Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आठव्या ब्रिक्स परिषदेनंतर पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेले निवेदन


मान्यवर ,बंधू-भगिनी आणि प्रसारमाध्यमातील माझ्या मित्रांनो..

आठव्या ब्रिक्स परिषदेचा नुकताच समारोप झाला आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, जेकब झुमा, तेमेर आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे गोवा या सुंदर राज्यात स्वागत करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे.

या परिषदेच्या तीन महत्वाच्या बैठकांमध्ये आमच्यात आज झालेली चर्चा अतिशय विस्तृत, फलदायी आणि महत्वाची होती.

सकाळच्या बैठकीत आम्ही अनेक जागतिक मुद्द्यांवर स्वत:ची मते मांडली. यात दहशतवाद, जागतिक आर्थिक परिस्थिती आणि जागतिक प्रशासनाच्या संरचनेत बदल करण्याची गरज अशा विषयांचा परामर्ष घेण्यात आला. त्याचवेळी आम्ही सध्याच्या ब्रिक्स सहकार्याचाही आढावा घेतला.

परिषदेच्या संपूर्ण सत्रात आम्ही भविष्यात ब्रिक्स परिषद अधिक व्यापक करण्याची संधी आणि कल्पनांविषयी प्रामुख्याने चर्चा केली.ही चर्चा सकारात्मक, उपयुक्त आणि भविष्याचा वेध घेणारी होती.सध्या आपण ब्रिक्सच्या दशकाभरातील वाटचालीचा आणि कामगिरीचा वेध घेत असताना ही चर्चा औचित्याची होती.

आम्ही आताच ब्रिक्स व्यापारी परिषदेचे सत्रही यशस्वीरीत्या पूर्ण केले.

ब्रिक्सच्या नव्या विकास बँकेने गेल्या वर्षाभरात केलेल्या कामगिरीचा गोषवारा आताच आम्ही बँकेच्या अध्यक्षांकडून ऐकला. ब्रिक्स देशांमधील परस्पर सहकार्य आणि समन्वय वाढावा या हेतूने तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेषक दृष्टीकोन असलेला गोवा जाहीरनामा सर्व सदस्य राष्ट्रांनी स्वीकारला आहे, हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे.

बंधू आणि भगिनींनो,

गोवा ब्रिक्स परिषदेमध्ये सदस्य राष्ट्रांचे सर्वाधिक लक्ष वेधून घेणाऱ्या एका विषयाबद्दल मला बोलायचे आहे. आज केवळ काही प्रदेशांनाच नाही, तर संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या दहशतवाद, कट्टरतावाद आणि मूलत्तत्ववाद या समस्या जागतिक शांतता. स्थैर्य आणि प्रगतीला मारक ठरल्या आहेत , यावर आम्हा सर्व सदस्य देशांचे एकमत झाले. संपूर्ण मानवजातच यामुळे धोक्यात आली आहे. हा धोका दूर करण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकत्रित येऊन निश्चित भूमिका घेत काम करण्याची गरज आहे , हे ही सर्वानी मान्य केले.

दहशतवादाला निधी पुरवणाऱ्या स्त्रोतांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य समन्वय निर्माण करणे, दहशतवादी कारवायांसाठी वापरली जाणारी आयुधे, मग त्यात शास्त्र पुरवठा, अस्त्र, उपकरणे आणि दहशतवाद्यांना प्रशिक्षण अशा सर्वांची साखळी तोडून ती नष्ट करायला हवी.

जे दहशतवादाला खतपाणी घालतात, त्याला आसरा देतात, पाठींबा देतात, प्रोत्साहन देतात , ज्यांच्या भूमीवरून दहशती कारवाया आणि हिंसा केली जाते हे सगळे घटक दहशतवाद्याइतकेच धोकादायक आहेत, यावर सर्व सदस्य राष्ट्रांनी सहमती व्यक्त केली.

जागतिक आव्हानाच्या या अतिशय गंभीर मुद्यावर विचार आणि कृती या दोन्ही बाबतीत सराव देशांनी दाखवलेल्या एकीविषयी भारताला अतिशय समाधान, आहे हे मी इथे नमूद करतो.

या परिषदेमध्ये दुसरा महत्वाचा विषय होता, तो म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा रुळावर आणणे २००८ च्या जागतिक मंदीनंतर जगाचे अर्थाविश्व सावरण्यात ब्रिक्स देशांचे महत्वाचे योगदान होते, त्याविषयी यावेळी चर्चा झाली.

दीर्घ कालावधीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये देशांनी अधिकाधिक गुंतवणूक करावी, स्थूल- आर्थिक धोरणात समन्वय निर्माण करावा ,अर्थव्यवस्थेचा वेग वाढवावा, जागतिक व्यापार आणि उत्पादनाला प्रोत्साहन द्यावे, असे सगळे निर्णय आर्थिक क्षेत्रात राबवायला हवेत , असे आम्हाला वाटते.

बहुपक्षीय जागतिक व्यापार संरचनेत जागतिक व्यापारी संघटनेची मध्यवर्ती भूमिका असावी यावर आम्ही भर दिला. आर्थिक विकास आणि पर्यावरण संरक्षण यात समतोल साधण्याची गरज आहे, हे ही यावेळी लक्षात घेतले गेले. परीस हवामान बदल कराराच्या अंमलबजावणीचे आम्ही स्वागत केले आहे. जगातील सर्वात आद्य पर्यावरणवादी महात्मा गांधी यांच्या जयंतीला , म्हणजे २ ऑक्टोबरला आम्ही या कराराला मान्यता दिली , हे सांगताना मला अतिशय अभिमान वाटतो आहे.

ब्रिक्सचे नेते म्हणून, विकासाचा अजेंडा प्रबावीपणे राबवण्यासाठी ब्रिक्सची संस्थात्मक बांधणी करण्यावर भर द्यावा यावर सर्व राष्ट्रांनी सहमती व्यक्त केली. नव्या विकास बँकेने एक वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन केले.

या विकास बँकेने पायाभूत प्रकल्प, तंत्रज्ञान आणि शाश्वत उर्जा क्षेत्रावर भर द्यायला हवा, असे विचार आम्ही मांडले. तसेच, ब्रिक्स कृषी संशोधन केंद्र मंच, ब्रिक्स रेल्वे संशोधन नेटवर्क, ब्रिक्स क्रीडा परिषद आणि युवकांशी संबंधित उपक्रम राबवले जावेत, यावर सर्वच राष्ट्रप्रमुखांनी भर दिला.जागतिक वित्तीय आणि आर्थिक सुधारणांना ब्रिक्सने प्रोत्साहन दिले पाहिजे, तसेच आंतराराष्ट्रीय नाणेनिधीत विकसनशील आणि उगवत्या अर्थव्यवस्थाचा सहभाग वाढवायला हवा, यावरही सर्वसहमती झाली. जागतिक वित्तीय संरचनेतील दरी भरून काढण्याच्या दृष्टीने ब्रिक्सची स्वतःची पतमानांकन संस्था लवकरात लवकर सुरु करावी, असा प्रस्ताव यावेळी मान्य करण्यात आला.

जी २० गटात ब्रिक्स राष्ट्रांमधील समन्वय वाढावा यालाही मान्यता देण्यात आली. ब्रिक्स देशांमधल्या नागरिकांमध्ये परस्पर संबंध वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, यावरही चर्चा झाली. याचाच भाग म्हणून ब्रिक्स देशांतर्गत आम्ही वर्षभर १०० वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत. शांतता आणि सुरक्षा या दोन्ही मुद्द्यांवर परस्पर सहकार्य वाढवावे यासाठी ब्रिक्स कटिबद्ध आहे.

बंधू आणि भगिनीनो,

ब्रिक्स राष्ट्रे बीम्सटेक देशांपर्यंत पोहोचणे , ही गोवा ब्रिक्स परिषदेची उल्लेखनीय कामगिरी म्हणता येईल. बांगलादेश, भूतान , म्यानमार , नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड या सर्व देशांचे प्रमुख आज येथे आले आहेत. हे सर्व देश आणि भारत मिळून बीमस्टेक ची स्थापना झाली आहे. बीमस्टेक गटातील राष्ट्रप्रमुख आठव्या ब्रिक्स परिषदेचे खास पाहुणे आहे.

ब्रिक्स आणि बिमस्टेकची एकत्र परिषद आजच या सत्रानंतर होणार आहे.

ब्रिक्स आणि बिमस्टेक नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन परस्पर संबंध आणि भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी ही अतिशय उत्तम संधी आहे. जगभरातील दोन तृतीयांश लोकसंख्या असलेल्या ब्रिक्स आणि बिमस्टेक संघटना एकत्र येऊन आपल्या जनतेसाठी अनेक गोष्टी करू शकतो. शेवटी , आठवी ब्रिक्स परिषद यशस्वी करण्यासाठी या सर्व राष्ट्राप्रमुखांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.

धन्यवाद !

खूप खूप धन्यवाद !!

B.Gokhale/R.Aghor/Anagha