Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुजरात येथील सरदार सरोवर धरण राष्ट्रार्पण कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशुन केलेले भाषण


भारत माता की जय !

भारत माता की जय !

प्रचंड संख्येनं उपस्थित राहिलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

दभोईला मी खूपवेळा आलो आहे. कधी बसने येत होतो, कधी स्कूटरवरून येत होतो, कधी कार्यकर्त्‍यांची बैठक घेत होतो, कधी सार्वजनिक सभेमध्ये भाषण करत होतो. आपल्याशी संबंधित कितीतरी आठवणी आहेत. परंतु दभोईमध्ये असे विराट जनसमुहाचे दृश्य यापूर्वी कधी पाहिले नाही. आज जमलेला विराट जनसागर म्हणजे माता नर्मदेविषयी असलेल्या भक्तीचे  प्रतीक आहे.

आज विश्वकर्मा जयंती आहे. भारतामध्ये प्राचीन काळापासून हाताने काम करतात, घाम गाळतात, श्रम करतात, निर्माणाचे कार्य करतात, तंत्रज्ञानी असेल, अभियंता असेल, मिस्त्री असेल, चुना आणि सिमेंटचे काम करणारे असतील, जे कोणी स्थापत्याच्या कामाशी जोडले गेलेले असतील त्या सगळ्यांना भारतामध्ये विश्वकर्माच्या रुपामध्ये पाहिले जाते. आज अशा विश्वकर्माच्या जयंतीचा योग आहे, आणि म्हणूनच यापेक्षा मोठा, चांगला सुयोग नाही. विश्वकर्म जयंतीदिनी, विश्वकर्माचे उपासक, ज्या ज्या लोकांनी या सरदार सरोवर धरणाची निर्मिती केली आहे, त्या सगळयांचे , त्यांनी केलेल्या परिश्रमाचे स्मरण करून, त्यांच्या कठोर साधनेचे पुण्यस्मरण करून, माता भारतीला हिंदुस्तानची एक मोठी, “सरदार सरोवर धरणाची” भेट देण्याचे सौभाग्य मिळाले आहे.

बंधू आणि भगिनींनो, इथं मला आज माझ्या वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा दिल्या जात आहेत. ज्या ज्या लोकांनी शुभेच्छा दिल्या आहेत, त्यांचे मी अगदी मनापासून आभार मानतो. आणि वाढदिवसाबरोबरच ज्या भावना प्रकट केल्या आहेत, त्या भावनांना अनुकूल असे स्वतःला अधिक चांगले बनवण्यासाठी आणि प्रत्येक क्षण आपल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी जगण्यासाठी मोठ्या पराकाष्ठेने  अतिशय परिश्रम करण्यामध्ये कोणतीही कसर सोडणार नाही.

 

जगणार तर आपल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी, परिश्रम करणार तेही आपल्या स्वप्नांसाठी, आणि आपली स्वप्ने साकार व्हावीत, त्यासाठी सव्वाशे कोटी देशवासियांची शक्ती एकजूट करून एका नवभारत, एक न्यू इंडिया, आपण मिळवूनच थांबणार आहे.

एक गांधी, अगदी किरकोळ शरीरयष्टीचे गांधी, साबरमतीच्या आश्रमामध्ये साधना करीत-करीत देशवासियांच्या स्वातंत्र्यासाठी काम करू शकतात, तर माता नर्मदेच्या आशीर्वादाने, साबरमतीच्या आशीर्वादाने, देशाच्या वीर पुरुषांच्या त्याग-तपस्येच्या आशीर्वादाने, या देशाच्या महापुरुषांच्या साधनेच्या आशीर्वादाने, सव्वाशे कोटी देशवासी, स्वातंत्र्याची 75 वर्षे झाली म्हणून एका नव्या भारताचे निर्मातीसाठी कोणतीही कमतरता ठेवणार, असा माझा पूर्ण विश्वास आहे.

बंधू, भगिनींनो, हे सरदार सरोवर धरण…. आज भारताचे लोहपुरूष, सरदार वल्लभभाई पटेल यांचा आत्मा जिथं कुठे असेल, आपल्या सर्वांना अनेक आशीर्वाद देत असेल. दीर्घदृष्टा कोणाला म्हणतात? 71 वर्षे आधी, स्वातंत्र्यापूर्वी, माझ्याही जन्माच्या आधी, आपल्यापैकी अनेकांच्याही जन्माच्या आधी, सरदार पटेल साहेबांनी सरदार सरोवर धरणाचे स्वप्न पाहिले होते. 

देश स्वतंत्र झाला. मी आज मोठ्या विश्वासाने सांगू इच्छितो की, दोन महापुरूष आणखी काही वर्षे जिवंत राहिले असते, तर हे सरदार सरोवर धरण 60-70च्या दशकामध्येच बनले असते. आणि पश्चिमेकडील सगळी राज्ये सुजलाम, सुफलाम बनली असती. हिरवीगार झाली असती. हिंदुस्तानच्या अर्थजगतामध्ये तर एक अभूतपूर्व सामथ्र्य देण्याचे सौभाग्य पश्चिमेच्या या राज्यांना मिळाले असते. या दोन महापुरुषांपैकी एक होते- सरदार वल्लभभाई पटेल. ज्यांनी नर्मदा नदीचे महात्म्य, सामथ्र्य, गुजरातची आवश्यकता, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान यांचे जीवन एक माता नर्मदा कशी बदलू शकते, याचे स्वप्न उराशी बाळगले होते. दूरदृष्टीने या प्रकल्पाची कल्पना केली होती. आणि दुसरे महापुरूष होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ज्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास  करण्याची संधी मिळाली आहे, ते पाहू शकतात, की भारतामध्ये जलक्रांतीसाठी, जलशक्तीसाठी, जलमार्गांसाठी, सागरी सामर्थ्यसाठी, मंत्रिमंडळाने आपल्या अल्पकाळामध्येही जेवढ्या योजना आणल्या, जितक्या कल्पना पूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केल्या होत्या, कोणत्याही सरकारला इतक्या कामाविषयी विचार करणेही  कदाचित अवघड आहे. ज्या कामांचा बाबासाहेबांनी विचार केला होता, तसा विचार करणे कोणत्याही सरकारला कदाचित जमेल.

जर हे दोन्ही महापुरूष आणखी काही वर्षे जिवंत राहिले असते, तर आपल्याला त्यांच्या सेवेचा लाभ अजून काही वर्षे अधिक मिळाला असता. तर माझ्या प्रिय देशवासियांनो, आज महापुरामुळे ज्या राज्यांमध्ये हाहाकार उडतो, दुष्काळामुळे ज्या ठिकाणी शेतकरी मृत्यू पावतो, या सर्व प्रश्नांमधून देश बाहेर पडला असता आणि देशाने प्रगतीची नवी उंची कधीच गाठली असती. परंतु आपलं  दुर्दैव असं की, आपल्याला हे दोन्ही महापुरूष फार लवकर सोडून गेले. आज हे सरदार सरोवर धरण भारताला समर्पित केले जात आहे. सव्वाशे कोटी देशवासियांना समर्पित होत आहे. गांधी आणि सरदार यांच्या भूमीवरून समर्पित होत आहे. ज्या भूमीवर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात गायकवाड यांच्यामुळे एक नवे वळण आले होते, त्या भूमीवरून समर्पित होत आहे. देशाच्या नव्या क्षमतेचे हे एक प्रतीक बनणार आहे. या विश्वासाबरोबरच आज या सर्व महापुरुषांचे स्मरण करून ही भव्य-दिव्य योजना आपणा सर्वांच्या चरणावर समर्पित करीत आहे. देशवासियांना समर्पित करीत आहे. माता भारतीला समर्पित करीत आहे.

बंधू, भगिनींनो, योजना बनणे, योजना पूर्ण होणे हे तर खूप स्वाभाविक आहे. परंतु हिंदुस्तानामध्ये जितका त्रास माता नर्मदेला सहन करावा लागला, या योजनेला सहन करावा लागला, ही योजना थांबवण्यासाठी दुनियेत असलेल्या सगळî शक्तींनी प्रयत्न केला. जागतिक बॅंक असेल, त्यांनीही निर्णय घेतल की, सरदार सरोवर धरणाला पैसा द्यायचा नाही. भारतामध्ये हजारो कोटी रुपयांची प्रचंड मोठी योजना आर्थिक मदतीशिवाय नाही बनू शकत. आणि त्याच जागतिक बॅंकेने सांगितले की, ही योजना पर्यावरणाच्या विरोधात आहे. चुकीच्या प्रचाराचे वादळ उठवणा-या  मंडळींनी सगळीकडे खोट्या गोष्टी पसरवल्या होत्या. बंधू, भगिनींनो, आम्ही निर्धार केला. बरोबर जागतिक बॅंक आहे किंवा जागतिक बॅंक नसेलही, आम्ही भारताच्या घामाने सरदार सरोवर धरण बनवणारच. आणि आज -आज हे बनवले आहे.

ज्या जागतिक बॅंकेने पर्यावरणाच्या नावाखाली सरदार सरोवर धरणाला मदत करण्याला नकार दिला होता. 2001मध्ये कच्छच्या भूकंपानंतर त्या प्रदेशामध्ये पुनर्निमाणाचे काम झाले. आणि ते पर्यावरणस्नेही झाले. पर्यावरण संवर्धन, सुरक्षेचा विचार करून विकासाचे काम झाले. त्याच जागतिक बॅंकेने गुजरात भूकंपानंतरच्या कामाला जागतिक बॅंकेचा पर्यावरणपुरक कामाचा पुरस्कार दिला. जागतिक बॅंकेला हरित पुरस्कार गुजरातला देणेच भाग पडले.

बंधू, भगिनींनो, जर एकदा का हिंदुस्तानच्या लोकांनी संकल्प केला तर ते दुनियेच्या कोणत्याही आव्हानांना ते आव्हान देण्याचं सामर्थ्य या देशात आहे. आणि त्याचाच हा परिणाम आहे. सरदार सरोवर धरणाचे काम, कधी  कधी आपल्या देशामध्ये राज्यांची शक्ती, राज्यांची आव्हाने, यांची खूप चर्चा होत असते. तुलनात्मक अभ्यास होत असतो. परंतु पश्चिम भारतातले काही राज्ये, जर स्वातंत्र्यानंतरचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल, या क्षेत्राचा  विकासामध्ये जास्तीत जास्त अडथळा निर्माण झाला आहे तो पाण्यामुळे! पाण्याचे दुर्भिक्ष्य, पशु असेल, माणूस असेल, आपले शेतशिवार सोडून, गाव सोडून 200- 200, 400-400 किलोमिटर दूर चालत जात होते. जिथे पाणी मिळेल, तिथेच 4-6 महिने दिवस काढत होते. आणि ज्यावेळी पाऊस पडत असे, त्यावेळी पुन्हा परत येत होते.  कधी कोेणी या दुःखद,त्रायदायक आयुष्याची कल्पना आहे आहे का?

ज्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून कार्य करत होतो, सीमेवर  जाण्याची माझी सवय होती. बीएसएफचे जवान असतील, सेनेचे जवान असतील, मी दिवाळी त्यांच्याबरोबर साजरी करीत होतो. असेच एकदा गुजरातच्या सीमेवर जाऊन बीएसएफच्या जवानांबरोबर बसलो होतो. तर दिसले बीएसएफचे जवान प्यायचे पाणी, शेकडो उंटांवर लादून आणत होते. असे पाणी आणल्यावर वाळवंटामध्ये देशाची सुरक्षा करत असलेल्या आमच्या जवानांना पिण्यासाठी पाणी मिळत होते. त्या वेदना मी खूप जवळून अनुभवल्या आहेत. आणि आता ज्या सरदार सरोवर धरणाचे काम पूर्ण होत आले, त्यावेळी मनात एक इच्छा जागृत झाली की, मी भारत आणि पाकिस्तान सीमेवरच्या माझ्या बीएसएफच्या जवानांना, जे बिना पाण्याचे वाळवंटामध्ये उभे आहेत, मी नर्मदेचे पाणी त्यांच्यापर्यंत नेता येईल. 700किलोमीटर दूर जलवाहिनी टाकली. अनेक वर्षांपासून, दशकांपासून उंटावरून पाणी वाहून न्यावे लागत होते. आणि मगच माझ्या देशाचे रक्षण करत असलेल्या जवानाला पाणी प्यावयास मिळत होते. ज्या दिवशी मी पाणी घेवून, नर्मदेचे पाणी घेवून पोहोचलो, मी बीएसएफच्या जवानांना झालेला आनंद त्यांच्या चेह-यावर पाहिला होता. हे एक अभियांत्रिकी आश्चर्य होते. आपण इथून पाणी उचलून 700 किलोमीटर दूर अंतरावर नर्मदेचे पाणी पोहोचवले आणि पोहोचवण्यासाठी पाण्याला कधी कधी तर 60 मजले उंचावर नेवून पुन्हा खाली आणि पुढे न्यावे लागले.

बंधू, भगिनींनो, पूर्ण सरदार सरोवर धरण एक अभियांत्रिकी आश्चर्य आहे. कालव्यांचे जाळे अभियांत्रिकी आश्चर्य आहे. आणि मी तर देशाच्या स्थापत्य शास्त्रज्ञ, अभियंते, बांधकाम संरचना करणारे, बांधकाम करणारे अभियंते, विद्युत कार्य करणारे अभियंते, या सगळ्या  विद्यार्थ्‍यांना  आग्रह आहे की, आपल्या अभ्यासामध्ये एक प्रकल्प म्हणून या धरणाच्या कामाचा अभ्यास करावा. भविष्यामध्ये निर्माण कार्यासाठी कशा पद्धतीने नवीन दिशा मिळू शकते, हे समजून घेण्याची त्यामुळे त्यांना संधी मिळणार आहे.

बंधू, भगिनींनो, हा गुजरातच्या नाही, तर हा मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यातल्या कोट्यवधी शेतक-यांचे भाग्य बदलून टाकणारा प्रकल्प आहे. गुजरातने याचे नेतृत्व केले आहे. आणि बंधू, भगिनींनो, आम्ही प्रयत्न केला. संपूर्ण दुनियेत आमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला गेला. नाही नाही ते खोटे आरोप लावण्यात आले. माता नर्मदेच्या या योजनेला रोखण्यासाठी अनेक षड्यंत्र रचण्यात आले. परंतु आम्ही नेहमीच एक गोष्टी केली. हा काही राजकीय विषय बनू द्यायचा नाही, हे ठरवले, आणि तसेच केले. आज 21व्या युगातली भावी पिढीच्या भाग्याचा निर्णय होणार आहे. म्हणूनच राजकारणाची भाषा करणा-या लोकांशी आम्ही आपला संबंध जोडणार नाही.

बंधू, भगिनींनो मी आजही या गोष्टींचे पालन करीत आलो आहे. कितीतरी समस्या आल्या, कोणी कोणी प्रश्न निर्माण केले, याचा सगळा लेखाजोखा माझ्याकडे आहे. परंतु असे राजकारण मला करायचे नाही. त्या मार्गाला मला जायचे नाही.

मी पाहिले आहे, गुजरातचे साधू-महात्मा, अध्यात्माचा संदेश देण्याचे ज्यांचे जीवनकार्य होते. परंतु ज्या ज्यावेळी सरदार सरोवर नर्मदा योजनेचा विषय निघत असे, गुजरातचे संतगण, त्यांनी  काम लवकर करण्यासाठी मदत देवू केली. विरोधकांच्या विरोधात संघर्ष सुरू केला. धरणाला विरोध केला जावू नये म्हणून उपोषणाला बसले. इतकेच नाही तर ज्यावेळी जागतिक बॅकेने निधी देण्यासाठी मनाई केली त्यावेळी गुजरातमधल्या मंदिरांनीही सरदार सरोवर धरणासाठी निधी दिला. आणि मग आता हे  धरण बनले. आणि म्हणूनच हा कोण्या एका दलाचा, कोणा एका सरकारचा कार्यक्रम आहे, असे आम्ही कधीच मानत नाही. हा कोटी कोटी जनतेचा कार्यक्रम आहे. पाण्यासाठी तहानलेल्या लोकांच्या संकल्पाचा हा कार्यक्रम आहे. आणि हे पाणी गुजरातच्या भूमीला, सुकलेल्या भूमीचा आहे.

बंधू, भगिनींनो प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही क्षण येत असताता की त्या क्षणाला ती व्यक्ती खूप भावूक होते. माझ्या जीवनातही माता नर्मदेसाठी काहीही करण्याचा क्षण  मला भावूक बनवणारे आहेत. कारण मी पाहतो, की माझी भूमाता, ही सुकलेली, शुष्क झालेली माझी भूमाता, पाण्याच्या एका एका थेंबासाठी आसुसलेली आहे. अशा तहानलेल्या भूमातेला नर्मदेचे पाणी हा पुत्र देतो आहे. त्या पुत्रसाठी यापेक्षा भावूक क्षण दुसरा कोणता असू शकणार आहे? माझ्या राज्यातल्या कोट्यवधी माता, कन्या शिक्षण सोडून, डोक्यावर पाण्याचे हंडे घेवून तीन-तीन किलामीटर प्यावयाच्या पाण्यासाठी पायपीट करत जातात. 6वर्षाची, 8 वर्षाची, 10 वर्षाची कन्या आपल्या आईला पाणी आणण्यासाठी मदत करते. शिक्षण सोडतात. आज ज्यावेळी या माता नर्मदेचे पाणी त्यांना समस्येतून कायमचे मुक्त करणार आहे, त्यावेळी या कोट्यवधी मातांचा आशीर्वाद माझ्यासारख्या मुलाला मिळणार आहे. यापेक्षा मोठा भावूक क्षण कोणता असू शकतो?

ते मुके प्राणी, मानवजातीच्या सेवेसाठी त्यांचे शरीर काम करते. हे मुके प्राणी माणसांना प्यावयासाठी पाणी हवे आहे म्हणून 200-200 किलोमीटर चालत जातात. आज ज्यावेळी नर्मदेचे पाणी या वाळवंटात पोहोचेल, त्यावेळी त्यांना हिरवा चारा मिळू शकणार आहे. मुक्या प्राण्यांचेही पाणी वाहून नेण्याचे कष्ट आता संपणार आहेत. त्या मुक्या प्राण्यांनाही पाणी मिळणार आहे. अबोल पशूही ज्यावेळी आशीर्वाद देतील तर भारत मातेच्या पुत्राच्या रुपामध्ये या कोटी कोटी पशुंचा आशीर्वादही माझ्यासाठी भावूक होण्याचा सर्वात मोठा क्षण असणे स्वाभाविक आहे.

बंधू, भगिनींनो मी काही वाढदिवस साजरा करणा-या लोकांमध्ये मोडत नाही. परंतु वाढदिनी विश्वकर्मा जयंती आहे आणि कोट्यवधी लोकांचे भाग्य निर्माण करण्याचा असा क्षण शतवर्षांमधून येत असतो. असा भाग्याचा क्षण इतक्या वर्षात माझ्या जीवनात कधीच आला नाही. असा क्षण आज गुजरातने मला दिला आहे.

बंधू, भगिनींनो विकासाचे हे एक मोठे उदाहरण आहे. ज्ञानी लोक याचा अभ्यास करतील. अगदी नेमका किती उपयोग झाला? असं सांगतात की, काश्मीर ते कन्याकुमाारी आणि कांडला ते कोहिमा, आठ मीटर रूंदीचा सिमेंट कॉंक्रीटचा रस्ता बनवला, हिमालयापासून ते समुद्रापर्यंत आणि कांडला ते कोहिमापर्यंत आठ मीटर रूद सिमेंट कॉंक्रीटचा रस्ता बनवला तर त्याला किती कॉंक्रीट लागेल, तितकेकॉंक्रीटचा या प्रकल्पाला लागले आहे. भाइ्रसाहेब, काय करावं लागलं नाही? आणि म्हणूनच बंधू, भगिनींनो हे नर्मदेचं पाणी आहे. हे काही साधं पाणी नाही. पारस आहे, पारस. आणि ज्यावेळी पारसचा स्पर्श लोखंडाला होतो, त्यावेळी लोखंडही सोनं बनते. त्याप्रमाणेच हे पारसरूपी माता नर्मदेचा स्पर्श भूमीच्या ज्या कोनाला होणार आहे, तो भाग स्वर्णिम होणार आहे. बंधू, भगिनींनो. आणि म्हणूनच भारताच्या स्वर्णिम भाग्याचे काम या नर्मदामयी पारसरूपी मातेव्दारे होणार आहे, हे मला दिसत आहे.

बंधू, भगिनींनो बळीराजाचे भले होणार, पिण्यासाठी  पाणी मिळणार, गुजरातमध्ये आर्थिकक्रांती येणार. परंतु आमच्या देशामध्ये पहा, पश्चिम भारत पाण्यासाठी आसुसलेला आहे. आणि पूर्वेकडील भारताला विकासासठी वीज हवी आहे. गॅस हवा आहे. आणि आपण पाहिलं आहे की, आम्ही केंद्रात आहोत. केंद्रामध्ये सेवा करण्याची संधी तुम्ही दिली आहे. आम्हाला भारताचा संतुलित विकास करायचा आहे. पश्चिमेला पाणी मिळावे आणि पूर्वेला वीज मिळावी, गॅस मिळावा. माझा पूर्व भारतही मजबूत झाला पाहिजे. माझा पश्चिम भारतही ताकदवान झाला पाहिजे. आणि माझ्या भारत मातेच्या दोन्ही बाहू सामथ्र्यवान बनल्या पाहिजेत. अशा योजनेवर आम्ही काम करीत आहोत.

बंधू, भगिनींनो हे सरदार सरोवर धरण काही कोणत्या एका राज्याचे नाही. मला अगदी चांगले स्मरण  आहे. ज्यावेळी राजस्थानला पाणी दिलं, सरदार सरोवर धरणातून राजस्थानला पाणी दिलं, त्यावेळी वसुंधराजी मुख्यमंत्री होत्या. भैरोसिंह शेखावत आणि जसवंतसिंहजी, भैरोसिंहजी भारताचे उपराष्ट्रपती होते. ते मला भेटायला आले होते. ते मला म्हणाले होते, भैरोसिंह आणि जसवंतसिंहजी म्हणाले होते,  मोदीजी राजस्थानला पाणी देण्याचा अर्थ मोदीजी तुम्हाला माहीत आहे का? त्यावेळी ते खूप भावूक झाले होते. आणि खूप मोठ्या मनाने ते म्हणाले, मोदीजी इतिहासाची पाने थोडी चाळून पहा. अगदी थोड्या पाण्यासाठी तलवारी चालत होत्या. लढाया होत होत्या. राज्या- राज्यात लढाई, पराजय होत असे. जय-विजयाचा इतिहास बनत होता. आणि आपण कोणताही संघर्ष नाही, कसलाही तणाव नाही, कसलाही वाद,तंटा नाही, कोणतेही आंदोलन नाही, थेट सरदार सरोवरातून नर्मदेचे पाणी राजस्थानच्या शुष्क भूमीला पाणी दिले. बाडमेर, पाकिस्तानच्या सीमेपर्यंत पाणी पोहोचवले? बंधू, भगिनींनो मी त्या दोन नेत्यांच्या डोळ्यामध्ये ती भावना पाहिली आहे. आणि मला खूप आनंद होतोय. ज्यांच्या दृष्टीने पक्षापेक्षा मोठा देश असतो, अशा लोकांना राज्य करण्याची संधी मिळाली, त्या त्यावेळी नर्मदा योजनेने प्रगती केली आहे, हे मी पाहिले आहे. आणि ज्यांच्यासाठी देशापेक्षाही आपला पक्ष मोठा वाटला, त्यावेळी नर्मदा योजनेच्या कामात अडथळे निर्माण झाले आहेत.

आज या धरणाचे काम पूर्ण झाले आहे. मी आदरपूर्वक मध्यप्रदेशच्या जनतेला, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चैहान यांना आदरपूर्वक धन्यवाद देवू इच्छितो. आज ही योजना पूर्ण होवू शकली, त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राची जनता, यांचे मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो. आज ही योजना परिपूर्ण झाली आहे. मी त्या माझ्या आदिवासी बंधू, भगिनींना आदरपूर्वक नमन करतो. ज्यांनी ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ असा विचार करून आपले जे काही आहे ते सोडण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. आणि येणारी सरकारे त्यांच्याकडे नेहमीच एका आदराच्या भावनेने पाहतील, असा माझा विश्वास आहे. त्यांच्या सुख-दुःखाची चिंता येणारी सरकारेही करतील, असा माझा पूर्ण विश्वास आहे. मी त्या माझ्या आदिवासी बंधू भगिनींना नमन करतो. ज्यांच्या त्यागामुळे, ज्यांच्या बलिदानामुळे आज ही भारत माता, तहानलेली माझी भारत माता, नर्मदेच्या पाण्यामुळे पुष्पीत, पल्लवित होणार आहे. यापेक्षा आयुष्यात मोठे सौभाग्य कोणते असू शकते?

बंधू, भगिनींनो, आपल्या देशात भारत बनवण्याचे भगिरथ कार्य सरदार साहेबांनी केले आहे. जर सरदार साहेब नसते तर देश विखुरला गेला असता, हे आपण चांगलेच जाणतो. काश्मीर वगळता संपूर्ण हिंदुस्तानला एक करण्याच्या  कामाची जबाबदारी सरदार साहेबांची होती. आणि त्यांनी ते काम करून दाखवले. आणि आज आपण एक भारत श्रेष्ठ भारत असे स्वप्न घेवून पुढे चाललो आहोत. परंतु स्वातंत्र्यानंतर या महापुरुषाचे कार्य देशाला ज्या पद्धतीने समजायला हवं होतं, ज्या रूपामध्ये या महापुरुषाची देशाच्या नव्या पिढीला प्रेरणा मिळायला पाहिजे होती, तशी काही कारणांनी मिळाली नाही.

 

मी आपलं पवित्र कर्तव्य मानतो की, हिंदुस्तानच्या येणा-या पिढ्यांमध्येही  सरदारसाहेबांचे नाव अमर राहिले पाहिजे. सरदारसाहेबांनी केलेले काम अमर राहिले पाहिजे. सरदारसाहेबांची प्रेरणा अमर राहिली पाहिजे. आणि कधी कधी प्रतिकात्मक गोष्टीही प्रेरणेला कारणीभूत बनतात. आणि त्याच स्वप्नाच्या पूर्तीचे काम मी करत आहे. तुम्हा लोकांना चांगलंच माहीत आहे की, मला लहान सहान काम पसंत नाहीच पडत. मी कधी लहान विचार करत नाही की छोटे काम मी कधी करत नाही. सव्वाशे कोटींचा देश माझ्याबरोबर असताना, सव्वाशे कोटी देशवासियांची स्वप्नं असताना तर मला लहानसे स्वप्न पाहण्याचा अधिकारही नाही. आणि म्हणूनच सरदारसाहेब का भव्य पुतळा बनवण्याचा निर्णय केला तो मनानं ठाम निर्धार केला की, हा पुतळा दुनियेमध्ये सर्वात उंच , मोठा असणार. एकूण जवळपास 190 मीटर आणि पुतळा 182 मीटर उंच असणार आहे. अमेरिकेमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ म्हणजे स्वातंत्र्याचा पुतळा आहे. सरदारसाहेबांचा पुतळा ‘स्टॅच्यू ऑफयुनिटी’ म्हणजे एकतेचा पुतळा असणार आहे. अमेरिकेच्या  ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ पेक्षा सरदारसाहेबांचा पुतळा दुप्पट उंच असणार आहे.

तुम्ही कल्पना करू शकता. संपूर्ण दुनियेतून अमेरिकेला ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ पाहण्यासाठी जातात. आपल्याकडे दक्षिण गुजरातमध्ये गेले तर सापुतारा आहे, सौराष्ट्रमध्ये जावे तर गिरीचे सिंह आहेत. कच्छमध्ये गेले तर उत्तम वाळवंट आहे. उत्तरेकडे गेले जर माता अंबा आहे. थोडे पुढे गेले तर माउंट आबू आहे. परंतु या एका क्षेत्रामध्ये पर्यटनाच्या अनेक संधी निर्माण करण्याची आवश्यकता होती. आणि म्हणूनच, बंधू भगिनींनो, सरदार पटेल यांचा हा पुतळा, तुम्ही  लक्षात ठेवा, माझे शब्द अगदी लिहून ठेवा, दररोज लाखो लोक इथं येतील. पर्यटनाचे एक मोठे आकर्षक केंद्र येथे होईल. इथे हजारो गावांना रोजी-रोटी कमावण्याचे एक साधन मिळेल. हे स्वप्न मी पाहिले आहे.

आणि इथेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी  आपले प्राण देणारे लोक होवून गेले आहेत. काही लोकांना वाटतं की, मुठभर लोकांनीच देशा स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे. मुठभर लोकांनीच बलिदान दिलं. आणि गीतही काही लोकांनीच गायली आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचे विस्मरण झाले आहे. देशासाठी प्राणाची बाजी लावणा-या लोकांचे स्मरण करण्यासाठी काही लोक घाबरत आले आहेत. 1857 ते 1947 पर्यंत माझ्या आदिवासीयांनी प्रत्येक सत्तेविरूद्ध लढाई केली आहे. बलिदान दिले आहे. एकाच वेळी शंभर शंभर आदिवासींना इंग्रजांनी फासावर लटकवले आहे. तरीही ते कधीच झुकले नाहीत. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये हिंदुस्तानाच्या प्रत्येक राज्यात जिथे जिथे आदिवासी आहेत, ते स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये बलिदान देण्यात कधीच मागे राहिले नाहीत. लढ्याला प्रारंभ करण्यात त्यांनी  महत्वपूर्ण  भूमिका निभावली. माझ्या देशाच्या भावी पिढीला याची माहिती झाली पाहिजे. माझे आदिवासी बंधू जंगलामध्ये राहिले, डोंगर दरीमध्ये राहिले, त्यांच्याकडे अंगभर घालायला कपडाही नाही. तरीही माता भारतीच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देण्यासाठी ते कधी मागे राहिले नाहीत. त्यांचा गौरव झाला पाहिजे. भावी पिढीला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली पाहिजे. आणि म्हणून हिंदुस्तानात जिथे जिथे, ज्या ज्या राज्यांमध्ये आदिवासींनी 1857 -1947 या काळात स्वातंत्र्याच्या लढ्यात जे काही केलं आहे, त्याचे एक संग्रहालय बनवण्याची सरकारची इच्छा आहे.

देशाच्या भावी पिढीला आपल्या आदिवासियांविषयी गौरव वाटला पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे. माता भारतीसाठी प्राण देणारे त्यांचे पूर्वज आहेत, त्यांच्याविषयी श्रद्धेचा भाव असला पाहिजे. आणि म्हणून यासाठी हिंदुस्तानच्या सर्व राज्ये, जिथे जिथे आदिवासियांच्या पराक्रमांची गाथा आहे, तिथे एक असे आधुनिक, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केलेले व्हर्चुअल म्युझियम बनवण्यात येणार आहे. आज त्याचा प्रारंभ, शिलान्यास करण्याची संधी मला गुजरातच्या भूमीवर मिळाली आहे. हळू हळू हिंदुस्तानच्या सर्व राज्यांमध्ये या कल्पनेचा प्रसार होईल. मी याला माझ्या आयुष्यात मिळालेले सौभाग्य मानतो. आणि माझ्या त्या वीर आदिवासियांचा भगवान बिरसा मुंडापासून ते आमच्या जाम्बुघोडाच्या नायका समाजापर्यंतच्या प्रत्येकाला श्रद्धा आणि आदराने नमन करतो. आज या संग्रहालयाचेही शिलान्यास करण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे. आणि आगामी काळात याचाही लाभ मिळणार आहे.

हे संपूर्ण सरदार सरोवर धरण, जलक्रीडांसाठी, साहसी जलक्रीडा प्रकारांसाठी, पुनर्निमितीसाठी, पर्यटनासाठी एक मोठे केंद्र होणार आहे. ही जागा म्हणजे गुजरातची सर्वात जास्त आर्थिक व्यवहार होणारे केंद्र बनणार आहे. इथे कालपर्यंत जंगल होते, रोजीरोटी कमावण्यासाठी शहरांमध्ये भटकंती करावी लागत होती. आता हीच रोजीरोटी घराच्या समोरच कमावता येणार आहे. बडोद्यापासून ते भडोचपासून रस्त्यांची कामे, रेलमार्गाची कामे, वेगवान गाड्या यांच्यासाठी मार्ग बनवण्याची कामे होणार आहेत. यामुळे पर्यटक येवू शकणार आहेत. हिंदुस्तानचे एक महत्वपूर्ण पर्यटन केंद्र येथे बनणार आहे. एक आग्रा इथे ताजमहाल अनेक वर्षांपूर्वी बनला होता. आजपर्यंत आपण दुनियेला फक्त ताजमहाल दाखवत आलो आहोत. बंधूंनो, हिंदस्तानच्या प्रत्येक कानाकोप-यात दुनियेला देण्यासारखे, दाखवण्यासारखे खूप काही आहे. हे सरदार सरोवर धरण, हा सरदार पटेल यांचा पुतळा, हे आदिवासियांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे संग्रहालय, हे देश आणि दुनियेतील पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनणार आहे.

अशा या महत्वपूर्ण कार्यक्रमाचा शुभारंभ आज होत आहे. धरण लोकार्पण केले जात आहे. मी आज सरदारसाहेबांच्या पुतळ्याच्या कामाचेही तपशीलवार परीक्षण केले. ज्या वेगाने काम सुरू आहे, ज्या प्रकारे तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे, ते शिकून- समजून घेतल्यासारखे वाटले.

आज देशवासियांना खरोखरीच एक अमूल्य भेट देताना  माझ्या मनात खूप गर्वाची आणि आनंदाची भावना निर्माण झाली आहे. मी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे  आणखी एका कामासाठी अभिनंदन करू इच्छितो. काही दिवसांपूर्वी, सगळया ना माहीत असेल की, नर्मदा माता डोंगरांवरून खाली येत नाही, तर जंगलांमधून येते. आणि म्हणून नर्मदा मातेसाठी जंगलांना हिरवेेगार करण्याची मोहीम मध्यप्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी सुरू केली आहे. जवळपास 8-9 महिने पदयात्रा केली. करोडो वृक्ष लावण्याचे अभियान चालवले. या करोडो वृक्षांच्या माध्यमातून त्यांनी येणा-या शंभर वर्षात नर्मदेचे पाणी कधीच कमी होणार नाही, यासाठी संकल्प केला आहे. मी मध्यप्रदेशची जनता, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री, यांनी हे पवित्र कार्य सुरू केले आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. नदी बचावाचे अशाप्रकारे कार्य या देशात यापूर्वी असे कदाचित झाले नसेल. आज मी पाहतो, आपल्या देशातले अनेक संत, अनेक संस्था नदी बचावासाठी मोहीम राबवत आहेत. त्याग-तपस्येबरोबर जात आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी देशात प्रयत्न होत आहेत. असे प्रयत्न करणारे अनेकजण अभिनंदनास पात्र आहेत. आणि म्हणून या महत्वपूर्ण कार्यासाठी मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो.

बंधू, भगिनींनो, काल रात्री मी दिल्लीवरून निघालो, त्यावेळी एक दुःखद बातमी समजली. आपल्या देशाचे एक वीर सैनिक, वीर सेनापती आणि आपल्या देशाचे मार्शल श्रीमान अर्जुन सिंह, 1965 च्या लढाईमध्ये ज्यांचे नाव आहे, असे एक वीर योद्धा,  98 वर्षे वय. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये आम्ही भेटलो होतो. संपूर्ण युनिफॉर्ममध्ये ते येत होते. चाकांच्या खुर्चीवरून यावं लागत होतं. आणि ते पाहता क्षणी उभे राहून सॅल्यूट करीत असत. मी त्यांना विनंती करीत असे, मार्शल आपण उभे नाही राहिले पाहिजे. परंतु ते, एक असे जवान होते, शिस्त त्यांच्या रक्तामध्ये जणू भिनली होती. ते लगेच खाडकन् उठून उभे रहात होते.

काल त्यांना ह्दय विकाराचा तीव्र झटका आल्याचे समजले. मी त्यांना भेटायला रुग्णालयामध्ये गेलो. भावना, जोश तोच होता. शरीर सहकार्य करीत नव्हते. परंतु रक्तामध्ये भिनलेली शिस्त त्यामुळे होणारी तडफड त्यांच्याकडे पाहताच दिसत होती. असा एक वीर यौद्धा, वीर सैनिक आज आपण हरपून बसलो आहोत. मी त्यांना आदरपूर्वक नमन करतो. त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या पराक्रमाचे हा देश सदैव स्मरण ठेवेल. आणि येणा-या पिढयांना त्यांच्याकडून प्रेरणा घेवून माता भारतीसाठी काही ना काही तरी करण्याचा संकल्प करेल. आणि 2022मध्ये नव भारत बनवण्याच्या दिशेने सिद्धी प्राप्त करेल.

या एका भावनेबरोबर मी पुन्हा एकदा गुजरात सरकारला धन्यवाद देतो. गुजरातच्या जनतेला धन्यवाद देतो. ज्यांचे या प्रकल्पामध्ये योगदान आहे त्या चारही सरकारांचे अभिनंदन करतो.  आणि घराघरामध्ये वीज पोहोचवण्यासाठी माता नर्मदाही कामी येत आहे. ती भूमीला सुजलाम, सुखलाम करेल, आपल्या घरांमध्येही प्रकाश पसरवेल. अशा माता नर्मदेला नमन करून आपल्या सर्वांना आग्रह करतो की, दोन्ही मुठी बंद करून मी म्हणतो, ‘नर्मदे’ तुम्ही म्हणा ‘सर्वदे’ आज माता नर्मदा आहे, तरच सर्व काही आहे.

नर्मदे-सर्वदे! पूर्ण ताकदीनिशी म्हणा,

नर्मदे-सर्वदे!

नर्मदे-सर्वदे! नर्मदे-सर्वदे!!

खूप खूप धन्यवाद.

पी.आई.बी./ बी.गोखले/एस.बेडेकर