Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात” द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद


माझ्या प्रिय देशवासीयांनो, आपणा सर्वांना नमस्कार. सुट्ट्यांच्या काळात अनेक गोष्टी करायचे आपण ठरवतो. कार्यक्रम आखतो आणि ह्या सुट्ट्यांच्या काळात हंगाम असतो आंब्याचा म्हणून मनात येते की, आंब्याचा आस्वाद घ्यावा, असेही वाटते की दुपारी थोडी वामकुक्षी करता आली, तर बरं होईल. पण यावेळी कडक उन्हाळ्याने चहूकडे हा आनंद हिरावून घेतला आहे. देशभरात काळजीचे वातावरण असणे हे स्वाभाविक आहे. आणि त्यातही जेव्हा सतत दुष्काळ पडतो तेव्हा जलसाठे आटतात. कधी कधी अतिक्रमणामुळे, कधी मार्ग अरुंद झाल्यामुळे, अडथळे आल्यामुळे येणाऱ्या जलप्रवाहात बाधा आल्यामुळे जलाशयात क्षमतेपेक्षा कमी जलसंचय होतो. आणि वर्षांनुवर्ष हेच होत राहिल्याने जलधारण क्षमता कमी होते. दुष्काळावर मात करण्यासाठी, पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी राज्य सरकारे आपल्या पातळीवर प्रयत्न करतात. हे असले तरीही मी पाहिले आहे की नागरिकही यासाठी खूप चांगले प्रयत्न करतात. अनेक गावांमध्ये याबद्दल जागरुकता दिसते आणि पाण्याची खरी किंमत तेच जाणतात ज्यांनी जलदुर्भिक्षाच्या संकटाचा सामना केला आहे. आणि अशा ठिकाणी पाणी वाचवण्याबद्दल संवेदनशीलता असते, आणि त्याबद्दल काही करण्याची सक्रीयताही असते. काही दिवसांपूर्वीच मला सांगण्यात आले की महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार ग्रामपंचायत आणि तिथल्या गावकऱ्यांनी पाणी हा विषय अत्यंत संवेदनशील रितीने हाताळला आहे. पाणी साठवण्याची इच्छा असणारी अनेक गावं सापडतील, पण त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पूर्ण पीक पद्धतीत बदल केला. अशी पिकं, ज्यांना अधिक पाणी लागते, उस असो, केळी असोत, अशा पिकांची लागवड न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हे ऐकायला फार सोपे वाटते पण वाटते तितके हे सोपे नाही. सर्वांनी मिळून केवढा मोठा संकल्प केला असेल? एखाद्या कारखान्यात पाण्याचा वापर अधिक होत असेल, तर त्या कारखानदाराला तुझा उद्योग बंद कर कारण त्याला जास्त पाणी लागते, असे सांगितले तर त्याचा काय परिणाम होईल? हे आपण जाणता. पण हे माझे शेतकरी बांधव, पहा त्यांना वाटले, उसाला खूप पाणी लागते, मग ऊसाची लागवड करु नका, त्यांनी लागवड बंद केली आणि अशी फळे, भाज्या ज्यांना कमी पाणी लागते, त्यांची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तुषार सिंचन, ठिबक सिंचन, जलसंधारण, जलपुनर्भरण याबाबतीत त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यामुळे पाण्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आज हे गाव स्वबळावर उभे राहिले आहे. बरोबर आहे, की मी तुम्हाला हिवरेबाजार या छोट्याशा गावाबद्दल सांगतो आहे, पण अशी अनेक गावं असतील, अशा सर्व गावकऱ्यांचे, त्यांच्या या उत्तम कामाबद्दल मी कौतुक करतो, त्यांना शुभेच्छा देतो.

मला कुणीतरी सांगितले की, मध्य प्रदेशात देवास जिल्ह्यात गोरवा ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीने प्रयत्नपूर्वक अभियान हाती घेतले ते शेततळ्यांच्या निर्मितीचे. सुमारे सत्तावीस शेततळी त्यांनी बांधली. परिणामी भूजल पातळी वाढली, पाण्याचा स्तर वर आला. जेव्हा पिकांना पाण्याची गरज भासली तेव्हा पाणी मिळाले आणि मोठमोठाले आकडे त्यांनी सांगितले. शेतीपासून त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नात वीस टक्क्यांची वाढ झाली. पाण्याची बचत तर झालीच शिवाय पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा होते. आणि जगभर असे सांगितले जाते की पिण्याचे शुद्ध पाणी ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचे कारण ठरते. आरोग्यही त्यामुळे उत्तम राहाते. कधी कधी असे वाटते की, जेव्हा भारत सरकार लातूरला रेल्वेने पाणी पोचवते, तेव्हा जगासाठी ती एक बातमी होते. हे खरे आहे की, ज्या वेगाने रेल्वेने हे काम केले त्याबद्दल रेल्वेचे अभिनंदन करायला हवे, पण ते गावकरीही अभिनंदनासाठी पात्र आहेत, मी तर म्हणेन की त्यांचे विशेष अभिनंदन करायला हवे. पण असे अनेक उपक्रम नागरिकांकडून राबवले जातात, जे कधी समोर येत नाहीत. सरकारने एखादी चांगली मोहीम राबवली तर कधी कधी त्याला प्रसिद्धी मिळतेही पण आपल्या आजूबाजूला आपण पाहिले, तर लक्षात येईल की दुष्काळावर मात करण्यासाठी कशाप्रकारे नवनवीन उपाययोजनांमधून लोक या समस्येवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करतात. कितीही संकटे येवोत पण एखादी चांगली गोष्ट कळली तर सारं संकट दूर झाल्याची भावना मनात निर्माण होते हा मनुष्य स्वभाव आहे. यंदाच्या पावसाळ्यात 106 ते 110 टक्के पाऊसमान असेल, ही शक्यता सर्वत्र कळली आणि ह्या बातमीने जणू एखादा शांती संदेशच सर्वांना मिळाला. पाऊस यायला अजून वेळ आहे पण चांगला पाऊस होणार ही बातमी चैतन्य घेऊन आली.

पण माझ्या प्रिय देशवासीयांनो, यंदा पाऊस चांगला पडणार ही बातमी आपल्यासाठी जितकी आनंद देणारी आहे तितकीच आपल्या सगळ्यांसाठी एक संधी निर्माण करणारी आहे. एक आव्हान निर्माण करणारी आहे. गावागावात पाणी वाचवण्यासाठी एखादी मोहीम आत्तापासूनच आपण हातात घेऊ शकतो का? शेतकऱ्यांना मातीची गरज असते. शेतात पिकांसाठी ती उपयोगी ठरते. मग गावातल्या तळ्यातला गाळ काढून तो आम्ही शेतात टाकला तर? शेतीसाठी फायदा होईलच त्याचबरोबर तळ्यात पाणी साठण्याची क्षमता वाढेल. सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांमधून, खताच्या रिकाम्या पोत्यांमधून दगड आणि माती भरुन आपण ते पाणी वाहून जाण्याच्या मार्गावर टाकले तर? पाणी अडवता येईल का? पाणी पाच दिवस साठेल, सात दिवस साठेल, ते पाणी जमिनीत मुरेल. जमिनीतली पाण्याची पातळी वाढेल. आमच्या विहींरींमध्ये पाणी येईल. जेवढे पाणी अडवता येईल, तेवढे अडवायला हवे. पावसाचे पाणी, गावात पडणारे पाणी गावात राहील. साऱ्यांनी मिळून संकल्प केला, तर सामुहिक प्रयत्नांमधून हे शक्य आहे. आज आपल्यापुढे पाण्याचे संकट आहे. दुष्काळाची स्थिती आहे पण येणारा महिना-दीड महिन्याचा काळ आपल्या हातात आहे. आणि मी तर नेहमी सांगतो की, कधी आपण पोरबंदर, महात्मा गांधीजींच्या जन्म स्थानी गेलो, तर वेगवेगळी ठिकाणे आपण बघतो. पण तिथे बघण्यासारखी आणखी एक महत्त्वाची जागा आहे. पावसाचे पाणी साठवण्यासाठी घराखाली कशा टाक्या बांधल्या आहेत. या दोनशे वर्ष जुन्या आहेत आणि त्यात साठणारे पाणी किती शुद्ध राहते हे बघण्यासारखे आहे.

श्रीमान कुमार कृष्णा यांनी MyGov वर एक मुद्दा मांडला आहे आणि एका अर्थाने कुतूहल प्रगट केले आहे. ते म्हणतात की, आमच्या हयातीत गंगास्वच्छता मोहिम पूर्ण होणे शक्य आहे का? त्यांना वाटणारी चिंता साहाजिक आहे कारण जवळजवळ गेल्या तीस वर्षांपासूनच हे काम सुरु आहे. अनेक सरकारे आली, अनेक योजना आखण्यात आल्या, यासाठी खूप पैसाही खर्च झाला. आणि म्हणून कुमार कृष्णा यांच्या प्रमाणेच देशातल्या कोट्यवधी नागरिकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होणे साहाजिक आहे धर्मावर श्रद्धा असणाऱ्यांसाठी गंगा मोक्षदायिनी आहे. गंगेचे हे महात्म्य मला मान्य आहेच पण त्याही पेक्षा गंगा जीवनदायिनी आहे, असे मी मानतो. गंगा आम्हाला भाकरी देते. गंगा आम्हाला रोजगार देते, गंगेकडून आम्हाला जगण्यासाठी नवी शक्ती मिळते. गंगा जशी वाहते तशी देशाच्या आर्थिक घडामोडींना एक नवी गती देते. एका भगीरथाने आपल्याला गंगा आणून दिली. पण तिला वाचवण्यासाठी कोट्यवधी भगीरथांची आज गरज आहे. लोक सहभागाशिवाय ही मोहिम कधीही यशस्वी होणार नाही. आणि म्हणून गंगेच्या स्वच्छतेसाठी आपण सर्वांनी बदल घडवणारे चेंज एजंट व्हायला हवे. पुन्हा पुन्हा, वारंवार हे सांगावे लागेल. सरकारी पातळीवर याबाबतीत अनेक प्रयत्न सुरु आहेत. गंगेकाठी असणाऱ्या राज्यांकडून यासाठी सहकार्य मिळवण्याचे प्रयत्न होत आहेत. सामाजिक तसेच स्वयंसेवी संघटनांना त्यात सहभागी करण्याचे प्रयत्न होत आहेत. गंगेचा प्रवाह, गंगेचा पृष्ठभाग स्वच्‍छ ठेवण्यासाठी आणि गंगेच्या पाण्यात होणारे औद्योगिक प्रदूषण थांबवण्यासाठी अनेक पावले उचलली गेली आहेत. गंगेच्या पात्रात, नाल्यांमधून रोज घनकचरा मोठ्या प्रमाणात वाहात येतो. हा कचरा स्वच्छ करण्यासाठी वाराणसी, अलाहाबाद, कानपूर, पटणा अशा जागी पाण्यावर तरंगणारा कचरा स्वच्छ करण्याचे काम ट्रॅश स्कीमर मदतीने केले जाते. सर्व स्थानिक प्रशासन संस्थांना हे उपलब्ध करुन देण्यात आले आहे आणि त्यांनी त्याचा वापर करुन कचरा साफ करावा, असे आवर्जून सांगितले गेले आहे. आणि नुकतेच मला सांगण्यात आले की, जिथे चांगल्या पद्धतीने हे प्रयत्न होत आहेत, त्याठिकाणी रोज तीन टन ते अकरा टन कचरा काढला जातो. म्हणजेच हे खरे आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर, होणारी घाण वाढण्यापासून थांबली आहे. येत्या काळात आणखी काही ठिकाणी ट्रॅश स्कीमर बसवण्याची योजना आखण्यात आली आहे. गंगेच्या आणि यमुनेच्या काठावर राहणाऱ्या लोकांना लवकरच त्याचा अनुभव येईल.

औद्योगिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी, कागद-लगदा उद्योग, मद्यनिर्मिती करणारे कारखाने आणि साखर कारखाने यांच्याबरोबर एक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी काही प्रमाणात सुरु झाली आहे. त्याचे चांगले परिणाम होतील, असे आज तरी मला वाटतेय.

मला हे ऐकून आनंद झाला की, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील मद्यनिर्मिती कारखान्यांनी शून्य द्रव विसर्ग, (zero liquid discharge) याबाबतीत यश मिळवले आहे. काही अधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसात ही माहिती मला दिली. कागद कारखान्यांमधून पडणारा टाकाऊ द्रव्यांचा विसर्ग आता जवळजवळ बंद होण्याच्या मार्गावर आहे. आपण योग्य दिशेने पावले टाकत आहोत, याचेच हे लक्षण आहे आणि एक प्रकारे जागरुकताही वाढली आहे. आणि मी बघितले आहे की, केवळ गंगेच्या काठावर राहणारीच नव्हे, तर दूरवरच्या दक्षिण भागातली एखादी व्यक्ती मला भेटते तेव्हा ती अवश्य म्हणते साहेब, गंगा स्वच्छ होईल ना! सर्वसामान्य लोकांचा हाच विश्वास, गंगा स्वच्छतेच्या मोहिमेला यश मिळवून देईल. गंगा स्वच्छ करण्याच्या कामात नागरिक दान देत आहेत. एका उत्तम रितीने हे काम सुरु आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो. आज 24 एप्रिल. हा दिवस भारतात पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. याच तारखेला आमच्या देशात पंचायत राजव्यवस्थेला सुरुवात झाली होती. आणि हळूहळू पूर्ण देशभर पसरलेली पंचायत राज प्रणाली, आमच्या लोकशाही शासन यंत्रणेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून आज यशस्वी रितीने काम करीत आहे.

14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती आपण साजरी केली आणि आज 24 एप्रिल रोजी पंचायत राज दिवस साजरा करत आहोत. हा एक सुंदर योग आहे. ज्या महापुरुषाने

भारताला संविधान दिले, त्या महामानवाच्या जयंतीपासून आज 24 एप्रिल पर्यंत आमच्या संविधानातील महत्वाचा भाग असणाऱ्या गाव या घटकाला जोडण्याची प्रेरणा मिळण्यासाठी केंद्र शासनाने राज्य शासनाच्या सहकार्याने 14 एप्रिल ते 24 एप्रिल पर्यंत दहा दिवसांच्या काळात ग्रामोदय ते भारतउदय हे अभियान राबवले. 14 एप्रिल रोजी डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीदिनी, त्यांचे जन्मस्थळ असणाऱ्या महू या ठिकाणी जाण्याची संधी मला मिळाली हे मी माझे सुदैव मानतो. त्या पवित्र भूमीला नमन करण्याची संधी मिळाली आणि आज 24 तारखेला मी झारखंड राज्यात, जिथे सर्वाधिक संख्येने आमचे आदिवासी बंधु भगिनी राहतात, त्या राज्यात मी पंचायत राज दिवस साजरा करणार आहे. आणि दुपारी तीन वाजता देशभरातील सर्व पंचायत संस्थांशी संवाद साधला. या अभियानानं जागरुकता निर्माण करण्याचे एक मोठे काम केले आहे. हिंदुस्थानातील कानाकोपऱ्यात गाव पातळीवर लोकशाही संस्था कशा सशक्त होतील? गाव स्वयंपूर्ण कसं होईल? गाव स्वत: आपल्या विकासाच्या योजना कशा बनवेल? मूलभूत सोयी –सुविधा महत्वाच्या असतील, सामाजिक सोयी सुविधा महत्त्वाच्या असतील, शाळेतून विद्यार्थ्यांची गळती होणार नाही. ‘मुलगी वाचवा-मुलगी शिकवा’ मोहीम यशस्वीरित्या राबवली जाईल. मुलीचा वाढदिवस साऱ्या गावाचा उत्सव व्हायला हवा. अशा अनेक योजना आहेत.काही गावांमध्ये अन्नदानाचा उपक्रम हाती घेतला गेला. हिंदुस्थानातल्या इतक्या गावांमधून इतके विविध कार्यक्रम दहा दिवस चालणारे, बहुधा असं फार कमी वेळा होतं. मी सर्व राज्य सरकारांचं, सरपंचांचं अभिनंदन करतो, त्यांनी फार मौलिक पध्दतीने नाविन्य पूर्ण मार्गाने गावाच्या हितासाठी, गावाच्या विकासासाठी, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी ही मोहिम मला सुसंधीत परिवर्तित केली. गावांमधून जी जागरुकता आली आहे, तीच भारत-उदय याची शाश्वती आहे. भारत-उदय चा आधार ग्राम उदय हाच आहे. म्हणूनच ग्राम उदय यावर भर दिला तर इच्छित परिणाम आपण मिळवल्याशिवाय राहणार नाही.

मुंबईहून शर्मिला घारपुरे यांनी फोन केला आणि त्यांच्या मनातली चिंता व्यक्त केली.

“माननीय पंतप्रधान नमस्कार. मी मुंबईहून शर्मिला घारपुरे बोलत आहे. शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षणाबाबत माझा प्रश्न आहे. शिक्षण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सुधारणांची गरज आहे. योग्य शाळा किंवा कॉलेज उपलब्ध नसणे किंवा शिक्षणाचा दर्जा नसणे. मुलांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्यांना अनेक मुलभूत गोष्टी माहित नसतात. यामुळे जगात आपली मुलं मागे राहतात. याबाबत आपले विचार काय आहेत? आणि या क्षेत्रात कोणत्याप्रकारे आपण सुधारणा आणू इच्छिता याबाबत कृपा करुन सांगा. धन्यवाद.”

ही अशी काळजी वाटणं साहजिक आहे. आज प्रत्येक कुटुंबात आई वडीलांचे सर्वात मोठं स्वप्न असते ते म्हणजे मुलांचं शिक्षण. घर, गाडी या गोष्टी त्यानंतर आणि भारतासारख्या देशात नागरिकांच्या मनात अशी भावना असणे ही फार मोठी शक्ती आहे. मुलांना शिकवायचे, सुशिक्षित करायचे, चांगले शिक्षण कसे मिळेल याची चिंता पालकांना वाटावी याचे प्रमाण वाढले पाहिजे आणि मी असे मानतो की, ज्या कुटुंबांमध्ये ही जागरुकतेची जाणीव असते, त्याचा परिणाम शाळेवर पडलेला दिसतो. शिक्षकांवर पडलेला दिसतो आणि त्या मुलांमध्येही ही जाणीव निर्माण होते की हे ध्येय गाठण्यासाठी मी शाळेत जातोय आणि यासाठी मी सर्व पालकांना, माता-पित्यांना आवर्जून सांगेन की आपल्या मुलाच्या शालेय घडामोडींकडे लक्ष द्या, वेळ काढून त्याबद्दल मुलाशी बोला आणि जर एखादी गोष्ट जाणवली तर स्वत: शाळेत जा आणि शिक्षकांशी बोला. ही तुमची दक्षता, आपल्या शालेय व्यवस्थेतील काही त्रुटी कमी करु शकेल आणि लोक सहभागामुळे हे होईलच.

आपल्या देशात प्रत्येक सरकारने शिक्षण या मुद्यावर भर दिला आहे. प्रत्येक सरकारने आपापल्या पध्दतीने त्यासाठी प्रयत्नही केले आहेत. आणि हेही खरं आहे की बराच काळ आमचे लक्ष या गोष्टीवर राहिले की शिक्षण संस्था उभ्या रहाव्यात, शिक्षण व्यवस्थेचा विस्तार व्हावा, शाळा तयार व्हाव्यात, महाविद्यालयं तयार व्हावीत, शिक्षकांची भरती व्हावी, अधिकाधिक मुले शाळेत यावीत. चहूबाजूला शिक्षणाचा प्रसार करण्याला आम्ही प्राधान्य दिले आणि ते आवश्यकही होते. पण आता जेवढे महत्व विस्ताराचे आहे त्यापेक्षा अधिक ते आमच्या शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांचे आहे. विस्ताराचे एक फार मोठे काम आपण केले आहे. आता आपल्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. साक्षरता मोहिमेकडून दर्जेदार शिक्षण हे आता आमचे प्राधान्य असायला हवे. आजवर मोजणी झाली आराखड्याची आता लक्ष द्यायचे आहे परिणामावर. शाळेत किती मुले आली हे आजवर प्राधान्यानं पाहिले गेले. आता साक्षरतेपेक्षा, शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. मुलांची पट नोंदणी करा, पट नोंदणी करा, ह्या मंत्राचा आजवर उच्चार केला गेला. आता जी मुले शाळेल आली आहेत, त्यांना चांगले शिक्षण, योग्य शिक्षण मिळेल यावर आम्हाला लक्ष केंद्रीत करावं लागेल. या सरकारच्या अर्थसंकल्पातही आपण पाहिले असेल, चांगले शिक्षण देण्यावर भर देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. फार मोठा पल्ला गाठायचा आहे, हे खरे आहे पण, शर्मिलाजींनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की आमच्यात आमूलाग्र बदल घडवण्याची गरज आहे.

आपण पाहिले असेल की यावेळच्या अर्थसंकल्पात वेगळा मार्ग निवडण्याचे काम झाले आहे. दहा सरकारी विश्वविद्यालये आणि दहा खाजगी विश्वविद्यालये यांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करुन आव्हानात्मक, स्पर्धात्मक स्तरावर येण्याबद्दल सांगण्यात आल्याचं या अर्थसंकल्पात आपल्याला दिसेल. सर्वोत्कृष्ट विश्वविद्यालये, सर्वोत्कृष्ट विद्यापीठे होण्यासाठी आपण काम करु इच्छिता? सांगा. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने ही योजना आणली गेली आहे. भारतीय विद्यापीठे जागतिक पातळीवर स्पर्धा करणारी विद्यापीठे होऊ शकतात. व्हायलाच हवीत. त्याबरोबरच शिक्षणाला जितके महत्त्व आहे. तितकेच कौशल्याला सुद्धा आहे. त्यासाठी आता शिक्षणात तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची ठरेल. दूरशिक्षण तंत्रज्ञान प्रणाली आमच्या शिक्षण व्यवस्थेला सुलभ करेल आणि लवकरच नजिकच्या भविष्यकाळात त्याचे परिणाम आपल्याला दिसतील असा मला विश्वास आहे.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून एका मुद्याबद्दल नागरिक मला विचारत आहेत. वेब पोर्टल MyGovवर ते लिहितात, काही जण माझ्या नरेंद्र मोदी ॲपवर लिहितात, आणि यात बहुसंख्य युवावर्ग लिहीत असतो.

“माननीय पंतप्रधान नमस्कार, मी बिजनोरहून मोना कर्णवाल बोलत आहे. आजच्या काळातल्या युवकांसाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्राचंही मोठं महत्त्व आहे. त्यांच्यात संघभावना असायला हवी, चांगले नेतृत्वगुण असायला हवेत, ज्यामुळे त्यांचा सर्वांगिण विकासही होईल. मी हे स्वानुभवावरुन बोलत आहे. कारण मी स्वत: भारत स्काऊटस् आणि गाईडमधे होतो आणि त्याचा माझ्या जीवनावर खूपच चांगला परिणाम झाला. आपण जास्तीत जास्त युवकांना प्रोत्साहित करावे अशी माझी इच्छा आहे आणि सरकारनेही एनसीसी, एनएसएस आणि भारत स्काऊटस् अँड गाईडस्‌ला प्रोत्साहन द्यावे.”

आपण मला इतक्या सूचना पाठवल्यात. एक दिवस माझ्या मनात आले की, आपल्याशी बोलण्याआधी यासर्व मंडळींशी बोलून घ्यावे. यासाठी तुमचाच दबाव होता, तुमच्याच सूचना होत्या त्याचा परिणाम असा झाला की नुकतीच एक बैठक मी बोलावली होती. त्या बैठकीत एनसीसी, एनएसएस यांचे प्रमुख, स्काऊट आणि गाईडचे प्रमुख, रेड क्रॉस आणि नेहरु युवा केंद्राचे प्रमुख यांना बोलावले होते. आणि जेव्हा मी त्यांना विचारले की याआधी आपली अशी बैठक कधी झाली होती? त्यावर त्यांचे उत्तर होते की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजवर अशा प्रकारची ही पहिलीच बैठक आहे. म्हणूनच या साऱ्या कामांच्या संदर्भात ज्या युवा वर्गाने, युवा मित्रांनी माझ्याकडे आग्रह धरला त्या सर्वांचे मी आभार मानतो. त्यांच्या सूचनांचा परिणाम म्हणून ही बैठक मी बोलावली आणि या अधिकाऱ्यांना मी भेटलो हे फार चांगले झाले, असे मला वाटते. यात मोठ्या प्रमाणावर समन्वयाची गरज आहे हे मला जाणवले. आपाआपल्या पातळीवर खूप कामं होत आहेत, पण सामुहिक स्वरुपात, संघटित स्वरुपात आमच्या संघटनांनी काम केले, तर त्याचा किती मोठा परिणाम मिळून शकतो. आणि केवढा विस्तार आहे त्यांचा, किती कुटुंबांपर्यंत त्या गेल्या आहेत, पोहचल्या आहेत. यांचा आवाका, परीघ बघून मला फार समाधान वाटले. आणि त्यांच्यातही उत्साह दांडगा दिसला, काही तरी करण्याचा. आता हे खरे आहे की मी स्वत: एनसीसी म्हणजे राष्ट्रीय छात्र सेनेचा कॅडेट होतो. त्यामुळे मला हे ठाऊक आहे की, अशा संघटनांमुळे एक नवी दृष्टी मिळते, प्रेरणा मिळते. एक राष्ट्रीय दृष्टीकोन वाढीला लागतो. मला लहानपणी त्याचा लाभ मिळाला आणि हेही मी मानतो की अशा संघटनांमध्ये नवी चेतना भरली पाहिजे. नवी शक्ती भरली पाहिजे. या बैठकीत काही मुद्दे मी त्यांच्या समोर मांडले. मी त्यांना सुचवले की या हंगामात जलसंचय, पाणी साठवण्याचे काम आपल्या तरुणांनी, संघटनांनी का करु नये? कितीतरी प्रभाग कितीतरी जिल्हे आपण हागणदारी मुक्त करण्यात प्रयत्नपूर्वक यश मिळवले. लोकांना शौचासाठी उघड्यावर जाण्यापासून थांबवले. देश जोडण्यासाठी कोणते कार्यक्रम आखू शकतो? आमच्या सर्व संघटनांचे मिळून एक, समान युवा-गीत कोणते असेल? अनेक गोष्टींवर त्यांच्याशी बोलणे झाले.

मी आज आपल्याला आवर्जून सांगेन, आपणही मला सांगा, अगदी नेमके उपाय, नेमक्या सूचना पाठवा. आपल्याकडे अनेक युवा संघटना कार्यरत आहेत, त्यांच्या कार्यपद्धतीत, कार्यक्रमांमध्ये काय नाविन्य आणता येईल? माझ्या नरेंद्र मोदी ॲपवर आपण हे लिहीलंत, तर ते योग्य जागी मी पोचवेन आणि मला वाटते की या बैठकीनंतर या सर्व गोष्टींना एक गती मिळेल. हे मला वाटते आणि या सर्वांबरोबर स्वत:ला समाविष्ट करावे, असे आपल्याही मनात येईल, असे होईलच.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपणा सर्वांना विचार करायला भाग पाडेल अशी एक गोष्ट मला सांगायची आहे. आम्हा सर्वांना जागृत करणारी ही गोष्ट आहे, असे मला वाटते. आपण पाहिले असेल की आपल्या देशाची राजकीय अवस्था अशी आहे की मागच्या अनेक निवडणुकांच्या वेळी कोणता पक्ष किती गॅस सिलेंडर देईल? यावर चर्चा होत असे. 12 सिलेंडर की 9? निवडणुकीच्या काळात हा एक महत्त्वाचा, मोठा विषय ठरत असे. आणि प्रत्येक राजकीय पक्षाला असे वाटायचे की मध्यमवर्गीय लोकांपर्यंत निवडणुकीच्या वाटेने पोचायचे असेल, तर गॅस सिलेंडर हा मोठा महत्त्वाचा विषय आहे. दुसऱ्या बाजूला अर्थतज्ञांचा आग्रह असायचा की अनुदानात कपात करा. त्यासाठी अनेक समित्या स्थापन झाल्या. गॅस सिलेंडरवरचे अनुदान कमी करण्यासाठी या समित्यांसमोर अनेक प्रस्ताव येत असत. सूचना येत असत. या समित्यांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असत, मात्र मूळ मुद्दा तसाच राहात असे. हा सार्वत्रिक अनुभव आहे. पण या चौकटीच्या बाहेर जाऊन कधी विचार केला गेला नाही. आज, माझ्या देशवासियांनो, आपल्यासमोर माझा हिशोब मांडताना मला आनंद होतो आहे. मी वेगळाच मार्ग निवडला, आणि तो मार्ग होता जनता जनार्दनावर विश्वास टाकण्याचा. कधी कधी आम्ही राजकीय नेत्यांनी स्वत:वर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या लोकांवर अधिक विश्वास ठेवायला हवा. मी जनता जनार्दनावर विश्वास ठेवून एकदा असेच म्हणालो होतो की, वर्षभरात 1500, 2000 रुपयांचा वाढीव खर्च आपण सहन करु शकतो, तर मग गॅस सिलेंडरवर मिळणारे अनुदान आपण का सोडून देत नाही? ते अनुदान एखाद्या गरीबाला उपयोगी पडेल. हे मी असेच बोललो होतो पण आज मी अत्यंत अभिमानपूर्वक आपल्याला सांगू शकतो. माझ्या देशवासियांबद्दल मला अभिमान वाटतो.

एक कोटी कुटुंबांनी स्वेच्छेने, गॅस अनुदान घ्यायचे नाकारले आहे. आणि हे अनुदान सोडणारे कुणी श्रीमंत, निवृत्त लिपीक, कुणी शेतकरी, कुणी किरकोळ दुकानदार, असे मध्यमवर्गातले, निम्न-मध्यम वर्गातले लोक, ज्यांनी गॅस सिलेंडरवर मिळणारे अनुदान सोडून दिले आहे. आणखी एक वैशिष्ट्य बघा, हे अनुदान सोडण्यासाठी मोबाईल फोनवरच्या ॲपचा वापर करणे शक्य होते, दूरध्वनीवरुन मिस्ड कॉल देऊन करणे शक्य होते, अनेक मार्ग होते. पण याचा धांडोळा घेतला गेला तेव्हा असे लक्षात आले की, या एक कोटी लोकांपैकी 80 टक्के नागरिक असे होते की जे त्यांच्या वितरकाकडे स्वत: गेले, रांगेत उभे राहीले आणि आपले गॅस सिलेंडरवरचे अनुदान त्यांनी लेखी स्वरुपात परत केले.

माझ्या प्रिय देशवासियांनो, ही काही लहान गोष्ट नाही. सरकारने एखाद्या करात थोडी सवलत दिली, तर आठवडाभर दूरचित्रवाणी आणि वर्तमानपत्रातून त्या सरकारची प्रशंसा ऐकू येते. एक कोटी कुटुंबांनी अनुदान सोडून दिले. आमच्या देशात अनुदान म्हणजे अधिकार असे समीकरण असताना अनुदान नाकारले. त्या एक कोटी कुटुंबांना मी सर्वप्रथम वंदन करतो, त्यांचे आभार मानतो, कारण एक नवा, एक वेगळा विचार करायला त्यांनी राजकीय नेत्यांना भाग पाडलं आहे. या एका घटनेने देशातील अर्थतज्ञांना नव्या पद्धतीने विचार करायला भाग पाडले आहे. आणि जगभरचे अर्थतज्ञ जे असे झाले, तर असे होईल, हे केले तर ते मिळेल, अशी आर्थिक समीकरणे मांडत असतात त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या विचार करण्याच्या कक्षेच्या बाहेरची ही घटना म्हणावी लागेल. यावर कधी ना कधी विचार करावाच लागेल. एक कोटी कुटुंबांनी गॅस अनुदान सोडणे आणि त्याबदल्यात कोट्यवधी गरीब कुटुंबांना गॅस सिलेंडर मिळणे. एक कोटी कुटुंबांनी अनुदान सोडल्यामुळे काही रुपये वाचणे हे वरवर पाहता तसे महत्त्वाचे वाटत नाही. महत्त्वाचे हे आहे की जनतेवर विश्वास ठेवला, तर हाती केवढे मोठे यश लागू शकते. मी विशेषत: सर्व राजकीय वर्गाला आज आवर्जून सांगेन की प्रत्येक ठिकाणी, लोकांवर विश्वास ठेवण्याची किमान एक तरी गोष्ट आपण करु या. आपण कधी विचारही केला नसेल, असा परिणाम आम्हाला मिळेल. या दिशेला आपण जायला हवे. आणि मला तर नेहमी वाटते की जसे माझ्या मनात आले की तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या नोकरीसाठी मुलाखत का घ्यावी? ज्यांनी परीक्षा देऊन, गुण मिळवले आहेत, ते पाठवले आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा. कधी कधी मला असेही वाटते की असे आपण घोषित करु या, की रेल्वेच्या ह्या एका मार्गावर कुणीही तिकीट तपासनीस नसेल. बघूया तर, ठेवूया विश्वास देशातील जनतेवर असे अनेक प्रयोग करता येतील. एकदा या देशातल्या जनतेवर विश्वास ठेवा, बघा अप्रतिम परिणाम मिळतील. असो. हे माझ्या मनात येते, हे काही सरकारी नियम नाही होऊ शकत. पण विश्वासाचं वातावरण तर तयार करु शकतो. आणि हे वातावरण तयार करणारे कुणी राजकीय नेते नाहीत, देशातील एक करोड कुटुंबांनी ते तयार केले आहे.

रवी नामक सद्‌गृहस्थांनी मला पत्र लिहिले आहे “Good News Every day”, रोज शुभवर्तमान. ते लिहीतात की कृपया आपल्या अधिकाऱ्यांना सांगा की रोज एखाद्या चांगल्या घटनेबद्दल त्यांनी माहिती द्यावी. प्रत्येक वर्तमानपत्रात आणि वृत्त वाहिनीवर प्रत्येक ब्रेकिंग न्यूज, त्रासदायक असते. शंभर-सव्वाशे कोटी लोकसंख्या असणाऱ्या या देशात, आमच्या आजूबाजूला काही चांगले घडतच नाही का? कृपया ही परिस्थिती बदला. रविजींनी त्यांचा तीव्र संताप व्यक्त केला आहे. पण मला वाटते की हा राग माझ्यावरचा नसून भोवतालच्या परिस्थितीवरचा आहे. आपल्याला आठवत असेल, आपले माजी राष्ट्रपती डॉ. A.P.J अब्दुल कलाम नेहमी सांगत असत, की वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर केवळ सकारात्मक बातम्या छापा. ते सतत ही गोष्ट सांगत राहीले. काही दिवसांपूर्वी एका वर्तमान पत्रानं मला पत्र लिहून कळवलं होतं की त्यांनी असं ठरवलं आहे की प्रत्येक सोमवारी एकही नकारात्मक बातमी ते छापणार नाहीत, सकारात्मक बातम्याच देणार.

हल्ली मी बघितले आहे की काही दूरचित्रवाणी वाहिन्या सकारात्मक बातम्या विशिष्ट वेळ ठरवून देतात. आजच्या काळात सकारात्मक बातम्यांचं वातावरण तयार होत आहे. अचूक बातमी, चांगली बातमी लोकांना मिळावी असे प्रत्येकाला वाटतंय. हे खरं आहे की मोठ्यात मोठी व्यक्ती, चांगल्यातली चांगली गोष्ट, उत्तमोत्तम शब्दांचा वापर करुन, चांगल्यातल्या चांगल्या पध्दतीने सांगितली जाईल, तेव्हा त्याचा जेवढा परिणाम होतो त्याहीपेक्षा अधिक परिणाम सकारात्मक बातमीचा चांगल्या बातमीचा होतो. हे खरं आहे की भलेपणावर अधिक भर दिला तर आपल्यात वाईट गोष्टींसाठी फार जागा उरणार नाही. दीप पेटवला तर अंध:कार दूर होईल, होईलच होईल. आणि म्हणूनच आपल्याला हे कदाचित ठावूक असेल की ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या नावाची वेबसाईट सरकारने सुरु केली आहे. एक संकेतस्थळ सुरु केले आहे, या संकेतस्थळावर सकारात्मक बातम्या असतात. केवळ सरकारच्याच नाही, नागरिकांच्या सुध्दा असतात. आणि हे असं पोर्टल आहे ज्यावर आपण, आपल्याकडची, एखादी चांगली बातमी पाठवू शकता. योगदान देवू शकता. रवीजी तुम्ही चांगली सूचना मांडली आहे, पण कृपया माझ्यावर रागावू नका. आपण सारे मिळून सकारात्मक काम करण्याचा प्रयत्न करुया. सकारात्मक बोलण्याचा प्रयत्न करुया. सकारात्मक पोचवण्याचा प्रयत्न करुया.

कुंभमेळा हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. कुंभमेळा हे पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षण केंद्र बनू शकते. जगातल्या फार कमी जणांना हे माहीत असतं की इतका दीर्घकाळ, नदी काठावर कोट्यवधी लोक येतात. शांत चित्त आणि शांततापूर्ण वातावरणात सोहळा साजरा होतो. अशा घटना आयोजनाच्या दृष्टीने, कार्यक्रम व्यवस्थापनाच्या दृष्टीने, लोक सहभागाच्या दृष्टीने, नवे मापदंड स्थापन करणाऱ्या ठरतात. गेल्या दोन दिवसापासून मी पाहतो आहे, अनेक जण कुंभमेळ्याची छायाचित्रे अपलोड करीत आहेत. मला वाटते की भारत सरकारच्या पर्यटन विभागाने राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने, अशा छायाचित्रांची स्पर्धा घ्यावी आणि लोकांना आवाहन करावे की उत्तमोत्तम छायाचित्र काढून Upload करा. पहा, एकदम वातावरण निर्मिती होईल आणि लोकांनाही कळेल की कुंभमेळ्यात किती विविधतेने भरलेल्या गोष्टी सुरु आहेत. हे अवश्य करता येईल.

मध्यंतरी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मला भेटले होते. स्वच्छतेवर विशेष भर दिल्याचे त्यांनी सांगितले. केवळ तिथेच स्वच्छता असावी असे नाही तर तिथून परतणारे लोक हा स्वच्छतेचा संदेश घेऊन जातील. मला असं वाटते की कुंभमेळा हा धार्मिक, अध्यात्मिक मेळावा आहे पण आपण त्याचे रुपांतर एका सामाजिक सोहळ्यात करु शकतो. संस्कार करण्याची सुसंधी असणारा सोहळा करु शकतो. तिथून परतताना चांगले संकल्प, चांगल्या सवयी घेऊन त्या गावागावात पोचवण्याचे एक निमित्त ठरू शकतो कुंभमेळा. पाण्याविषयी वाटणारा स्नेह, कसा वाढेल? पाण्याविषयी वाटणारी कळकळ कशी वाढेल? पाणी साठवण्याचा संदेश देता येईल यासाठी या कुंभमेळ्याचा उपयोग व्हायला हवा, आम्ही तो तसा करायला हवा.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, पंचायत राज दिनाच्या या महत्वपूर्ण दिवशी आज संध्याकाळी मी पुन्हा भेटेनच. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. नेहमीप्रमाणेच आपल्या मनातल्या गोष्टीने माझ्या मनातल्या गोष्टीशी एक अतूट नाते जोडले आहे, याचा मला आनंद वाटतो, पुन्हा एकदा अनेक अनेक धन्यवाद.

S. Tupe / M.Desai