Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आणीबाणीच्या काळात लोकशाहीचे रक्षण करणाऱ्यांना पंतप्रधानांची आदरांजली


नवी दिल्‍ली, 25 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांचे खंबीरपणे रक्षण करणाऱ्या सर्वांना आदरांजली वाहिली आणि आणीबाणी हा भारताच्या इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असल्याचा उल्लेख  केला. या काळात मूक न राहता संविधानात अंतर्भूत असलेल्या आदर्शांचे रक्षण करणाऱ्या असंख्य नागरिकांचे असामान्य धैर्य आणि चिकाटीही दिसून आली, असे त्यांनी नमूद केले.

घटनात्मक मूल्यांशी असलेली देशाची निष्ठा अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले, “संविधान हे 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा, हक्क आणि कर्तव्यांचे मूर्तिमंत स्वरूप आहे. संविधानाच्या तत्त्वांचे मार्गदर्शन घेत, भारत आपला लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करत राहील आणि न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या आदर्शांशी एकनिष्ठ राहील.”

मोदी यांनी लोकशाही, संविधान आणि नागरिकांच्या हक्कांच्या रक्षणासाठीची कटिबद्धता पुन्हा व्यक्त करणारे संस्कृत सुभाषितही सामायिक केले;

“स्वातन्त्र्यात् सुखमाप्नोति स्वातन्त्र्याल्लभते परम्।

स्वातन्त्र्यान्निर्वृत्तिं गच्छेत् स्वातन्त्र्यात् परमं पदम् ।।”

मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले:

आज आपण भारताच्या इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असलेल्या आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांचे खंबीरपणे रक्षण करणाऱ्या सर्वांना आदरांजली वाहत आहोत.

आणीबाणी हा आपल्या संविधानावर झालेला थेट हल्ला होता. यामध्ये नागरी स्वातंत्र्याला स्थगिती, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध, राजकीय नेते, पत्रकार, समाजसेवक यांना अटक आणि आपल्या लोकशाहीचा पाया असलेल्या संस्थांवरील हल्ले पाहिले गेले.

त्याच वेळी, शांत राहण्यास नकार देणाऱ्या आणि आपल्या संविधानातील आदर्शांचे रक्षण करणाऱ्या असंख्य नागरिकांचे असामान्य धैर्यही यातून दिसून आले.

आपल्या सर्वांसाठी, आपले संविधान 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा, हक्क आणि कर्तव्यांचे मूर्तिमंत स्वरूप आहे. घटनात्मक मूल्यांचे रक्षण करण्याच्या आपल्या सामूहिक वचनबद्धतेचा आपण पुनरुच्चार करतो. आपल्या संविधानाच्या तत्त्वांचे मार्गदर्शन घेत, आपण असा भारत घडवू जो न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाप्रति सदैव वचनबद्ध राहील.

#SamvidhanHatyaDiwas

 

“‘संविधान हत्या दिवस’ आज आपल्याला अशा काळ्या पर्वाची आठवण करून देत आहे, जेव्हा भारतीय लोकशाहीला निर्दयपणे चिरडण्यात आले होते. हा दिवस आपल्याला लोकशाही, संविधान आणि नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी सदैव वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देईल. आणीबाणीला विरोध करणाऱ्या सर्व महान विभूतींना विनम्र अभिवादन.”

“स्वातन्त्र्यात् सुखमाप्नोति स्वातन्त्र्याल्लभते परम्।

स्वातन्त्र्यान्निर्वृत्तिं गच्छेत् स्वातन्त्र्यात् परमं पदम् ।।”

#SamvidhanHatyaDiwas

 

* * *

यश राणे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai