Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उषा विद्यालयात कृत्रिम धावपट्टीच्या उद्‌घाटनप्रसंगी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून पंतप्रधानानी केलेले भाषण

dsc_4781


उषा एथलेटिक्स विद्यालयात कृत्रिम धावपट्टीच्या उद्‌घाटनप्रसंगी तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचे मनःपूर्वक स्वागत.

 

उषा विद्यालयात सुरु झालेली ही कृत्रिम धावपट्टी म्हणजे या विद्यालयाच्या प्रगतीच्या प्रवासातला एक मैलाचा दगड मानता येईल, यामुळे प्रशिक्षणार्थी खेळाडूंना सरावासाठी आधुनिक सुविधा मिळणार आहेत. भारताच्या धावपटू, पाय्योली एक्स्प्रेस, उडान परी आणि गोल्डन गर्ल नावाने ओळखल्या जाणाऱ्या पी टी उषा यांनी या शाळेच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या योगदानाचे स्मरण करत कृतज्ञता व्यक्त करणे आज औचित्याचे ठरेल.

 

पी टी उषा भारतीय क्रीडा क्षेत्रातला दैदिप्यमान तारा आहे.    

 

त्यांनी आयुष्यात अनेक खडतर आव्हानांचा सामना करत ऑलम्पिकच्या अंतिम फेरीत धडक मारली, आणि त्यांचे पदक अगदी थोडक्यात हुकले.  भारतीय धावपटूंच्या इतिहासात खूप कमी खेळाडूंनी त्यांच्यासारखा विक्रम नोंदवला आहे.

 

उषाजी, देशाला तुमचा अतिशय अभिमान आहे आणि आणखी आनंदाची गोष्ट म्हणजे, उषाजींनी निवृत्तीनंतरही क्रीडा क्षेत्राशी संबंध ठेवला आहे. त्यांनी याकडे दिलेले वैयक्तिक लक्ष आणि प्रशिक्षण देऊन खेळाडू घडविण्यावर दिलेला भर, याचे सकारात्मक दृश्य परिणाम आता दिसत आहेत. त्यांनी प्रशिक्षित केलेल्या कुमारी टिंकू लुका आणि कुमारी जीस्ना मैथ्यू यांनी आधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे.

 

उषाजींप्रमाणेच, त्यांचे ‘उषा विद्यालय’ ही त्यांच्याजवळ असलेल्या सर्व स्त्रोतांचा अधिकाधिक वापर करून मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करत आहे.

 

अनेक अडथळे आणि अडचणींमुळे प्रलंबित असलेला हा प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल मी क्रीडा आणि युवक कार्यक्रम मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे अभिनंदन करतो.

 

हा प्रकल्प अनेक कारणांमुळे रखडला होता, मात्र आता उशिरा का होईना तो पूर्ण झाला आहे. सर्व प्रकल्प वेगाने मार्गी लावून त्यांची धडक अंमलबजावणी करणे आणि ते नियोजित काळात पूर्ण करण्याला आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ह्या प्रकल्पालाही २०११ सालीच मंजुरी मिळाली होती, मात्र कृत्रिम धावपट्टीसाठी निविदा २०१५ साली निघाली. मला असे सांगण्यात आले आहे की, ही धावपट्टी पूर्णपणे पीयुआर या सिंथेटिक लेदरने तयार केली आहे. आंतरराष्ट्रीय मानकानुसार ही धावपट्टी बनवण्यात आली असून, यात धावपटूंना कमीतकमी इजा व्हावी, असाही प्रयत्न करण्यात आला आहे.  क्रीडाक्षेत्राचा समाजातल्या मनुष्यबळ विकासाशी जवळचा संबंध आहे.  

 

माझा नेहमीच असा दृष्टीकोन राहिला आहे की, खेळामुळे शरीर निरोगी तर राहातच, पण त्यासोबतच, खेळामुळे तुमच्या व्यक्तीमत्वात आमुलाग्र बदल होतो, तुमचा सर्वांगीण विकास होतो. खेळामुळे आपल्याला शिस्त आणि कठोर परिश्रमाची सवय जडते.

 

खेळामुळे आपल्याला जीवन जगण्याचे धडे मिळतात, आपण त्यातून समृद्ध होतो. क्रीडाक्षेत्र हे स्वतःच एक उत्तम शिक्षक आहे.क्रीडाक्षेत्राची एक सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे – विजय आणि पराजय या दोन्हीकडे एकाच तटस्थ दृष्टीने बघण्याची समानता खेळामुळेच आपल्यामध्ये विकसित होऊ शकते.

 

विजय आपल्याला नम्र बनवितो आणि त्याच वेळी पराजयाने खचून न जाण्याचा धडा या खिलाडूवृत्तीमुळेच मिळतो. पराजय हा शेवट नाही, खरं म्हणजे पुनः उठून ध्येय गाठण्याची ती सुरुवात असते. 

 

खेळाने संघ भावना वृद्धिंगत होते. खेळामुळे आपल्यात एक मुक्तपणा येतो आणि दुसऱ्यांना स्वीकारण्याची क्षमता प्राप्त होते. आपल्या देशातील युवकांनी खेळ हा जीवनाचा भाग म्हणून स्वीकारणे अतिशय गरजेचे आहे. 

 

माझ्यासाठी  खेळ ह्या शब्दाचे पुढील अर्थ आहेत. ते समजाविण्यासाठी मी स्पोर्ट्स ह्या शब्दाचा विस्तार करून सांगतो:

 

एस म्हणजे स्किल (कौशल्य)

 

पी म्हणजे  प्रेसेवेरंस (चिकाटी)

 

ओ म्हणजे ऑप्तीमीझम (आशावाद)

 

आर म्हणजे रेसिलीयांस (लवचिकता)

 

टी म्हणजे टेनासिटी (दृढता)

 

एस म्हणजे स्टॅमिना (तग धरण्याची क्षमता)

 

खेळाने खिलाडूवृत्ती निर्माण होते, जी मैदानात आणि मैदानाबाहेरील जीवनात देखील अतिशय उपयोगी पडते. 

 

त्यामुळे मी नेहमी म्हणतो, जो खेळतो, तो बहरतो – जो खेळतो, तो चमकतो. 

 

सध्याच्या एकमेकांशी जोडलेल्या आणि एकमेकांवर अवलंबून असलेल्या जगात, देशाची सुप्त शक्ती अतिशय महत्वाची आहे. देशाच्या आर्थिक आणि सैनिक शक्ती व्यतिरिक्त, सुप्त शक्ती ही त्या देशाची मध्यवर्ती ओळख असते. खेळ ही एक महत्वाची सुप्त शक्ती बनली आहे.

 

खेळाची जागतिक व्याप्ती आणि खेळाडूंचे असंख्य चाहते बघता, एखादा देश खेळाच्या भरवशावर जगात आपली स्वतःची जागा तयार करू शकतो.

 

कोणत्याही खेळात नैपुण्य दाखवणारे यशस्वी खेळाडू जागतिक पातळीवर प्रेरणा स्रोत असतात. त्यांचे परिश्रम आणि यश यातून मुलांना आणि युवकांना सतत प्रेरणा मिळत असते. कुठल्या ही जागतिक महत्वाच्या क्रीडा  स्पर्धेदरम्यान, ऑलीम्पिक असो वा विश्व चषक स्पर्धा किंवा दुसरी तत्सम स्पर्धा, एखाद्या कितीही लहान आणि कितीही मोठ्या देशाच्या कामगिरीचा आनंद सगळं जग घेते.

 

सर्वांना एकत्र करण्याची ही खेळाची ताकद आहे. खेळ आणि संस्कृती ह्यांच्या मध्ये, लोकांमधील परस्पर संबंध दृढ आणि खोल करण्याचा बदल घडवून आणण्याची शक्ती आहे. अगदी भारतातही एक खेळाडू संपूर्ण देशाला आकर्षित करू शकतो. त्याचा किंवा तिचा खेळ हा संपूर्ण देशाला जोडणारी शक्ती ठरतो. जेंव्हा ती किंवा तो  मैदानावर खेळत असतो, तेंव्हा देशातला प्रत्येक नागरिक त्याच्यासाठी प्रार्थना करतो. 

 

या खेळाडूंची लोकप्रियता त्यांच्या कारकीर्दीनंतरही टिकून राहते. गेल्या अनेक वर्षांपासून ज्ञानसाधने सोबतच क्रिडा हा भारतीय संस्कृती आणि परंपरेचे अविभाज्य अंग राहिला आहे. भारतात गेल्या अनेक शतकांपासून तिरंदाजी, तलवारबाजी, मुष्टी युध्द, मलखांब, नौका शर्यत असे खेळ अस्तित्वात आहेत. केरळ मध्ये कुट्टीयमकोलूम, कालारी या सारखे खेळ लोकप्रिय आहेत. चिखलातला फुटबॉल हा ही एक लोकप्रिय खेळ आहे. तुमच्यापैकी अनेकांना सागोलकंगजेई म्हणजेच या चिखलातल्या फुटबॉल बद्दल माहित असेल. मूळचा मणिपूरचा असलेला हा खेळ पोलोपेक्षा ही जुना असल्याचं मानले जाते. अनेक ठिकाणी हा खेळ खेळला जातो.

 

आपले पारंपारिक खेळ आधुनिकतेच्या प्रवासात हरवले जाणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायला हवी. भारतीय जीवन शैलीतून तयार झालेल्या या स्वदेशी खेळांना आपण नक्कीच प्रोत्साहन द्यायला हवे. लोकांनी नैसर्गिकरित्याच हे खेळ खेळणं सुरु ठेवलं तर त्यांच्या व्यक्तीमत्वात आणि बौद्धिक क्षमतेत आपोआप वाढ होईल. त्यामुळे या खेळांचे आणि खेळाडूंचीही मुळे पक्की होतील. आज जग नव्यानं योग साधनेत रुची घेत आहे. योग आज निरोगी आणि सुदृढ आयुष्याचं तसच ताण तणाव दूर करण्याचं साधन बनलं आहे. आपल्या खेळाडूंनीही त्यांच्या नियमित सरावात योगाभ्यासाचा समावेश करावा. यातून नक्कीच खूप उत्तम परीणाम दिसतील. भारत हे योगाचं उगमस्थान आहे. त्यामुळे योगाभ्यास जगभर लोकप्रिय करणे ही आपलीच जबाबदारी आहे. आणि जसं योग आज लोकप्रिय होतो आहे तसेच आपले पारंपारिक खेळही जगभारत लोकप्रिय होतील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.

 

गेल्या काही वर्षात आपण पहिले की कसं कबड्डी हा खेळ आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा भाग झाला. आणि देशभरातही कबड्डीच्या अनेक स्पर्धा भरविल्या जातात. अनेक उद्योगपती या स्पर्धांना प्रायोजित करतात. आणि या स्पर्धा जगभरात बघितल्या जातात असंही मला सांगण्यात आले आहे. कबड्डी प्रमाणेच आपल्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून इतरही देशी खेळांना राष्ट्रीय पातळीवर आणावे लागेल. ह्यात सरकार बरोबरच खेळाशी संबंधित संस्था आणि समाजालाही मोठी भूमिका पार पाडायची आहे. आपल्या देशाला समृद्ध आणि विविधतेने परिपूर्ण संस्कृती आहे. त्यात जवळपास १०० भाषा आणी १६०० बोलीभाषा आहेत. विविध खान-पान, पेहराव, सण – उत्सव.अशा विविधतेने नटलेल्या आपल्या देशातल्या सर्वाना एकत्र धाग्यात बांधण्यात खेळाची महत्वाची भूमिका आहे.

 

सततचा आणि नियमित संवाद, स्पर्धांसाठी केला जाणारा प्रवास, सामने, प्रशिक्षण इत्यादीमुळे आपल्याला देशाच्या विविध भागातील संस्कृती आणि परंपरांबद्दल जाणून घेण्यास मदत होते.

 

ह्यामुळे एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना दृढ होते आणि राष्ट्रीय एकात्मतेला बहुमोल मदत होते.

 

आपल्याकडे प्रतिभेची वानवा नाही. पण ह्या प्रतिभेला योग्य संधी देण्याची आणि तिची जोपासना करण्यासाठी पूरक वातावरण तयार करण्याची गरज आहे.  यासाठीच, आम्ही ‘खेलो इंडिया’ कार्यक्रम सुरु केला. या कार्यक्रमांतर्गंत शाळा, महाविद्यालये ते राष्ट्रीय पातळीवर विविध क्रीडा स्पर्धा घेतल्या जातील. खेळांमधली प्रतिभा शोधणे आणि अशा गुणवंत खेळाडूंना हवी ती मदत देऊन त्यांची जोपासना करणे हा या स्पर्धांचा प्रमुख उद्देश आहे. खेलो इंडियाअंतर्गत खेळाच्या पायाभूत सुविधा तयार करण्यास मदत केली जाते. आपल्या देशातील महिलांनी, विशेषतः खेळात साऱ्या देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे.

 

आपण विशेषतः आपल्या मुलींना विविध खेळ खेळण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे आणि त्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे गेल्या वेळच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी त्यांची आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली हे अतिशय आनंददायक आहे. 

 

कदाचित, खेळातील कामगिरीच्या पलीकडे देखील, ह्या पॅरालम्पिक खेळाडुंनी दिव्यांग बंधू आणि भगिनींकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन पूर्णपणे बदलला आहे. पदक स्वीकारतांना दीपिका मलिक, वास्तविक हे अतिशय सामान्य नाव आहे, ती जे म्हणाली ते मी कधीच विसरू शकणार नाही.

 

ती म्हणाली, “हे पदक मिळवून मी खरतर अपंगत्वावर मात केली आहे.

 

या वाक्यात विलक्षण शक्ती आहे. क्रीडा क्षेत्रासाठी जन समर्थन तयार करण्यासाठी आपण सदैव प्रयत्न केले पाहिजेत. गेल्या दशकांत असे वातावरण होते की कुणी खेळात कारकीर्द करण्याचा विचारही करत नसे. आता हे बदलायला सुरुवात झाली आहे. लवकरच क्रीडांगणावर ह्याचे परिणाम दिसू लागतील. एक सशक्त खेळ संस्कृती, सशक्त खेळ अर्थव्यवस्था उभी करण्यात मदत करू शकते.

 

एक परिपूर्ण अर्थव्यवस्था म्हणून क्रीडा क्षेत्र नोकरीच्या अनेक संधी निर्माण करण्यात मोलाचे योगदान देऊ शकते. एक उद्योग म्हणून क्रीडा क्षेत्र, व्यावसायिक स्पर्धा, क्रीडा साहित्य, क्रीडा विज्ञान, औषधे, क्रीडापटू, पोशाख, पौष्टिक खाद्य, कौशल्य विकास, क्रीडा व्यवस्थापन आणि इतर वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक संधी निर्माण करू शकते.

 

क्रीडाक्षेत्र हा एक बहु अब्ज डॉलरचा जागतिक उद्योग आहे. ह्याला लोकांमधून प्रचंड मागणी आहे. जागतिक क्रीडा उद्योग जवळपास ६०० अब्ज अमेरिकी डॉलर इतका मोठा असल्याचा अंदाज आहे. भारतात संपूर्ण क्रीडा क्षेत्र केवळ २ अब्ज अमेरिकी डॉलर इतके असल्याचा अंदाज आहे.

 

मात्र, क्रीडा क्षेत्राला वाढण्यास भारतात प्रचंड वाव आहे. भारत हा खेळावर प्रेम करणारा देश आहे. ज्या प्रचंड आवडीने माझे युवा मित्र सध्या सुरु असलेल्या क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफीचे सामने बघत आहेत, तितक्याच प्रचंड आवडीने ते इपीएल फुटबॉल किंवा एनबीए बास्केटबॉल सामने आणि एफ१ शर्यती देखील बघतात.

 

आणि, मी आधी म्हटल्याप्रमाणे, ते कबड्डी सारख्या खेळाकडे देखील आकर्षित होत आहेत. आपली क्रीडांगणे आणि स्टेडीयम त्यांच्या पूर्ण क्षमतेला वापरली गेली पाहिजेत. सुट्टीत देखील बाहेर जाऊन एखादा खेळ खेळला पाहिजे. शाळा आणि महाविद्यालयांची क्रीडांगणे किंवा जिल्ह्यातील आधुनिक सुविधा असलेली स्टेडीयम वापरली गेली पाहिजेत.

 

माझे भाषण पूर्ण करण्यापूर्वी, केरळ राज्याचे, त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल मला अभिनंदन केले पाहिजे. मी देशासाठी खेळलेल्या एकूण एक खेळाडूचे अभिनंदन करतो. खेळात प्राविण्य मिळविण्यासाठीची इच्छाशक्ती आणि त्यासाठी घेतलेले कष्ट यासाठी मी खेळाडूंना सलाम करतो.

 

मी उषा शाळेला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. नवी कृत्रिम धावपट्टीमुळे त्यांना खेळात नवीन उंची गाठण्यास मदत होईल. २०२० साली टोकियो ऑलिम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय क्रिडा स्पर्धांच्या तयारीसाठी उपयोगी पडेल.

 

मी क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना आवर्जून सांगू इच्छितो की, क्रीडा क्षेत्रासाठी काही ध्येय ठरवून २०२२ मध्ये जेव्हा आपण स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करू तोपर्यंत ती पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करावा.

 

मला विश्वास आहे, उषा विद्यालयातून ऑलिम्पिक आणि इतर जागतिक क्रिडा स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी करणारे अधिकाधिक खेळाडू निर्माण होतील, असा मला विश्वास वाटतो. भारत सरकार तुम्हाला पूर्ण पाठिंबा आणि ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी आवश्यक ती सगळी मदत देईल. 

 

धन्यवाद !!

 

खूप खूप धन्यवाद !!

 

 

 

B.Gokhale/R.Aghor/Anagha