Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कानपूर आयआयटीच्या दीक्षांत समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

कानपूर आयआयटीच्या दीक्षांत समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


नवी दिल्ली – दि. 28 डिसेंबर, 2021 
 

दीक्षांत  समारंभामध्ये गंभीर राहणं आवश्यक असते काय?तुम्हा मंडळींना अनेक सूचना दिल्या गेल्या आहेत, असे वाटतंय. आपल्या सर्वांना नमस्कार! कार्यक्रमाला उपस्थित असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, डॉक्टर के. राधाकृष्णन, प्राध्यापक अभय करंदीकर, आयआयटी कानपूरचे प्राध्यापक,सर्व विद्यार्थी, इतर मान्यवर, आणि या ऐतिहासिक संस्थेतून पदवी प्राप्त करून सन्मानित होत असलेले मान्यवर! आज कानपूरच्या दृष्टीने दुहेरी आनंदाचा दिवस आहे. आज एकीकडे कानपूरला मेट्रोसारखी सुविधा मिळत आहे. तर दुसरीकडे  आयआयटी कानपूरकडून तंत्रज्ञानाच्या विश्वाला तुमच्यासारखी अमूल्य भेटही मिळत आहे. माझ्या या प्रत्येक युवा साथीदाराला मी खूप शुभेच्छा देतो. आज ज्या विद्यार्थ्यांना सन्मान केला गेला, त्यांचेही  खूप खूप अभिनंदन! आपण सर्वजण आज ज्या स्थानी पोहोचले आहात, त्याच्यामागे तुमचे माता पिता, तुमच्या कुटुंबियातले सर्व लोक, तुमचे शिक्षक, तुमचे प्राध्यापक,असे असंख्य लोक आहेत आणि त्यांचे परिश्रम तसेच त्यांचे काही ना काही तरी योगदान असणार आहे. त्या सर्वांचे विशेषतः तुमच्या माता- पित्यांचे मी अगदी मनापासून अभिनंदन करतो. 
 
मित्रांनो, 
 
तुम्ही ज्यावेळी कानपूर आयआयटीमध्ये प्रवेश घेतला होता, त्यावेळचे कानपूर  आणि आता ज्यावेळी तुम्ही इथून पदवी घेवून बाहेर पडत आहात तो आजचा दिवस, यामध्ये तुमचे तुम्हालाच स्वत:मध्‍ये  खूप मोठे परिवर्तन झाल्याचे जाणवत असणार . इथे ज्यावेळी तुम्ही आला होता, त्यावेळी मनात एक अनामिक भय असेल. मनात अनेक प्रश्नांची मालिका तयार त्यावेळी झाली असणार. आधी आपले ज्ञान , आपल्याला पडणारे प्रश्न याला एक मर्यादा होती. शाळा, महाविद्यालय, आपले मित्र, परिवार, इतकेच तुमचे वर्तुळ मर्यादित होते. आयआयटी कानपूरने तुम्हाला या मर्यादेतून बाहेर काढून  एक खूप मोठा कॅनवास दिला आहे. आता अनामिक भीती राहिलेली नाही. आता संपूर्ण दुनिया तुम्ही जाणून घेण्यासाठी तिचा नव्याने शोध घेण्याचे धाडस दाखवून तुम्ही पुढे जाणार आहात. आता अनामिक प्रश्नांची मालिका तुमच्यासमोर नाही. आता ‘क्वेस्ट फॉर द बेस्ट’ आहे. संपूर्ण विश्वावर जणू राज्य करण्याचे स्वप्न तुमचे आहे. आणि जे काही तुम्ही या वर्गामध्ये शिकला आहात, अथवा जितके काही तुम्हाला आपल्या वर्गामध्ये शिकायला मिळाले, तितकेच शिक्षण तुमचे वर्गाबाहेर, आपल्या मित्रांबरोबर अनुभवातून झाले आहे. वर्गामध्ये तुम्हाला तुमच्या विचारांचा, तुमच्या कल्पनांचा विस्तार झाला. वर्गाबाहेर तुमच्या व्यक्तित्वाचा विस्तार झाला. तुमचे व्यक्तिमत्व विकसित झाले आहे. तुम्ही आयआयटी कानपूरमध्ये जे काही मिळवले आहे, तुमच्या विचार समृद्ध झाले, त्यामुळे ही एक मजबूत पायाभरणी झाली आहे. ही एक ताकद-शक्ती आहे. या शक्तीमुळे तुम्ही जिथे कुठे जाणार आहात, तिथे काही तरी नवीन करू शकणार आहे. काही वेगळे करू शकणार आहे. तुमच्या कामामध्ये मूल्य वर्धनाचे काम तुम्ही करणार आहात. तुमचे आजचे प्रशिक्षण, तुमचे कौशल्य, तुमचे ज्ञान, निश्चितपणे तुम्हाला व्यवहारी जगामध्ये वावरताना अधिक मजबूतीने स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी मदत करेल. परंतु इथे तुमचे व्यक्तित्चव विकसित झाले आहे. ते आपल्याला अशी काही ताकद देईल की, त्यामुळे तुम्ही एका संपूर्ण समाजाचे कल्याण करू शकणार आहे. तुम्ही समाज, आपला देश यांना एक नवीन सामर्थ्य देणार आहात. 

मित्रांनो, 

तुम्ही इथे आयआयटीच्या भव्य परंपरेच्या, ऐतिहासिक काळामध्ये जगला आहात. तुम्ही वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांनी नटलेल्या भारताच्या वैभवाबरोबरच वर्तमानकाळ जगला आहात. ही भव्य परंपरा आणि चैतन्यदायी, सळसळता वर्तमान या दोन स्तंभांवर, या दोन रूळांवर आज तुम्ही आपल्या उज्ज्वल भविष्याचा प्रवास सुरू करीत आहात. हा प्रवास शुभ व्हावा, देशासाठी यशांनी भरलेला हा प्रवास असावा, अशी कामना  आज  आपल्यामध्ये उपस्थित राहून मी तुम्हा सर्वांविषयी व्यक्त करीत आहे.

 
मित्रांनो, 

यावर्षी भारताने आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश केला आहे.  आपण सर्वजण देशाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. तुम्ही ज्या शहरामध्ये पदवी घेतली आहे, त्या कानपूर शहराचा एक शानदार इतिहास आहे. कानपूर हे भारतातल्या निवडक शहरांपैकी एक वैविध्यपूर्ण शहर आहे. सत्ती चौरा घाटापासून ते मदारी पासीपर्यत, नानासाहेबांपासून ते बटुकेश्वर दत्तपर्यंत, ज्यावेळी आपण या शहरामध्ये फेरफटका मारतो, त्यावेळी असे वाटते की, आपण स्वातंत्र्य संग्रामातल्या हुतात्म्यांचा गौरव केला आहे. त्या गौरवशाली भूतकाळामध्ये आपण फेरफटका मारून येत आहोत. या स्मृतींच्याबरोबरच, तुम्हा सर्वांवर देशाला आगामी 25 वर्षांपर्यंत दिशा देण्याचे, देशाला गती देण्याचे दायित्व आहे. तुम्ही कल्पना करा, ज्यावेळी 1930 मध्ये दांडी यात्रा निघाली होती, त्यावेळी त्या यात्रेने त्या कालावधीमध्ये संपूर्ण देशामध्ये किती मोठे आंदोलनकारी बनवले होते. त्या काळामध्ये देश जितका  भारलेला होता, त्यामुळेच स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारतातल्या प्रत्येक जन-जनामध्ये अभूतपूर्व विश्वास निर्माण झाला होता. प्रत्येक भारतवासीच्या मनामध्ये विजयाच्या विश्वासाचे बीज पेरले गेले होते. 1930 च्या काळामध्ये जे 20-25 वर्षांचे नवतरूण होते, 1947 पर्यंत त्यांचा प्रवास आणि 1947 मध्ये स्वातंत्र्याच्या संकल्पाला मिळालेली सिद्धी म्हणजे त्यांच्या आयुष्यातले ते सुवर्ण युग होते. आज तुम्हीही एकप्रकारे अशाच सुवर्ण युगामध्ये पाऊल टाकत आहात. हे सुवर्ण युग आहे आपल्यासाठी आहे, ज्याप्रमाणे राष्ट्र जीवनाचा हा अमृतकाळ  आहे, अगदी तसाच हा तुमच्या जीवनाचाही अमृतकाळ आहे. अमृत महोत्सवाच्या या क्षणामध्ये तुम्ही आयआयटीचा परंपरा, वारसा घेवून पुढे निघाला आहात.  तर मग त्या स्वप्नांनाही बरोबर घेवून निघा. 2047 मध्ये भारत कसा असेल? आगामी 25 वर्षांमध्ये भारताची विकास यात्रेची गाडी तुम्हालाच सांभाळायची आहे. तुम्हीच याप्रवासाचे सूत्रधार आहात.  ज्यावेळी तुम्ही  आपल्या जीवनामध्ये 50 वर्ष पूर्ण करणार आहात, त्यावेळी भारत कसा असेल? त्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच काम करावे लागणार आहे. आणि मला माहिती आहे की, कानपूर आयआयटीमध्ये, इथल्या वातावरणाने तुम्हाला ही ताकद दिली आहे. आता तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही. हा काळ, हे 21 वे शतकामध्ये, संपूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. या दशकामध्येही तंत्रज्ञानाचा वेगवेगळ्या क्षेत्रावर दबदबा अधिक वाढणार आहे. तंत्रज्ञानाविना जीवन आता एकप्रकारे अपूर्ण जीवन असणार आहे. ही जीवन आणि तंत्रज्ञानाची स्पर्धा असणारे युग आहे. आणि मला विश्वास आहे की, यामध्ये तुम्ही नक्कीच खूप पुढे जाणार आहात. तुम्ही आपल्या तरूणपणातली इतकी महत्वाची वर्ष तंत्रज्ञानामध्ये तज्ज्ञ बनविण्यासाठी खर्च केली आहेत. तुमच्यासाठी मग यापेक्षा मोठी संधी आणखी काय असणार आहे? तुमच्याकडे तर भारताबरोरबच संपूर्ण विश्वामध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये योगदान देता येईल, यासाठी संधी उपलब्ध असणार आहेत. 

मित्रांनो, 

आपल्या आयआयटी संस्था  तर नेहमीच बुद्धिवंत आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने ‘इनक्युबेशन’ केंद्र असतात. आणि आयआयटी कानपूरने तर आपली एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. तुम्ही स्वतःची कंपनी अक्वा फ्रंट इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून बनारसच्या खिडकी घाटावर जगातला पहिले तरंगते सीएनजी फिलींग स्टेशन विकसित केले आहे. ते अतिशय उत्कृष्ट आहे. अशा पद्धतीने तुम्ही कृषी क्षेत्रामध्ये ‘स्टेट ऑफ आर्ट तंत्रज्ञान’ विकसित केले आहे. जगातला पहिला छोटेखानी मृदा चाचणी संच तयार केला आहे. 5 जी तंत्रज्ञानामध्ये तर आयआयटी कानपूरचे नाव जागतिक दर्जाचा भाग बनले आहे. ही संस्था अशा अनेक यशांमुळे अभिनंदनास पात्र आहे. अशावेळी, तुमची जबाबदारीही अनेक पटींनी वाढते. आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये, ऊर्जा आणि हवामान विषयक पर्यायामध्ये, उच्चतंत्रज्ञानाधारित पायाभूत सुविधा या क्षेत्रामध्ये देशामध्ये खूप मोठ्या संधी आहेत. आरोग्यासारख्या क्षेत्रामध्येही आज तंत्रज्ञानाधारित काम केले जात आहे. आपण आता एक डिजिटल रोगनिदान युगामध्ये, रोबोच्या मदतीने उपचार करण्याच्या युगामध्ये पाऊल ठेवत आहोत. आरोग्य उपकरणे आता घरातमध्ये असणे गरजेचे बनले आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते, त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत आपण घेवू शकतो. तुम्ही कल्पना करा की, आपण किमी व्यापक  शक्यतांच्या दारी उभे आहोत. त्यामध्ये तुम्हांची खूप मोठी आणि महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. या तुमच्यासाठी देशाविषयीच्या असलेल्या केवळ जबाबदा-या नाहीत, तर ही सर्व स्वप्ने आहेत. ही स्वप्ने आपल्या किती तरी पिढ्यांनी पाहिली आहेत, ही मंडळी अशी स्वप्ने जगली आहेत. मात्र, ती स्वप्ने साकार करण्याचे, एक आधुनिक भारत बनविण्याचे भाग्य तुम्हाला मिळाले आहे. तुमच्या पिढीला मिळाले आहे. 
 

मित्रांनो,

आज तुम्ही ज्या 21 व्या शतकाच्या ज्या कालावधीत  आहात तो काळ म्हणजे मोठी ध्येये निश्चित करण्याचा  आणि ती साध्य करण्यासाठी तुमची सर्व शक्ती पणाला लावण्याचा  आहे.  आज जी विचार आणि प्रवृत्ती तुमची आहे, तीच प्रवृत्ती देशाचीही आहे.  पूर्वी कामासंदर्भात विचार करत असू, , तर आज विचार करून काम करून दाखवायचे, आणि त्या कामाचे परिणाम घडवून आणायचे आहेत.  पूर्वी समस्यांपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न असे, तर आज समस्या सोडवण्यासाठी संकल्प केले जात आहेत.  त्यावर उत्तरे, ती ही कायमस्वरूपी.  शाश्वत उपाय! (Stable Solution) आत्मनिर्भर भारत हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

मित्रांनो,

आपण सर्वांनी पाहिलं आहे की कुटुंबात कुणी 20-22 वर्षांचे झाले तरी घरातील वडीलधारी मंडळी त्याला वारंवार सांगतात की आता वेळ आली आहे, आपल्या पायावर उभे राहण्याची.  आणि मला खात्री आहे की तुम्ही जरा आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी, इथून घरी गेलात तर ते  आधी हेच ऐकवतील, बाळा, आता माझं काम संपलं आहे.  आता आपल्या पायावर उभा राहा.  प्रत्येक पालक हेच सांगणार आहेत आणि उशीर केला तर पुन्हा पुन्हा हेच ऐकावं लागेल.  घरातील वडीलधारी मंडळी, आई-वडील असं सांगत राहतात, कारण तुम्ही आत्मनिर्भर व्हावे, तुम्ही तुमचे सामर्थ्य ओळखावे, तुम्ही स्वप्ने पाहवीत, त्यांचे संकल्पात रूपांतर करावे आणि जीव तोडून ती सिद्ध करुन  दाखवावीत.  आपल्या भारतानेही स्वातंत्र्यानंतर असाच नव्यानेच प्रवास सुरू केला होता. ज्यावेळी देशाच्या स्वातंत्र्याला 25 वर्षे पूर्ण झाली, त्यावेळेपर्यंत आपण आपल्या पायावर उभे राहण्यासाठी खूप काही करायला हवे होते.  तेव्हापासून आतापर्यंत  खूप उशीर झाला आहे, देशाने बराच वेळ वाया घालवला आहे.  मधे दोन पिढ्याही  होऊन गेल्या, त्यामुळे आता दोन क्षणही गमावायचे नाहीत.

 मित्रांनो,

माझ्या बोलण्यात तुम्हाला अधीरता दिसत असेल आणि तुम्हालाही अधीरता वाटणे स्वाभाविक आहे.  पण मला वाटतंय, आणि तुम्हा सर्वांच्या मध्ये कानपूरच्या भूमीवर  आलो आहे, तेव्हा माझ्या मनाला वाटतंय, तुम्हीही आत्मनिर्भर भारतासाठी असेच अधीर व्हा,  आत्मनिर्भर भारत हे संपूर्ण स्वातंत्र्याचे आदिस्वरूप आहे, जिथे आपण कोणावरही अवलंबून राहणार नाही.  स्वामी विवेकानंद म्हणाले होते – प्रत्येक राष्ट्राला देण्यासाठी संदेश असतो, पूर्ण करण्यासाठी एक ध्येय असते, आणि भाग्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक गंतव्य स्थान असते.  जर आपण आत्मनिर्भर झालो नाही, तर आपला देश आपले लक्ष्य कसे पूर्ण करेल, आपल्या गंतव्य ठिकाणी आपण कसे पोहोचणार?

मित्रांनो,

आपण हे करू शकता. माझा तुझ्यावर विश्वास आहे. आणि आज जेव्हा मी एवढ्या गोष्टी बोलतोय, इतक्या गोष्टी करतोय त्यात मला तुमचा चेहरा दिसतोय.  देशात एकामागून एक होत असलेल्या बदलांमागे आज मला तुमचाच चेहरा दिसतो आहे.  देश आज जे ध्येय निश्चित करत आहे ते साध्य करण्याची ताकद देशाला तुमच्या कडूनच मिळेल.  तुम्हीच आहात जे हे साध्य करणार आहात आणि तुम्हालाच हे करायचे आहे.  या अनंत शक्यता तुमच्यासाठी आहेत आणि तुम्हाला त्या प्रत्यक्षात आणायच्या आहेत.  जेव्हा देश आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल, तेंव्हा त्या यशाला तुमच्या घामाचा सुगंध येईल, तुमच्या मेहनतीची ओळख पटेल.  आणि तुम्ही चांगलेच ओळखता की, देशाने गेल्या काही वर्षांत आत्मनिर्भर भारताचा पाया रचण्यासाठी, तुमचे काम सोपे करण्यासाठी कशाप्रकारे कार्य करून ठेवलेले आहे.  गेल्या 7 वर्षांत देशात स्टार्ट-अप इंडिया, स्टँड-अप इंडिया सारखे उपक्रम सुरू झाले आहेत.  अटल इनोव्हेशन मिशन आणि पीएम रिसर्च फेलोशिपच्या माध्यमातून देश तरुणांसाठी नवीन मार्ग तयार करत आहे.  भविष्यातील संभाव्यस्थितीचा आरंभ राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने करून नव्या पिढीच्या निर्मितीची तयारी सुरू झाली आहे.  व्यवसाय सुलभता(ईझ ऑफ डुईंग बिझनेस) सुधारली गेली, धोरणात्मक अडथळे दूर झाले, या प्रयत्नांचे परिणाम आज इतक्या कमी कालावधीत आपल्यासमोर आले आहेत.  स्वातंत्र्याच्या या 75व्या वर्षात आपल्याकडे 75 हून अधिक युनिकॉर्न (नवनिर्माण), पन्नास हजारांहून अधिक स्टार्ट-अप्स आहेत.  यापैकी दहा हजार स्टार्टअप्स गेल्या सहा महिन्यांतच पुढे आले आहेत.  आज भारत जगातील दुसरे सर्वात मोठे स्टार्टअप हब म्हणून उदयास आले आहे.  आपल्या आयआयटीच्या तरुणांनीच कितीतरी स्टार्टअप सुरू केले आहेत.  ताज्या अहवालानुसार, जगातील अनेक विकसित देशांना मागे टाकून भारत तिसरा सर्वात मोठा युनिकॉर्न देश बनला आहे.

मित्रांनो,

आजकाल जागतिकीकरणाची चर्चा होते, त्याचे फायदे-तोटेही चर्चिले जातात.  पण एका गोष्टीबद्दल विवाद नाही.  भारतीय कंपन्या जागतिक व्हाव्यात, भारताची उत्पादने जागतिक व्हावीत असे कोणाला वाटत नाही.  ज्याला आयआयटीची माहिती आहे, इथली बुध्दिमानकता माहीत आहे, इथल्या प्राध्यापकांची कार्यप्रवणता  माहीत आहे, त्यांचा विश्वास आहे,की हे सर्व  आयआयटीचा तरुण नक्कीच करेल.  आणि आज, मी तुम्हाला, अशा व्यावसायिकांना आश्वासन देऊ इच्छितो की सरकार सर्व प्रकारे तुमच्यासोबत आहे.

मित्रांनो,

आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे.  आजपासून सुरू झालेल्या प्रवासात अनेकजण तुम्हाला सोयीसाठी जवळचे मार्ग सांगतील.  पण माझा सल्ला असा आहे की जर तुम्हाला आराम आणि आव्हान यापैकी एक निवडायचे असेल, तर मी तुम्हाला आराम नाही, आव्हानाची निवड करण्याचा आग्रह करेन.  कारण, तुमची इच्छा असो वा नसो, जीवनात आव्हाने नक्की येतातच. पण त्यांच्यापासून दूर पळणारे त्यांचे बळी ठरतात.  परंतु जर तुम्ही आव्हाने शोधत असाल तर तुम्ही शिकारी आहात आणि आव्हान म्हणजे तुमची शिकार. म्हणून, तुम्ही अशी व्यक्ती असावे की जी समस्यांना  शोधत राहील, आणि तुमच्या आवडीनुसार त्यांचे निराकरण करेल.  मित्रांनो, तुम्ही सर्व विद्यार्थी आयआयटीचे उत्कृष्ट तंत्रज्ञ आहात.  तुम्ही सगळे खाताना, पिताना, श्वास घेताना तंत्रज्ञानाचाच विचार करता.  तुम्ही सतत नवनिर्मितीत गुंतलेले असता.  तरीसुद्धा, या सगळ्यात माझी तुम्हाला एक विनंती आहे.  तंत्रज्ञानाची स्वतःची ताकद आहे, त्यात काहीही नुकसान नाही आणि ती तुमची आवडही आहे.  मात्र तंत्रज्ञानाच्या जगात वावरत असताना, जीवनातील मानवी घटकांना तुम्ही कधीही विसरु नका.  आपण कधीही आपल्या स्वतःला यंत्रमानव होऊ देऊ नका.  तुम्ही तुमच्या मानवी संवेदना, तुमची कल्पनाशक्ती, तुमची सर्जनशीलता आणि कुतूहल जिवंत ठेवा. आपण आपल्या जीवनात अशा गोष्टींनाही महत्त्व देऊ, ज्या केवळ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्याला मिळतीलच असे नाही.  इंटरनेट ऑफ थिंग्जवर तुम्ही नक्कीच काम कराल पण इमोशन्स ऑफ थिंग्ज विसरू नका.  तुम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल नक्कीच विचार कराल परंतु मानवी बुद्धिमत्तेची देखील आठवण ठेवा.  तुम्ही कोडिंग करत राहाल पण लोकांशी तुमचा कनेक्ट( संपर्कही )कायम ठेवा.  वेगवेगळ्या लोकांशी, वेगवेगळ्या संस्कृतीच्या लोकांशी झालेला तुमचा सहवास तुमच्या व्यक्तिमत्त्वाची ताकद वाढवेल.  भावना दाखवताना तुमच्या मेंदूने असे करु नये – H.T.T.P 404 – पृष्ठ सापडले नाही.  जेंव्हा सामायिकीकरण करण्याची वेळ येईल, आनंद आणि दयाळूपणा सामायिक करण्याची वेळ येते तेंव्हा  कधीही त्याला पासवर्ड ठेवू नका, खुल्या मनाने जीवनाचा आनंद घ्या.  बरं, मी नुकतेच आनंद शेअर करण्याबद्दल जे बोललो त्यावरून  तुम्हाला स्मरण करून देतो. हे शब्द, सुध्दा तुम्हाला आठवतील,  सागर ढाबा आणि केरळ कॅफे येथील गप्पा, कॅम्पस रेस्टॉरंट मधला स्वाद, सीसीडीची कॉफी, ओएटीमधील काठीरोल्स आणि एमटीमधील चहा आणि जिलेबी, टेक-कृती आणि अंतरंगिनी याची सुद्धा तुमची खूप आठवण येईल.  आयुष्याच नाव  हेच आहे.  ठिकाणे बदलतात, माणसे भेटतात आणि वेगळी होतात, पण आयुष्य पुढे जात असते.  याला म्हणतात – चरैवेति चरैवेति चरैवेति.  मला आत्ता दिसत आहे की सर्व विद्यार्थी इतर लेक्चर हॉलमध्येही अनेक विद्यार्थी आमच्याशी जोडलेले आहेत, कोरोना प्रोटोकॉलमुळे(कोरोना औपचारिक नियमानुसार)  ते तिथून माझे ऐकत आहेत.  तुमची परवानगी असेल आणि तुमच्या प्रोटोकॉलमध्ये काही अडचण नसेल तर मी आता त्यांना भेटायला जाईन, मी त्यांना समोरासमोर भेटेन.  तुमची कारकीर्द यशस्वी होवो, तुमचे यश, देशाचे यश होवो, या सदिच्छा देऊन मी माझे भाषण संपवतो.  तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.  खूप खूप धन्यवाद!

 

मित्रांनो,

शहरात राहणार्‍या गोरगरिबांकडेही पूर्वीच्या सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले होते. आज प्रथमच आमचे सरकार अशा शहरी गरिबांसाठी प्रामाणिकपणे काम करत आहे.  मी आपल्याला एक उदाहरण देतो.  2017 पूर्वीच्या 10 वर्षांत, उत्तरप्रदेशात शहरी गरिबांसाठी फक्त 2.5 लाख पक्की घरे बांधली गेली.  गेल्या साडेचार वर्षांत उत्तरप्रदेश सरकारने शहरी गरिबांसाठी 17 लाखांहून अधिक घरे मंजूर केली आहेत.  यापैकी साडेनऊ लाख तयार झाली असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे.
 

 बंधू आणि भगिनिंनो,

आपल्या ग्रामीण भागातील अनेक लोक शहरांमध्ये काम करण्यासाठी येतात.  यापैकी बरेच लोक शहरांमध्ये येतात आणि रस्त्यावरील हातगाड्या, टपऱ्या  पदपथावर वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करतात.  आज पहिल्यांदाच आपल्याच सरकारने या लोकांची काळजी घेतली आहे.  त्यांना बँकांची मदत सहज मिळावी, या लोकांनीही डिजिटल व्यवहार करावेत, या दिशेने आमचे सरकार काम करत आहे.  कानपूरच्या अनेक रस्त्यावरील विक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेचा लाभ झाला आहे.  यूपीमध्ये स्वनिधी योजनेअंतर्गत 7 लाखांहून अधिक विक्रेत्यांना 700 कोटींहून अधिक रक्कम देण्यात आली आहे.

 

 बंधू आणि भगिनिंनो,

जनता जनार्दनाच्या गरजा समजून घेऊन त्यांची सेवा करणे ही आपल्या सर्वांवरची जबाबदारी आहे.  यूपीच्या गरजा समजून डबल इंजिनचे सरकार दमदारपणे काम करत आहे.  यापूर्वी, यूपीमध्ये कोट्यवधी घरांमध्ये नळाने पाणी पोहोचत नव्हते. आज आम्ही “घर घर जल मिशन”च्या माध्यमातून यूपीच्या प्रत्येक घराला शुद्ध पाणी पुरवण्याची व्यवस्था करण्यात गुंतलो आहोत.  कोरोनाच्या या कठीण काळात आपल्याच सरकारने यूपीतील 15 कोटींहून अधिक लोकांना मोफत रेशन मिळण्याची व्यवस्था केली आहे.

 

 मित्रांनो,

जे आधी सरकारमध्ये होते, त्यांची मानसिकता अशी होती,की चला  पाच वर्षे आपल्याला लॉटरी लागली आहे, युपीला जमेल तेवढे लुटून घेत जाऊ, लुटून घेऊ.  यूपीमध्ये आधीच्या सरकारांनी सुरू केलेल्या प्रकल्पांमध्ये कसे हजारो कोटींचे घोटाळे झाले, ते तुम्ही स्वतः पाहिले आहे.  या लोकांनी कधीच यूपीसाठी मोठे ध्येय ठेवून काम केले नाही, दूरदृष्टीने काम केले नाही.  त्यांनी कधीही स्वत:ला उत्तर प्रदेशातील जनतेची जबाबदारी घेतली नाही.  आजचे कार्यक्षम (दुहेरी इंजिनचे) सरकार यूपीला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी पूर्ण प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करत आहे.  डबल इंजिनच्या सरकारला मोठी उद्दिष्टे कशी ठरवायची आणि ती कशी पूर्ण करायची हे माहीत आहे.  वीज निर्मितीपासून पारेषणापर्यंत यूपी सुधारू शकेल याचा विचार तरी कोणी केला होता का?  वीज का गेली, याचा विचार लोक करत नसत.  तासनतास वीज नसते हेच  त्यांना माहीत असे.  शेजारच्या घरातही वीज नाही यावरच ते समाधानी असायचे.
 

मित्रांनो,

गंगेला जाऊन मिळणारा सिसामाऊसारखा विशाल, विक्राळ नालाही एक दिवस बंद होऊ शकतो, याची कल्पना तरी कोणी केली असेल का.  पण आमच्या डबल इंजिन सरकारने हे काम केले आहे.  बीपीसीएलच्या पनकी कानपूर डेपोची क्षमता 4 पटीने वाढवल्यानेही कानपूरला मोठा दिलासा मिळणार आहे.

 बंधू आणि भगिनिंनो,

दळणवळण (कनेक्टिव्हिटी) आणि माहिती तंत्रज्ञान( कम्युनिकेशन) यांच्याशी  संबंधित पायाभूत सुविधांसोबतच, गॅस आणि पेट्रोलियम पाइपलाइनच्या पायाभूत सुविधांवर केलेल्या कामाचाही यूपीला खूप फायदा झाला आहे.  2014 पर्यंत देशात फक्त 14 कोटी एलपीजी गॅस कनेक्शन्स होती, आज 30 कोटींहून अधिक गॅस कनेक्शन आहेत.  एकट्या यूपीमध्ये सुमारे 1 कोटी 60 लाख गरीब कुटुंबांना नवीन एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत.  7 वर्षात पाईप गॅस जोडणीमध्ये 9 पट वाढ झाली आहे.  गेल्या काही वर्षांत पेट्रोलियम नेटवर्कच्या अभूतपूर्व विस्तार झाला असल्यामुळे हे घडत आहे.  बीना-पंकी मल्टी प्रॉडक्ट पाइपलाइनमुळे हे नेटवर्क आणखी मजबूत होईल.  आता कानपूरसह उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना बीना रिफायनरीच्या पेट्रोल आणि डिझेलसारख्या उत्पादनांसाठी येणाऱ्या ट्रकवर अवलंबून राहावे लागणार नाही.  यामुळे उत्तर प्रदेशातील विकासाच्या इंजिनाला न थांबता ऊर्जा मिळत राहील.

 

मित्रांनो,

कोणत्याही राज्यात गुंतवणुकीसाठी उद्योगधंदे वाढण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचे नियम सर्वात जरुरीचे असतात.  उत्तर प्रदेशातील आधीच्या सरकारांनी माफियावादाचा वृक्ष एवढा फोफावला की त्याच्या छायेत सर्व उद्योगधंदे उद्ध्वस्त झाले.  आता योगीजींच्या सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य  पुन्हा आणले आहे.  त्यामुळे आता यूपीमध्येही गुंतवणूक वाढत आहे आणि गुन्हेगार आपला जामीन स्वतः रद्द करून तुरुंगात जात आहेत.  डबल इंजिन सरकार, आता पुन्हा एकदा यूपीमधील  औद्योगिक संस्कृतीला चालना देत आहे.  कानपूर येथे एक मेगा लेदर क्लस्टर (चामड्याची औद्योगिक वसाहत) मंजूर करण्यात आले आहे.  येथील तरुणांचे कौशल्य विकसित करण्यासाठी फाजलगंजमध्ये तंत्रज्ञान केंद्राचीही स्थापना करण्यात आली आहे.  डिफेन्स कॉरिडॉर असो किंवा एक जनविभाग एक उत्पादन योजना ( वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट स्कीम) असो, कानपूरच्या आमच्या उद्योजक सहकाऱ्यांनाही त्यांचा फायदा होईल.

 मित्रांनो,

व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी (ईद ऑफ डुईंग बिझनेस)केंद्र सरकारकडूनही सातत्याने कार्य केले जात आहे.  नवीन युनिट्ससाठी कॉर्पोरेट टॅक्स कमी करून 15 टक्के करणे, जीएसटीचे दर कमी करणे, अनेक कायद्यांचे जाळे काढून टाकणे, फेसलेस असेसमेंट या दिशेने पावले उचलण्यात आली आहेत.  नवीन क्षेत्रांना चालना देण्यासाठी सरकारने उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन (प्रॉडक्शन लिंक्ड इनसेंटीव्ह) देण्यास सुरुवात केली आहे.  सरकारने कंपनी कायद्यातील अनेक तरतुदीही गुन्हे करण्यापासून मुक्त केल्या आहेत, ज्यामुळे आमच्या व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या होत्या.

 बंधू आणि भगिनिंनो,

ज्या पक्षांचे आर्थिक धोरण भ्रष्टाचाराचे आहे, ज्यांचे धोरण शक्तीशाली लोकांचा(बळाचा वापर करणाऱ्यांचा) आदर करणारे आहे, ते उत्तर प्रदेशचा विकास करू शकत नाहीत.  त्यामुळे त्यांना प्रत्येक पावलावर अडचणी येतात, ज्यामुळे  समाजाची शक्ती वाढते, समाजाचे सबलीकरण होते.  त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी उचललेल्या पावलांनाही त्यांचा विरोध आहे.  तिहेरी तलाकच्या विरोधात कडक कायदा असो, किंवा मुला-मुलींच्या लग्नाचे वय समान करण्याचा मुद्दा असो, ते फक्त विरोध करतात.  होय, योगीजींच्या सरकारचे काम पाहून हे लोक नक्कीच म्हणतात की आम्हीच तर हे केले, ते तर आम्हीच केले.  मी विचार करत होतो की, पेट्या भरून, पूर्वी मिळालेल्या नोटा पाहून हे लोक अजूनही म्हणतील की हेच आम्हीही  केले आहे.

मित्रांनो,

तुम्ही कानपूरचे लोक तर उद्योग-व्यवसायाला,धंद्यांना  चांगल्या प्रकारे समजून घेता.  2017 पूर्वी भ्रष्टाचाराचे अत्तर, जे भ्रष्टाचाराचे अत्तर त्यांनी संपूर्ण उत्तर प्रदेशात शिंपडले होते, तेच पुन्हा सर्वांसमोर आले आहे.  पण आता ते तोंडाला कुलूप लावून बसले आहेत आणि श्रेय घेण्यासाठी पुढे येत नाहीत.  संपूर्ण देशाने पाहिलेला नोटांचा डोंगर हे त्यांचे कर्तृत्व आहे, हे त्यांचे सत्य आहे.  यूपीचे लोक हे सगळं बघत आहेत, समजून आहेत.  म्हणूनच ते यूपीचा विकास करणाऱ्यांसोबत, यूपीला नव्या उंचीवर नेणाऱ्यांसोबत आहेत.  बंधू आणि भगिनींनो, आज एवढी मोठी देणगी तुमच्या चरणी सोपवत असताना, अनेक प्रकारच्या आनंदाने हे वातावरण भारलेले आहे.आजचा हा महत्वपूर्ण  क्षण, यासाठी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!  खूप खूप धन्यवाद.  

भारत माता की जय

भारत माता की जय

भारत माता की जय

 खूप खूप धन्यवाद.

***

MI/Samarjit .T/Suvarna B/ Sampada.P/C.Yadav

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]