Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कोलकाता येथे ‘आयएनएस अग्रय’, ‘आयएनएस दुनागिरी’ आणि ‘आयएनएस संशोधक’ युद्धनौकांच्या जलावतरण समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

कोलकाता येथे ‘आयएनएस अग्रय’, ‘आयएनएस दुनागिरी’  आणि ‘आयएनएस संशोधक’ युद्धनौकांच्या जलावतरण समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण


नवी दिल्‍ली, 21 जून 2026

 

पश्चिम बंगालचे राज्यपाल  आर. एन. रवी जी, ऊर्जाशील  मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी जी, नौदल प्रमुख कृष्ण स्वामीनाथन जी आणि येथे उपस्थित असलेले महिला आणि पुरुषगण !

आजचा दिवस अनेक अर्थांनी विशेष आहे. संपूर्ण जग ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करत आहे. मला आनंद आहे की या निमित्ताने मला बंगालच्या या महान भूमीवर येण्याची संधी मिळाली. ही ती भूमी आहे जिने भारताच्या विचारांना नवी दिशा दिली, भारताच्या पुनर्जागरणाला गती दिली आणि जिने शतकानुशतके भारताला सागरी मार्गाने जगाशी जोडले. आज याच भूमीवर ‘आत्मनिर्भर भारत’, ‘सुरक्षित भारत’ आणि ‘विकसित भारत’ शी संबंधित एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम होत आहे. काही वेळापूर्वीच ‘आयएनएस अग्रय’, ‘आयएनएस दुनागिरी’ आणि ‘आयएनएस संशोधक’ यांचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला आहे. योगायोगाने,  21  जून हा दिवस ‘जागतिक जलविज्ञान  दिन’ (World Hydrography Day) म्हणूनही साजरा केला जातो. आणि हा एक विलक्षण योगायोग आहे की याच दिवशी भारताचे सर्वात प्रगत हायड्रोग्राफी जहाज, ‘आयएनएस संशोधक ‘ नौदलात सामील करण्यात आले आहे. मी भारतीय नौदल, या प्रकल्पांशी संबंधित सर्व शास्त्रज्ञ, अभियंते, कामगार आणि माझ्या प्रिय देशवासियांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.

मित्रहो,

जग साक्ष  आहे की सागरी सामर्थ्याशिवाय कोणताही देश महासत्ता बनू शकत नाही. विकास, सुरक्षा आणि समृद्धी या सर्व गोष्टी समुद्राशी जोडलेल्या आहेत. आज जगातील बहुतांश व्यापार समुद्री मार्गांनीच चालतो. जगाला जोडणारे माहितीचे विशाल जाळे महासागरांच्या खालून जाते. आगामी काळात महत्त्वपूर्ण खनिजे, खोल समुद्रातील संसाधने आणि ऊर्जेचे नवीन स्रोत देखील समुद्राशीच जोडले जातील. म्हणूनच, ज्या देशाचे सागरी सामर्थ्य अधिक असेल, तितकाच त्याचा आर्थिक आणि सामरिक प्रभावही अधिक असेल. आणि भारत हे वास्तव चांगल्या प्रकारे जाणतो आणि त्यासाठी स्वतःला सज्ज करत आहे. आपली क्षमता आणि कौशल्य काय आहे, याचा आजचा हा दिवस  पुरावा आहे.

मित्रहो,

काही वर्षांपूर्वी, जेव्हा आपण ‘आयएनएस विक्रांत’ राष्ट्राला समर्पित केले, तेव्हा भारताने आपल्या समुद्री सामर्थ्याचा एक नवीन अध्याय सुरू केला होता. तो जगासमोर आपल्या क्षमतेचा उद्घोष होता. ‘आयएनएस विक्रांत’पासून आजपर्यंतचा हा प्रवास केवळ नवीन युद्धनौकांचा प्रवास नाही, तर भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचाही प्रवास आहे. आज ‘आयएनएस अग्रय’, ‘आयएनएस दुनागिरी’ आणि ‘आयएनएस संशोधक’  या प्रवासाला नवी गती देत आहेत. या तीनही नौका भारताच्या तीन महत्त्वाच्या संकल्पांचे प्रतीक आहेत. त्यांची निर्मिती भारतातच झाली आहे आणि त्यांचे संरेखनही भारतातच करण्यात आले आहे. त्यांच्या बांधणीत भारतीय उद्योगांची प्रतिभा, भारतीय अभियंत्यांचे कौशल्य आणि भारतीय कामगारांचे कठोर परिश्रम आहेत  आणि हीच ‘नव्या भारता’ची सर्वात मोठी ताकद आहे.

मित्रहो,

आज भारताला संरक्षण क्षेत्रात केवळ खरेदीदार म्हणून रहायचे नाही. आपले  लष्करी सामर्थ्य केवळ जगासाठीची एक बाजारपेठ बनून राहणार नाही. आपल्या सामर्थ्याची खरी ओळख ही बाजारपेठ असण्यात नाही, तर आपल्या ‘आत्मनिर्भरते’त आहे. भारताला उत्पादक बनायचे आहे. आणि ज्या दिवशी आपण उत्पादक बनू, त्या दिवशी आपण निर्णायक भूमिका बजावण्यासही सक्षम होऊ. आपण या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत. अलीकडच्या काळात, ‘मेड इन इंडिया’ 40 हून अधिक युद्धनौका  आणि पाणबुड्या नौदलात सामील करण्यात आल्या आहेत. म्हणजेच जवळपास दर काही आठवड्यांनी भारतीय नौदलाला नवीन ताकद मिळाली आहे. आताही  45 प्रमुख नौदल प्लॅटफॉर्म्सची निर्मिती सुरू आहे. ही केवळ एक संख्या नाही; तर  भारताच्या औद्योगिक क्षमतेचा दाखला  आहे आणि भारताच्या भविष्याचा संकेत आहे.

मित्रहो,

येत्या काही वर्षांमध्ये  भारताच्या सागरी क्षेत्रात लाखो नवीन रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. म्हणूनच आम्ही सागरी क्षेत्राकडे केवळ एक स्वतंत्र क्षेत्र म्हणून पाहत नाही, तर ‘विकसित भारता’साठी रोजगाराचे एक प्रमुख इंजिन म्हणून पाहतो. एका आधुनिक जहाजासाठी शेकडो टन पोलाद, इलेक्ट्रॉनिक्स, यंत्रसामग्री आणि हजारो सुटे भाग  लागतात. या सर्वांच्या निर्मितीमागे हजारो कंपन्या काम करतात म्हणजेच  हजारो तरुणांना रोजगार मिळतो. आज जलावतरण  झालेल्या तीन जहाजांच्या निर्मितीमध्ये 200 हून अधिक एमएसएमई क्षेत्रातील उद्योगांनी योगदान दिले आहे. या 200 एमएसएमईंमध्ये, किती मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाले असतील, याची आपण कल्पना करू शकतो.

मित्रहो,

भारतासाठी सागरी सामर्थ्याच्या पुढील टप्प्यात प्रवेश करण्याची वेळ आली आहे. म्हणूनच, जहाजबांधणी क्षेत्रासाठी एका नवीन दृष्टिकोनासह भारताने पुढील वाटचाल सुरू केली आहे. मागील काही वर्षांमध्ये  अनेक धोरणात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत. देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या  आहेत. जहाजबांधणी, जहाजांची दुरुस्ती, जहाजांचा पुनर्वापर आणि एमआरओ – देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉलिंग यांकडे आता एका मोठ्या राष्ट्रीय मोहिमेचा भाग म्हणून पाहिले जात आहे.

मित्रहो,

नौवहन क्षेत्रासाठी जाहीर केलेले 70,000 कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज हा केवळ एक आर्थिक निर्णय नाही. ही भारताच्या सागरी भविष्यातील गुंतवणूक आहे. ही भारताच्या औद्योगिक विस्तारातील गुंतवणूक आहे.

मित्रहो,

आज भारत आपली संपूर्ण सागरी परिसंस्था बळकट करत आहे. म्हणूनच भारत आपल्या बंदरांचे आधुनिकीकरण करत आहे, नवीन क्षमता निर्माण करत आहे, नवीन संपर्क-सुविधा विकसित करत आहे, नदी जलमार्गांचा विस्तार करत आहे आणि ‘मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स नेटवर्क’ विकसित करत आहे. ‘सागरमाला’ सारख्या मोहिमा या व्यापक  दृष्टिकोनाचाच एक भाग आहेत. यामुळे व्यापाराचा खर्च कमी होत आहे, उद्योगांना नवी गती मिळत आहे आणि किनारपट्टी भागात नवीन संधी निर्माण होत आहेत.

मित्रहो,

एकेकाळी भारत हा जगातील सर्वात मोठ्या संरक्षण-सामग्री आयातदारांपैकी एक म्हणून ओळखला जात असे. या अवलंबित्वामुळे धोरणात्मक आणि सुरक्षाविषयक आव्हाने निर्माण झाली होती. 2014 मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर, आम्ही ही परिस्थिती बदलण्याचा संकल्प केला. धोरणात्मक पातळीवर मोठे बदल केले  गेले आणि संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला प्राधान्य दिले गेले. याचा परिणाम म्हणून, आज संरक्षण क्षेत्रातील डिझाइन, उत्पादन आणि निर्यात यांमध्ये नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. 2014 पर्यंत देशाचे एकूण संरक्षण उत्पादन सुमारे 40,000 कोटी रुपये इतके होते. आज ते वाढून जवळपास 1,80,000 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

आणि मित्रहो,

एकीकडे देशातील संरक्षण उत्पादनात वेगाने वाढ झाली आहे, तर दुसरीकडे आपल्या  संरक्षण निर्यातीतही अभूतपूर्व गतीने वाढ झाली आहे. 2014 पर्यंत भारत सुमारे 700 कोटी रुपये मूल्याच्या संरक्षण उत्पादनांची निर्यात करत असे. आज हा आकडा वाढून जवळपास 40,000 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. भारतात तयार झालेली संरक्षण उपकरणे आता जगभरातील 80 हून अधिक देशांपर्यंत पोहोचत आहेत.

मित्रहो,

आत्मनिर्भरतेच्या या प्रवासात अजूनही बरेच काही करणे बाकी आहे. माझ्या मते, ही केवळ सुरुवात आहे. परंतु गेल्या काही वर्षांत झालेली प्रगती हे दर्शवते की, जेव्हा धोरणे स्पष्ट असतात, दिशा योग्य असते आणि आपण सर्वजण मिळून काम करतो, तेव्हा देशात अशा प्रकारचे प्रचंड परिवर्तन घडून येऊ शकते.

मित्रहो,

जेव्हा आपण सागरी वारसाबाबत  बोलतो, तेव्हा स्वाभाविकपणे बंगालचे नाव समोर येते. भारताच्या सागरी संबंधांमध्येही या भूमीचे मोठे महत्त्व राहिले आहे. हुगळी नदीच्या प्रवाहाने इतिहासाला बदलताना , व्यापाराचे नवे अध्याय लिहिले जाताना आणि विकासाचा नवा प्रवास सुरू होताना पाहिले आहे. आणि योगायोग पहा – या बंदराला बंगालचे सुपुत्र आणि देशाचे पहिले उद्योगमंत्री डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्यात आले आहे.

मित्रहो,

भारत ज्या नव्या सागरी युगाकडे वाटचाल करत आहे, त्यात पश्चिम बंगालची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. येथे बंदराची क्षमता, औद्योगिक क्षमता, तसेच प्रतिभा, कौशल्य आणि सागरी अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्याची क्षमता  आहे. मला खात्री आहे की, आगामी काळात पश्चिम बंगाल भारताच्या नील  अर्थव्यवस्था, सागरी क्षेत्रातील उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि किनारपट्टीवरील विकासाचे एक महत्त्वपूर्ण केंद्र बनेल.

मित्रहो,

भारताने नेहमीच समुद्राकडे सहकार्याचे माध्यम म्हणून पाहिले आहे. परंतु, शांततेचे रक्षण करण्यासाठी सामर्थ्यही तितकेच आवश्यक आहे, हे भारताला ठाऊक आहे. समृद्धीच्या रक्षणासाठी सुरक्षा आवश्यक आहे आणि भविष्य घडवण्यासाठी आत्मनिर्भरता अनिवार्य आहे. आज, याच भावनेचे प्रतीक म्हणून ‘आयएनएस अग्रय’,’आयएनएस दुनागिरी’ आणि ‘आयएनएस संशोधक’ भारतीय नौदलात सामील झाले आहेत. ही जहाजे त्या भारताचे प्रतिनिधित्व करतात जो २१ व्या शतकात आपले सामर्थ्य ओळखत आहे, आपल्या स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवत आहे आणि नवीन आत्मविश्वास, गती, ऊर्जा व दृढनिश्चयाने जगासमोर वाटचाल करत आहे.

मित्रहो,

या शुभ प्रसंगी, मी नौदलातील माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि माझ्या सर्व देशबांधवांना शुभेच्छा देतो. मी पुन्हा एकदा भारतीय नौदल, सर्व शास्त्रज्ञ, अभियंते, कामगार आणि देशातील जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

धन्यवाद.

 

* * *

आशिष सांगळे/सुषमा काणे/दर्शना राणे