Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गांधीनगर येथे भारत-जपान उद्योग प्रमुखांच्या मंचावर पंतप्रधानांनी केलेले भाषण


 

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे,

माननीय मंत्री आणि जपानच्या शिष्टमंडळातील वरिष्ठ सदस्य,

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपांनी,

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल,

दोन्ही देशांचे उद्योग नेते,

स्त्री आणि पुरुष गण,

भारत आणि जपानच्या उद्योग समुदायाबरोबर उपस्थित राहताना मला अतिशय आनंद होत आहे. आणि तेही महान मित्र, भारताचे मित्र, गुजरातचे मित्र आणि माझे वैयक्तिक मित्र शिंजो आबे यांच्या उपस्थितीत. कृपया या महान मित्र आणि नेत्याचे स्वागत टाळ्या वाजवून करा. जपानचे नेते, सरकार, उद्योग आणि नेत्यांशी माझा वैयक्तिक संबंध आता जवळपास एक दशकाहून जुना आहे. गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून मी जेव्हा जपानचा दौरा केला होता तेव्हा मी म्हटले होते-मला गुजरातमध्ये एक मिनी जपान पाहायचा आहे. आज हे स्वप्न पूर्ण झाले आहे. जपानच्या इतक्या मित्रांना गुजरातमध्ये राहताना आणि व्यवसाय करताना पाहून मला खूप आनंद होत आहे. इथे एवढे परिचित चेहरे पाहून मला आनंद झाला आहे. जपानी जीवन आणि कार्य अनुभव अधिक चांगला बनवण्यासाठी समर्पित वसाहती, समूह आणि संस्था स्थापन करण्यात आल्याचे पाहून मला खूप समाधान वाटले आहे. आजही एका जपानी वसाहतीची घोषणा करण्यात आली आहे. गुजरातमधील उद्योग आणि सरकार अजूनही आस लावून आहेत की “व्हायब्रण्ट गुजरात” कार्यक्रमात जपान प्रथम सहभागी देश बनेल. जपान भारताच्या भागीदारीमुळेच आज दोन्ही देशातील संपर्क वृद्धिंगत झाला.  याचा परिणाम म्हणून जपानी उद्योगांनी भारतीय अर्थव्यवस्थेबरोबर आणखी मोठ्या प्रमाणावर भागीदारी केली आहे. यासाठी मी किदानरेन, जेट्रो आणि अन्य संघटनांना या प्रक्रियेत आमची मदत केल्याबद्दल धन्यवाद देतो. जपान प्लस प्रणालीकडूनही सहकार्याच्या प्रक्रियेत मदत मिळाली आहे.

मित्रानो,

जपानचे सरकार आणि तेथील जनतेने माझ्या आणि माझ्या देशाच्या प्रति खूप प्रेम दाखवले आहे. खरे तर भारतातील सव्वाशे कोटी लोकांनाही जपानच्या लोकांबद्दल तेवढेच प्रेम आहे. पंतप्रधान आबे यांनी दिलेले प्रोत्साहन आणि वैयक्तिक पातळीवरील समर्थनासाठी मी त्यांचा विशेष आभारी आहे. पंतप्रधान आबे आणि मी एकमेकांना भेटण्याची संधी कधीही सोडत नाही. ही जवळीक आणि परस्पर सामंजस्यामुळे आम्हाला  द्विपक्षीय संबंधातील अनेक दऱ्या सांधण्यात मदत झाली आहे. गेल्या वर्षी जपानकडून कुठल्याही आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक सरकारी विकास सहायता निधी देण्यात आला. त्याचप्रमाणे भारतात कार्यरत अनेक जपानी कंपन्यांची संख्या देखील गेल्या काही वर्षात सातत्याने वाढत आहे. आज शुभारंभ झालेल्या कार्यक्रमांमधून तुम्हाला दोन्ही देशांमधील दृढ संबंधांचा अंदाज येईल.

– पहिला मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्प

-या प्रकल्पासाठी मदत केल्याबद्दल आम्ही जपान सरकारचे आभारी आहोत.

-मला आशा आहे कि 5०० किलोमीटर लांब बुलेट ट्रेन रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरु होईल आणि 2022-23 पर्यंत पूर्ण होईल.

-अतिजलद रेल्वे प्रकल्पबरोबरच एक प्रशिक्षण संस्था देखील उभारण्यात येणार आहे.

-यामध्ये मेकर्स ऑफ न्यू इंडिया म्हणजेच  , जे या अतिजलद रेल्वेची निर्मिती, परिचालन आणि देखभालीसाठी आवश्यक अतिकुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करतील.

-दुसरे, जपानी औद्योगिक वसाहतीचा विकास, देशभरात चार ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत, गुजरात व्यतिरिक्त राजस्थान, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू.

-तिसरे, ऑटोमोबाईल मोटार वाहन उद्योग क्षेत्रात आमचे सहकार्य, मांडाल येथील सुझुकीचा कारखाना जगभरात गाड्यांची निर्यात करत आहे आणि नेक्स्ट जनरेशन म्हणजेच पुढल्या पिढीच्या हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी लिथियम-आयर्न बॅटरीच्या उत्पादनाची पायाभरणी करण्यात आली आहे.

-चौथे आहे, जपान भारत निर्मिती संस्थांच्या माध्यमातून मनुष्यबळ विकास, जपानी कंपन्यांद्वारे हा विकास करण्यात येणार असून गुजरात व्यतिरिक्त कर्नाटक, राजस्थान आणि तामिळनाडू येथे हा विकास केला जाईल.

तुम्हाला माहित आहेच कि प्राचीन पुण्यनगरी वाराणसी माझे दुसरे घर आहे.

वाराणसी कन्व्हेन्शन सेंटरचा प्रकल्प जपानचे क्योटो शहर आणि वाराणसी यांच्यातील सांस्कृतिक सहकार्याचे प्रतीक आहे. याची संकल्पना पंतप्रधान आबे आणि मी तेव्हा मांडली होती, जेव्हा आम्ही 2015मध्ये एकत्रितपणे वाराणसीचा दौरा केला होता. मी याचे नाव ‘रुद्राक्ष’ ठेवले आहे, जे स्नेहाचे प्रतीक आहे. आणि मानवतेसाठी भगवान शंकराचा प्रसाद आहे. हे रुद्राक्ष वाराणसीसाठी जपानकडून प्रेमाचा हार असेल. सारनाथ येथील सामायिक बौद्ध वारसाप्रती ही एक मानवंदना असेल. या प्रकल्पासाठी जपानच्या आर्थिक सहकार्याबद्दल पंतप्रधान आबे यांचे माझ्याकडून वैयक्तिक आभार मानतो. जपानी कंपन्यांनी केलेल्या अन्य काही गुंतवणूक घोषणांबद्दल तुम्हाला माहिती आहेच. राजकीय आणि धोरणात्मक दृष्ट्या पंतप्रधान आबे यांचा हा दौरा अत्यंत उपयुक्त ठरला आहे. आम्ही अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर अनेक करार केले आहेत. यातून आमचे परस्परांचे सामंजस्य आणि विश्वास दिसून येतो.

मित्रानो,

गेल्या तीन वर्षात आम्ही व्यवसायात सुलभता सुनिश्चित करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. अनेक प्रशासकीय सुधारणांमुळे देशात उद्योगाचे वातावरण खूप चांगले बनले आहे. या सुधारणा आणि उपाययोजनांचा उद्देश २१ व्या शतकासाठी भारताला तयार करणे हा आहे. या सर्वांचा उद्देश देशात व्यापक परिवर्तन घडवणे आणि नवीन भारताच्या निर्माणाचा मार्ग प्रशस्त करणे हा आहे. आपल्या देशातील युवकांच्या व्यापक ऊर्जेमुळे आपण भारताला जागतिक निर्मिती केंद्र म्हणून सादर करत आहोत. या उद्देशासाठी आम्ही ‘मेक इन इंडिया’ अभियान सुरु केले आहे. आम्ही भारताला एक ज्ञान आधारित, कौशल्ययुक्त आणि तंत्रज्ञान आधारित समाज म्हणून विकसित करत आहोत. डिजिटल भारत आणि कौशल्य भारत यांसारख्या आमच्या अभियानाच्या माध्यमातून या दिशेने यापूर्वीच चांगली सुरुवात झाली आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही स्टार्ट अप भारत अभियान सुरु केले आहे. जागतिक स्टार्ट अप क्रमवारीत भारताला तिसरे मानांकन मिळाले आहे. आणि गेल्या दोन वर्षात भारतात उल्लेखनीय सुधारणा पाहायला मिळाल्या आहेत.

स्टार्ट अप भारत उपक्रमाचा उद्देश अभिनवतेची  एक सुदृढ व्यवस्था निर्माण करणे देखील आहे. पायाभूत सुविधा क्षेत्राबाबत माझ्या सरकारने महत्वाकांक्षी पावले उचलली आहेत. हे प्रकल्प गुंतवणूकदारांना आयुष्यभराच्या  संधी उपलब्ध करून देता आहेत. यामध्ये १०० स्मार्ट शहरांचे अभियान, 5 कोटी बेघरांसाठी घरे, रस्ते, शाळा, बंदरे तसेच रेल्वे रुळांबरोबरच रेल्वे स्थानकांची निर्मिती यांचा समावेश आहे.

मित्रानो,

भारतातील व्यापक क्षमता आणि कुशल हातांमुळे जपानला मोठ्या प्रमाणात लाभ होऊ शकतो. खरे तर भारताचा सर्वांगीण विकास कार्यक्रम जपानी कंपन्यांसाठी प्रासंगिक आहे. भांडवल आणि तंत्रज्ञानाचा प्रवेश सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आम्ही आमची अर्थव्यवस्था खुली करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. आम्ही दररोज भारतात गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभ बनवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आम्ही व्यावसायिक आणि कंपन्यांसमोरील अनेक नियामक आणि धोरणात्मक समस्या यापूर्वीच सोडवल्या आहेत. या प्रयत्नांचे अत्यंत चांगले परिणाम दिसून आले आहेत.

 मी अलीकडच्या काही जागतिक घटनांचा उल्लेख करतो- जागतिक बँकेच्या ‘उद्योगातील सुलभतेशी संबंधित निर्देशांकात’ भारताने मोठी झेप घेतली आहे. जागतिक आर्थिक मंचाच्या जागतिक स्पर्धंत्मकता निर्देशांकात भारत गेल्या दोन वर्षात 32 स्थानांनी वर गेला आहे. कुठल्याही अन्य देशापेक्षा ही उत्तम कामगिरी आहे. गेल्या दोन वर्षात भारत जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या जागतिक अभिनवता निर्देशांकात देखील २१ स्थानांनी वर चढला आहे. याचबरोबर जागतिक बंकेच्या लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांकात देखील भारत १९ स्थानांनी वर आला आहे. भारत अंक्टाड अर्थात व्यापार आणि विकासाबाबत संयुक्त राष्ट्र परिषदेने सूचिबद्ध केलेल्या अव्वल 1० एफडीआय ठिकाणांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताची सर्वात मोठी कर सुधारणा जीएसटी अलिकडेच लागू करण्यात आली. याचबरोबर आपण अशा एका अत्याधुनिक कर व्यवस्थेच्या दिशेने अग्रेसर झालो आहोत, जी पारदर्शक, स्थिर आणि पूर्व अनुमान योग्य अशी आहे.

  आज जगातील सार्वधिक उदार एफडीआय व्यवस्थांमध्ये भारताचे नाव घेतले जाते. 9० टक्क्यांहून अधिक थेट परकीय गुंतवणुकीच्या मंजुऱ्या स्वयंचलित मार्गाच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. आम्ही परदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ बरखास्त केले आहे. या  उदारीकरणामुळे भारताची थेट परदेशी गुंतवणूक गेल्या आर्थिक वर्षात ६० अब्ज डॉलर्सच्या पातळीवर पोहचली आहे. जपानकडून थेट परदेशी गुंतवणुकीचा प्रवाह गेल्या तीन वर्षात जवळपास तिप्पट झाला आहे. नवीन दिवाळखोरी आणि कर्जबाजारी संहितेमुळे गुंतवणूकदारांना आपल्या व्यवसायातून बाहेर पडणे सोपे होईल.

आम्ही वाणिज्यिक न्यायालये आणि वाणिज्यिक प्रभाग स्थापन करत आहोत, जेणेकरून वाणिज्यिक प्रकरणांचा निपटारा लवकरात लवकर होईल. मध्यस्थता संबंधी कार्यवाही आता वेगाने होऊ शकेल, कारण मध्यस्थता कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. आम्ही एका नवीन बौद्धिक संपदा अधिकार धोरणाची देखील घोषणा केली आहे. ही तर काही अशी उदाहरणे आहेत, जी दाखवतात कि आम्ही या दिशेने मार्गक्रमण करत आहोत. आम्ही या दिशेने अधिकाधिक, सर्वोत्तम आणि अतिजलद वेगाने पावले उचलू. .

मित्रानो,

भारत आणि जपान प्राचीन संस्कृती आणि जिवंत लोकशाही आहेत. सामान्य माणसापर्यंत विकास आणि समृद्धीची फळे कशी पोहचवायची ते आम्हाला माहिती आहे. भारता ला  अशा किफायतशीर तोडगे आणि प्रक्रियांची गरज आहे ज्याद्वारे देशाच्या नागरिकांपर्यंत सरकारी सेवा सहज पोहचवता येतील.

जपानला अशा संधींची गरज आहे, जिथे ते अतिशय मेहनतीने मिळवलेले ज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा वापर करू शकतील. मी हे नेहमीच सांगत आलो आहे कि 21 वे शतक हे आशियाचे शतक आहे. मी हे देखील सांगतो कि भारत आणि जपान आशियाच्या उदयात महत्वपूर्ण भूमिका पार पाडतील.

धोरणात्मक आणि आर्थिक मुद्द्यांवर भारत आणि जपान दरम्यान वाढत्या सामंजस्यामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला नवीन गती प्रदान करण्याची क्षमता आहे. मला पूर्ण खात्री आहे कि सुदृढ भारत आणि सुदृढ जपान यामुळे आशियात आणि जगात स्थैर्य येईल. हे  परस्पर आणि जागतिक उद्दिष्ट लक्षात घेऊन मी पंतप्रधान आबे आणि जपानला एक योग्य भागीदार बनल्याबद्दल धन्यवाद देतो.

आपल्या मैत्रीची ताकद आणि परस्पर विश्वास ध्यानात घेऊन मी जास्तीत जास्त जपानी लोकांना आणि कंपन्यांना भारतात येण्यासाठी, राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी आमंत्रित करतो. मी तुमच्या प्रयत्नांना यश मिळो अशी प्रार्थना करतो. आवश्यकता भासल्यास आमच्याकडून सर्वतोपरी मदत देण्याचे मी आश्वासन देतो.

 

धन्यवाद! खूप-खूप धन्यवाद!

पी.आई.बी./ बी. गोखले/ एस. काणे