पीएम्इंडिया
जमियत उलेमा ए हिंदच्या नेतृत्वाखाली, मुस्लिम समुदायाच्या 25 नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत केले. संपूर्ण जग भारताकडे पाहत असून, राष्ट्राची आगेकूच सुरु ठेवणे ही भारतीय समाजाच्या सर्वच घटकांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. डोवल यांच्या वक्तव्याशी या नेत्यांनी सहमती दर्शवली. पंतप्रधानांच्या सबका साथ सबका विकास या धोरणाला अनुसरून देशाला प्रगतीपथावर नेणे हे उद्दिष्ट हवे असे ते म्हणाले.
पंतप्रधानांच्या दूरदृष्टीची प्रशंसा करतानाच, पंतप्रधानांवर देशातल्या जनतेच्या असलेल्या विश्वासामुळे समाजातल्या सर्वच स्तराची भरभराट होईल असा विश्वास या प्रतिनिधिमंडळाने व्यक्त केला. नव भारताच्या निर्मितीसाठी समान भागीदार होण्यासाठी मुस्लिम समाज उत्सुक असल्याचे या नेत्यांनी सांगितले.
दहशतवाद हे मोठे आव्हान असल्याची दखल घेत दहशतवाद नष्ट करण्यासाठी एकत्रित निश्चय त्यांनी व्यक्त केला. कोणत्याही परिस्थितीत, कोणीही देशाच्या सुरक्षेशी अथवा कल्याणाशी तडजोड करणार नाही ही मुस्लिम समाजाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. भारताविरुद्धचे कोणतेही कारस्थान, मुस्लिम समाज यशस्वी होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले. काश्मीरमधल्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त करून केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच हा प्रश्न सोडवू शकतात असा विश्वास या प्रतिनिधिमंडळाने व्यक्त केला.
तिहेरी तलाक या विषयावर पंतप्रधानांनी घेतलेल्या पवित्र्याची त्यांनी प्रशंसा केली.
या प्रतिनिधिमंडळात, शैक्षणिक संस्थांशी निगडित सदस्यांचा समावेश होता. त्यांनी, स्टार्ट अप, रोकडरहित व्यवहार, नीती आयोगाने नुकत्याच आयोजित केलेल्या हॅकॆथॉन, यासारख्या सरकारी उपक्रमात या संस्थानी केलेल्या प्रगतीची माहिती यावेळी दिली.
केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कल्याण योजनांच्या अंमलबजावणीची त्यांनी स्तुती केली.
लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती म्हणजे सलोखा आणि स्नेहभाव असल्याचे पंतप्रधानांनी या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत करताना सांगितले. आपल्या नागरिकात भेदभाव करण्याचा कोणताही अधिकार सरकारला नाही यावर भर देतानाच, विविधतेतून एकता हे भारताचे वैशिष्ट्य राहिल्याचे पंतप्रधान म्हणाले. जगात फोफावणाऱ्या कट्टरतावादाला भारतातल्या नव्या पिढीने बळी पडता कामा नये असे त्यांनी सांगितले.
तिहेरी तलाक या मुद्द्याचे राजकारण होऊ देऊ नये याचा पुनरुच्चार करत याबाबत सुधारणा करण्यासाठी या नेत्यांनी जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन त्यांनी केले.
जमियत उलेमा ए हिंदचे अध्यक्ष मौलाना सय्यद मोहमद उस्मान मंसूरपुरी, जमियत उलेमा ए हिंदचे सरचिटणीस मौलाना मोहमद ए मदानी, मुंबई अंजुमन इस्लामचे अध्यक्ष डॉ झहीर काझी, प्रो अख्तरूल वासें, मौलाना बद्रुद्दीन अजमल यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
B.Gokhale/ N.Chitale/D.Rane
Had fruitful discussions on a wide range of subjects with leaders of the Jamiat Ulama-i-Hind. https://t.co/oB4QZpTMgx
— Narendra Modi (@narendramodi) May 9, 2017