Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दिल्ली मेट्रोच्या बदरपुर-फरिदाबाद विस्‍तारित मार्गाच्या उद्‌घाटन समारंभात पंतप्रधानांचे भाषण

दिल्ली मेट्रोच्या  बदरपुर-फरिदाबाद विस्‍तारित मार्गाच्या उद्‌घाटन समारंभात  पंतप्रधानांचे भाषण

दिल्ली मेट्रोच्या  बदरपुर-फरिदाबाद विस्‍तारित मार्गाच्या उद्‌घाटन समारंभात  पंतप्रधानांचे भाषण

दिल्ली मेट्रोच्या  बदरपुर-फरिदाबाद विस्‍तारित मार्गाच्या उद्‌घाटन समारंभात  पंतप्रधानांचे भाषण

दिल्ली मेट्रोच्या  बदरपुर-फरिदाबाद विस्‍तारित मार्गाच्या उद्‌घाटन समारंभात  पंतप्रधानांचे भाषण

दिल्ली मेट्रोच्या  बदरपुर-फरिदाबाद विस्‍तारित मार्गाच्या उद्‌घाटन समारंभात  पंतप्रधानांचे भाषण

दिल्ली मेट्रोच्या  बदरपुर-फरिदाबाद विस्‍तारित मार्गाच्या उद्‌घाटन समारंभात  पंतप्रधानांचे भाषण

दिल्ली मेट्रोच्या  बदरपुर-फरिदाबाद विस्‍तारित मार्गाच्या उद्‌घाटन समारंभात  पंतप्रधानांचे भाषण

दिल्ली मेट्रोच्या  बदरपुर-फरिदाबाद विस्‍तारित मार्गाच्या उद्‌घाटन समारंभात  पंतप्रधानांचे भाषण

दिल्ली मेट्रोच्या  बदरपुर-फरिदाबाद विस्‍तारित मार्गाच्या उद्‌घाटन समारंभात  पंतप्रधानांचे भाषण

दिल्ली मेट्रोच्या  बदरपुर-फरिदाबाद विस्‍तारित मार्गाच्या उद्‌घाटन समारंभात  पंतप्रधानांचे भाषण

दिल्ली मेट्रोच्या  बदरपुर-फरिदाबाद विस्‍तारित मार्गाच्या उद्‌घाटन समारंभात  पंतप्रधानांचे भाषण

दिल्ली मेट्रोच्या  बदरपुर-फरिदाबाद विस्‍तारित मार्गाच्या उद्‌घाटन समारंभात  पंतप्रधानांचे भाषण

दिल्ली मेट्रोच्या  बदरपुर-फरिदाबाद विस्‍तारित मार्गाच्या उद्‌घाटन समारंभात  पंतप्रधानांचे भाषण


मोठया संख्येने उपस्थित बंधू-भगिनींनो,

आताच आपले मुख्यमंत्री सांगत होते की मोदीजी इतक्या वेळा हरियाणामध्ये आले आहेत आणि 11 तारखेलाही येणार आहेत, 18 तारखेलाही येणार आहेत. तुम्हा सर्वांना माहित आहे, हरियाणा हे माझे दुसरे घर आहे. गुजरात सोडल्यानंतर मी अनेक वर्षे हरियाणामध्येच राहिलो. इथल्या प्रत्येक गाव, गल्ली, परिसराशी मी परिचित आहे, त्यामुळे मला हरियाणाला यायची इच्छा होईल की नाही होणार ? तुम्ही दिलेले प्रेम मी कधी विसरु शकतो का ? तर हे तुमचे प्रेम आहे जे मला वारंवार येथे घेऊन येते आणि मी हरियाणाला सांगितले होते, पहिल्या दिवसापासून सांगत आहे की तुम्ही मला जे प्रेम दिलंत, मी विकास करुन व्याजानिशी ते परत करेन, हे मी सांगतो आहे.

बंधू-भगिनींनो, निवडणुका येतात, जातात. राजकारण आपल्या जागी सुरुच असते. ते लोकशाहीचा भाग आहे, मात्र देश केवळ राजकारणाने नाही चालत, देश राष्ट्रकारणाने चालतो, देश वादांमुळे पुढे जात नाही तर देश संवादामुळे पुढे जातो. आपल्या समस्यांवर तोडगा किंवा त्यांचा काही उपाय असेल किंवा एखादे औषध असेल तर त्याचं नाव आहे विकास. विकास झाला, तर तरुणांना रोजगार मिळेल, विकास झाला तर शेतकऱ्याला आपल्या पिकांसाठी पूर्ण भाव मिळेल. विकास झाला तर गरीबातील गरीब मुलाला सर्वोत्तम शिक्षण मिळेल, विकास झाला तर गावांतील गरीब, वृध्द लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध होईल, गरीबाला राहायला घर मिळेल आणि म्हणूनच माझ्या बंधू-भगिनींनो, आम्ही एकाच मुद्दयावर काम करत आहोत. जेव्हापासून तुम्ही आमच्यावर जबाबदारी सोपवलीत, आमचा एकच मंत्र आहे, एकच उद्दिष्ट आहे, एकच मार्ग आहे, एकच ध्येय आहे आणि त्याचं नाव आहे विकास.

तुम्ही मला सांगा, तुम्हाला विकास हवा आहे की नाही ? चांगले रस्ते हवेत की नकोत ? चांगल्या शाळा हव्यात की नकोत ? या देशाला हेच हवे आहे आणि म्हणूनच हे सरकार या मुद्दयांवर आपली शक्ती पणाला लावत आहे. गेल्या 60 वर्षात ही कामे पूर्ण झाली असती तर बरे झाले असते. देश नव्या उंचीवर पोहोचला असता. मात्र खूप कामे अपूर्ण आहेत आणि अपूर्ण आहेत म्हणून जुन्या सरकारवर टीका टिप्पणी करुन मी थांबणे, हे योग्य नाही. समस्यांचे निराकरण करणे, विकासाचे नवनवीन उपाय शोधणे आणि देशाला नव्या उंचीवर घेऊन जाणे ही या सरकारची जबाबदारी आहे.

काही दिवसांपूर्वी, आपण पाहिलेत, सूपर्ण जगात एक आर्थिक संकट आले, भक्कम आर्थिक पाया असलेले देशदेखील हादरले. हे वादळ इतके भीषण होते की, त्यासमोर निभाव लागणे कठीण होते. या भीषण आर्थिक मंदीमध्ये, भयंकर आर्थिक वादळामध्ये, केवळ भारत देश तग धरु शकला असे जगभरातील अर्थतज्ञांचे मत आहे. माझ्या बंधू-भगिनींनो, आणि यावरुन हेच दिसून येते की, गेल्या 15 महिन्यात सरकारने जो मार्ग निवडला आहे, जी धोरणे लागू केली आहेत, आज त्याचा परिणाम दिसून येत आहे. एवढया मोठया वादळातही भारत जमिनीवर पाय रोवून उभा आहे. मात्र बंधू-भगिनींनो, केवळ तग धरुन राहिलो, एवढयावर समाधान मानणे आम्हाला मंजूर नाही. एवढया मोठया वादळात टिकलो ही चांगली गोष्ट आहे, मात्र जिथे आपण टिकलो, तिथे थांबायचे नाही. आपल्याला पुढे जायचे आहे. पुढे जाण्याचा रस्ता सव्वाशे कोटी देशबांधवांची साथ आणि सहकार्य आहे, पुढे जाण्याचा रस्‍ता सर्व राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी खांद्याला खांद्या लावून चालण्याचा आहे. पुढे जाण्याचा मार्ग लोकशाही मार्ग आहे आणि जर आपल्याला विकास करायचा असेल तर पायाभूत विकास क्षेत्राला सर्वप्रथम प्राधान्य दयावे लागेल. रेल्वे, रस्‍ते, सामान्य नागरिकासाठी सुविधा जोपर्यंत आपण निर्माण करत नाही, तोपर्यंत विकासाची फळे तळापर्यंत पोहोचणार नाहीत. आणि म्हणूनच 2022 साली जेव्हा भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करेल, स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष कसे असावे, आपण स्वप्न बरोबर घेऊन चालू शकत नाही का कि जेव्हा स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करु, स्वातंत्र्य सैनिकांना जेव्हा पुष्पांजली वाहू, स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या महापुरुषांचे पुण्यस्मरण करु, तोपर्यंत किमान एक काम तरी पूर्ण करु, या देशात कोणताही गरीब असा असणार नाही, ज्याचे स्वत:चे घर नसेल, प्रत्येक गरीब व्यक्तीला स्वत:चे घर मिळेल, काम खूप मोठे आहे, जगातील काही देशांच्या लोकसंख्येपेक्षा अधिक घरे बांधावी लागतील, मात्र बंधू-भगिनींनो कठीण काम देखील आपल्याला हाती घ्यायचे आहे आणि ते पूर्ण करण्याच्या दिशेने पुढे जायचे आहे.

आमचे वेंकय्या नायडू, नगरविकास मंत्री म्हणून त्यांनी एक योजना देशासमोर ठेवली आहे, ज्यामुळे शहरातील गरीबांसाठी घरांची सुविधा उपलब्ध होईल, नवीन घरे तयार होतील, गरीबांसाठी तयार होतील, स्वस्त असतील, चांगली असतील आणि घर देखील असे असेल, ज्याच्या नळात पाणी असेल, वीज असेल, जवळपास शाळा असेल, एक कुटुंब सुखाने शांतीने राहील असे घर असावे. ग्रामीण विकास मंत्रालयाचे चौधरी वीरेंद्र सिंह, गावांमधील गरीबांना राहण्यासाठी स्वत:चे घर मिळावे यासाठी योजना राबवत आहेत. एका बाजूला नगरविकास, एका बाजूला ग्रामीण विकास, गरीब मग तो शहरातील असो किंवा गावातील असो, प्रत्येकाला राहायला घर मिळावे यासाठी खूप मोठे काम आम्ही हाती घेतले आहे.

बंधू-भगिनींनो, आज इथे मेट्रो रेल्वेचे लोकार्पण होत आहे. आता हरियाणा देखील अभिमानाने जगाला सांगेल की आमच्याकडे मेट्रो रेल्‍वे आहे. दिल्लीच्या पर्यटकांना आकर्षिक करण्याची सर्वात मोठी ताकद कुणात असेल तर ती हरियाणामध्ये आहे. शनिवार-रविवारी पर्यटकांना आकर्षित करण्याची ताकद हरियाणामध्ये आहे, आणि मेट्रोची सुविधा झाली की मोठया संख्येने दिल्लीहून लोकं सुट्टी साजरी करण्यासाठी हरियाणाकडे वळतील आणि हरियाणातील युवकांना रोजगार मिळेल. ही मेट्रो केवळ येण्या-जाण्यासाठी आहे, असे नाही, यापूर्वी बसने जावे लागत होते, गाडी घेऊन जावे लागत होते, वाहतूक कोंडी होत होती, आता लवकर पोहचता येते, एवढेच नाही तर यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेला गती मिळते, संपूर्ण आर्थिक जीवनाला एक गती मिळते आणि म्हणूनच या रॅलीचे नाव देखील गती-प्रगती रॅली ठेवण्यात आले आहे. गती देखील असेल, प्रगती देखील असेल आणि जलद गतीने प्रगती व्हावी, ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. अंदाजे अडीच हजार कोटी रुपये खर्च करुन हा प्रकल्प येथे पूर्ण झाला आहे.

मात्र मी आज माझ्या हरियाणाच्या बंधू-भगिनींना आणखी एक भेट देऊ इच्छितो, ही मेट्रो इथूनच परत जाणार नाही, तर आपण वल्लभगडपर्यंत जाऊ. येत्या काही दिवसांत वल्लभगडसाठी काम सुरु होईल. 600-700 कोटी रुपयांचा आणखी खर्च येईल. परंतु हरियाणाच्या महत्त्वपूर्ण भागांना जोडण्याचे काम होईल.

फरिदाबाद माझ्यासाठी नवीन नाही. मी एकेकाळी इथे स्कूटरवरुन यायचो. मी फरिदाबादला वाढताना पाहिले आहे. आशियामध्ये सर्वात मोठया औद्योगिक परिसरांच्या यादीत फरिदाबाद एक छोटा भारत बनले आहे. भारतातील असे कोणतेही राज्य नसेल, जेथील लोक फरिदाबादमध्ये राहिले नाहीत. एक प्रकारे लघु भारत बनले आहे. अशा फरिदाबादचा विकास देखील तसाच व्हायला हवा. या मेट्रो रेल्वेच्या प्रारंभामुळे तो नवीन विकासाचा मार्ग देखील खुला झाला आहे आणि मी वेंकय्या नायडू यांचे एका गोष्टीसाठी अभिनंदन करु इच्छितो, त्यांचा विभाग हे काम पाहतो. ते संपूर्ण जगाला एक संदेश देत आहेत की मेट्रोचा हा मार्ग पर्यावरण-स्नेही आहे. येथील स्थानकांवर सौर पॅनेल लावले आहेत आणि अंदाजे दोन मेगावॅट वीज सूर्यप्रकाशापासून निर्माण होते आणि संपूर्ण व्यवस्थेमध्ये याच विजेचा वापर केला जातो. मेट्रोचा एक मार्ग सौर पॅनेलनी सज्ज असणे हे जगासाठी देखील आकर्षणाचे कारण ठरले आहे. येत्या काही दिवसांत हरित रेल्वे स्थानक कसे बनेल, पर्यावरणाला अनुकूल रेल्वे स्थानक कसे बनेल याबाबत मेट्रोच्या वतीने एक यशस्वी अभियान चालवले जात आहे आणि आज जेव्हा संपूर्ण जग जागतिक तापमानवाढीमुळे चिंताग्रस्त आहे, हवामान बदलामुळे चिंतित आहे, आपल्या छोटीशी मेट्रो देखील जगाची मदत करण्यासाठी हरित चळवळीमध्ये आपले योगदान देत आहे आणि म्हणूनच वेंकय्याजी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो.

बंधू-भगिनींनो, ही हरियाणाची धरती अशी आहे, काल आपण श्रीकृष्णाचा जन्‍मोत्सव साजरा केला आणि जेव्हा श्रीकृष्णाची आठवण काढतो, तेव्हा केवळ द्वारकानगरीची आठवण येत नाही, तर कुरुक्षेत्र देखील लगेच आठवते. संपूर्ण हरियाणा एक प्रकारे या महापुरषांच्या सावलीत मोठा झाला आहे. सांस्कृतिक वारशाचा धनी आहे. इथूनच जवळ सिही गाव आहे जे सूरदासांची जन्मभूमी आहे, हेच तर आपले वैशिष्टय आहे, हीच आपली शक्ती आहे आणि या महापुरुषांचा आर्शिर्वाद घेऊन हरियाणाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

मी हरियाणा सरकारचे अभिनंदन करतो. मनोहर लालजी यांचे आणि त्यांच्या टीमचे विशेष अभिनंदन करतो. जे हरियाणा मुलींच्या भ्रूण हत्येसाठी ओळखले जात होते, ते हरियाणा आज मुली वाचवण्यासाठी ओळखले जाऊ लागले आहे. हा छोटासा निर्णय बदल नाही, ही छोटीशी चळवळ नाही, किती कठीण काम असते याचा मला अंदाज आहे. मात्र हरियाणाच्या राज्य सरकारने, येथील राजकीय नेत्यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे आणि मुली वाचवण्याचे जे अभियान सुरु केले आहे आणि संपूर्ण भारतात मुली वाचवण्याच्या अभियानाचा प्रारंभ देखील याच हरियाणाच्या धरतीवरुन झाला आहे.

मला माहित आहे, मनोहर लाल जी आपले कष्टाळू नेते आहेत. मेहनत करण्यात बहुधा कोणी त्यांचा हात धरु शकणार नाही. मी अनेक वर्षे त्यांच्याबरोबर काम केले आहे. आणि ते हरियाणाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यात यशस्वी होतील, हरियाणाच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करतील असा मला विश्वास वाटतो.

पुढील दिवसांत, आपल्या देशात आम्हाला आपल्या शहरांचा कायापालट करायचा आहे. चेहरा बदलयचा आहे, त्याच्या फुफ्फुसाला नवीन ताकद दयायची आहे. आज आपल्या शहरांची फुफ्फुसे देखील आजारी पडली आहेत. हिरवळ शिल्लक नाही. आपल्या मर्जीने ते वाढत चालले आहे. वेंकय्याजी यांच्या नेतृत्वाखाली जे स्मार्ट शहरांचे अभियान सुरु झाले आहे, त्या स्मार्ट शहरांमध्ये फरिदाबादचे देखील नाव आहे. मात्र काही लोकांना वाटत असेल कि आता सरकारने स्मार्ट शहर म्हटले तर स्मार्ट शहर झाले. बंधू-भगिनींनो, तुम्हाला माहित असायला हवे आणि मला वाटते याबाबत घरा-घरांत चर्चा व्हायला हवी, दरवेळी चर्चा व्हायला हवी कि आताच तर फरिदाबादचा प्रवेश झाला आहे आणि या स्पर्धेतील पहिला सामना त्यांनी जिंकला आहे. पहिला सामना जिंकून त्यांनी प्रवेश मिळवला आहे, मात्र पुढे जाण्यासाठी इथल्या सर्व नागरिकांनी ठरवायला हवे कि आपल्याला फरिदाबाद स्मार्ट शहर बनवायचे आहे. कायद्यात हा बदल करावा लागला तर करायचा. आपल्याला ही शिस्त आणायची आहे म्हणजे आणायची आहे. आपल्याला स्वच्छता ठेवायची आहे तर ठेवायची आहे. हे जोपर्यंत आपण करणार नाही, ही स्मार्ट शहरांची स्पर्धा तुम्ही जिंकू शकणार नाही त्याच्या काही अटी काही निकष आहेत, काही नियम आहेत, मला वाटते देशात एक जागृतीचे वातावरण तयार व्हायला हवे. ही शंभर शहरे संपूर्ण भारतात पहिला सामना जिंकून आली आहेत. कारण स्पर्धेतून हे ठरवले आहे, पहिल्या स्पर्धेत ते जिंकले आहेत. मात्र जसजसे पुढे जाल, स्पर्धा अधिक कठीण होणार आहे. मात्र मला विश्वास वाटतो की, हरियाणाची दोन्ही शहरे ही स्पर्धा जिंकतील आणि देशात स्मार्ट शहरे बनवण्याचे यश हरियाणा मिळवेल.

मी तुम्हाला आमंत्रित करतो, मी तुम्हाला आव्हान देतो, हे आव्हान स्वीकारा, सरकारने जितके निकष ठरवले आहेत, ते निकष पूर्ण करा. संपूर्ण फरिदाबादमधील प्रत्येक घरातील प्रत्येक नागरिकाने स्मार्ट शहराचा संकल्प करायला हवा, तेव्हा कुठे स्मार्ट शहर बनवू शकाल, आणि यासाठीच मी तुम्हाला आवाहन करत आहे.

बंधू-भगिनींनो, हरियाणाची धरती वीरांची धरती आहे. ही हरियाणाची धरती जवानांची धरती आहे. ही हरियाणाची धरती देशासाठी बलिदान देणाऱ्यांची धरती आहे. पंतप्रधान बनण्यापूर्वीचा माझा पहिला कार्यक्रम, जेव्हा माझ्या पक्षाने मला पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केले, 13 सप्टेंबर रोजी मी रिवाडीमध्ये आलो होतो. आणि माझा पहिला कार्यक्रम होता, माजी सैनिक मोठया संख्येने जमले होते, आणि त्यावेळी मी समान पद, समान निवृत्ती वेतनाबाबत बोललो होतो, आठवतंय. बंधू-भगिनींनो, हा मुद्दा 42 वर्षापासून रेंगाळला आहे, चार दशके इतकी सरकारे येऊन गेली, मात्र या समस्येवर कोणालाही तोडगा काढता आला नाही. तोंडी सहानुभूती सर्व सरकारांनी व्यक्त केली. प्रत्येकजण म्हणत होता, देशासाठी जवान प्राण देतात, सरकारची जबाबदारी आहे, प्रत्येकजण म्हणत होता. मात्र करताना प्रत्येकाला जड जात होते आणि आज मलाही ते जाणवतंय हे सोपे काम नाही. माझ्या देशाच्या जवानांनो, तुम्ही देशासाठी आपले आयुष्य वेचले आहे, तुमच्या मान-सन्मानाहून मोठे आमच्या आयुष्यात काही असू शकत नाही. मात्र हे प्रकरण खूप कठीण आहे. त्याचा प्रभाव माहीत नाही, कुठे कुठे पडू शकतो. येणाऱ्या दिवसांत काय-काय संकटे येतील, मात्र माझ्या देशाच्या जवानांनो, आम्ही आश्वासन दिले होते आणि आश्वासन पूर्ण केले आहे. तुम्हाला माहित आहे, आधीच्या सरकारसाठी ओआरओपी काय होते ? 500 कोटी रुपयांचा कार्यक्रम होता, 500 कोटी रुपयांचा, तेव्हा आम्हालाही वाटले की आता 500 आहे तर 700 होईल, 800 होईल, करा, काय आहे ? मात्र जेव्हा आम्ही मोजदाद करायला बसलो, तेव्हा दररोज नवीन गोष्ट येत राहिली. कोशयारी समिती, ज्याचा आपले जवान वारंवार उल्लेख करतात, ती आम्ही पाहिली, तिने काय म्हटले, तिने तर 300 कोटी रुपयांहून कमी सांगितले होते. त्यांनी म्हटले होते, 300 कोटी रुपयांपेक्षा कमी देखील लागले, तरी होईल. संपूर्ण सरकार संभ्रमात, बसलेले अधिकारी संभ्रमात, लष्कराच्या जवानांचे बोलणे देखील असे, प्रत्येक जण गोंधळलेला होता. गेल्‍या काही दिवसांपासून, मी सतत एक-एक तार उघडत गेलो, गोष्टी ठीक करत गेलो, आणि हिशोब लागत गेला. बंधू-भगिनींनो, हे ओआरओपी 500 कोटी रुपयांमध्ये पूर्ण होणारे काम नाही. जेव्हा हिशोब केला तेवहा तो 8 ते 10 हजार कोटी रुपये इतका झाला.

माझे सरकार स्थापन झाले 26 मे 2014 रोजी आणि माझी जबाबदारी 26 मे 2014 पासून सुरु होते. हे जे प्रचार करणारे लोक आहेत, ते देशाची जनता आणि विशेषत: आपल्या जवानांना संभ्रमात पाडण्याचे पाप करत होते. 26 मे रोजी या सरकारचा जन्म झाला, त्याच दिवसापासून आम्ही काम चालू केले आणि काल आम्ही घोषणा केली. तरीदेखील सरकार बनल्यानंतर लगेचच एक जुलै मोजण्यासाठी योग्य म्हणून आम्ही एक जुलैपासून हा निर्णय लागू केला.

मला माहित आहे, देशाच्या सैन्यात 80-90 टक्के लोक कोण असतात ? आपल्या सैन्यात 80-90 टक्के ते जवान असतात, जे छोटया-छोटया पदांवर असतात, खांद्यावर बंदूक घेऊन शत्रूंशी लढत असतात. सर्वात आधी प्राणाची बाजी ते लावतात, मात्र सैन्याचे वय कमी असावे यासाठी त्यांना 15 वर्षानंतर नोकरी सोडावी लागते, 17 वर्षानंतर नोकरी सोडावी लागते, 20 वर्षानंतर नोकरी सोडावी लागते, यासाठी सैन्यातले लोक वेगवेगळे शब्दप्रयोग करत असतील. काही लोकांना वाटते की, जे 15 वर्ष, 17 वर्षानंतर नोकरी सोडून गेले, त्यांना ओआरओपी मिळणार नाही. माझ्या जवान बंधू-भगिनींनो, मात्र तो हवालदार असो, शिपाई असो, नायक असो, अरे तुम्हीच तर देशाचे रक्षण करता, आणि हे ओआरओपी सर्वप्रथम कुणाला मिळेल तर ते तुम्हाला मिळेल. स्वेच्छानिवृत्तीच्या नावाखाली तुम्हाला संभ्रमात टाकण्याचे जे प्रयत्न केले जात आहेत ते चुकीचे करत आहेत. ज्या लोकांनी युध्दात सैन्यात काम करताना आपले शरीर गमावले, एखादा अवयव गमावला, असेही जवान ज्यांना नाईलाजाने सैन्य सोडावे लागले, देशासाठी शरीराचा एक-एक अवयव बलिदान केला, त्यांना सैन्य सोडावे लागते. ते ओआरओपीपासून वंचित राहतील? सैन्यावर प्रेम करणारा पंतप्रधान असा विचार करुच शकत नाही. माझ्या बंधू-भगिनींनो, सर्वांना समान पद समान निवृत्तीवेतन मिळेल. आणि म्हणूनच, हा जो 8 हजार 10 हजार कोटी रुपयांचा खर्च आहे ना, त्यातील सर्वात जास्‍त निधी 15-17 वर्षानंतर जे सैन्य सोडून घरी येतात, त्या जवानांना दिला जाईल. आणि म्हणूनच हा संभ्रम निर्माण करण्याची आवश्यकता नाही. हे सरकार खूपच स्पष्ट आहे. देशासाठी जगणाऱ्या मरणाऱ्या जवानांसाठी ओआरओपी लागू करण्याचे आम्ही आश्वासन दिले आहे आणि काल आम्ही घोषणा केली.

काही लोक म्हणतात, आयोग बनवला. हा काही वेतन आयोग बनवलेला नाही. हे केवळ आम्ही घेतलेले निर्णय आहेत. कारण आधी 500 कोटीवाल्यांच्या समजण्यात काहीतरी गडबड राहिली, नंतर कोशयारी समितीने जो अहवाल दिला, त्यात गडबड होती, आम्हाला वाटले कि 10 हजार कोटी रुपये दिल्यानंतरही होऊ शकते की कुठे तरी काही राहून गेलेले असेल, कुठे समजण्यात गडबड झाली असेल, सैन्याचा एखादा भाग निसटला असेल, तर अशावेळी एखादी व्यवस्था असावी जेणेकरुन सैन्याचे जवान त्यांच्या मदतीने एखादी त्रुटी राहिली असेल, लहान-मोठा बदल आवश्यक असेल, तर तो करु शकतील. यासाठी ही समिती बनवण्यात आली, हा काही वेतन आयोग नाही आणि म्हणूनच हे जे गैरसमज पसरवले जात आहेत, त्यांचे निराकरण व्हायला हवे.

आज देशाच्या सैन्यदलात 10 पैकी 1 जवान हरियाणातील असतो. 10 जवान असतील, तर त्यापैकी एक हरियाणाचा असणारच असणार आणि म्हणूनच हे 8-10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जेव्हा येईल, तेव्हा यातील निधी मोठया प्रमाणावर हरियाणाच्या निवृत्त जवानांकडे येणार आहे. याचाच अर्थ हरियाणामध्ये हजारो-कोटी रुपये येणार आहेत. जेव्हा हरियाणामध्ये हजारो-कोटी रुपये येतात, तेव्हा हरियाणाची अर्थव्यवस्था अचानक चालक बनते. निवृत्त जवानांना पैसे मिळाल्यावर हरियाणाच्या आर्थिक घडामोडींना खूप मोठे बळ मिळेल. खूप मोठा निर्णय या सरकारने घेतला आहे, देशभक्तीने प्रेरित होऊन घेतला आहे. देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये खूप कामे असतात. काही कामांमध्ये कपात करावी लागली तरीही करायचा निर्णय घेतला आहे आणि म्हणूनच मी माझ्या जवानांना सांगतो की हे सरकार तुमचे आहे, हे सरकार तुमचा उत्साह वाढलेला पाहू इच्छिते, हे सरकार तुमच्या सुखाची चिंता करणारे सरकार आहे आणि आगामी दिवसांत जिथे गरज पडेल तेव्हा सरकार तुमच्या सोबत उभे राहील. हा विश्वास मी देशाच्या जवानांना देऊ इच्छितो.

बंधू-भगिनींनो, जे लोक घोषणाबाजी करुन राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत, देशबांधवांनो, ज्यांनी 40-42 वर्षे जे काम केले नाही, त्यांना एक तरी प्रश्न विचारायचा अधिकार आहे का? देशाची दिशाभूल करण्याचा अधिकार आहे का ? जवानांच्या नावाने बोलण्याचा अधिकार आहे का? अरे तुम्हा लोकांचे पाप होते कि तुम्ही लोकांनी 40-42 वर्षे काम केले नाही तर आज आमच्याकडे हिशोब मागत आहेत. बंधू-भगिनींनो, एक फॅशन सुरु झाली आहे, जेव्हा सरकार कोणताही चांगला निर्णय घेते, देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी धैर्याने पुढे येते, तेव्हा जनतेने नाकारलेले हे लोक देशाला पुढे जाऊ देत नाहीत, यापेक्षा मोठा लोकशाहीचा अपमान असू शकत नाही, आणि म्हणूनच माझ्या बंधू-भगिनींनो, मी हरियाणातील धरतीवरुन देशबांधवांना सांगत आहे, जिथे कृष्णाने गीतेचा संदेश दिला होता आणि युध्दात विजय मिळवण्याचे संकेत दिले होते, ही ती भूमी आहे जिथे प्रत्येक कुटुंबातून एखादा जवान सीमेवर देशाची सेवा करत आहे, अशा धरतीवरुन मी बोलत आहे कि आमच्यासाठी आमच्या सैन्यदलाचे जवान कुणापेक्षाही कमी प्रिय नाहीत आणि म्हणूनच हे जे कुरघोडीचे राजकारण सुरु आहे, त्यामुळे देशाचे भले होणार नाही.

बंधू-भगिनींनो, आम्हाला विकासाच्या मार्गावर चालायचे आहे, सव्वाशे कोटी देशबांधवांना घेऊन चालायचे आहे आणि त्यांना घेऊन आम्ही पुढे जात आहोत आणि आज मेट्रोची एक भेट हरियाणाच्या जीवनाला नवीन ताकद देईल. आधुनिक हरियाणा निर्मितीत हे उपयोगी पडेल. या विश्वासासह मी पुन्हा एकदा इथले मुख्यमंत्री, सरकारच्या संपूर्ण टीमचे हरियाणाला निरंतर पुढे घेऊन जाण्यासाठी, नव्या उंचीवर घेऊन जाण्याच्या प्रयत्नांसाठी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि वेंकय्याजी नायडू यांच्या नेतृत्वाखाली आपला शहरी विकास जलद गतीने होवो, हरियाणामध्ये खूप मोठया प्रमाणात शहरी विकास होत आहे, तो देखील नवी उंची गाठो या शुभेच्छांसह तुम्हा सर्वांचे खूप-खूप धन्यवाद !

“जय जवान, जय किसान”

“जय जवान, जय किसान”

“जय जवान, जय किसान”

“भारत माता की जय”

“भारत माता की जय”

खूप-खूप धन्यवाद !

S.Kane/S.Tupe