Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंडित दिनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी आणि स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील ऐतिहासिक भाषणाला 125 वर्ष झाल्यानिमित्त आयोजित समारंभात पंतप्रधानांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पंडित दिनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी आणि स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील ऐतिहासिक भाषणाला 125 वर्ष झाल्यानिमित्त आयोजित समारंभात पंतप्रधानांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


पंडित दिनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी आणि स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील ऐतिहासिक भाषणाला 125 वर्ष झाल्यानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

125 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतातील एका युवकाने आपल्या मोजक्या शब्दांनी जग जिंकून घेतले होते आणि जगाला एकतेचे महत्व पटवून दिले होते. आजच्या काळात हा दिवस 9/11 म्हणून ओळखला जातो. 1893 साली मात्र 9/11 हा दिवस प्रेम, सलोखा आणि बंधुभावाचे प्रतिक होता, असे पंतप्रधान म्हणाले.

आपल्या समाजात शिरकाव करणाऱ्या सामाजिक कुप्रथांविरोधात स्वामी विवेकानंदांनी आवाज उठवला. केवळ कर्मकांडांनी कुठलीही व्यक्ती दिव्यत्वापर्यंत पोहोचू शकत नाही, जनसेवा हीच खऱ्या अर्थाने प्रभू सेवा आहे, असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते, याची आठवण पंतप्रधानांनी करुन दिली.

स्वामी विवेकानंदांचा निव्वळ उपदेश देण्यावर विश्वास नव्हता, राम कृष्ण मिशनच्या माध्यमातून संस्थात्मक आराखडा उभारण्यासाठी त्यांच्या कल्पना आणि आदर्शांनी मार्ग तयार केला, असे पंतप्रधान म्हणाले.

भारत स्वच्छ ठेवण्यासाठी अर्थक काम करणाऱ्या सर्वांचा विशेष उल्लेख करत, त्यांनीच खऱ्या अर्थाने वंदे मातरम्‌ची भावना आत्मसात केल्याचे पंतप्रधानांनी आवर्जुन नमुद केले. विद्यापीठ स्तरावरील निवडणुकांसाठी प्रचार करणाऱ्या विद्यार्थी संघटनांनी स्वच्छतेला अधिक महत्व द्यावे, असे पंतप्रधान म्हणाले. जे खरोखर महिलांचा आदर करतात, त्यांनाच स्वामी विवेकानंदांच्या भाषणातील – अमेरिकेतील बंधु आणि भगिनींनो, या संबोधनामागील अभिमानाची भावना खऱ्या अर्थाने समजू शकेल, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.

भारत सर्वार्थाने स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी स्वामींजींच्या मनात असणारी तळमळ, त्यांच्या आणि जमशेदजी टाटा यांच्यातील पत्र व्यवहारावरुन दिसून येते. ज्ञान आणि कौशल्य या दोन्ही गोष्टी सारख्याच महत्वाच्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

21 वे शतक हे आशियाचे शतक आहे, असे लोक आता म्हणतात. मात्र फार पूर्वी स्वामी विवेकानंदांनी ‘एक आशिया’ ही संकल्पना व्यक्त केली होती आणि जगाच्या समस्यांचे निराकरण आशियातून होऊ शकेल, असे भाकीत केले होते, असे पंतप्रधान म्हणाले.

विद्यापीठाचा परिसर हा कौशल्य आणि नाविन्यासाठी आदर्श असा परिसर आहे, असे सांगत महाविद्यालयातील परिसरात ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही भावना रुजवण्यासाठी विविध राज्यांच्या संस्कृती आणि भाषांचे महत्व अधोरेखित करणारे विशेष दिवस साजरे व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भारत बदलतो आहे, जागतिक परिक्षेत्रात भारताची भूमिका महत्वपूर्ण ठरते आहे आणि केवळ जनशक्तीमुळे हे शक्य होते आहे, असे सांगत ‘नियम पाळा, मग भारत राज्य करेल’ असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

B.Gokhale/M.Pange/D.Rane