Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात” द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद


माझ्या प्रिय देशवासियांनो, आपणा सर्वांना नमस्कार. जम्मू काश्मीरच्या उरी विभागात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या देशाच्या अठरा वीरांना आपण गमावले. ह्या सर्व शूरवीरांना मी नमन करतो आणि त्यांना श्रद्धांजली वाहतो. ह्या भ्याड हल्ल्यामुळे साऱ्या देशाला धक्का बसला. देशभर शोक आहे, आणि आक्रोशही आहे. आणि हे नुकसान केवळ त्या कुटुंबाचे नाही, ज्यांनी आपला मुलगा गमावला, पती गमावला, हे नुकसान पूर्ण देशाचे आहे आणि म्हणून मी देशवासियांना आज इतकेच सांगेन, जे मी त्या दिवशी सांगितले होते, मी आज त्याचा पुनरुच्चार करतो, की अपराध्यांना शिक्षा होणारच.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या सैन्यदलावर आपला पूर्ण विश्वास आहे. अशा प्रत्येक कटाचा ते बिमोड करतील, आणि देशातील सव्वाशे कोटी लोकांना सुखाने जगता यावे, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. असे शूरवीर आहेत ते. आपल्या सैन्यदलाचा आपल्याला अभिमान आहे. आपल्या सारख्या नागरिकांना, राजकीय नेत्यांना बोलण्यासाठी खूप संधी मिळते. पण सैन्यदल बोलत नाही. ते पराक्रम गाजवतात.

आज मी काश्मीरच्या नागरिकांशी विशेषत्वाने बोलू इच्छितो. देशविरोधी शक्तींना आता काश्मीरचे नागरिक चांगलेच ओळखू लागले आहेत. आणि जसे जसे सत्य त्यांना कळू लागले आहे, ते अशा विचारांपासून स्वतःला वेगळे करून शांततेच्या मार्गावर वाटचाल करू लागले आहेत. शाळा आणि महाविद्यालये पुन्हा लवकरात लवकर कार्यरत व्हावीत असे प्रत्येक आई-वडिलांना वाटतंय. शेतात तयार झालेला माल, फळं भारताभरातल्या बाजारपेठांमध्ये जावे असे शेतकऱ्‍यांना वाटतेय. आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावेत असे वाटतेय. आणि गेल्या काही दिवसांपासून हे व्यवहार सुरळीत व्हायला सुरुवातही झाली आहे. शांतता,एकता आणि सद्‌भावना हाच आपल्या समस्यांवर समाधान मिळवून देणारा मार्ग आहे, हे आपण सारेजण जाणतो. हाच आपल्या प्रगतीचा मार्ग आहे, आपल्या विकासाचाही मार्ग आहे. आपल्या भावी पिढ्यांसाठी विकासाची नवी शिखरं आपल्याला गाठायची आहेत. प्रत्येक समस्येवरचा उपाय आपण एकत्र बसून शोधू शकतो, मार्ग काढू शकतो आणि काश्मीरच्या भावी पिढीसाठी उत्तम मार्ग प्रशस्त करू शकतो, असा मला विश्वास आहे. काश्मीरमधल्या नागरिकांची सुरक्षा ही शासनाची जबाबदारी आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाला काही पावले उचलावी लागतात. मी आपल्या सुरक्षा दलांनाही सांगतो, की आपल्याकडे असलेले बळ, सामर्थ्य, आपले कायदे-नियम आहेत. ते कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आहेत. काश्मिरमधल्या सामान्य नागरिकांना सुखाने जगता यावे यासाठी आहेत, आणि आपण त्याचे कसोशीने पालन करूया. कधी कधी आपण विचार करतो, त्यापेक्षा वेगळा विचार, नवा विचार काही जण मांडतात. सोशल मिडियाच्या माध्यमातून हल्ली बरेच जाणून घेण्याची संधी मला मिळते. हिंदुस्तानातल्या प्रत्येक भागातल्या, प्रत्येक प्रकारच्या लोकांच्या भाव-भावना समजून घेण्याची, जाणून घेण्याची संधी मिळते. आणि यामुळे लोकशाहीला बळकटी मिळते. अकरावी इयत्तेत शिकणाऱ्या हर्षवर्धन नावाच्या तरुणाने नुकताच एक वेगळा विचार माझ्यासमोर मांडला. तो लिहितो, की उरी इथे झालेल्या हल्ल्यानंतर मी फार अस्वस्थ झालो होतो. काहीतरी करावे अशी मनात तीव्र इच्छा होती. पण काय करावे ते कळत नव्हते. आणि माझ्यासारखा एक छोटासा विद्यार्थी काय करू शकतो? मग माझ्या मनात विचार आला, की देशहितासाठी मी काय करू शकतो? मग मी संकल्प केला की मी रोज तीन तास जास्त अभ्यास करीन. देशाला उपयोगी पडेन असा नागरिक होईन.

हर्षवर्धन भाऊ, वातावरणात उद्विग्नता असताना, एवढ्या लहान वयात तुम्ही शांत मनाने असा विचार करू शकता, याचा मला आनंद वाटतो. पण हर्षवर्धन, मी हेही सांगू इच्छितो की, देशभरातल्या नागरिकांच्या मनात जी उद्विग्नता आहे, त्याला फार मोठी किंमत आहे. राष्ट्राच्या चेतनेचे ते प्रतिक आहे. ही उद्विग्नता काहीतरी करून दाखवण्याचा निश्चय दर्शवते. हा, तुम्ही एका रचनात्मक दृष्टीकोनातून ते मांडलात. पण आपल्याला माहिती असेल, जेव्हा 1965 साली लढाई झाली, तेव्हा लालबहादूर शास्त्री आपले नेतृत्व करत होते. पूर्ण देशभर असेच वातावरण तयार झाले होते. आक्रोश होता, देशभक्तीच्या भावनेला भरती आली होती. काहीतरी घडावं असे प्रत्येकाला वाटत होते, काहीतरी करावे असे प्रत्येकाला वाटते होते. त्यावेळी लालबहादूर शास्त्री यांनी एका अत्यंत उत्तम पद्धतीने देशाच्या ह्या भावविश्वाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. आणि जय जवान-जय किसान हा मंत्र देऊन, देशातल्या सामान्य माणसाला देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली होती. बॉम्ब आणि बंदुकांच्या आवाजातही देशभक्ती प्रकट करण्याचा आणखी एक मार्ग प्रत्येक नागरिकाकडे असतो. तो लालबहादूर शास्त्रींनी दाखवला. महात्मा गांधीजी जेव्हा स्वातंत्र्याची लढाई लढत होते, आणि आंदोलन जेव्हा ऐन टोकाला पोहचत असे आणि थोडावेळ थांबण्याची वेळ येत असे, तेव्हा आंदोलनाच्या ह्या तीव्रतेचा उपयोग समाजात रचनात्मक कामांना प्रेरणा देण्यात कसा होईल ? याचा यशस्वी प्रयोग त्यांनी केला. आपल्या सैन्याने त्याचे कर्तव्य पार पाडावे, शासनात काम करणाऱ्या लोकांनी त्यांचं कर्तव्य पार पाडावे, आणि आपण देशवासी, प्रत्येक नागरिक देशभक्तीच्या भावनेतून, काहीतरी रचनात्मक योगदान देऊ. असे झाले तर, देश निश्चितच नवी शिखरं गाठेल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, श्रीमान टी.एस.कार्तिक ह्यांनी नरेंद्र मोदी ॲपवर लिहिलं आहे की, पॅरालिम्पिक्स स्पर्धेसाठी गेलेल्या आपल्या ॲथलीटनी इतिहास रचला, आणि त्यांनी दाखवलेला खेळ म्हणजे मानवी चेतनेचा विजय आहे. श्रीमान वरूण विश्वनाथन ह्यांनी नरेंद्र मोदी ॲपवर लिहिले आहे की आपल्या ॲथलीटनी खूपच चांगले काम केले आहे. ह्याचा उल्लेख आपण ‘मन की बात’मध्ये केला पाहिजे. केवळ आपण दोघेच नाही, तर देशातली प्रत्येक व्यक्ती पॅरालिम्पिक्स मधल्या आपल्या खेळाडूंबरोबर एका भावनिक नात्याने जोडली गेली आहे. खेळाच्याही पुढे जाऊन, ह्या पॅरालिम्पिक्सने आणि आपल्या खेळाडूंच्या कामगिरीने मानवतेच्या दृष्टीकोनात, दिव्यागांकडे बघण्याच्या दृष्टीकोनात पूर्ण बदल घडवला आहे. आणि मी, आपली विजयी भगिनी दीपा मलिक हिनं सांगितलेली गोष्ट विसरूच शकत नाही. जेव्हा तिने पदक जिकले, तेव्हा ती म्हणाली, की ह्या पदकाने मी अपंगत्वालाच पराभूत केले आहे. ह्या वाक्यात फार मोठी ताकत आहे. ह्या वेळी पॅरालिम्पिक्स स्पर्धेत आपल्या देशातल्या तीन महिलांबरोबर १९ अॅथलिट सहभागी झाले होते. इतर खेळांच्या तुलनेत, जेव्हा दिव्यांग खेळतात, तेव्हा शारीरिक क्षमता, खेळातील कौशल्य, ह्यापेक्षाही मोठी गोष्ट असते टी इच्छाशक्ती, संकल्पशक्ती.

आपल्याला हे ऐकून सुखद आश्चर्य वाटेल, की आपल्या खेळाडूंनी आजवरची सर्वोत्तम कामगिरी करत, चार पदके मिळवली. दोन सुवर्ण, एक रौप्य, आणि एक कांस्य पदक अशी कमाई केली. सुवर्ण पदक मिळवणाऱ्या देवेंद्र झाझरीया याने भालाफेकीत दुसऱ्‍यांदा सुवर्ण पदक पटकावले. बारा वर्षांनी पुन्हा मिळवले. बारा वर्षात वय वाढतं. एकदा सुवर्णपदक मिळाल्यानंतर उत्साह थोडा कमी होतो. पण देवेंद्रने दाखवून दिले, की शरीराची अवस्था, वाढणारे वय, ह्याचा त्याच्या संकल्पावर कोणताही परिणाम झाला नाही. आणि बारा वर्षांनी त्याने पुन्हा सुवर्णपदक जिंकले. आणि तो काही जन्मताच अपंग नव्हता, विजेचा झटका लागल्यामुळे त्याला एक हात गमवावा लागला. आपण विचार करा, जो माणूस वयाच्या तेविसाव्या वर्षी पहिले सुवर्णपदक जिंकतो, आणि पस्तिसाव्या वर्षी दुसरं सुवर्णपदक मिळवतो,त्याने आयुष्यात किती साधना केली असेल? मरीयप्पन थंगवेलू याने उंच उडी प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. आणि ह्या थंगवेलूला वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी आपला उजवा पाय गमवावा लागला. त्याच्या संकल्पाच्या आड त्याची गरिबी त्याने येऊ दिली नाही. तो काही मोठ्या शहरात राहणारा नाही, किंवा मध्यमवर्गीय श्रीमंत घरातलाही नाही. वयाच्या एकविसाव्या वर्षी, कष्टप्रद आयुष्य सोसून शारीरिक अडचणी असूनही संकल्पाच्या सामर्थ्यावर त्याने देशाला पदक मिळवून दिलं. ॲथलीट दीपा मलिकने तर विजयध्वज फडकवण्यात कमालच केली.

वरूण सी.भाटी याने उंच उडी प्रकारात कांस्य पदक जिंकले. पॅरालिम्पिक्स पदकांचे हेच तर महत्व आहे, आपल्या देशात, आपल्या समाजात,आपल्या आजूबाजूला, आपले जे दिव्यांग बंधू-भगिनी आहेत, त्यांच्याकडे बघण्याच्या आपल्या दृष्टीकोनात या पदकांनी फार मोठा बदल घडवून आणला आहे. आपल्या संवेदना जाग्या केल्या आहेत.फार कमी लोकांना हे माहिती असेल, की या वेळी पॅरालिम्पिक्स स्पर्धेत या दिव्यांग जनांनी कोणता पराक्रम केला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच जागी ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती. त्या ऑलिम्पिक स्पर्धेतील विक्रम ह्या दिव्यांग खेळाडूंनी मोडले. या वेळी असे झाले आहे. ऑलिम्पिकमध्ये 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या धावपटूने जी विक्रमी वेळ नोंदवली, त्या पेक्षा 1.7 सेकंद कमी वेळ नोंदवून दिव्यांग स्पर्धेतल्या अल्जिरियाच्या अब्दुल लतीफ बाकरने 1500 मीटर शर्यतीत नवा विक्रम स्थापन केला.एवढंच नाही, मला आश्चर्य तेव्हा वाटले जेव्हा मला हे कळले की दिव्यांग खेळाडूंमध्ये धावण्याच्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर आलेल्या खेळाडूला पदक मिळालं नाही, पण सबल धावपटूंच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या खेळाडूपेक्षा कमी वेळेत त्याने शर्यत पूर्ण केली. मी ह्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करतो, आणि आगामी काळात पॅरालिम्पिक्ससाठी, त्याच्या विकासासाठी एक सुलभ योजना तयार करण्याच्या दिशेने भारत पुढे जात आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या आठवड्यात मला गुजरातच्या नवसारीत अनेक आश्चर्यकारक अनुभव आले. मोठा भावनिक क्षण होता तो माझ्यासाठी. भारत सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी एका महाशिबिराचे आयोजन केले होते. आणि अनेक विश्वविक्रम त्यावेळी नोंदले गेले. तिथे मला एक छोटी मुलगी भेटली. जी हे जग पाहू शकत नाही. गौरी शार्दूल आणि ती नांग जिल्ह्यातल्या दुर्गम जंगलातून आली होती. संपूर्ण रामायण काव्य रुपात तिला मुखोद्गत आहे. तिने मला त्यातला थोडासा भाग ऐकवला. आणि तिथल्या जमलेल्या लोकांनाही मी ते ऐकवले. तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले. त्या दिवशी एका पुस्तकाचे लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली. दिव्यांग व्यक्तींच्या जीवनातल्या यशोकथा त्यात संकलीत केल्या होत्या. फार प्रेरक गोष्टी त्यात होत्या. भारत सरकारने नवसारीच्या भूमीवर विश्वविक्रम नोंदवला. ही गोष्ट मी अत्यंत महत्वाची मानतो. केवळ आठ तासात सहाशे दिव्यांग, जे ऐकू शकत नाहीत, त्यांना श्रवणयंत्र देण्याचा यशस्वी प्रयोग तिथे झाला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ह्या प्रयोगाची नोंद झाली.एकाच दिवशी दिव्यांग व्यक्तींकडून तीन-तीन विश्वविक्रम होणे ही आपल्या सर्व देशवासियांकरता गौरवाची गोष्ट आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, दोन वर्षांपूर्वी दोन ऑक्टोबरला पूज्य बापूजींच्या जयंतीदिनी आपण स्वच्छ भारत अभियानाचा प्रारंभ केला होता.आणि त्याच दिवशी मी सांगितले होते की स्वच्छता ही सवय व्हायला हवी. प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य व्हायला हवं, अस्वच्छतेबद्दल तिरस्काराचे वातावरण तयार व्हायला हवे. आता दोन ऑक्टोबरला जेव्हा दोन वर्षं पूर्ण होतील, तेव्हा मी विश्वासाने सांगू शकतो, की सव्वाशे कोटी देशवासियांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढली आहे.आणि मी म्हटले होते-एक पाऊल स्वच्छतेकडे. आणि आज आपण सर्व जण सांगू शकतो, की प्रत्येकाने एक पाउल पुढे जाण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे. याचाच अर्थ देश सव्वाशे पावले स्वच्छतेकडे पुढे गेला आहे. आणि हेही नक्की झाले आहे, दिशा योग्य आहे, फळे किती मधुर असतात, थोड्याशा प्रयत्नांनी केवढं साध्य होऊ शकते, हे सुद्धा समजले. आणि म्हणूनच प्रत्येक जण, मग तो सामान्य नागरिक असो, शासक असो, सरकारी कार्यालय असो किंवा रस्ता, बस स्थानक किंवा रेल्वे स्टेशन, शाळा किंवा कॉलेज, धार्मिक स्थळ किंवा रुग्णालय, लहान मुलांपासून,ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, ग्रामीण गरीब, शेतकरी महिला, प्रत्येक जण स्वच्छतेसाठी काहीनाकाहीतरी योगदान देत आहे. माध्यमातील मित्रांनी देखील एक सकारात्मक भूमिका पार पाडली आहे. माझी इच्छा आहे की आपण अजून पुढे जायला हवं. पण सुरुवात चांगली झाली आहे. प्रयत्न भरपूर झाले आहेत. आणि आपण यशस्वी होऊ असा विश्वास निर्माण झाला आहे. हे सुद्धा आवश्यक आहे, आणि म्हणूनच ग्रामीण भारताबद्दल सांगायचे झाले तर, आजपर्यंत दोन कोटी अडतीस लाख, म्हणजे जवळ जवळ अडीच कोटी शौचालये बांधली गेली आहेत. आणि येत्या दीड वर्षात आणखी दीड कोटी शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट आहे. नागरिकांच्या सन्मानासाठी, विशेषतः माता-भगिनींच्या सन्मानासाठी, उघड्यावर शौचाला जाण्याची सवय बंद व्हायला हवी. आणि यासाठी हागणदारी मुक्त गाव अभियान सुरु झाले आहे. राज्या-राज्यांमध्ये, जिल्ह्या-जिल्ह्यामध्ये, गावा-गावात एक निकोप स्पर्धा सुरु झाली आहे. आंध्र प्रदेश, गुजरात, आणि केरळ हागणदारी मुक्त गाव अभियानात पूर्ण यश मिळवतील. मी नुकताच गुजरातला गेलो होतो. तेव्हा अधिकाऱ्‍यांनी मला सांगितले की महात्मा गांधीजींचे जन्मस्थान पोरबंदर, येत्या दोन ऑक्टोबरला हागणदारी मुक्त गाव अभियान पूर्णपणे यशस्वी करणार आहे. ह्या करता ज्यांनी काम केले, त्यांचे अभिनंदन, आणि जे यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना शुभेच्छा. आणि देशवासियांना मी आग्रहाने सांगेन की, माता-भगिनींच्या सन्मानासाठी, लहान मुलांच्या आरोग्यासाठी, ह्या समस्येपासून आपण देशाला मुक्त करायचे आहे. या आपण हा संकल्प घेऊन पुढे जाऊ. विशेषतः माझे तरुण मित्र, जे हल्ली तंत्रज्ञानाचा भरपूर वापर करतात, त्यांच्यासाठी मी एक योजना सादर करू इच्छितो. स्वच्छता मोहिमेची आपल्या शहरात काय परिस्थिती आहे? हे जाणून घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि म्हणून भारत सरकारने यासाठी एक दूरध्वनी क्रमांक सुरु केला आहे 1969. आपल्याला माहित आहे की गांधीजींचा जन्म 1969 साली झाला होता. 1969 मध्ये आपण महात्मा गांधी जन्मशताब्दी साजरी केली. आणि 2019 मध्ये आपण त्यांची दीडशेवी जयंती साजरी करणार आहोत. ह्या 1969क्रमांकावर फोन करून आपण आपल्या शहरातील शौचालय बांधण्याची स्थिती तर जाणून घेऊ शकालच, त्याचबरोबर शौचालय बांधण्यासाठी अर्ज सुद्धा करू शकाल. आपण याचा अवश्य फायदा घ्या. एवढेच नाही तर, साफ-सफाई बाबत आपल्या तक्रारी आणि त्या तक्रारींचे निराकरण याबद्दल जाणून घेण्यासाठी एक स्वच्छता ॲप सुरु करण्यात आले आहे. आपण याचा भरपूर लाभ घ्या, विशेषत्वाने तरुण पिढीने याचा फायदा घ्यायला हवा. भारत सरकारने कॉर्पोरेट क्षेत्राला सुद्धा पुढे येण्याचे आवाहन केले आहे. स्वच्छतेसाठी काम करू इच्छिणाऱ्या तरुण व्यावसायिकांना त्यांनी प्रायोजकत्व द्यावे. स्वच्छ भारत मोहिमेचे प्रतिनिधी म्हणून त्यांना जिल्ह्यात पाठवता येईल.

हे स्वच्छता अभियान केवळ संस्कारापुरतेच मर्यादित राहून चालणार नाही. स्वच्छता ही सवय होऊनही काम पूर्ण होणार नाही. आजच्या जगात स्वच्छता ही आरोग्याशी जशी जोडली गेली आहे, त्याप्रमाणे स्वच्छतेशी आर्थिक उत्पन्नाचा मार्ग देखील जोडला गेला पाहिजे. वेस्ट टू वेल्थ, कचऱ्यापासून संपती हा सुद्धा त्याचा एक भाग व्हायला हवा. आणि म्हणून वेस्ट टू कंपोस्ट, कचऱ्यापासून खत या दिशेने आपण पुढे जायला हवे. घनकचऱ्यावर प्रक्रिया व्हायला हवी, त्याचे रुपांतर खतात होण्यासाठी काम व्हायला हवे. आणि यासाठी सरकारच्यावतीने धोरण आखणीची सुरुवात झाली आहे. कचऱ्यापासून जे खत तयार होईल ते खरेदी करा, असे खत उत्पादक कंपन्यांना सांगण्यात आले आहे. जे शेतकरी सेंद्रिय शेती करतात, त्यांना ते खत उपलब्ध करून देण्यासाठी सांगण्यात आले आहे. ज्यांना आपल्या जमिनीचे आरोग्य सुधारायचे आहे, धरतीच्या आरोग्याबद्दल ज्यांना काळजी वाटते, रासायनिक खतांच्या वापरामुळे ज्यांचं नुकसान झाले आहे, त्यांना आवश्यकतेप्रमाणे हे खत उपलब्ध करून द्यावे असे सांगण्यात आले आहे. आणि श्रीमान अमिताभ बच्चनजी सदिच्छा दूत म्हणून ह्या कामात विशेष योगदान देत आहेत. वेस्ट टू वेल्थ,कचऱ्यापासून संपत्ती या क्षेत्रात नवीन स्टार्ट अप सुरु करण्यासाठी मी युवकांना आमंत्रित करत आहे. त्यासाठी लागणारी यंत्र सामुग्री विकसित करा, तंत्रज्ञान विकसित करा. कमी खर्चात त्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्या. हे नक्कीच करण्यासारखे काम आहे. रोजगार निर्मितीला यात मोठा वाव आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होण्याची संधी आहे. आणि कचऱ्यापासून संपत्ती निर्माण हे यशस्वी करता येतं. ह्या वर्षी 25 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत एका विशेष कार्यक्रमाचं इन्डोसन, इंडिअन सॅनिटेशन कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात येत आहे. देशभरातील मंत्री, मुख्यमंत्री, महानगरांचे महापौर, आयुक्त एकत्र भेटून केवळ स्वच्छता आणि फक्त स्वच्छता यावर गहन विचार-विनिमय करणार आहेत. तंत्रज्ञान काय असू शकेल? आर्थिक धोरण काय असू शकेल? लोक-सहभाग कसा मिळवता येईल? यात रोजगाराच्या संधी कशा निर्माण करता येतील? या सर्व विषयांवर चर्चा होणार आहे.मी पाहतो आहे, स्वच्छतेबाबत नव्या नव्या बातम्या सतत येत आहेत. नुकतेच मी वर्तमानपत्रात वाचले की गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी एकशे सात गावांमध्ये जाऊन, शौचालय निर्मितीबाबत जागरुकता अभियान चालवलं. स्वतः कष्ट केले आणि जवळ जवळ 900 शौचालयं बांधण्यासाठी त्यांनी योगदान दिले. नुकतेच आपण हेही बघितले असेल की, विंग कमांडर परमवीर सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक पथक गंगेच्या पात्रात देवप्रयागपासून ते गंगासागर हे 2800 किलोमीटर अंतर पोहून गेले आणि त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला. भारत सरकारच्या वेगवेगळ्या विभागांनी आपली दिनदर्शिका तयार केली आहे. प्रत्येक विभाग पंधरा दिवस, ठरवून स्वच्छतेकडे लक्ष देतो. येत्या ऑक्टोबर महिन्यात पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय, पंचायत राज्य विभाग, ग्रामीण विकास विभाग हे एकत्र येऊन आपापल्या क्षेत्रात स्वच्छतेविषयी आराखडा तयार करणार आहेत. आणि ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये, 16 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, अन्न प्रक्रिया विभाग, आणि ग्राहक कल्याण मंत्रालय हे तीन विभाग त्यांच्याशी संबधित क्षेत्रात स्वच्छता अभियान राबवणार आहेत. मी नागरिकांना आवाहन करतो, की यापैकी ज्या विभागाशी कामानिमित्त आपला संबंध येतो, तिथे आपणही यात सहभागी व्हा. आपण पाहिले असेल की हल्ली स्वच्छता विषयक सर्वेक्षण केले जाते. आधी 73 शहरांमध्ये सर्वेक्षण करून तिथे स्वच्छतेबाबत काय परिस्थिती आहे हे देशातल्या जनतेसमोर मांडले गेले. आता एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या जवळ जवळ 500 शहरात हे काम होईल. कारण प्रत्येक शहरातील नागरिकांना असे वाटत असते की आपण या बाबतीत मागे आहोत, आता काहीतरी चांगले करून दाखवू. स्वच्छतेसाठी एक स्पर्धात्मक वातावरण तयार झाले आहे. आपण सर्व नागरिक यात आपले योगदान द्याल अशी मला आशा आहे. येत्या दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती आहे. गांधी जयंती पासून दिवाळीपर्यंत आपण खादी खरेदी करावी यासाठी मी आग्रह करत असतोच. या वेळीही माझे सांगणे आहे की आपल्या कुटुंबात खादीची एक तरी वस्तू असायलाच हवी. ज्यामुळे गरीबाच्या घरात दिवाळीचा दिवा लागू शकेल. या दोन ऑक्टोबरला रविवार आहे. एक नागरिक या नात्याने आपण स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊ शकाल का? दोन तास, चार तास, आपण सफाईच्या कामात प्रत्यक्ष भाग घ्या, आणि मी आपल्याला सांगेन की त्याचा एक फोटो, एक छायाचित्र काढून नरेंद्र मोदी ॲपवर ते शेअर करा. व्हिडीओ असेल तर व्हिडीओ शेअर करा. बघा आपल्या प्रयत्नांमुळे देशभरात या मोहिमेला नवी शक्ती मिळेल, नवी गती मिळेल. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचे पुन्हा स्मरण करून आपण देशासाठी काहीतरी करण्याचा संकल्प करूया.

माझ्या प्रिय देशवासियांनो, जीवनात देण्याचा आनंद काही वेगळाच असतो. कुणी त्याची नोंद घेवो किंवा न घेवो. देण्यातला आनंद काही वेगळाच असतो. आणि मी पाहिले आहे, मागील दिवसांमध्ये गॅस सिलेंडरवर मिळणारे अनुदान सोडून देण्याविषयी मी देशवासियांना सांगितले. आणि त्याला जो प्रतिसाद मिळाला, तो भारताच्या राष्ट्रीय जीवनात एक फार मोठी प्रेरक घटना म्हणता येईल. आपल्या देशातील अनेक तरुण, लहान-मोठ्या संस्था, कॉर्पोरेट क्षेत्रातले लोक, विद्यार्थी,स्वयंसेवी संघटना सारे मिळून 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या काळात देशातल्या अनेक शहरांमध्ये जॉय ऑफ गिव्हिंग विक, साजरा करणार आहेत. खाद्य पदार्थ, कपडे हे सारे एकत्र करून गरजू लोकांपर्यंत पोहचवण्याची ही त्याची मोहीम आहे. मी जेव्हा गुजरातमध्ये होतो,तेव्हा आम्ही सगळे कार्यकर्ते गल्ली-गल्लीत फिरून ज्या कुटुंबांकडे जुनी खेळणी असतील, ती दान म्हणून मागत असू. आणि गरीब वस्तीतल्या आंगणवाडीत जाऊन ती देत असू. त्या गरीब मुलांच्या चेहेऱ्यावर ती खेळणी पाहून असा काही आनंद उमटत असे की वा ! ज्या शहरांमध्ये हा जॉय ऑफ गिव्हिंग, विक साजरा होणार आहे, त्या तरुणांना आपण प्रोत्साहन द्यायला हवे, त्यांना मदत करायला हवी असे मला वाटते. एक प्रकारे हा दानोत्सव आहे. जे तरुण हे काम करत आहेत, त्यांना मी हृदयापासून शुभेच्छा देतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 25 सप्टेंबर, पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती. आणि आजच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होत आहे. माझ्यासारखे लाखो कार्यकर्ते ज्या राजकीय विचारधारेला घेऊन काम करत आहेत, त्या राजकीय विचारधारेला व्याख्या देण्याचे काम त्यांनी केले. भारताच्या मुळाशी जोडलेल्या राजानितीची बाजू त्यांनी मांडली. भारताच्या सांस्कृतिक परंपरेला पाठींबा देणारी विचारप्रणाली त्यांनी दिली. एकात्म मानरव दर्शन दिले, अशा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज आरंभ होत आहे. सर्वजन हिताय-सर्वजन सुखाय हा अन्त्योदयाचा सिद्धांत ही त्यांची देणगी आहे. महात्मा गांधी देखील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीच्या हिताबद्दल बोलत. विकासाची फळे गरीबाताल्या गरीब व्यक्तीपर्यंत कशी पोहचतील? प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक शेताला पाणी, ह्या दोन शब्दात सारा आर्थिक आराखडा त्यांनी सादर केला. देशभरात त्यांची जन्मशताब्दी गरीब कल्याण वर्ष म्हणून साजरी होईल. विकासाचे फायदे गरिबांना कसे मिळतील? यावर समाजाचे,सरकारचे,लक्ष केंद्रित झालं तरच, देशाला गरिबीपासून मुक्ती मिळेल. पंतप्रधान निवासस्थान असलेला भाग आजवर रेसकोर्स रोड या ब्रिटीशकालीन नावाने ओळखला जात असे. पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्या रस्त्याचं नामकरण लोककल्याण मार्ग असे करण्यात आले आहे. शताब्दी वर्षातल्या “गरीब कल्याण वर्ष” ह्या संकल्पनेचे ते एक प्रतीकात्मक रूप आहे. प्रेरणा पुरुष आणि आम्हाला वैचारिक परंपरा देणारे श्रध्देय दीनदयाळ उपाध्याय यांना मी आदरपूर्वक नमन करतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो,विजयादशमीच्या दिवशी, आजपासून दोन वर्षांपूर्वी, मन की बात याची मी सुरुवात केली. या विजयादशमीला दोन वर्षं पूर्ण होतील. सरकारी कामांचे गुणवर्णन करणारा हा कार्यक्रम नसावा असा माझा प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे. राजकीय टीका टिप्पणी, मन की बात मध्ये नसावी. मन कि बात हा आरोप-प्रत्यारोप यांचा कार्यक्रम नसावा. या दोन वर्षात दबाव आणणारे अनेक प्रसंग आले, नाराजी उघडपणे प्रगट करावी असेही कधीकधी वाटले. पण आपणा सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी मन की बात त्यापासून दूर ठेवून, सामान्य माणसाला जोडण्याचा प्रयत्न केला. या देशातला सामान्य माणूस मला कशी प्रेरणा देऊ शकेल? त्याच्या अशा आकांक्षा काय आहेत? माझ्या मनात आणि विचारात कायम हा सामान्य माणूसच केंद्रस्थानी राहिला. मन की बात मधून तेच प्रकट होत राहिले. देशवासीयांसाठी मन की बात म्हणजे काही जाणून घेण्याची संधी असते, माझ्यासाठी मात्र मन की बात म्हणजे सव्वाशे कोटी देशवासियांच्या शक्तीचा अनुभव घेणे, माझ्या देशातल्या सव्वाशे कोटी लोकांच्या शक्तीचं पुन्हा पुन्हा स्मरण करणे, आणि त्यातून कामासाठी प्रेरणा घेणे आहे. दोन वर्षं पूर्ण होत असताना आपण ज्याप्रकारे ह्या कार्याक्रमाचे कौतुक केलं, आशीर्वाद दिले, त्यासाठी मी सर्व श्रोत्यांचे हृदयापासून आभार मानतो. आकाशवाणीचेही मी आभार मानतो, कारण मन की बात त्यांनी केवळ प्रसारित केली नाही, तर सर्व प्रादेशिक भाषांमधून श्रोत्यांपर्यंत पोचवण्यासाठी परिश्रम घेतले. ज्या श्रोत्यांनी मन की बात झाल्यावर पत्र लिहून सरकारचे दरवाजे ठोठावले, सरकारच्या कामातील त्रुटी दाखवल्या, त्यांचेही मी आभार मानतो. आकाशवाणीने अशा पत्रांची दखल घेऊन, सरकारी अधिकाऱ्‍यांना बोलावून, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मंच उपलब्ध करून दिला. त्यामुळे मन की बात हा केवळ पंधरा-वीस मिनिटांचा संवाद न राहता, समाज परिवर्तनाची संधी ठरला. कुणासाठीही यापेक्षा मोठी आनंद देणारी कोणती गोष्ट असू शकते. म्हणून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, पुढच्या आठवड्यात नवरात्र आणि दुर्गा पूजेचा उत्सव आहे. विजयादशमीचा सण आहे. मग दिवाळीची तयारी सुरु होईल. साऱ्या देशात एक वेगळे वातावरण तयार होईल. शक्तीची उपासना करण्याचा हा सण आहे. समाजाची एकजूट हीच देशाची शक्ती असते.नवरात्र असो की दुर्गापूजा. शक्तीची उपासना करण्याचा हा सण, समाजाच्या एकतेची उपासना करणारा कसा होईल? माणसा-माणसाला जोडणारा उत्सव कसा होईल? आणि तीच शक्ती खऱ्या शक्तीची साधना ठरेल. आणि मग आपण सारे एकत्र येऊन विजयाचा उत्सव साजरा करू. या शक्तीची साधना करुया,एकतेचा मंत्र घेऊन चालूया. राष्ट्राला नव्या शिखरावर नेण्यासाठी शांतता, एकता, सद्‌भावना यासह नवरात्री आणि दुर्गापूजेचा सण साजरा करूया, विजयादशमीचा विजय साजरा करुया.

अनेक अनेक धन्यवाद.

S.Tupe/Anagha