Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फिलिपाईन्सला निघण्यापूर्वी पंतप्रधानांनी केलेले निवेदन


 फिलिपाईन्सला निघण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन पुढीलप्रमाणे –

“12 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी मी मनिलाला जात आहे. फिलिपाईन्सचा हा माझा पहिला द्विपक्षीय दौरा आहे, ज्यात मी आसियान-भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषदांमध्ये देखील सहभागी होणार आहे. त्यामधील माझा सहभाग विशेषत: आसियान सदस्य देशांबरोबर आणि एकूणच भारत-प्रशांत क्षेत्राबरोबर माझ्या सरकारच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणाच्या चौकटीत राहून संबंध अधिक दृढ करण्याच्या भारताच्या कटिबद्धतेचे द्योतक आहे.

या शिखर परिषदांव्यतिरिक्त, आसियानच्या 50व्या वर्धापन दिनाचा विशेष समारंभ, प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी नेत्यांची बैठक, आसियान व्यापार आणि गुंतवणूक शिखर परिषदेतही मी सहभागी होणार आहे.

आपल्या एकूण व्यापाराच्या 10.85 टक्के हिस्सा असलेल्या आसियान सदस्य देशांबरोबर आपले व्यापार संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपल्या सहकार्याला चालना देण्यात आसियान व्यापार आणि गुंतवणूक परिषदेची मदत होईल.

फिलिपाईन्सच्या माझ्या पहिल्या दौऱ्यात, फिलिपाईन्सचे राष्ट्रपती महामहीम रॉड्रिगो ड्यूटर्ट यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठकीची मी उत्सुकतेने वाट पाहत आहे. आसियान आणि पूर्व आशिया शिखर परिषदेतील अन्य नेत्यांशीही मी संवाद साधणार आहे.

फिलिपाईन्समधील भारतीय समुदायाबरोबर संवाद साधायलाही मी उत्सुक आहे. मनिलामधील माझ्या वास्तव्या दरम्यान, मी आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था (आयआरआरआय) आणि महावीर फिलिपाईन्स फाउंडेशनला देखील भेट देणार आहे.

वैज्ञानिक संशोधन आणि विकासाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेने उत्तम दर्जाच्या तांदळाची बियाणे विकसित केली आहेत आणि अन्न सुरक्षेच्या समस्येवर मात करायला जागतिक समुदायाला मदत केली आहे. या संस्थेत मोठ्या संख्येने भारतीय वैज्ञानिक काम करत असून, या क्षेत्रातील संशोधन आणि विकासात मोलाचे योगदान देत आहेत. या संस्थेने वाराणसी येथे दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला माझ्या मंत्रिमंडळाने 12 जुलै 2017 रोजी मान्यता दिली आहे. आयआरआरआय या संस्थेचे फिलिपाईन्समधील मुख्यालयाच्या बाहेरचे हे पहिलेच संशोधन केंद्र असेल. वाराणसी येथील केंद्रामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास, तसेच तांदूळ उत्पादकतेत वाढ, उत्पादन खर्चात घट, मूल्यवर्धन, शेतकऱ्यांच्या कौशल्यात वाढ होण्यास मदत होईल.

महावीर फिलिपाईन्स फाऊंडेशनच्या माझ्या भेटीतून, पायांवर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या गरजूंना ‘जयपूर फूट’चे वितरण करण्याच्या कार्याला भारताचा पाठिंबा दिसून येईल. 1989 मध्ये स्थापना झाल्यापासून या फाऊंडेशनने फिलिपाईन्समधील 15000 गरजूंना जयपूर फूट बसवून नवीन आयुष्य जगण्यासाठी सक्षम बनवले आहे. फाऊंडेशनच्या या मानवतावादी कार्यात भारत सरकार खारीचा वाटा उचलत आहे.

मला खात्री आहे की, माझ्या मनिलाच्या दौऱ्यामुळे फिलिपाईन्सबरोबरच्या भारताच्या द्विपक्षीय संबंधांना नवी चालना मिळेल आणि आसियान बरोबर राजकीय-सुरक्षा, आर्थिक आणि सामाजिक-सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत होतील.”

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane