Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतातील गरिबांना सार्वत्रिक ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा निर्मितीवर भारताचा भर-पंतप्रधान नरेंद्र मोदी


s2015021562291 [ PM India 79KB ]

देशातील गरिबांना सार्वत्रिक ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठीच भारत अपारंपरिक ऊर्जा निर्मितीवर अधिक भर देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. नवी दिल्ली येथे रि-इन्व्हेस्ट 2015 या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील जागतिक गुंतवणूकदारांच्या परिषदेच्या उद्‌घाटन कार्यक्रमात ते आज बोलत होते.

अपारंपरिक ऊर्जा निर्मितीमध्ये भारताने आता मोठी झेप घेतली असून या ऊर्जा निर्मितीमध्ये भारत आता मेगावॅटकडून गिगावॅटकडे वळला आहे, असे ते म्हणाले. देशात अद्यापही अशी लाखो कुटुंबे आहेत, जी वीज पुरवठ्यापासून वंचित आहेत. देशातील शेवटच्या कुटुंबापर्यंत जोपर्यंत वीज पोहोचत नाही तोपर्यंत विकासाची फळे सर्वसामान्य माणसाला चाखता येणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. जागतिकीकरणाच्या या काळात ऊर्जा निर्मितीमध्ये आणि वीज पुरवठा करण्यामध्ये मोठी मजल मारण्यासाठी प्रयत्न करण्याशिवाय आपल्या देशाला पर्याय नाही, असे त्यांनी नमूद केले. जगाला प्रभावित करण्यासाठी भारत अपारंपरिक ऊर्जा निर्मितीवर भर देत नसून स्वत:च्या जनतेच्या गरजा भागवण्यासाठी प्रयत्न करत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

s2015021562293 [ PM India 138KB ]

‘ऊर्जेचे सात अश्व’ ही संकल्पना त्यांनी मांडली. भारताने आतापर्यंत औष्णिक, वायू जलविद्युत आणि अणुऊर्जेवर भर दिला. पण त्यामध्ये आपण सौर, पवन आणि जैववायू ऊर्जा या प्रकारांची भर घालण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

s2015021562292 [ PM India 114KB ]

ज्या देशांमध्ये विपुल प्रमाणात सौर उत्सर्जन उपलब्ध आहे अशा 50 देशांना एकत्र करुन सौर ऊर्जा निर्मितीमध्ये सहकार्य मिळण्याचे भारताचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे सौर ऊर्जा क्षेत्रातल्या संशोधनाला आणि त्यातील सुधारणांना वाव मिळण्याची आणि दुर्गम भागातील गरिबातील गरिबाला वीज उपलब्ध होण्याची अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

ऊर्जा स्रोतांपासून अधिकाधिक फायदे मिळवण्यासाठी सौर आणि पवन अशा दोन्ही स्रोतांपासून ऊर्जा निर्मिती करणाऱ्या संयुक्त ऊर्जा उद्यानांच्या उभारणीची शक्यता पडताळून पाहण्याची सूचना त्यांनी केली. जलाशयांच्या वर सौर छप्पर बसवून सौर ऊर्जा मिळवतानाच पृष्ठभागावरून होणारे बाष्पीभवन कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. घराच्या छपरांवरील सौर ऊर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची त्यांनी सुचना केली. शेतकऱ्यांचा शेतीवर होणारा खर्च कमी करण्यासाठी सौर पंपांचा वापर करण्यावरही त्यांनी भर दिला.

जलसंवर्धन आणि कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी सुक्ष्म जलसिंचनाची गरज त्यांनी व्यक्त केली. अनेक सरकारांकडून या दिशेने होत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी स्वागत केले. अशा एकत्रित प्रयत्नातूनच देश मेगावॅटकडून गिगावॅटकडे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता कोणत्या देशात असेल तर तो देश म्हणजेच भारत आहे, असे ते म्हणाले. निसर्गावर प्रेम करणे आणि निसर्गाशी एकात्मता साधत जीवन जगण्याची वृत्ती भारतीयांच्या गुणसूत्रांमध्ये आहे असे त्यांनी सांगितले. मात्र, त्याचवेळी आपली संस्कृती आणि परंपरा यांवर अवलंबून राहणे पुरेसे नसून, या दिशेने एक मोठी झेप घेण्यासाठी शाश्वत प्रयत्नांची आवश्यकता असल्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष वेधले.

— PMO India (@PMOIndia) February 15, 2015