Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लखनौ येथे भारतीय मायक्रो क्रेडीट ने आयोजित केलेल्या ई -रिक्षा वितरण कार्यक्रमात पंतप्रधानाचे भाषण

लखनौ  येथे  भारतीय मायक्रो क्रेडीट ने आयोजित  केलेल्या ई -रिक्षा वितरण कार्यक्रमात पंतप्रधानाचे भाषण


मंचावर उपस्थित उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईकजी , लखनौचे खासदार आणि गृहमंत्री राजनाथ सिंह जी, लखनौचे आमदार भाई आशुतोषजी , इथले महापौर दिनेश जी , मुद्रा चे अध्यक्ष डॉ . के शिवा जी , आणि या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असलेले माझे रिक्षाचालक बंधू आणि त्यांचे कुटुंबिय आणि माझ्या प्रिय बंधू भगिनीनो ,

हे सरकार एकापाठोपाठ एक ज्याप्रमाणे पावले उचलत आहे आणि इतक्या कमी वेळेत , आज संपूर्ण जगाने ही गोष्ट स्वीकारली आहे की जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था जर कोणती असेल तर ती भारताची अर्थव्यवस्था आहे.. आज संपूर्ण जगात मंदीचे वातावरण आहे. खूप मोठे मोठे मानले जाणारे देश देखील मंदीचे शिकार झाले आहेत. आणि अशावेळी भारत हा असा देश आहे ज्याने केवळ आपली आर्थिक स्थितीच मजबूत केली नाही तर तो वेगाने पुढे जात आहे. मग ती जागतिक बँक असो,आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असो, जगातील मानांकन संस्था असो, सर्व एका सुरात ही गोष्ट स्वीकार करत आहेत , एवढेच नाही जगातील सर्व अर्थतज्ञ हेच म्हणत आहेत की आगामी दिवसात भारत खूप वेगाने पुढे जाणार आहे.

जेव्हा अशा गोष्टी ऐकतो तेव्हा मनाला खूप समाधान मिळते , मात्र आमचे लक्ष्य केवळ जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनणे हे नाही तर आमचे लक्ष्य आहे आमच्या देशातील गरीबाच्या आयुष्यात बदल घडवून आणणे, आमचे लक्ष्य आहे युवकांना रोजगार मिळवून देणे,

आमचे लक्ष्य आहे आमची युवा पिढी स्वतःच्या पायावर उभी राहावी, आमचा प्रयत्न आहे की देशातला युवक नोकरी शोधण्यासाठी दारोदारी ठोकर खाऊ नये, या स्थितीतून बाहेर येऊन त्याने आपल्या पायावर उभे राहून इतरांनाही रोजगार देण्याची ताकद प्राप्त करावी आणि म्हणूनच आम्ही जी पावले उचलत आहोत, ती सारी , देशाच्या सामान्य माणसाच्या जीवनात आपल्या मेहनतीने जे कमवेल ते कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोगी पडावे आणि म्हणूनच एकापाठोपाठ एक पावले टाकत आहोत. आपल्या देशात ४० वर्षांपूर्वी बँकाचे राष्ट्रीयकरण झाले आणि जेव्हा राष्ट्रीयकरण झाले तेव्हा सांगण्यात आले होते की बँका गरिबांच्या उपयोगी पडायला हव्यात. गरीबी दूर करण्यासाठी बँकांचे राष्ट्रीयकरण आवश्यक आहे आणि सरकारने सर्व बँका आपल्या ताब्यात घेतल्या. ४० वर्षं झाली मात्र या देशासाठी बँकांचे दरवाजे उघडले नाहीत.

आमचे सरकार आल्यानंतर आम्ही विडा उचलला कि भारतातील गरीबातील गरीब व्यक्तीचे बँक खाते का असू नये,अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात भारताचा गरीब का असू नये, आणि प्रधानमंत्री जन-धन योजना अभियान सुरु झाले, बँका देखील उत्साहाने सहभागी झाल्या आणि आज देशात ज्या लोकांची बँक खाती नव्हती, सुमारे २० कोटी नवीन खाती उघडण्यात आली. संपूर्ण जगाला आश्चर्य वाटत आहे की हे कसे काय शक्य झाले आणि खाती उघडायची होती , गरीबाची खाती उघडायची होती ,म्हणून आम्ही नियम बनवला की एकही पैसा नसला तरी बँक खाते उघडण्यात येईल, त्यासाठी जो खर्च येईल तो बँक देईल. एकही नवीन पैसा द्यायचा नव्हता ,परंतु आपल्या देशातील गरीबाची श्रीमंती पहा, या गरीबानी बँकेत खाती उघडली आणि छोटी मोठी रक्कम नाही तर ३० हजार कोटी रुपये जमा केले,३० हजार कोटी रुपये ,ही आहे आपल्या देशातील गरीबाची ताकद.

तो मूल्यांसाठी जगतो , तत्वांसाठी जगतो,आणि म्हणूनच मोफत खाती उघडण्याऐवजी १०० रुपये ,२०० रुपये जे काही , त्याने बचत केली आहे.आम्ही एक मुद्रा योजना आणली आहे . आपल्या देशात जे छोटे -छोटे लोक आहेत , वृत्तपत्र विक्रेते असतील, दूध विक्रेते असतील,बिस्कीट विक्रेते असतील, फूल विक्रेते असतील, मंदिराबाहेर प्रसाद विकणारे असतील,धोबी असतील, न्हावी असतील , छोटे -छोटे लोक, त्यांनीदेखील कधी विचार केला नसेल की त्यांच्या व्यवसायात जर पुढे जायचे असेल आणि पैशांची गरज भासली तर बँका देऊ शकतात , त्यांनी कधी बँकेचा दरवाजा पाहिला नव्हता. आम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजना आणली आणि ठरवले कि असे सामान्य वर्गातील लोक ,ज्यांना कधी बँकेत जाण्याची संधी मिळाली नाही,त्यांना कर्ज द्यायचे, हमी शिवाय कर्ज द्यायचे आणि आज मला आनंद होत आहे की योजना सुरु करून जास्त काळ लोटला नाही ,५-६ महिनेच झालेत . आतापर्यंत सुमारे २ कोटी लोकांना हे कर्ज पुरवण्यात आले आहे आणि ते ही कोणत्याही हमीशिवाय.

काही लोक आहेत ज्यांनी ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम घेतली आहे, काही लोक आहेत ज्यांनी १० लाख रुपयांपर्यंत रक्कम घेतली आहे आणि काही लोक आहेत ज्यांनी १० लाख रुपयांहून अधिक घेतले आहेत, आणि हे सर्व काम कर्ज मागणाऱ्यावर विश्वास ठेवून करण्यात आले आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की सुमारे ८० हजार कोटी रुपये या कामात लावण्यात आले आहेत. येत्या काही दिवसात याची फळे दिसू लागतील. आज आपण पाहत आहोत २१०० कुटुंबाना , जे भाड्याची रिक्षा चालवत होते,स्वतःची रिक्षा नव्हती, त्यांची छाननी करण्यात आली आणि आज २१०० कुटुंबाना त्यांच्या मालकीच्या रिक्षा दिल्या जात आहेत. ते त्यांचे मालक बनणार आहेत. आधी व्याज द्यावे लागत होते,आता व्याजापासून मुक्ती . भाडे द्यावे लागत होते,भाड्यापासून मुक्ति. आणि त्याच पैशातून आज ते मालक बनणार आहेत. मुद्रा बँकेतून त्यांना पैसे देण्यात आले आहेत, त्यांना विमा पॉलिसी देण्यात आली आहे. केवळ लखनौत बॅटरी चार्जिंगसाठी सुमारे ४०-४२ नवीन केंद्रे बनत आहेत. त्यांना बँकांनी पैसे दिले आहेत. सुमारे १० मोठी सर्विस सेंटर बनत आहेत., ज्यातील प्रत्येक सेंटरमध्ये ५-५, १०-१०, १२-१२ युवकांना काम मिळणार आहे. या ठिकाणी या रिक्षांच्या दुरुस्तीचे ,देखभालीचे काम होईल . म्हणजे किती मोठा रोजगार निर्माण केला जाऊ शकतो , त्याचा हा प्रयत्न आहे. प्रयत्न हा आहे की सामान्यातील सामान्य व्यक्ती आपल्या पायांवर उभी राहील.

ज्या लोकांना ई -रिक्षा मिळणार आहेत अशा काही कुटुंबियांशी माझी भेट झाली . मी त्यांना विचारले आधी कसे होते ,आता कसे वाटतंय ,काय करणार? काही गोष्टी समोर आल्या . काही जण म्हणाले, आम्ही आधी काम करू , जे पैसे वाचतील त्यातून मुलांना शिक्षण देऊ . आता पहा आयुष्य बदलायला कशी सुरुवात होते ते. आम्हाला वाटते आमच्या मुलांनी शिकून खूप मोठे व्हावे.काही जण म्हणाले की आम्ही दररोज ४० रुपये-५० रुपये बँकेत जमा करून बचत करु, जेणेकरून आम्हाला भविष्यात उपयोगी पडतील . या ई -रिक्षा बरोबर त्यांना विम्याचा लाभ देखील मिळत आहे. प्रधानमंत्री जीवन रक्षा योजना, ,जीवन ज्योती योजना, अटल पेन्शन योजना , या साऱ्या योजनांचा लाभ त्यांना दिला जात आहे. म्हणजेच एक प्रकारे संपूर्ण सुरक्षा कवच या आमच्या ई -रिक्षा वाल्यांना मिळणार आहे. यांच्या प्रशिक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे, त्यांना गणवेश दिला जात आहे आणि संपूर्ण लखनौच्या जीवनात एक नवीन संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

येत्या काळात भारत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. १०० हून अधिक देशांना ई-व्हिसा दिला जात आहे. आधीच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात परदेशी नागरिक भारतात येत आहेत. जगातील कोणतीही व्यक्ती भारतात प्रथमच येते तेव्हा त्यांची भेट सर्वप्रथम कोणाशी होईल? सर्वप्रथम त्याची भेट वाहन चालकाशी होईल. कोणताही बाहेरचा पाहुणा येतो तेव्हा त्याची भेट सर्वप्रथम वाहन चालकाशी होते आणि तो वाहन चालक सुरवातीच्या १०-१५ मिनिटांमध्ये त्याच्याशी जसे वर्तन करेल त्यानुसार त्याच्या मनात भारताची प्रतिमा असेल. तीच प्रतिमा घेऊन तो परत जाईल. जर तो त्याच्याशी प्रेमाने बोलला, प्रामाणिकपणे वागला, बाहेरच्या व्यक्तीला त्याने मदत करण्याचा प्रयत्न केला, तर ती बाहेरून आलेली व्यक्ती आयुष्यभर भारताला विसरणार नाही. देशाचा पंतप्रधान जे काम करू शकत नाही, ते काम एक ऑटोरिक्षावाला करू शकतो, एक रिक्षा चालवणारा करू शकतो.

जी गोष्ट अब्जावधी रुपयांची जाहिरात करू शकणार नाही ती आपल्या एका वाहनचालकाच्या वर्तनामुळे होऊ शकते. आणि म्हणूनच या वाहनचालकांना खास प्रशिक्षण देण्यात येते जेणेकरून भविष्यात पर्यटनासाठी भारताची चांगली प्रतिमा निर्माण करणारे हे भारताचे सर्वोत्तम सदिच्छादूत म्हणून काम करू शकतील, त्या दिशेने काम केले जात आहे.

हे केवळ पायी चालवण्यात येणाऱ्या रिक्षेतून बाहेर पडून ई-रिक्षामध्ये गेले, एवढे छोटे परिवर्तन नाही. हे खूप मोठे परिवर्तन होत आहे. एक नवीन बदल होत आहे. आज संपूर्ण जग जागतिक तापमान वाढीमुळे चिंताग्रस्त आहे. पर्यावरणाबाबत जगाला काळजी वाटत आहे. नुकतेच जगातील सर्व देश पैरीस मध्ये एकत्र आले होते. आणि जागतिक तापमान वाढीपासून जगाला कसे वाचवता येईल यावर गंभीरपणे चर्चा करत होते. प्रत्येकाला चिंता वाटत होती. छोटे-छोटे देश जे समुद्र किनाऱ्याला लागून आहेत त्यांना आपल्या अस्तित्वाची भीती वाटू लागली आहे आणि प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण करणे ही गरज बनली आहे. मनुष्य जातीला पर्यावरणाबाबत जे संकट झेलावे लागत आहे त्यापासून त्यांना मुक्ती देण्यात या ई-रिक्षा खारीचा वाटा उचलत आहेत, भले तो छोटासा प्रयत्न असेल. आणि हा प्रयत्न आपले ऑटो रिक्षावाले करणार आहेत.

म्हणजेच, एकप्रकारे प्रत्येक मुद्दा आपल्याशी जोडून एक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे लखनौच्या जीवनात नवीन बदल होईल. या दोन हजारहून अधिक कुटुंबांच्या जीवनात बदल होईल. येथील आर्थिक घडामोडींना बळ मिळेल आणि आमची जी इच्छा आहे कि विकास असा असायला हवा ज्यामुळे सामान्य मनुष्याचे आयुष्य बदलून जाईल. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात यामुळे नवीन आशा निर्माण होईल. अशी व्यवस्था असावी जिथे युवकाना आपल्या पायांवर उभे राहण्याची ताकद मिळेल. या सर्व गोष्टींसह आपण पुढे जात आहोत.

ज्यांना आज ई-रिक्षा मिळत आहेत त्या सर्व कुटुबांना मी खूप-खूप शुभेच्छा देतो आणि आशा करतो कि ही त्यांच्या आयुष्याची सुरुवात आहे, नव्या जीवनाची सुरवात आहे. आता त्यांनी थांबायचे नाही. प्रगतीची नवी उंची गाठण्यासाठी आपल्या जीवनात बदल आणायचा आहे आणि बघता-बघता त्यांचे कुटुंब, त्यांची मुले सुख आणि शांतीचा जीवन जागो यापेक्षा मोठे आमच्यासाठी काय असू शकते आणि म्हणूनच मी या सर्व कुटुंबाना मनापासून शुभेच्छा देतो.

आज मी लखनौचे विशेष आभार मानू इच्छितो कारण पंतप्रधान झाल्या नंतर प्रथमच मी तुमच्या समोर आलो आहे. मला लखनौकरांचे यासाठी अभिनंदन करायचे आहे कि तुम्ही इथे अशा एका खासदाराला निवडून दिले आहे, अशा खासदाराला निवडून तुम्ही देशाला एक अतिशय उत्तम गृहमंत्री दिला आहे. यासाठी मी लखनौकरांचे मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो. मी लखनौकरांना खूप शुभेच्छा देतो. खूप-खूप धन्यवाद.