पीएम्इंडिया
मी तुम्हा सर्वांचे व्हायब्रंट गुजरात परिषदेत स्वागत करतो. हे नुतनवर्ष तुम्हा सर्वांना आनंदी, भरभराटीचे आणि यशाचे जाओ अशी देखील मी कामना करतो. वर्ष २००३ ला ह्या सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि तेव्हापासून या सोहळ्याचा यशस्वी प्रवास सुरु आहे.
या सोहळ्यातील भागीदार देश आणि संघटनांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो – आमच्या भागीदार देशांमध्ये जपान, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, नेदार्लंड, ओस्ट्रेलिया, डेन्मार्क, फ्रांस, पोलंड, स्वीडन, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरात या देशांचा समावेश आहे. व्हायब्रंट गुजरात सोहळ्याचे सर्वात पहिले भागीदार असणारे जपान आणि कॅनडा या दोन देशांचे मी विशेष आभार मानतो.
जागतिक स्तरावरील अनेक नामवंत संघटना आणि नेटवर्क देखील या सोहळ्याचे भागीदार आहेत. या भागीदारीबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. तुमची उपस्थिती ही येथे आलेल्या व्यापारी तसेच तरुण उद्योजकांसाठी प्रेरणेचा स्रोत आहे. तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याशिवाय ह्या सोहळ्याने ८ द्विवार्षिक प्रकरण पाहणे शक्यच नव्हते, प्रत्येक सोहळा हा आधीच्या सोहळ्यापेक्षा चांगला आणि मोठा झाला.
मागील ३ सोहळे तर खूपच भव्य झाले. १०० हून अधिक देशातील राजकीय नेते आणि व्यापारी आणि जगभरातील असंख्य संघटना या सर्वांमुळे खऱ्या अर्थाने हा सोहळा जागतिक होतो.
या सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्वांना मी विनंती करतो की, तुम्ही एकमेकांना भेटा आणि ह्या परिषदेचा अधिकाधिक लाभ घ्या. तुम्ही ट्रेड शो आणि प्रदर्शनाला देखील भेट द्या.
गुजरात, महात्मा गांधी आणि सरदार पटेलांची ही भूमी भारताच्या व्यापारी स्वभावाचे देखील प्रतिनिधित्व करते. अनेक वर्षांपासून हे, वाणिज्य आणि उद्योगामध्ये आघाडीवर आहे. शेकडो वर्षांपूर्वी, इथले लोकं संधींच्या शोधात साता समुद्रापार गेले. आज देखील, परदेशात वास्तव्य केलेले आणि कामासाठी गेलेले सर्वाधिक लोकं ही याच राज्यातील आहेत. आणि ते जिथे कुठे जातील तिथे ते छोटा गुजरात वसवतात. आम्ही गर्वाने सांगतो की, ज्यां ज्यां बसे एक गुजराती, त्यां त्यां सदाकाल गुजरात. म्हणजे, जिथे कुठे एक गुजराती राहतो, तिथे सदासर्वदा गुजरात वसतो.
गुजरात हा सध्या पतंग महोत्सवाच्या मध्यावर आहे. ह्या पतंगाकडून आपल्या सर्वांना उंच उडण्याची प्रेरणा मिळू दे!
मित्रांनो!
जसे मी नेहमीच सांगतो भारताची शक्ती ही ३ डी मध्ये आहे: डेमोक्रसि (लोकशाही),
डेमोग्राफी (लोकसंख्या), डिमांड (मागणी).
आपली सर्वात मोठी शक्ती ही आपल्या डेमोक्रसि लोकशाहीच्या मुळाशी आहे. काही लोकं म्हणतात की, लोकशाही परिणामकारक आणि जलद सुशासन देवू शक नाही. परंतु गेल्या अडीच वर्षात आपण हे पहिले आहे की, लोकशाही मध्ये देखील जलद परिणाम मिळणे शक्य आहे.
मागील अडीच वर्षात आम्ही राज्यांमध्ये देखील निकोप स्पर्धेचे वातावरण निर्माण केले आहे. राज्यांना सुप्रशासनाच्या आधारावर मानांकन देण्यात येते. यासर्व प्रक्रियेमध्ये जागितक बँक सहाय्य करते.
डेमोग्राफी लोकसंख्येचा विचार केला तर, आपला देश हा युवकांचा देश आहे. भारताचा शिस्तप्रिय, समर्पित आणि हुशार युवकाची तुलना जगातील कोणत्याच कामासोबत होणार नाही. इंग्रजी भाषा बोलणाऱ्यांमध्ये जगात आपला दुसऱ्या क्रमाकांचा देश आहे. आपले युवक केवळ नोकरीच करत नाहीत, तर त्यांनी धोका देखील पत्करायला सुरुवात केली आहे आणि आता ते उद्योजक बनणे जास्त पसंद करतात.
डिमांड मागणीच्या आघाडीवर पाहता, मध्यमवर्ग लोकांकडून वाढत असलेली मागणी पाहता मोठ्या देशांतर्गत बाजारपेठेची संधी आहे.
भारतीय द्विकल्पाला सागराने वेढलेले असल्याने अफ्रिका, मध्य पूर्व आणि युरोपसह मोठ्या बाजारपेठांशी भारत जोडला गेला आहे.
आपल्यावर निसर्गाचा वरदहस्त आहे. आपले तीन पीक हंगाम आपल्याला अमाप अन्न, भाजी आणि फळ देतात.
आपल्या वनस्पती आणि जिवांमधील विविधता अद्वितीय आहे. आपल्या संस्कृतीची समृद्धी आणि तिची प्रतिक अद्वितीय आहेत. आपल्या संस्था आणि विद्वानांना संपूर्ण जगात मान्यता आहे. भारत सध्या संशोधन आणि विकास केंद्र म्हणून उदयाला येत आहे. आपल्याकडे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे वैज्ञानिक आणि अभियंते तयार होतात.
आपल्या करमणूक उद्योगाने जगभर एक लाट निर्माण केली आहे. कमी किंमतीमध्ये चांगले दर्जात्मक जीवन मिळण्याची शाश्वती मिळण्यास या सर्वाची मदत होते.
मित्रांनो!
स्वच्छ प्रशासन आणि सध्या असलेल्या भ्रष्टाचार आणि भाऊबंदकीचा खात्मा करण्याच्या वचनावर निवडून आलेले आमचे आतापर्यंतचे पाहिलेचे सरकार आहे. आपल्या राज्यपद्धतीमध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्याचे आमची दृष्टी आणि अभियान आहे. या दिशेने आम्ही अनेक निर्णय आणि पावले उचलली आहेत. तुम्हाला उदाहरणच द्यायचे झाले तर:
• संबंध आधारित प्रशासन ते व्यवस्था आधारित प्रशासन;
• मुखत्यारीआधारित प्रशासन ते धोरण आधारित प्रशासन;
• सहजगत्या होणारी ढवळाढवळ ते तांत्रिक हस्तक्षेप;
• पक्षपातीपणा ते वैशिष्टयपूर्ण दर्जात्मक स्तर;
• अनौपचारिक अर्थव्यवस्था ते औपचारिक अर्थव्यवस्था.
हे सर्व करताना डिजीटल तंत्रज्ञानाची भूमिका महत्वपूर्ण आहे. मी नेहमीच सांगतो की, ई- प्रशासन हे सहज आणि परिणामकारक प्रशासन आहे. मी नेहमीच धोरण आधारित प्रशासनाच्या आवशक्यतेवर जोर दिला आहे. ऑनलाईन प्रक्रियेमुळे निर्णय जलद आणि खुले होण्यास मदत व्हायला लागली. या दिशेने पुढे जाताना, आम्ही अशा नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहोत जे पारदर्शकता आणेल आणि पक्षपातीपणाचे समूळ उच्चाटन करेल. माझ्यावर विश्वास ठेवा, आपण जगातील सर्वात डिजीटल आधारित अर्थव्यवस्था बनण्याच्या उंबरठ्यावर उभे आहोत. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना भारतात हे बदल हवे आहेत. मला हे सांगताना खूप गर्व होत आहे की, हे सर्व तुमच्या देखत घडत आहे.
मागील अडीच वर्षापासून आम्ही भारताची क्षमता ओळखण्याचा आणि योग्य अर्थव्यवस्था स्थापित करण्याचे निरंतर कार्य करत आहोत. आणि ह्याचे निकाल उत्साहवर्धक आहेत. सर्वसाधारण ढोबळ उत्पनाचा विकास दर, चलनवाढ, वित्तीय तुट, चालू खाते तुट तसेच परकीय गुतंवणूक यासारख्या मुख्य दीर्घ अर्थशास्त्र दर्शकांमध्ये भरीव सुधारणा दिसून येत आहेत.
भारत जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था बनत आहे. जागतिक मंदी असतानाही आपण चांगल्या विकासाची नोंद केली आहे. आज, भारत जागितक अर्थव्यवस्थेतील महत्वाचे केंद्र आहे. आपल्याकडे जागतिक विकासाचे इंजीन म्हणून सगळे बघत आहेत.
जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटना आणि इतर संस्थांनी आगामी दिवसात आपला विकास दर अधिक चांगला राहण्याचे भाकीत वर्तविले आहे. वर्ष २०१४-१५ मध्ये जागितक विकासामध्ये भारताचे योगदान १२.५% होते. जागितक विकासातील हे योगदान जागतिक अर्थव्यवस्थेतील आपल्या हिस्स्याच्या ६८%हून अधिक आहे.
सुलभ व्यापारासाठी वातावरण निर्माण करणे आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याला मी प्राधान्य दिले आहे. युवकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला हे केलेच पाहिजे. ह्याच उत्साहासह काही ऐतिहासिक उपक्रमांची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने आम्ही मार्गक्रमण करत आहोत. यामध्ये वस्तू आणि सेवा कराचा समावेश आहे.
दिवाळखोरी आणि कर्जबाजारीपणा विधेयक, राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद, नवीन लवाद आराखडा आणि नवीन आय पी आर शासन ह्या सर्वांची अंमलबजावणी सुरु आहे. नवीन व्यवसायिक न्यायालयांची स्थापना देखील केली जात आहे. आम्ही ज्या दिशेने जात आहोत ही त्यातली काही उदाहरणे आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये निरंतर परिवर्तन घडवून आणण्यासाठी माझे सरकार वचनबद्ध आहे.
मित्रांनो!
व्यापार सुलभीकरणावर आम्ही सर्वाधिक जोर दिला आहे. परवाना प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि परवाना, परतावा आणि निरीक्षण यासंदर्भातील सर्व प्रक्रिया तर्कसंगत करण्यासाठी आम्ही काही निर्णायक पावले उचलली आहेत. नियामक आराखड्यांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रांमधील शेकडो कृती योजनांच्या अंमलबजावणीचे आम्ही निरीक्षण करत आहोत. सुसाशासन प्रदान करण्याच्या आमच्या वाचनातील हा एक भाग आहे.
विविध दर्शकांवर भारताचे जागतिक मानांकन आपल्या परिश्रमाचे फलित दर्शवतात. मागील अडीच वर्षात कित्येक जागितक अहवाल आणि लेखापरीक्षणांमध्ये भारताच्या राजकीय घडामोडींमध्ये सुधारणा दिसून आली आहे ज्याचे परिणामस्वरूप आर्थिक स्थिती देखील सुधारत आहे.
जागितक बँकेच्या डुईंग बिजनेस या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, भारताच्या क्रमवारीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहे.
युएनसीटीएडी ने २०१६ मध्ये जारी केलेल्या जागतिक गुंतवणूक अहवालामध्ये २०१६-१८ या कालावधीसाठीच्या संभाव्य तीन अग्रणी अर्थव्यवस्थांमध्ये भारताला तिसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे.
वर्ष २०१५-१६ आणि २०१६-१७ च्या जागतिक आर्थिक मंचाच्या जागतिक स्पर्धात्मक अहवालामध्ये आपल्या क्रमवारीत ३२ गुणांनी सुधारणा झाली आहे.
जागतिक बौध्दिक संपदा संघटन अर्था विपो आणि इतर संस्था जारी करत असलेल्या ‘ग्लोबल इनोवेशन इंडेक्स २०१६’ मध्ये आपण १६ अंकांनी सुधरणा केली आहे.
जागितक बँकेच्या ‘लॉजिस्टिक पफॉर्मन्स इंडेक्स ऑफ २०१६’ साठी भारताने आपल्या क्रमवारीत १९ अंकांची सुधारणा झाली आहे.
तुम्ही बघत असाल की, आपण जगातील सर्वोत्तम सवयींचा अवलंब करत आहोत. दिवसेंदिवस आपण जगाशी अधिकाधिक एकरूप होत आहोत. आपली धोरणे आणि योजनांच्या सकारात्मक परिणामांमुळे आपला विश्वास वृद्धिंगत होत आहे. भविष्यात व्यापारासाठी आपला देश अधिक सुलभ करण्यासाठी आपल्या प्रक्रिया अधिक सोप्या करण्यासाठी ह्या सर्व गोष्टी आपल्याला प्रोत्साहन देतात.
व्यापार स्थापना आणि विकास सुलभ व्हावा यासाठी प्रत्येक दिवशी आम्ही आपल्या योजना आणि प्रक्रिया तर्कसंगत करत आहोत.
अनेक क्षेत्रांमध्ये आम्ही मुक्त थेट परदेशी गुतंवणूक धोरण अवलंबल आहे. आज सर्वात मुक्त अर्थव्यवस्थांपैकी भारत एक आहे.
हे बदल देशातील आणि परदेशातील दोन्ही गुंतवणूकदारांनी हेरले आहेत. देशात आता प्रोत्साहनात्मक स्टार्ट अप अर्थ प्रणाली हळूहळू साकारत आहे.
मागील अडीच वर्षात देशातील थेट परदेशी गुंतवणुकीचा ओघ १३० अब्जापर्यंत पोहोचला आहे. आदल्या २ आर्थिक वर्षांची तुलना करता मागील २ आर्थिक वर्षांमध्ये थेट परदेशी गुंतवणुकीचा ओघ ६० टक्क्यांनी जास्त आहे. खरे पाहता, देशात मागील २ आर्थिक वर्षात झालेली थेट परदेशी गुंतवणूक ही आत्तापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक आहे.
भारतात थेट परदेशी गुंतवणूक करणाऱ्या देशांच्या संख्येमध्ये आणि गुंतवणूक करत असलेल्या क्षेत्रांमध्ये देखील मागील २ वर्षात विविधता आली आहे. आशिया प्रशांत क्षेत्रात सर्वाधिक भांडवली गुंतवणूक भारतात होते. जागतिक पातळीवर जर थेट परदेशी गुंतवणुकीची क्षेत्र पाहिले तर भारत पहिल्या १० देशांच्या यादीत आहे.
परंतु हे इथेच थांबत नाही. गुंतवणुकीवर परतावा देण्याच्या बाबतीत देखील भारताने सर्व देशांना मागे सोडले आहे. २०१५ मध्ये भारताने बेसलाईन नफा निर्देशांकात प्रथम क्रमांकावर होता.
मित्रांनो!
“मेक इन इंडिया” हा भारताचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ब्रांड आहे. भारताला उत्पादन, डिझाईन आणि नाविन्याच्या दिशेने पुढे घेऊन जायचे काम हे अभियान करत आहे.
मित्रांनो मला हा अनुभव आला आहे; मी जगभर जिथे जिथे गेलो आहे; मी जर ५ वेळा मेक इन इंडिया बोललो असेल; तर यजमान देशातील नेते ५० वेळा मेक इंडिया बोलायचे. “मेक इन इंडिया”ने भारताला एका अर्थाने जगाच्या दृष्टीने गुंतवणुकीचे एक केंद्र बनविले आहे. भारतामध्ये राज्यांचा पुढाकार, केंद्र सरकारचे सहकार्य या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मेक इन इंडिया साठी खूप दरवाजे उघडले आहेत.
या संधीचा लाभ सर्व राज्यांना होऊन सर्व राज्यांमध्ये सुप्रशासन आणि अर्थ प्रणालीच्या आधारावर स्पर्धा, निकोप स्पर्धा झाली पाहिजे. स्पर्धा आधी देखील व्हायची, १५ वर्षांपूर्वी एक राज्य दुसऱ्या राज्यापेक्षा अधिक गोष्टी द्यायचा. दुसरा तिसऱ्याहून अधिक दयायचा; याची स्पर्धा व्हायची. जिथे जिथे सुप्रशासानावर भर दिला गेला, जिथे जिथे व्यवस्थित अर्थ प्रणाली निर्माण केली गेली, जिथे जिथे नियम सुधारण्यात आले, जिथे जिथे मैत्रीपूर्ण व्यापार वातावरण निर्मिती केली गेली, तिथे अधिक प्रमाणात जगभरातून लोकं येवू लागले आणि म्हणूनच जगभरात “मेक इन इंडिया” माहित नाही असे कोणी नाही. आणि मी गुजरात सरकारचे अभिनंदन करतो, त्यांनी आपल्या पुरोगामी धोरणांच्या आधारावर सुप्रशासनाला जोर देत थेट परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्यामध्ये प्राधान्य प्राप्त केले आहे. यासाठी मी गुजरात सरकारच्या संपूर्ण चमूला खूप खूप शुभेच्छा देतो.
मेक इन इंडियाने नुकतीच त्याची २ वर्ष साजरी केली आहेत.
मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, नवव्या क्रमांकावरून भारत जगातील सहाव्या क्रमांकाचा उत्पादक देश बनला आहे. वर्ष २०१५-१६ मध्ये उत्पादन क्षेत्रातील एकूण मूल्यामध्ये ९ टक्क्यांची वाढ नमूद झाली आहे. मागील ३ वर्षांच्या ५ ते ६ टक्क्यांच्या वाढीपेक्षा ही वाढ खूप अधिक आहे.
रोजगार निर्मिती वाढण्यामध्ये आणि आपल्या लोकांची खरेदी क्षमता वाढण्यामध्ये या सर्वाची खूप मदत होत आहे. पण आपली खरी क्षमता तर ह्याहून अधिक आहे.
तुम्हाला उदाहरणच द्यायचे झाले तर: आगामी १० वर्षात भारताचा अन्न प्रक्रिया उद्योग हा अंदाजे ५ पटीने वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, भारताची मोटार बाजारपेठ देखील जगातील सर्वात आकर्षक बाजारपेठ बनत आहे.
सरकारी पातळीवर आम्ही खात्री देतो की, आपली विकास प्रक्रिया ही सर्वसमावेशक असून ती ग्रामीण आणि शहरी दोन्ही समाजाला सामावून घेत आहे.
भारत हा असा देश आहे जिथे आम्ही गाव आणि शहरांमध्ये संतुलित विकास करण्याच्या बाजूने आहोत. आमच्या धोरणांचा लाभ गाव आणि शहर दोघांना समान मिळाला पाहिजे आणि म्हणूनच आमच्या योजनांच्या प्राधान्यांमध्ये गावांना देखील तितकेच महत्त्व देण्यात आले आहे. प्रत्येक विकास यात्रेचा लाभ शेवटचे गाव, गरीब शेतकऱ्यापर्यंत पोहोचावे याला आम्ही प्राधान्य दिल्याने सर्व धोरणांच्या गाभ्यामध्ये आम्ही ह्या गोष्टीवर जोर दिला आहे.
भारतीय म्हणून भारताप्रती आमची वचनबद्धता अशी:
• रोजगाराच्या चांगल्या संधी;
• चांगले उत्पन्न;
• चांगली खरेदी क्षमता;
• चांगले दर्जात्मक आयुष्य;
• आणि चांगले जीवनमान.
मित्रांनो!
आपल्या विकासाच्या गरजा खूप जास्त आहेत. आपली विकास विषयसूची महत्वाकांक्षी आहे. उदाहरणार्थ:
• आपल्याला प्रत्येकाला छत द्यायचे आहे;
प्रत्येक गरिबाचे घर पाहिजे आणि स्वतः चे घर पाहिजे आणि २०२२ पर्यंत झाले पाहिजे, हे स्वप्न उराशी बाळगून आम्ही चालत आहोत.
• आम्हाला प्रत्येक हाताला काम द्यायचे आहे:
३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेले ८०० दशलक्ष भारतीय हे एक प्रकारे तरुण भारतीय आहेत. ८०० दशलक्ष तरुण ज्यांचे वय २५ पेक्षा कमी आहे त्यांच्या हातात कौशल्य असेल, कामची संधी असेल, तर नवीन भारत आपल्या डोळ्यासमोर उभा करू, हा माझा बह्र्तातील तरुणांवरील विश्वास आहे, हि संधी त्यांना मिळावी ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि आपण संधी देऊ शकतो तशा बऱ्याच शक्यता आहेत.
• आपल्याला अशी उर्जा निर्माण करायची आहे जी स्वच्छ असेल;
• आम्हाला जलद गतीचे रस्ते आणि रेल्वेची निर्मिती करायची आहे;
• आम्हाला खनिज उत्खनन अधिक हरित करायचे आहे;
• आम्हाला नागरी सोयीसुविधा निर्माण करायच्या आहेत;
• आम्हाला आमचे राहणीमान अधिकाधिक चांगले झालेले पहायचे आहे.
आम्ही पुढील पिढीच्या दृष्टीने सोयीच्या पायाभूत सुविधांची उभारणी करत आहोत. दोन्ही मुख्य आणि सामाजिक क्षेत्रात, ग्रामीण आणि शहरी दोन्हीकडे. यामध्ये मालवाहतूक रेल्वेमार्ग, औद्योगिक कॉरीडोर, जलद गती आणि मेट्रो रेल प्रकल्प, लॉजिस्टिक पार्क, स्मार्टसिटी, सागरी क्षेत्र, प्रादेशिक विमानतळ, पाणी, स्वच्छतागृह आणि उर्जा उपक्रम इत्यादी आपला दरडोई वीज उपयोग वाढला आहे. असे असले तरी, आम्ही नवीकरणीय उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबध्द आहोत.
आम्हाला पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन द्यायचे आहे आणि त्यासाठी पर्यटनाला आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे.
जेव्हा मी नवीकरणीय उर्जेविषयी बोलतो, १७५ गिगावॉट, एक काळ होता जेव्हा मेगावॉट विषयी बोलायला देखील घाबरायचो, आज देश गिगावॉटचे स्वप्न बघत आहे. हा खूप मोठा, खूप मोठा बदल आहे. १७५ गिगावॉट नवीकरणीय उर्जा, उर्जा- मिश्रण ज्यामध्ये सौरऊर्जा, पवनउर्जा, अणुउर्जा असेल. हवामान बदलामुळे त्रस्त असलेल्या जगाला वाचविण्याचे स्वप्न आम्ही देखील पहिले आहे. आणि १७५ गिगावॉटच्या योगदानाने जगाला हवामान बदलापासून वाचविण्याच्या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी भारत आपली प्रथम क्रमांकाची भूमिका पार पडण्याच्या दिशेने पुढे चालत आहे. म्हणूनच मी संपूर्ण जगाला आमंत्रित करतो या, १७५ गिगावॉट नवीकरणीय उर्जा क्षेत्रामध्ये गुंतवणूक करा. आमची धोरण पुरोगामी आहेत. आणि मला विश्वास आहे, हे मानवजातीच्या कल्याणाचे काम आहे, आयुष्याप्रती बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची ही संधी आहे. आम्ही दोन शतक निसर्गाचे शोषण करण्यात घालवली. आता येणाऱ्या दोन शतकांमध्ये निसर्गाचे शोषण करण्याच्या आपल्या विचारधारेला बदलून निसर्गाला बळकटी प्रदान करण्याचे कार्य केले पाहिजे. आणि ही गोष्ट लक्षात घेऊन जर आपण मार्गक्रमण करत राहिलो तर नक्कीच जगामध्ये होणाऱ्या एका खूप मोठ्या बदलाच्या शक्यतांमध्ये आपली एक महत्वाची भूमिका असेल.
रस्ते बांधणी आणि रेल्वे रूळ बांधणीच्या उद्दिष्टामध्ये अनेक पटीने वाढ झाली आहे. भारत जगातील एक सर्वात मोठी बांधकाम बाजारपेठ म्हणून उदयाला येत आहे. या सर्व बाबी गुंतवणूकदारांना अद्वितीय संधी उपलब्ध करून देत आहेत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आमच्या सोबत खालीलपैकी बऱ्याच क्षेत्रांमध्ये काम केले असेल:
• हार्डवेअर ते सॉफ्टवेअर;
• सौम्य कौशल्य ते वैज्ञानिक स्वभाव;
• संरक्षण प्रणाली ते सायबर सुरक्षा;
• औषध ते पर्यटन.
मी हे सांगण्याची हिम्मत करतो आहे की, संपूर्ण खंडातील प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अधिक संधी एकता भारत उपलब्ध करून देईल. आज भारत संपूर्ण शतकाच्या शक्यता उपलब्ध करून देत आहे. आणि आम्ही हे सर्व स्वच्छ, हरित आणि शाश्वत पद्धतीने करू इच्छितो. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि निसर्गाप्रती असणारी आमची जबाबदारी आम्ही नक्कीच पूर्ण करू. अंतिमतः अनंतकाळापासून हिच भारताची खरी ओळख आहे.
भारतामध्ये तुमचे स्वागत:
• संस्कृती आणि निःशब्दतेची भूमी;
• भावना आणि उत्साहाची भूमी;
• प्रयोग आणि उद्योगाची भूमी;
• प्रारंभाची आणि संधींची भूमी;
मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आणि तुम्हाला
• आजचा भारत;
• आणि उद्याच्या भारतामध्ये
सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो.
धन्यवाद!
B.Gokhale/S.Mhatre/Anagha
Had a series of fruitful meetings with leaders & ministers of various countries during @VibrantGujarat. https://t.co/gcrXFOeAkH pic.twitter.com/jGe98HpiZj
— Narendra Modi (@narendramodi) January 10, 2017
At @VibrantGujarat, invited investors to India, a land of excitement, enterprise, openings & opportunities. https://t.co/LkOM5ahvhu
— Narendra Modi (@narendramodi) January 10, 2017
Coming for @VibrantGujarat brings back many memories. From the launch in 2003 to the Summit today, the journey has been very successful.
— Narendra Modi (@narendramodi) January 10, 2017
India's 3Ds- democracy, demography & demand are going to propel the nation to new heights of economic progress & prosperity.
— Narendra Modi (@narendramodi) January 10, 2017
Explained ways through which our Government has focussed on clean, corruption free governance with a policy driven approach at the forefront
— Narendra Modi (@narendramodi) January 10, 2017
India is the fastest growing economy with improved macro-economic indicators. Doing business in India is much easier today.
— Narendra Modi (@narendramodi) January 10, 2017
Our Government's growth process is inclusive, aimed at providing better job opportunities, incomes, purchasing power & quality of life.
— Narendra Modi (@narendramodi) January 10, 2017
Breathtaking photos of Mahatma Mandir during @VibrantGujarat. pic.twitter.com/x1aQxFZquy
— Narendra Modi (@narendramodi) January 10, 2017