Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

श्री सुत्तूर मठ येथील जगदगुरु डॉ श्री शिवराथरी राजेंद्र महास्वामीजी यांच्या शताब्दी सोहळ्याप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

श्री सुत्तूर मठ येथील जगदगुरु डॉ श्री शिवराथरी राजेंद्र महास्वामीजी यांच्या शताब्दी सोहळ्याप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

श्री सुत्तूर मठ येथील जगदगुरु डॉ श्री शिवराथरी राजेंद्र महास्वामीजी यांच्या शताब्दी सोहळ्याप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

श्री सुत्तूर मठ येथील जगदगुरु डॉ श्री शिवराथरी राजेंद्र महास्वामीजी यांच्या शताब्दी सोहळ्याप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण


मला विचारण्यात आले की, मी हिंदीमधून बोलल्यानंतर भाषांतर करण्याची आवश्यकता आहे का? स्वामीजींनी स्वतः सांगितले की, काही आवश्यकता नाही. याठिकाणी सर्वांना हिंदी समजते. या पवित्र कार्यक्रमात सहभागी होण्याची मला संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात संतमंडळी जमली आहेत, ज्येष्ठ संत या वयातही कार्यक्रमासाठी आले आहेत, एवढे भाग्य कोठे मिळणार.

काही दिवसांपूर्वी मी लंडनला गेलो होतो. लोकशाहीच्या गोष्टी, मानवतावादाच्या गोष्टी, महिला सबलीकरणाची चर्चा, जगातील इतर देशांना वाटते या सर्व विचारांना त्याचठिकाणी सुरुवात झाली, त्याचठिकाणी निर्माण झाले आणि जगाला त्याठिकाणाहूनच समजले. ज्याठिकाणी अशाप्रकारची विचारसरणी आहे त्याठिकाणी मला एका महापुरुषाच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य लाभले. बसवेश्वरजी, एक समाजसुधारक कसा असू शकतो, महिला सबलीकरण काय असते, तळागाळातील लोकशाहीची शक्ती काय असते, हे शतकांपूर्वी याठिकाणचे महापुरुष बसवेश्वरजी यांनी जगाला दाखवून दिले. स्वीडनच्या संसदेचे सभापती या कार्यक्रमाला उपस्थित होते, मी समाजसुधारणेचे महान कार्य करणाऱ्या बसवेश्वरजींनी केलेले कार्य त्याठिकाणी सांगितले ते त्यांच्यासाठी आश्चर्यकारक होते. शतकांपूर्वी भारतात महापुरुषाचे असे विचार असू शकतात आणि ते फक्त विचार नाही तर प्रत्यक्ष व्यवहारही तसा होता, आचरणही तसे होते आणि तसे करुन दाखवले. आज याच परंपरेच्या एका साखळीशी जोडण्याचे भाग्य मला मिळाले. मी स्वतःला खूप नशीबवान समजतो.

पूर्ण विश्वात या विषयाची माहिती खूप कमी लोकांना आहे आणि कधी कधी तर जग सोडा आपल्या देशातही एक मोठा वर्ग असा आहे जो स्वतःला खूप मोठा विद्वान समजतो, मोठा अभिजात वर्ग समजतो. त्यांना माहिती नाही की भारतात ऋषींनी, मुनिंनी, संतांनी, महंतांनी समाजहितासाठी किती मोठे कार्य केले आहे. त्यांचे या गोष्टीकडे लक्षच नाही आणि म्हणून जेंव्हा तेंव्हा आमच्या या महान परंपरेवर टीका करत राहणे हीच काही लोकांची सवय बनली आहे. या देशाचे वैशिष्ट्ये हे की हजारो वर्षांपूर्वीच्या या समाजजीवनात कसल्या न कसल्या वाईट विचारसरणीने प्रवेश केला आहे. समाजात विकृती निर्माण झाली, चुकीच्या गोष्टींचा प्रवेश झाला, चुकीच्या परंपरा निर्माण झाल्या, ज्यामुळे या समाजाचा आत्मा नष्ट झाला पण त्याच्यानंतरच या समाजाची शक्ती पाहा याच समाजात संत जन्माला आले, समाजसुधारक जन्माला आले, ऋषी-मुनी जन्माला आले आणि त्यांनी समाजाच्या विरोधात जाऊन समाजसुधारणेचा विडा उचलला आणि समाजातील अपप्रवृत्तींपासून समाजाला मुक्त करण्याचा सदोदीत प्रयत्न केला.

हजारो वर्षांपासून हा देश, ही परंपरा, ही संस्कृती यामुळे जिवंत आहे की प्रत्येक युगात जेंव्हा-जेंव्हा संकट आले, ज्या-ज्या वेळी आमच्यामध्ये अपप्रवृत्ती शिरल्या, आमच्या आतूनच एक नवीन ऊर्जा निर्माण झाली, नवीन नेतृत्व उदयास आले, नवी शक्ती निर्माण झाली, नवी परंपरा निर्माण झाली आणि समाजसुधारणेचे काम चालू राहिले आणि म्हणून मी आज जेंव्हा हीज होलिनेस जगदगुरु श्री डॉ शिवराथरी राजेंद्र महास्वामी जी यांच्या शताब्दी सोहळ्यासाठी आलो आहे, त्या महान परंपरेला नमन करण्यासाठी आलो आहे, ज्या महान परंपरने समाजहितांची, समाजाच्या कल्याणाची नेहमी चिंता केली आहे.

आम्ही स्वातंत्र्याचा इतिहास पाहिला तर, एका बाबीकडे आमच्या लोकांचे लक्ष फार कमी वेळा जाते. जर आम्ही स्वातंत्र्य संग्राम पाहिला तर, 19 व्या शतकात आणि 18 व्या शतकात, या दोन शतकांवर आम्ही नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की, 20 व्या शतकात स्वातंत्र्याच्या आंदोलनाची जी तीव्रता निर्माण झाली, त्यामागे 19 वे शतक आणि 18 व्या शतकात आपल्या संत महंतांनी ज्याला आम्ही भक्तीयुग म्हणतो, त्या भक्तियुगात जी चेतना प्रज्वलित केली, भारताचा आत्मा जागा करण्याचा प्रयत्न केला आणि देशाच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक भागात, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, प्रत्येक भाषकांमध्ये, कोणीतरी एक संत जन्माला आला, जो संत मठ-मंदिरांतून बाहेर निघाला, एक सामुहिक जागृतीची चळवळ चालवली. देशभरात पुन्हा एकदा समाजाचा आत्मा जागवण्याचे काम दोन शताब्दीपर्यंत आमच्या संतांनी, आमच्या महापुरुषांनी केले आणि ती चेतना जागृत झाली. या चेतनेतूनच 1857 च्या स्वातंत्र्यलढ्याची ज्योत पेटली. त्यामुळे 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी अशा महापुरुषांमुळे निर्माण झाली. ज्याला पुढे महात्मा गांधींचे नेतृत्व मिळाले आणि देशाने महात्मा गांधींना कधी राजकीय व्यक्ती म्हणून पाहिले नाही. याच संतपरंपरेतील एक भाग म्हणून पाहिले होते. म्हणूनच त्यांना महात्मा संबोधले जाते. ज्या गोष्टी संत महंतांबद्दल बोलल्या जात होत्या, त्याच महात्मा गांधींबद्दलही बोलल्या जात होत्या. त्याच परंपरेतील नेतृत्व लाभले आणि तेंव्हा कुठे देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि यामुळे भारताने समाजजीवनातील प्रत्येक गट-तट व्यवस्थेपासून मुक्ती देण्याचे काम आमच्या संतांकडून झाले आहे.

त्याच प्रकारे, आज आम्ही या पीठाकडेही पाहत आहोत. मला तर याठिकाणी यापूर्वीसुद्धा येण्याचे भाग्य लाभले आहे. शैक्षणिक क्षेत्रात किती मोठे कार्य केले आहे. सुमारे एक लाख विद्यार्थ्यांचे आयुष्यपरिवर्तन याठिकाणी होत आहे. एकाप्रकारे सरकारचे काम संत करत आहेत. सरकारचे ओझे कमी करत आहेत आणि समाजाची ताकद वाढवत आहेत.

आज या शताब्दी सोहळ्यात ज्ञान संसाधन केंद्र (नॉलेज रिसोर्स सेंटर) ची सुरुवात होत आहे. ही बाब खरी आहे की मागच्या शतकांमध्ये राष्ट्राची शक्ती ठरवण्याचे निकष एक तर धनशक्ती वा सैन्य शक्ती असे होते. देशाकडे किती सैन्य आहे, किती धनसंपदा आहे या आधारे जगात त्या देशाची ताकद ठरवली जात असे. पण आज काळ बदलला आहे, आज धनशक्ती असेल वा सैन्यशक्ती एवढ्यावरच भागणार नाही. 21 वे शतक ज्ञानाचे शतक आहे. ज्याच्याजवळ जास्तीत जास्त माहिती असेल, ज्यादा ज्ञान असेल, रुढार्थापेक्षा वेगळा विचार करण्याची कुवत असेल, तोच देश जगात वरचढ ठरेल. म्हणून 21 व्या शतकाची ताकद संतांनी ओळखली आणि या सामर्थ्याला शास्त्रीय पद्धतीने आकार देण्यासाठी आज ज्ञान संसाधन केंद्र (नॉलेज रिसोर्स सेंटर) सुरू होत आहे.

मागील अनेक शतकांमध्ये मानवजातीने ज्ञानाच्या आधारावर, विज्ञानाच्या आधारावर, तंत्रज्ञानाच्या मदतीने, जी प्रगती केली आहे, आज प्रत्येक तासाला, प्रत्येक दिवसाला, प्रत्येक महिन्याला प्रत्येक वर्षी विज्ञानाचे नवे शोध, ज्ञान, तंत्रज्ञानाचे प्रभुत्व, समाजजीवनाला एवढ्या वेगाने परिवर्तीत करत आहे, जे मागच्या शतकांमध्ये झाले नव्हते. ज्या वेगाने जग बदलत आहे, तंत्रज्ञान विज्ञान आणि ज्ञानाच्या आधारावर त्याच्याशी जुळवण्यासाठी कधी कधी मनुष्याची कल्पनाशक्ती कमी पडते. कुठे जर लोक पुढे जात असतील तर आम्ही विचार करतो की, आम्ही त्याठिकाणी कधी पोहचणार. जग एवढ्या वेगाने ज्ञान-विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने बदलत आहे. मग काय भारत फक्त प्रतीक्षा करत बसणार? काय भारत हाच विचार करत बसेल कोणी महापुरुष, संत, महात्मा यांचे आशीर्वाद मिळतील आणि देश महान होईल. संतसुद्धा असे मानत नाहीत. संतसुद्धा मानतात की, ज्ञान संसाधन केंद्रं निर्माण झाली पाहिजेत.

नवनवीन शोध लागले पाहिजेत. तुम्हाला माहित असेल काही दिवसांपूर्वी पॅरिसमध्ये जगातील सर्व देश एकत्र जमले होते. एक मोठा जागतिक कुंभमेळा भरला होता आणि ते पृथ्वीची चर्चा करत होते, जागतिक हवामानबदलाबाबत ग्लोबल वार्मिंगबाबत. ग्लोबल वार्मिंगपासून मानवजातीला कसे वाचवता येईल, जगाला वाचवता येईल, पृथ्वीला वाचवता येईल याची चिंता होत होती. त्याठिकाणी दोन बाबी दिसून आल्या. एक भारत, अमेरिका, फ्रान्स यांनी पुढाकार घेऊन सांगितले की नवनवीन संशोधनावर जोर देऊन योजना तयार करणे आणि या संकटाचा मुकाबला करायचा असेल तर नवनवीन संशोधन करावे लागेल, त्यासाठी सामुहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. दुसरा निर्णय झाला तो म्हणजे जे देश ज्याठिकाणी 300 दिवसांपेक्षा जास्त दिवस सूर्यप्रकाश मिळतो, त्या देशांनी एकत्र यावे. जगात सुमारे 122 असे देश आहेत, ज्याठिकाणी सौर उत्सर्जन मोठ्या प्रमाणात आहे आणि यामुळे भारताच्या प्रयत्नांना, भारताच्या नेतृत्वाखाली जगातील 122 देश ज्या ठिकाणी 300 दिवस सूर्यप्रकाश मिळतो त्यांनी एकत्र येऊन सूर्यशक्तिचा मानवी आयुष्यात कसा उपयोग होईल, यावर एक संघटना तयार केली आहे.

या बाबींचा आगामी युगांवर प्रभाव असणार आहे. त्याच्या मूळाशी ज्ञान आहे, विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, नवनवीन कल्पना आहेत, त्यामुळेच परिवर्तन घडून आले आहे आणि परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने हे एक चांगले पाऊल आहे. मी मानतो की शताब्दी सोहळ्यापर्यंत पूज्य स्वामीजींना हे पाऊल उचलून श्रद्धांजली दिली जात आहे. यासाठी आपण सर्वजण शुभेच्छा व अभिनंदनास पात्र आहात.

भारत सरकारकडून या चांगल्या प्रयत्नांसाठी सदैव खांद्याला खांदा लावून देश, दिल्लीमध्ये बसलेले सरकार तुमच्यासोबत चालेल आणि नवे शोध समाज-जीवनाच्या कामी येतील, ज्ञानाचे भांडार मानवजातीचे कल्याण करेल, या दिशेने आम्ही प्रयत्न करत राहू.

आज जेव्हा मी या पवित्र कार्यक्रमात आलो आहे, मला देशाच्या सैन्याबद्दल अभिमान वाटतो, देशाच्या सैनिकांचा अभिमान वाटतो आणि त्यांचे अभिनंदन करतो.

जेंव्हा युद्ध होते, तेव्हा शत्रू देश, आपल्या समोरच्या देशाच्या सैन्यशक्तीवर घाव घालण्याचा प्रयत्न करतो. आज मानवतेच्या शत्रूंनी ज्यांना भारताचा विकास पाहवत नाही, अशा शक्तींनी पठाणकोटमध्ये हिंदुस्तानच्या सैन्यशक्तिचा विभाग असलेल्या हवाईतळावर हल्ला केला. मी देशाच्या सैनिकांचे अभिनंदन करतो की त्यांनी शत्रूला लोळवले. त्यांना यशस्वी होऊ दिले नाही, याप्रसंगी जे जवान शहीद झाले त्यांच्या वीरतेला मी नमन करतो आणि देशवासियांना विश्वास देतो की, आमच्या सैनिकांमध्ये ते सामर्थ्य आहे की शत्रूंचा नायनाट करुन देशाला सुरक्षा पुरवतात. त्या वीर सैनिकांचे अभिनंदन करतो, अशावेळी राष्ट्राचा आत्मविश्वास, राष्ट्राचे धैर्य, राष्ट्रीय एकता या एक सूरात जेंव्हा राष्ट्र बोलते तेंव्हा शत्रूंची घरे नष्ट होतात. हाच संकल्प घेऊन आम्ही पुढे चालू. या एका अपेक्षेसह तुमचे खूप-खूप आभार. पूज्य स्वामीजींच्या श्री चरणांना मी प्रणाम करतो, आणि हे ज्ञान संसाधन केंद्र 21 व्या शतकात आम्हाला नवीन ताकद देईल या अपेक्षेसह खूप-खूप धन्यवाद ।

S.Thakur/S.Tupe/M.Desai