Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी माध्यमांना दिलेले निवेदन

सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी माध्यमांना दिलेले निवेदन

सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी माध्यमांना दिलेले निवेदन


महामहिम, सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष,

सन्माननीय प्रतिनिधी,

माध्यम प्रतिनिधी

पहिल्या भारत भेटीदरम्यान महामहीम आपलं स्वागत करताना मला आनंद होत आहे. सायप्रसच्या प्रत्येक राष्ट्राध्यक्षांच्या मनात भारताला विशेष स्थान आहे हे मी जाणतो. जवळपास प्रत्येक राष्ट्राध्यक्षांनी भारताला भेट दिली आहे. अशा मित्राचं आणि भारताच्या समर्थकांचं स्वागत करणं हा मी सन्मानच समजतो. भारत आणि सायप्रस दोघांनाही समृध्द प्राचीन परंपरा लाभली असून त्यांचा परस्परांवर प्रभाव राहीला आहे. आपल्या राष्ट्रपित्यांनी सायप्रसच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा दर्शवला होता त्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून उभय देशात संबंध आहेत. सायप्रसनेही या मैत्रीला स्नेहपूर्ण प्रतिसाद दिला आहे. सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर भारताने सायप्रसला नेहमीच पाठिंबा दर्शवला आहे. 1974 मध्ये भारतानं, सार्वभौम, रिपब्लिक सायप्रसच्या पाठिंब्यासाठी ठाम पवित्रा घेतला. सायप्रसमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेत भारताचे जवानही सहभागी होते. भारतातून तीन कमांडर या सेवेत होते आणि या तिघांचीही आठवण सायप्रसकडून केले जाते हे ऐकून मला आनंद झाला आहे.

सायप्रससमोरच्या समस्यांच्या निराकरणासाठी आपण घेतलेल्या पुढाकाराविषयी मला माहिती आहे. केवळ सायप्रसच नव्हे तर या भागाच्या शांतता, सुरक्षितता आणि विकासाचं नवं पर्व आणण्यासाठी आपण पुढाकार घेतला आहे. तुमच्या या प्रयत्नांना आम्ही सुयश चिंतीतो. आपल्या नेतृत्वाखाली वित्तीय आणि बँकिंग क्षेत्रातल्या आव्हानांचा समर्थपणे मुकाबला करण्यात आला. 2016 मध्ये युरोझोनमधल्या सर्वोच्च विकास दरापैकी एकाची नोंद आपण केली. देशाला पेचप्रसंगातून बाहेर काढून आर्थिक भरभराटीच्या मार्गावर नेण्यासाठी आपला दृष्टीकोन आणि नेतृत्वाची आम्ही प्रशंसा करतो.

मित्रहो,

आज, राष्ट्राध्यक्ष आणि मी तपशिलवार चर्चा केली. द्विपक्षीय संबंधाच्या सर्व पैलूंचा आमच्या चर्चेदरम्यान उहापोह करण्यात आला. परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक बाबींवरही आम्ही दृष्टीकोन मांडून चर्चा केली. भारत आणि सायप्रस यांच्यात घनिष्ठ आर्थिक संबंध आहेत. सायप्रस हा भारतातला आठवा मोठा गुंतवणूकदार आहे. भांडवली आणि गुंतवणूक संबंधांना चालना देण्यासाठी गेल्यावर्षी आपण दुहेरी कर आकारणी टाळणाऱ्या करारात सुधारणा केल्या. सायप्रसमधल्या उद्योजकांसाठी, भारत उत्तम गुंतवणूक संधी देऊ करत आहे यावर सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष आणि मी यांचं एकमत झालं. माझ्या सरकारच्या उपक्रमाद्वारे उभय देशातले उद्योग आणि व्यापार जगताच्या उत्तम भागीदारीला आकार प्राप्त होईल. सायप्रसमधली नितांत सुंदर ठिकाणं आणि अतुल्य भारतातलं वैविध्य हे दोन्ही देशातल्या पर्यटन प्रोत्साहनासाठी स्रोत ठरू शकतं.

मित्रहो,

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत लवकर सुधारणा घडवून आणण्याचं भारत आणि सायप्रसचं सामाईक उद्दिष्ट आहे. सध्याच्या जगासमोर असलेली गुंतागुंतीची आव्हानं लक्षात घेता सुरक्षा परिषदेतल्या सुधारणात त्याचं प्रतिबिंब असायला हवं असं आमचं मत आहे. यासंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या विस्तारित सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठीच्या दाव्याला आपण दिलेल्या पाठिंब्याची मी प्रशंसा करतो. इतर आंतरसरकारी संस्थांमध्ये आपली भागीदारी मजबूत करण्याबाबतही राष्ट्राध्यक्ष आणि मी चर्चा केली.

मित्रहो,

दशकांपासून, भारत सीमापार दहशतवादाशी लढा देत आहे. आपल्या प्रदेशात दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या, त्याला पाठिंबा देणाऱ्या, त्याला आश्रम देणाऱ्या राष्ट्राविरोधात सर्व देशांनी निर्णायक कृती करण्याची तातडीची गरज आहे यावर आमचं एकमत झालं आहे.

सर्वंकष जागतिक कायदेविषयक चौकट तयार करण्याच्या गरजेबाबतही राष्ट्राध्यक्ष आणि मी चर्चा केली.

महामहीम,

द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी मी कटिबध्दता दर्शवतो. आपली आज झालेली चर्चा आणि निर्णय आपल्या भागीदारीला नवा आयाम देईल असा मला विश्वास आहे. भारतात आपलं पुन्हा एकदा स्वागत करून भारतातलं आपलं वास्तव्य फलदायी ठरो अशी शुभेच्छा व्यक्त करतो.

धन्यवाद

खूप खूप आभार..

B.Gokhale/N.Chitale/P.Kor