Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ॲडव्हान्टेज-आसाम, जागतिक गुंतवणूकदार परिषद 2018 ला पंतप्रधानांनी केले संबोधित


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुवाहाटी येथे ॲडव्हान्टेज आसाम-जागतिक गुंतवणूकदार परिषद 2018 च्या उद्‌घाटनपर सत्राला संबोधित केलं. उपस्थितांचं स्वागत करताना त्यांनी केंद्र सरकारच्या ॲक्ट ईस्ट धोरणाच्या केंद्रस्थानी ईशान्य भाग असल्याचं यावेळी बोलतांना सांगितलं. या धोरणाअंतर्गत आसियान देशांशी जनतेमधला संवाद वाढवणं, व्यापार संबंधात वृद्धी आणि इतर संबंध वृद्धींगत करण्याला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

भारत आणि आसियान देशांमधल्या भागीदारीला 25 वर्ष झाल्याबद्दल नुकत्याच झालेल्या आसियान-भारत परिषदेचं स्मरण त्यांनी केलं. भारत आणि आसियान देशांमध्ये हजारो वर्षांपासून संबंध असल्याचे त्यांनी नमूद केले. नवी दिल्लीत सन्माननीय अतिथी म्हणून 10 आसियान राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन साजरा करणे भारतासाठी सन्मानाची बाब आहे असे पंतप्रधान म्हणाले.

ईशान्य भागाचा संतुलित आणि गतिमान विकास साधतच भारताच्या विकासाला अधिक चालना मिळेल यावर त्यांनी भर दिला. जनतेच्या जीवनमानात दर्जेदार सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीनेच केंद्र सरकारच्या सर्व योजना आखल्या आहेत. जनतेचं जीवनमान उंचावणं हेच सरकारचं उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली ‘आयुष्मान भारत’ ही अशा प्रकारची जगातली सर्वात मोठी योजना आहे. 45 ते 50 कोटी जनतेला या आरोग्य सुविधा योजनेचा लाभ होईल. केंद्र सरकारने गरीबांच्या आरोग्यासाठी केलेल्या आणखी उपाययोजनांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.

उत्पादन खर्च कमी आणि कृषी उत्पादनाला वाजवी भाव देत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकार झटत आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने कोणती पावले उचलली आहेत याबाबतही त्यांनी माहिती दिली.

जनतेला माफक दरात घर मिळावं यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून त्याबाबत सरकारने आखलेल्या उपाययोजनांचा त्यांनी उल्लेख केला. एलईडी बल्ब वितरणासाठीच्या उज्वला योजनेबाबत बोलताना या योजनेमुळे कुटुंबांच्या वीजबिलात मोठी बचत होत असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय बांबू अभियानाची पुनर्रचना करण्यात येत असल्याचा उल्लेख करून ईशान्येसाठी हे महत्त्वाचे आहे.

केंद्र सरकारने प्रशासकीय टप्प्यात सुधारणा केल्यामुळे प्रकल्पांच्या अंमलबजावणीला वेग आला आहे.

मुद्रा योजनेअंतर्गत उद्योजकांना तारणाशिवाय कर्ज मिळावं यासाठी सरकारनं हाती घेतलेल्या उपाययोजनांची त्यांनी माहिती दिली. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना करामध्ये दिलासा मिळावा यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या तरतुद आणि उचलण्यात आलेली पावलं याबाबत पंतप्रधानांनी माहिती दिली.

भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला आळा घालण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. गेल्या तीन वर्षात केंद्र सरकारनं अनेक आर्थिक सुधारणा हाती घेतल्यामुळे व्यापार करण्यासाठी प्रक्रिया सुलभ झाल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे सुधारणांमुळे जागतिक बँकेचया व्यापार करण्यासंदर्भातल्या अहवालात 42 क्रमांकाची झेप घेऊन भारत 190 देशांमध्ये 100 व्या स्थानावर आला आहे.

महान आसामी संगीतकार भुपेन हजारिका यांचाही उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वप्नातला भारत साकारणं आणि 2022 पर्यंत नव भारताची निर्मिती करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

ईशान्य भागात नव्या वाहतूक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी मांडला. आसाममध्ये व्यापाराला अनुकूल आणि विकासस्नेही वातावरण निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं.

B.Gokhale/N.Chitale/P.Kor