Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

14 व्या आसियान-भारत शिखर परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

14 व्या आसियान-भारत शिखर परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण


सन्मानीय पंतप्रधान थॉयलॉन सिस्योलिथ

महोदय,

आसियान शिखर परिषदेत मी तिसऱ्यांदा सहभागी होत आहे. आसियानच्या माध्यमातून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मैत्रीपूर्ण संबंध जोपासले आहेत. या मैत्रीत दृढता आल्यामुळे आपल्याला आनंद वाटत आहे. आपण अतिशय प्रेमळपणाने स्वागत करून उत्कृष्ट व्यवस्था ठेवल्याबद्दलही आपले आभार मानतो.

प्राचीन वारसा असलेल्या विअन्चन या सुंदर शहराला भेट दिल्यानंतर माझ्या मनात या शहराचे भारताशी असलेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक बंधाच्या आठवणी जागृत झाल्या. आसियान-भारत संबंधामध्ये समन्वय राष्ट्र म्हणून व्हिएतनामने केलेल्या नेतृत्वाचे कौतुकही मी करतो.

महोदय,

केवळ नागरी वसाहतींच्या वारशांमुळे आसियनच्या सदस्यांचा पाया भक्कम बनला आहे, असे अजिबात नाही. तर आपल्या समाजात शांतता प्रस्थापित होऊन त्यांचे रक्षण व्हावे, या महत्त्वाच्या उद्दिष्टपूर्तीला आपण सर्वांनी प्राधान्य दिले आहे. आसियान राष्ट्रांमध्ये स्थिरता निर्माण होऊन संपूर्ण क्षेत्राची भरभराट व्हावी, असे ध्येय आपले आहे. भारताने ‘ॲक्ट ईस्ट’ असे धोरण स्वीकारले आहे आणि त्याच्या केंद्रस्थानी आसियान आहे. क्षेत्रामध्ये समतोल आणि एकोपा निर्माण होण्यासाठी आपण सर्वजण बांधील आहोत.

महोदय,

आसियान सदस्यांची तीन महत्त्वपूर्ण क्षेत्रात भागीदारी आहे. यामध्ये संरक्षण कार्य, आर्थिक आणि सामाजिक-सांस्कृतिक संबंध यांचा प्रामुख्याने समावेश आहे आणि आसियान-भारत यांच्यादरम्यान 2016-2020 या कार्यकाळासाठी निर्धारित केलेली कृती योजना आपले सगळे उद्देश अतिशय उत्तम प्रकारे पूर्ण करणारी आहे. या कृती योजनेमध्ये 130 कार्यांपैकी 54 गोष्टींची आपण आधीच पूर्तता केलेली आहे.

महोदय,

भारताने आसियानशी भागीदारी अगदी मनापासून, हृदयापासून केली आहे. यामुळे व्यक्तिगत, डिजिटल, आर्थिक, संस्थागत आणि सांस्कृतिक संबंधाचा सर्व बाजूंनी विस्तार केला आहे आणि आमच्या देशाने ज्या पद्धतीने आर्थिक यश मिळवले. विकास कार्यात जे प्रयोग केले त्यामध्ये आसियान राष्ट्रांना सहभागी करून घेण्यास भारत सदैव सिध्द आहे. यामध्ये कंबोडिया, लाओस, म्यानमार, व्हिएतनाम (सीएलएमव्ही) या देशांचा विशेषत्वाने भारत सहभागी करून घेऊ इच्छितो.

महोदय,

परंपरागत आणि अपरंपरागत आव्हानांचा विचार केला तर राजकीय संरक्षणामध्ये एकमेकांना करावयाचे सहकार्य हाच आपल्या संबंधांचा आधारस्तंभ आहे. दहशतवादाची वाढती निर्यात, वाढता जहालपणा, विद्वेषपूर्ण विचारसरणी आणि सगळीकडे पसरलेल्या हिंसाचाराच्या वातावरणामुळे आपल्या समाजाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. हा धोका एकाचवेळी स्थानिक, क्षेत्रीय आणि पलिकडच्या राष्ट्रांकडून निर्माण झाला आहे. त्यामुळे आसियानमधील सहसदस्यांनी हा धोका ओळखून समन्वय, सहकार्य आणि सहभागीदारीने अनेक स्तरांवरून ही जबाबदारी उचलली पाहिजे.

महोदय,

पुढच्या वर्षी आपल्या या संबंधाचा नवीन टप्पा गाठणारे ऐतिहासिक वर्ष असेल. आपल्या भागीदारीचे सहचर्चेचे 25 वे वर्ष आपण साजरे करणार आहोत. यामध्ये शिखर स्तरावर संवाद साधल्याची 15 वर्षे आहेत. तसेच व्यूहरचनात्मक भागीदारीची 5 वर्षे आहेत.

मैत्रीपूर्ण सहकार्याचा आनंद साजरा करण्यासाठी 2017 मध्ये आसियान-भारत परराष्ट्र मंत्र्यांची खास बैठक आयोजन करण्यात येणार आहे. आम्हीही मैत्रीवर्षाच्या 25 व्या वर्षानिमित्त एका विशेष स्मृती शिखर परिषदेचे यजमानपद स्वीकारले आहे. ही शिखर ‘सहमूल्य आणि संयुक्त ध्येय’ या विषयाला समर्पित असणार आहे. याचबरोबर उद्योग व्यवसाय शिखर परिषद, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मंच त्याचबरोबर कार रॅली यासारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. आपल्या सगळ्यांच्या बरोबर राहून काम करून ही विशेष स्मृती शिखर परिषद यशस्वी व्हावी, अशी अपेक्षा बाळगतो.

धन्यवाद!

खूप खूप धन्यवाद!!

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor