Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचे खासदारांना नारी शक्ती वंदन अधिनियम दुरुस्ती  समर्थनार्थ मतदान करण्याचे आवाहन; ही ऐतिहासिक संधी असल्याचे प्रतिपादन


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्ती वंदन अधिनियम  दुरुस्तीबाबत संसदेत चर्चा सुरू असल्याचे सांगितले आणि काल मध्यरात्रीनंतर एक वाजेपर्यंत ही  चर्चा सुरू होती, असे त्यांनी नमूद केले.

या दुरुस्तीबाबत असलेले सर्व गैरसमज तर्कशुद्ध उत्तरे देऊन दूर करण्यात आले असून, सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक शंकेचे निरसन केले आहे, असे त्यांनी सांगितले. जिथे अपुरी माहिती होती तिथे आवश्यक माहितीही सर्व सदस्यांना देण्यात आली आहे,जेणेकरून विरोधकांच्या  शंका दूर होतील   असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर जवळपास चार दशकांपासून राजकीय चर्चा होत असल्याकडे लक्ष वेधून घेत पंतप्रधानांनी सांगितले की आता देशाच्या लोकसंख्येचा अर्धा भाग असलेल्या महिलांना त्यांचे योग्य प्रतिनिधित्व मिळवून देण्याची वेळ आली आहे.

स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे उलटूनही निर्णयप्रक्रियेत महिलांचे कमी प्रतिनिधित्व असणे योग्य नाही आणि ते दुरुस्त करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

लोकसभेत लवकरच मतदान अपेक्षित असून  सर्व राजकीय पक्षांना विचारपूर्वक आणि संवेदनशील निर्णय घेऊन महिला आरक्षण दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले.

देशातील महिलांच्या वतीने आवाहन करत त्यांनी सर्व खासदारांना विनंती केली की नारी शक्तीच्या भावना दुखावतील असे कोणतेही कृत्य होऊ नये, याची खात्री करावी. त्यांनी नमूद केले की कोट्यवधी महिला संसदेकडे, तिच्या उद्देशांकडे आणि निर्णयांकडे अपेक्षेने पाहत आहेत.

पंतप्रधानांनी खासदारांना आपापल्या कुटुंबातील आई, बहिणी, मुली आणि पत्नी यांना डोळ्यासमोर आणून निर्णय घेताना आपल्या अंतःकरणाचा आवाज ऐकावा, असे आवाहन केले.

या दुरुस्ती विधेयकाचे त्यांनी देशातील महिलांची सेवा करण्याची आणि त्यांचा सन्मान करण्याची एक महत्त्वाची संधी असे वर्णन केले. सदस्यांनी त्यांना नव्या संधींपासून वंचित ठेवू नये, असे आवाहन केले.

हे दुरुस्ती विधेयक एकमताने मंजूर झाल्यास नारी शक्ती तसेच देशाची लोकशाही अधिक बळकट होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

याला ऐतिहासिक क्षण म्हणत त्यांनी सर्व सदस्यांना एकत्र येऊन भारताच्या लोकसंख्येचा अर्धा हिस्सा असलेल्या महिलांना त्यांचे योग्य प्रतिनिधित्व देऊन नवा इतिहास घडविण्याचे आवाहन केले.

एक्स या सामाजिक माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले की,

संसदेत सध्या ‘नारीशक्ती वंदन अधिनियमातील दुरुस्तीवर चर्चा सुरू आहे. काल रात्री देखील एक वाजेपर्यंत ही चर्चा चालली.

जे भ्रम पसरवले गेले होते, त्यांना तर्कसंगत उत्तरे देण्यात आली आहेत. प्रत्येक शंकेचे समाधान करण्यात आले आहे. ज्या माहितीचा अभाव होता, ती माहिती देखील प्रत्येक सदस्याला देण्यात आली आहे. कोणाच्याही मनात विरोधाचा जो काही विषय होता, त्याचेही निराकरण झाले आहे.

महिला आरक्षणाच्या या विषयावर देशात चार दशकांपासून खूप राजकारण झाले आहे. आता वेळ आली आहे की, देशाच्या निम्म्या लोकसंख्येला त्यांचे हक्क अवश्य मिळावेत.

स्वातंत्र्याच्या इतक्या दशकांनंतरही भारताच्या महिलांचे निर्णय प्रक्रियेतील प्रतिनिधित्व इतके कमी असावे, हे योग्य नाही.

आता थोड्यात वेळात लोकसभेत मतदान होणार आहे. मी सर्व राजकीय पक्षांना आग्रह करतो, आवाहन करतो.

कृपया विचारपूर्वक आणि पूर्ण संवेदनशीलतेने निर्णय घ्या, महिला आरक्षणाच्या बाजूने मतदान करा.

मी देशाच्या नारीशक्तीच्या वतीने देखील सर्व सदस्यांना प्रार्थना करेन, असे काहीही करू नका, ज्यामुळे नारीशक्तीच्या भावना दुखावतील.

देशातील करोडो महिलांचे लक्ष आपल्याकडे आहे, आपल्या हेतूवर आहे, आपल्या निर्णयावर आहे. कृपया नारीशक्ती वंदन अधिनियम  दुरुस्तीला साथ द्या.

मी सर्व खासदारांना सांगेन, 

आपल्या घरातील आई-बहीण-मुलगी-पत्नी या सर्वांचे स्मरण करत आपल्या अंतरात्म्याचे ऐका.

देशाच्या नारीशक्तीच्या सेवेची, त्यांना  वंदन करण्याची ही खूप मोठी संधी आहे.

त्यांना नवीन संधींपासून वंचित ठेवू नका.

ही दुरुस्ती सर्वसंमतीने मंजूर झाली, तर देशाची नारीशक्ती अधिक सशक्त होईल, देशाची लोकशाही अधिक मजबूत होईल.

चला , आपण मिळून आज इतिहास घडवूया. भारताच्या नारीला, देशाच्या निम्म्या लोकसंख्येला तिचा हक्क देऊया.

***

निलिमा चितळे/रेश्मा बेडेकर/राज दळेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai