Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कलम 370 आणि 35(A) रद्द करण्याच्या निर्णयाला सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधानांकडून त्याचे महत्व अधोरेखित


नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2026 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 आणि  35(A) रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला आज सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी 5 ऑगस्ट  2019 हा दिवस  भारताच्या सर्वसमावेशक विकासाच्या प्रवासातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्याचे म्हटले आहे.

मोदी यांनी नमूद केले की, गेल्या सात वर्षांमध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील जनतेने विविध क्षेत्रांमध्ये व्यापक परिवर्तन घडताना पाहिले आहे. पायाभूत सुविधांचा लक्षणीय विस्तार झाला असून शिक्षण, आरोग्यसेवा, उद्योजकता आणि क्रीडा या क्षेत्रांमध्ये नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. “कित्येक दशकांपासून अनेक घटनात्मक अधिकारांपासून वंचित राहिलेल्या महिला आणि उपेक्षित घटकांमधील लोक आता भारतीय संविधानाच्या पूर्ण अंमलबजावणीमुळे सक्षम झाले आहेत,” असेही  मोदी यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी म्हटले आहे की, या वर्षीचा वर्धापन दिन अधिकच महत्त्वपूर्ण आहे , कारण देश डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची 125 वी जयंती साजरी करत आहे. ते म्हणाले  की, राष्ट्रीय एकात्मतेप्रती डॉ. मुखर्जी यांची आयुष्यभर असलेली निष्ठा आजही अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे आणि त्यांनी मांडलेली संकल्पना  5 ऑगस्ट 2019 रोजी ऐतिहासिकरित्या साकार झाली.

जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या विकासाप्रति सरकारची दृढ कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, प्रत्येक नागरिकाला मोठी स्वप्ने पाहण्याची, आपल्या आकांक्षा पूर्ण करण्याची आणि ‘विकसित भारता’च्या संकल्पनेत योगदान देण्याची संधी मिळाली पाहिजे.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर पोस्ट केले:

सात वर्षांपूर्वी याच दिवशी कलम 370 आणि 35(A)) इतिहासजमा झाले आणि जम्मू-काश्मीर तसेच लडाखच्या प्रवासात एका निर्णायक नव्या अध्यायाची सुरुवात झाली.

तेव्हापासून जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील लोकांच्या जीवनात व्यापक परिवर्तन झाले आहे. पायाभूत सुविधांचा विस्तार झाला असून शिक्षण, आरोग्यसेवा, उद्योजकता आणि क्रीडा यांसारख्या क्षेत्रांमध्ये संधी वाढल्या आहेत. महिला असोत किंवा उपेक्षित समाजातील घटक; ज्यांना अनेक दशके त्यांच्या मूलभूत घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले होते, त्यांना भारतीय संविधानाच्या पूर्ण अंमलबजावणीमुळे सक्षम करण्यात आले आहे.

या वर्षीचा 5 ऑगस्टचा दिवस अधिकच महत्त्वपूर्ण ठरतो, कारण यावर्षी आपला  देश डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची 125 वी जयंती साजरी करत आहे. राष्ट्रीय एकात्मतेप्रती त्यांची आयुष्यभराची निष्ठा आजही अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे. त्यांनी अनेक दशकांपूर्वी मांडलेली संकल्पना 5 ऑगस्ट 2019 रोजी ऐतिहासिकरित्या साकार झाली.

जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या प्रगतीसाठी आम्ही आमची कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित करतो. तसेच, प्रत्येक नागरिकाला मोठी स्वप्ने पाहण्याची, ती पूर्ण करण्याची आणि ‘विकसित भारत’ घडवण्यात योगदान देण्याची संधी मिळेल,हे  सुनिश्चित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

#Article370Abrogation

आशिष सांगळे /सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai