पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाटा मेमोरियल केंद्राच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज नवी दिल्लीत एका पुस्तकाचे प्रकाशन केले.
आरोग्य आणि कर्करोग संशोधनासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा, सहकार्य आणि दूरदृष्टीबद्दल रतन टाटा यांनी त्यांचे आभार मानले.
टाटा मेमोरियल केंद्रातल्या डॉक्टर आणि विद्यार्थ्यांशी पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. सामाजिक जबाबदारी आणि मानवी सेवा विशेषत: कर्करोग उपचार आणि संशोधन क्षेत्रात टाटा कुटुंबियांच्या अमूल्य योगदानाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
यावेळी पंतप्रधानांनी केलेले भाषण –
रतन टाटाजी
टाटा मेमोरियल केंद्राचे संचालक डॉ. आर.ए.बडवे
टाटा मेमोरियल केंद्राचे डॉक्टर, विद्यार्थी आणि सहकारी,
टाटा मेमोरियल केंद्राच्या अमृत महोत्सवानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
टाटा मेमोरियल केंद्राला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्लॅटिनम ज्युबिली माईलस्टोन बुकचे प्रकाशन करताना मला आनंद होत आहे.
टाटा केंद्राला हे स्थान मिळवून देण्यात टाटा कुटुंबियांची सेवा-भावी आणि सामाजिक जबाबदारी निभावण्याची त्यांची वृत्ती यांचे अमूल्य योगदान राहिले आहे.
या संस्थेशी 75 वर्ष जोडल्या गेलेल्या सर्वांचे स्मरण करण्याची ही वेळ आहे.
या पुस्तकाची पाने चालतांना मला 1931 मधल्या एका प्रसंगाची माहिती मिळाली. त्या काळात मेहरबाई टाटा यांनी कर्करोगावरच्या उपचारासाठी अमेरिकेला जाताना, आपले पती सर दोराबजी टाटा यांना म्हटले होते की, उपचारासाठी मी अमेरिकेला जात आहे हे माझे भाग्य आहे. मात्र, आपल्या देशातल्या लाखो लोकांवर कसे उपचार होतील. ज्यांच्याजवळ संसाधनेच नाहीत.
मेहरबाई यांच्या निधनानंतर दोराबजी टाटा यांच्या स्मरणात ही गोष्ट राहीली आणि तीच टाटा मेमोरियल केंद्रासाठी आधार ठरली.
आज 75 वर्षानंतर ही संस्था, कर्करोगावरचे उपचार आणि संशोधनाचे प्रमुख केंद्र आहे.
देशात अशा मोजक्याच संस्था आहेत, ज्या राष्ट्रसेवेत अविरत काम करत आहेत.
लाखो गरीबांच्या उपचारांसाठी या संस्थेने जे कार्य केले आहे ते देशातल्या इतर रुग्णालयांसाठी प्रेरणादायी आहे.
सरकार आणि खाजगी संस्था एकत्र येऊन गरिबांची सेवा कशी करु शकतात, याचे उदाहरण म्हणजे ही संस्था आहे.
कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा मुकाबला म्हणजे रुग्णाच्या कुटुंबियांचीही अग्निपरीक्षाच, रुग्णाला होणाऱ्या वेदना, मानसिक ताण आणि उपचारासाठी लागणारा पैसा या सर्व बाबी याच्याशी संबंधित आहेत.
गरीब माणूस आजारी पडल्यानंतर औषधापेक्षाही त्याच्या समोर संकट ठाकते ते नोकरीचे.
म्हणूनच टाटा मेमोरियल सारख्या संस्था, तिथे काम करणारे लोक, जेव्हा गरीबांच्या उपचारांसाठी अहोरात्र मेहनत करतात, त्यांच्यावर उपचार करतात, त्यांच्या वेदना कमी करतात, हे कार्य मानवतेची मोठी सेवा ठरते.
रतन टाटाजी, टाटा मेमोरियल केंद्र आणि तिथे काम करणाऱ्या लोकांना मी टाटा मेमोरियल केंद्राच्या अमृत महोत्सवानिमित्त पुन्हा शुभेच्छा देतो.
मित्र हो, मानवासमोर असलेल्या मोठ्या आव्हानांपैकी कर्करोग हे एक आव्हान आहे. केवळ आपल्या देशातच दरवर्षी 10 लाखाहून अधिक लोकांना कर्करोगाचे निदान होते. दरवर्षी साडेसहा लाख लोकांचा कर्करोगामुळे मृत्यु होतो.
येत्या वीस वर्षात ही संख्या दुप्पट होईल, असा अंदाज कर्करोगावर संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय एजन्सीने व्यक्त केला आहे.
अशा परिस्थितीत प्रत्येक रुग्णावर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या कर्करोग रुग्णालयांनी एकाच मंचावर येणे आवश्यक आहे.
असा मंच जिथे कर्करुग्णांवर माफक दरात उपचार करण्यासाठी मदत होईल आणि उपचारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला जाईल.
2014 मधे हे सरकार सत्तेवर आले तेव्हा कर्करोग ग्रीडशी 36 संस्था जोडल्या गेल्या होत्या. सध्या या ग्रीडबरोबर दुपटीने म्हणजे 108 कर्करोग केंद्र जोडली गेली आहेत.
काही दिवसांपूर्वीच ‘डिजीटल कॅन्सर नर्व्ह सेंटर’ची सुरुवात झाली आहे. याचप्रमाणे व्हर्च्युअल ट्युमर बोर्डच्या मदतीने कर्करोगावरचे वेगवेगळे तज्ञ एकाच वेळी इंटरनेटच्या माध्यमातून रुग्णाच्या उपचाराचा आराखडा तयार करण्यात मदत करत आहेत.
टाटा मेमोरियल केंद्राच्या अनुभवाचा फायदा घेऊन देशात चार मोठ्या कर्करोग संस्थांची स्थापना केली जात आहे.
वाराणसी, चंढीगड, विशाखापट्टणम आणि गुवाहाटी इथे ही कर्करोग केंद्र उभारली जाणार आहेत. यामुळे उपचारासाठी रुग्णालयात लांबून-लांबून येणाऱ्या रुग्णांना मदत होणार आहे.
याशिवाय हरियाणातल्या झज्जर इथे राष्ट्रीय कर्करोग संस्थेची उभारणी केली जात आहे.
गरीबातल्या गरीब व्यक्तीला सर्व सुविधांसह अल्प दरात उपचार मिळावेत असे सरकारचे उद्दिष्ट आहे.
या उद्दिष्टाला अनुसरुनच राष्ट्रीय आरोग्य धोरण तयार करण्यात आले आहे.
प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्य काळजी यंत्रणा, सरकार प्रत्येकापर्यंत पोहचवू इच्छिते. येत्या वर्षात ढोबळ राष्ट्रीय उत्पादनाच्या 2.5 टक्के आरोग्यावर खर्च करण्याचा सरकारचा उद्देश आहे.
तपासणीच्या वेगवेगळ्या पद्धती एकत्रित कशा करता येतील, यावरही काम केले जाणार आहे. कर्करोगावर ॲलोपॅथीचे उपचार करतांना रुग्णाला दुसरा त्रास सहन करावा लागतो, त्यासाठी आयुर्वेद आणि योगसाधनेची मदत होऊ शकते.
याविषयी आपली संस्थाही काही सुचवू शकते.
मित्र हो, आजही देशात 70 टक्के वैद्यकीय उपकरणे परदेशातून येतात. ही परिस्थिती बदलायला हवी कारण उपचार महाग होण्यासाठी हेही एक कारण आहे. म्हणुनच नव्या आरोग्य धोरणांतर्गत वैद्यकीय उपकरणे भारतात निर्माण करायला सरकार प्रोत्साहन देत आहे.
टाटा मेमोरियल केंद्रासारख्या संस्थांची यात मोठी भूमिका आहे.
आपल्या केंद्राच्या डॉक्टरांच्या मदतीने भाभा अणू संशोधन केंद्राने स्वदेशी रेडीएशन यंत्र भाभाट्रोन विकसित केले.
दोन वर्षांपूर्वी मी मंगोलियाला गेलो होतो, तेव्हा देशाच्या वतीने मंगोलियाला भाभाट्रोनची भेट दिली होती.
यासाठी स्वस्त आणि उत्तम यंत्रे निर्माण करण्याच्या दृष्टीने आपल्याला एकत्रित काम करायला हवे.
आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी सरकार नवी एम्स सुरु करत आहे. वैद्यकीय महाविद्यालयांचे आधुनिकीकरण केले जात आहे. पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर विद्यार्थी संख्या वाढवली जात आहे.
गरीबांना स्वस्त औषधे मिळावीत यासाठी भारतीय जनऔषधी परियोजना सुरु केली आहे. 500 पेक्षा जास्त औषधांचा आवश्यक औषधांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. ज्यामुळे त्यांच्या किमती आवाक्यात ठेवता येतील.
स्टेंटच्या किंमती 85 टक्क्यांनी कमी झाल्याचे आपण पाहिले आहेच. सरकारने वाजवी दरात आरोग्यसेवा पुरवण्याकडे लक्ष देऊन असे अनेक निर्णय घेतले आहेत.
आरोग्य सेवा ही सेवाच रहावी, याकडे याच्याशी संबंधित लोकांनी लक्ष पुरवायला हवे. आजारावर उपचार हा व्यापाराचा भाग नव्हे, याचे स्मरण ठेवायला हवे.
त्याचबरोबर कोणत्याही इतर पेशातल्या व्यक्तीला देव मानले जात नाही. देशाच्या करोडो लोकांची आपल्यावर श्रद्धा आहे आणि तुम्ही त्यांच्यासाठी देवच आहात.
टाटा मेमोरियल केंद्राला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपणा सर्वांना अनेक शुभेच्छा. या पुस्तकाच्या प्रकाशनाची संधी आपण दिलीत यासाठी आपणा सर्वांचे पुन्हा आभार.
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
Sharing my speech at the programme to mark the release of Platinum Jubilee Milestone book on Tata Memorial Centre. https://t.co/naB2BSJzfX pic.twitter.com/qKFc6svxNb
— Narendra Modi (@narendramodi) May 25, 2017