Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वाराणसीमध्ये विविध विकास योजनांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

वाराणसीमध्ये विविध विकास योजनांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

वाराणसीमध्ये विविध विकास योजनांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

वाराणसीमध्ये विविध विकास योजनांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

वाराणसीमध्ये विविध विकास योजनांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

वाराणसीमध्ये विविध विकास योजनांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

वाराणसीमध्ये विविध विकास योजनांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण


मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या वाराणसीच्या बंधु आणि भगिनिंनो, हा कार्यक्रम जरी वाराणसीच्या भूमीवर होत आहे, तरी हा कार्यक्रम पूर्ण देशासाठी आहे. ही वाराणसीची भूमी आहे, जिने शतकानुशतके मानवजातीला ज्ञानाचा प्रकाश दिला आहे आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही नगरी ऊर्जेचाही प्रकाश देण्याचे नेतृत्व करत आहे आणि म्हणून मी देशवासियांना शुभेच्छा देतो, वाराणसीवासियांना विशेष शुभेच्छा देतो.

तसे पाहिले तर हा एकच कार्यक्रम आहे, मात्र या एका कार्यक्रमात सात कार्यक्रम अंतर्भूत आहेत, सात. एक तर तुम्ही आता एक चित्रफित पाहिली की विजेच्या क्षेत्रात देशभर आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आम्ही काय करणार आहोत ते. दुसरे, वाराणसीमध्ये फार वर्षापासून एक समस्या आहे, वाराणसीवासीयांची ती बरीच वर्षांपासून मागणी आहे ती म्हणजे वाराणसी रिंग रोड ची मागणी. आज या व्यासपीठावरून रिंग रोड कार्यक्रमाचाही पायाभरणी सोहळा होत आहे. काशी तीर्थयात्रेकरुंचे पीठ आहे. जगातील पर्यटकांसाठी आकर्षण आहे, मात्र विमानतळावरुन काशीपर्यंत पोहचताना प्रवाशाच्या मनात शंका निर्माण होते की मी खरंच योग्य ठिकाणी जात आहे, की दुसरीकडेच जात आहे. याचे मूळ कारण म्हणजे, काशी ते बाबतपूर विमानतळापर्यंतचा जो रस्ता आहे, त्याची दुर्दशा. आज याठिकाणी या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा पायाभरणी सोहळा होत आहे, त्याचे सुशोभीकरण करण्यात येईल ज्यामुळे काशीत येणाऱ्या परदेशी वा देशी पर्यटकाला एका भव्य आणि प्राचीन नगरीत प्रवेश केल्यासारखे वाटेल.

आज देशभरात हा जो आयपीडीएस अर्थात एकात्मिक ऊर्जा विकास योजनेचा शुभारंभ झाला, त्या आयपीडीएस योजनेच्या माध्यमातून वाराणसीत दोन सबस्टेशन..चौक सबस्टेशनचाही पायाभरणी सोहळा या व्यासपीठावरुन होत आहे, आणि या योजनेच्या अंमलबजावणीचाही आज आरंभ होत आहे. एक चौक सबस्टेशन, दुसरे कझ्झाकपूरा सबस्टेशन या दोन सबस्टेशनचाही पायाभरणी सोहळा या व्यासपीठावरुन होत आहे. वाराणसीच्या आरोग्य सुविधेत आणखी एक नवी भेट…काही दिवसांपूर्वी जे ट्रॉमा सेंटर सुरू झाले आहे, येथील नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे, आज त्याचाही लोकार्पण सोहळा होत आहे. त्याचप्रकारे गंगाघाटावर वसलेला आमचा रामनगर परिसर, हळूहळू त्याची लोकसंख्या वाढत आहे. या परिसरातील लोकांना रेल्वे आरक्षणासाठी इथपर्यंत यावे लागत होते, आरक्षणाची व्यवस्था जर त्याच जागी झाल तर. आज रामनगर परिसरात व्ही-सॅटच्या माध्यमातून रेल्वे आरक्षण सुविधेचा शुभारंभ याठिकाणी होत आहे. एक प्रकारे, या व्यासपीठावरुन देशासाठी एक योजना आणि वाराणसीवासीयांसाठी या योजनेसह एकूण सात योजनांचे लोकार्पण करताना मला आनंद होत आहे.

मी काशीला खूप वेळा येत होतो. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून संघटनेची विविध कामं करण्यासाठी येत होतो. या भूमीचे एक आकर्षण होते, म्हणून येत होतो. मात्र, ज्यावेळी वर पाहत होतो, त्यावेळी मी आश्चर्यचकीत होत होतो, जिकडे पाहावे तिकडे तारा लटकलेल्या आहेत. एवढ्या प्राचीन शहराचे सौंदर्य त्या तारांच्या पुंजक्यांमुळे खराब होत होते. जेंव्हा मी खासदार म्हणून निवडून आलो आणि नागरी सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम होता त्यावेळी मी म्हटले होते या तारा हटवल्या पाहिजेत. आणि आज मला आनंद होत आहे की, 572 कोटी रुपयांमुळे काशीमध्ये एक नवी ऊर्जा संचारणार आहे. कधी कधी वीज बंद होणे, तारा जुनाट होणे, ट्रान्समिशन लाईन्स खराब होणे, बाबा आदमच्या काळातील वस्तू लटकत आहेत त्या दुरुस्त करायला कोणाकडे वेळ नाही. गाडी तर चालत राहते. हे खराब झाले आहे चला ते दुरुस्त करुया, ते खराब झाले आहे, ठीक आहे दुरुस्त करुया, ठिगळं देण्याचं काम सुरुच राहतं. आणि ही समस्या काही फक्त वाराणसीची नाही. देशाच्या खूप शहरांमध्ये हे होत आहे आणि यामुळे विजेची गळती (लाईन लॉस) मोठ्या प्रमाणावर होत आहे. नागरिकांना त्रास होतो. म्हणून वीज पुरवठ्यासाठीची पूर्ण यंत्रणा आहे तिला आधुनिकतेची जोड देण्याची गरज आहे. स्मार्ट बनवण्याची गरज आहे. आणि एकप्रकारे वाराणसीला जी स्मार्ट सिटी बनवण्याची कल्पना आहे, त्याची सुरुवात या विजेच्या माध्यमातून होत आहे. वाराणसीमधून या योजनेची सुरुवात करण्यात येत आहे, देशभर ही योजना लागू होणार आहे. लोकांना वाटत असेल की पंतप्रधान या भागाचे खासदार आहेत, म्हणून या भागातून योजनेची सुरुवात होत आहे. मी यामागचं गुपित सांगतो, हे कारण तर नंतर येईल. पहिले कारण म्हणजे आमचे ऊर्जामंत्री आहेत पियुष गोयलजी, त्यांच्या वडिलांचे अभियांत्रिकीचे शिक्षण बीएचयू मधून झाले. ते याठिकाणी शिक्षण घेत होते आणि याठिकाणाहूनच अभियंता झाले होते आणि इथूनच समाजसेवेसाठी निघाले होते. म्हणून स्वाभाविकपणे पियुषजींना वाटले असेल की आपल्या वडिलांची शिक्षा-दीक्षा भूमी असलेल्या या भागातूनच कार्यक्रमाची सुरुवात करुया. यामुळे वडिलांनाही समाधान वाटेल म्हणून आज वाराणसीतून संपूर्ण देशाला ही भेट मिळत आहे. देशभर या योजनेसाठी 45 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या योजनेमुळे ऊर्जाक्षेत्रात जो गैरव्यवहार सुरू आहे, ज्या समस्या आहेत, त्यापासून शहरी भागाला मुक्ती मिळणार आहे. काम मोठे आहे, कठीण आहे. पण हे केल्याशिवाय आमच्याकडे काही मार्ग नाही कारण आमचे स्वप्न आहे की 2022 पर्यंत म्हणजेच देश 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असेल तेंव्हा, आम्ही जेंव्हा स्वातंत्र्याचा 75 वा सोहळा साजरा करत असू, तेंव्हा ज्यांनी आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिले, स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेले, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले तारुण्य गजाआड घालवले, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या शरीरावर ब्रिटीश राजवटीचे आसूड झेलले, त्यांना आम्ही काय उत्तर देणार. हेच देणार की, तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलेत, आम्ही मौज मजा केली. परंतु, जे स्वप्न तुम्ही पाहिले होते, ते आम्ही पूर्ण केले नाही. हे आम्हाला मान्य नाही. काय कोणत्या देशवासियाला ही बाब मान्य होईल? काय स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या त्या व्यक्तींच्या स्वप्नातला देश निर्माण केला पाहिजे की नाही केला पाहिजे. स्वातंत्र्याची 75 वर्षे आम्ही ज्यावेळी साजरी करु, त्यात देशवासियांचे योगदान हवे की नाही? देशात परिवर्तन झाले पाहिजे की नाही पाहिजे?एक चांगला देश, देशभक्तांच्या स्वप्नातला भारत असला पाहिजे की नाही पाहिजे? त्यातील एक महत्वाचे काम आहे, ते म्हणजे 24 तास 365 दिवस वीज. आज वीज चार तास, सहा तास, आठ तास मिळत आहे. आमचे स्वप्न आहे की, गाव असेल, वनक्षेत्र असेल, दूर एखादी झोपडी असेल, 2022 पर्यंत जेंव्हा आम्ही स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करु, तेंव्हा गरीबातील गरीब व्यक्तीच्या घरी 24 तास वीज मिळाली पाहिजे. अशाप्रकारच्या व्यवस्थेसाठी, पायाभूत सुविधांसाठी आज एका महत्वपूर्ण अशा कामासाठी आज 45 हजार कोटी रुपये आणि एकट्या काशीसाठी 572 कोटी रुपयांचा खर्च करुन या परिवर्तनाची आज सुरुवात होत आहे.

मला आपणा-सर्वांचे आशीर्वाद पाहिजेत. बाबा भोलेनाथचे आशीर्वाद पाहिजेत, जेणेकरुन देशात हे ऊर्जा पोहचवण्याचे काम, देशाला ऊर्जावान बनवण्यासाठी एक मैलाचा दगड बनत आहे, त्या दिशेने आम्हाला वाटचाल करायची आहे. वाराणसीचा आकार वाढत गेला. शेजारच्या जिल्ह्यांतून जे काही दळणवळण आहे, त्यासाठी शहराच्या मध्यातून जावे लागते. शहराच्या वाहतूक समस्येवरही आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत. अडचणींचा जर हिशोब लावला तर त्या वाढतच जातील. त्यातून मुक्ती मिळण्यासाठी एक महत्वपूर्ण काम करण्याची गरज होती, येथे रिंग रोड झाला पाहिजे जेणेकरुन ज्याला बाहेरुन जायचे आहे तो शहरातील वाहतुकीचा खोळंबा केल्याविना जाईल. फार मोठे काम आहे. सुमारे 600 कोटी रुपयांचे हे काम आहे. आज त्याचाही पायाभरणी सोहळा झाला आहे. या परिसरातील काशीसोबत शेजारील जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना जोडणारे रस्तेही तयार करण्यात येणार आहेत जेणेकरुन सर्व गावांना याचा लाभ होईल. यासाठी सुमारे 11 हजार कोटी रुपयांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काळात शेजारील जिल्हे काशीसोबत जोडण्यात येतील त्यामुळे पूर्ण परिसर एक आर्थिक विकासासाठीचे विकास केंद्र म्हणून तयार होईल. एक फार मोठे केंद्र तयार होईल. त्यासाठी वीज, पाणी, रस्ते यांचं अशाप्रकारे जाळं विणण्यात येईल की, ज्या पूर्व उत्तर प्रदेशच्या विकासाच्या बाबतीत समस्या आहेत, त्यापासून मुक्ती मिळेल. या सर्व योजना वाराणसीच्या भूमीवरुन भलेही सुरु होत असतील, पण पूर्ण उत्तर प्रदेश, यात प्रामुख्याने पूर्व उत्तर प्रदेशात खास जाळं विणण्याच्या दिशेने आम्ही काम सुरू केले आहे. आगामी काळात पाहता पाहता याचे परिणाम दिसून येतील.

आता तुम्ही पाहिले की, तुम्हीसुद्धा घाटावर जाता, आणि एलईडीची वीज आल्यानंतर तर मला सांगण्यात आले आहे की, घाटावर जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे, पाहण्यासाठी जात आहेत. तुम्ही पाहिले असेल की, की किती मोठे परिवर्तन घडून आले आहे. आमची इच्छा आहे की, काशीतील प्रत्येक कुटुंबाचे वीज बिल कमी असले पाहिजे की नाही? तुमचे पैसे वाचले पाहिजेत, असे तुम्हाला वाटते का? खरंच असं तुम्हाला वाटतं का? तर तुम्ही माझी एक गोष्ट ऐकणार का, खरंच ऐकणार का? वचन द्या-भोलेबाबाला स्मरुन वचन द्या. तुम्ही तुमच्या घरात जेवढे बल्ब लावले आहेत, ट्युब लावल्या आहेत, तेवढ्या एलईडी लावून टाका. मग तुम्ही पाहा, वीज बिल कसे कमी होते. तुमचे पैसे वाचतील आणि प्रकाशही उजळेल. हा दुहेरी नफा आहे. देशभर मला ही चळवळ उभी करावयाची आहे, जुने विजेचे दिवे आहेत त्यापासून मुक्ती मिळवा. हे नवे तंत्रज्ञान आहे. हे आमच्या डोळ्यासाठी चांगले आहे, प्रकाशही चांगला आणि खिशाला परवडणारे आहे. आपण काशीत एक चळवळ चालवूया. सर्वांनी ही बाब पुढे नेली तर काशीमध्येही आपण याचा लाभ घेऊ शकतो आणि मी पाहिलं आहे, पथदिवे, काशीतील पथदिव्यांनाही एलईडीमध्ये परिवर्तीत करावयाचे आहे. यामुळे काशी महापालिकेचे वीज बिल कमी होईल व ही जी रक्कम वाचेल त्यातून स्वच्छतेची कामं केली तर माझी काशी चमकेल. रात्री प्रकाशाने उजळेल आणि दिवसा सफाईमुळे चमकेल व जगभरातून येणारे लोक नव्या काशीला पाहून जातील.

मी काशीवासियांचे एका गोष्टीसाठी ह्रदयापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. मी जेंव्हा निवडणूक जिंकून आलो होतो आणि गंगा आरतीसाठी बसलो होतो. गंगा मातेचे आशीर्वाद घेऊन मी येथून गेलो होतो. नंतर मी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. प्रथम मी या भूमीला नमन करण्यासाठी आलो होतो आणि त्यादिवशी मी म्हटले होते, वाराणसीच्या नागरिकांनी वाराणसीच्या स्वच्छतेची जबाबदारी घेतली पाहिजे. वाराणसीच्या नागरिकांनी वाराणसी स्वच्छ ठेवली पाहिजे. असे मी म्हटले होते. आज देशात असे सांगणे फार सोपे राहिले नाही. पण, मी पाहिले की, वाराणसीच्या नागरिकांनी माझे म्हणणे प्रमाण मानले, अनेक संघटना तयार झाल्या, अनेक तरुणांनी पुढाकार घेतला. महिला, तरुणी या सर्वांनी वाराणसीला स्वच्छ ठेवण्याची मोठी चळवळ उभारली आहे व या चळवळीअंतर्गत वाराणसीच्या सौंदर्याचे काम सुरू आहे.

मी पाहत आहे की, आज वाराणसी विकासाच्या नव्या शिखरावर जाण्याचा एक केंद्रबिंदु बनली आहे. मग ते रस्त्यांच्या सुविधा असो, रेल्वेच्या सुविधा असो, वीज व्यवस्था असो, कौशल्य विकास असो, आमच्या विणकरांच्या कल्याणाचे काम असो या सर्व बाबींमध्ये आज वाराणसी नव्या शिखरावर घेऊन जाण्याची एक मोठी चळवळ आम्ही सुरू केली आहे. या कामासाठी इथे येण्याची मला संधी मिळाली.

पंतप्रधान जन-धन योजनेच्या माध्यमातून या देशातील गरीब व्यक्तींच्या बँक खात्यांच्या माध्यमातून आगामी काळात अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू ठरणार आहे. एक मोठा यशस्वी प्रयत्न झाला आहे. मला खात्री आहे की, आगामी काळात यामुळे परिवर्तन घडून येणार आहे.

मागील काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेशातील शिक्षक मित्रांच्या मुद्यावर एक समस्या निर्माण झाली आहे. मी उत्तर प्रदेश सरकारला विचारले की, हे प्रकरण काय आहे, त्यांनी सांगितले की, आतापर्यंत आमच्याकडे न्यायालयाचा आदेश आला नाही. न्यायालयाने तोंडी सूचना केली, लिखीत आदेश अद्याप आला नाही. आज मी काही शिक्षक मित्रांच्या नेत्यांना बोलावले होते. त्यांची अडचण समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. मी त्यांना म्हटले की, तुम्ही मला सांगा. पण त्यांचीही अडचण ही होती की, त्यांच्याकडेही न्यायालयाच्या आदेशाची लिखीत प्रत नव्हती. न्यायालयाचे काय म्हणणे आहे, याविषयीचीही माहिती नव्हती. मी त्यांना सांगितले की, न्यायालयाचा आदेश आल्यानतंर तातडीने माझ्याकडे पाठवा. भारत सरकार याचा अभ्यास करेल व उत्तर प्रदेश सरकारला काही सुचवायचे असेल तर आम्ही सुचवू. परंतु, आज मी शिक्षकमित्रांना विनंती करतो, मी ऐकले आहे की, आमच्या उत्तर प्रदेशातील शिक्षक मित्राने आत्महत्या केली आहे. मी आपल्याला विनंती करतो. अद्याप न्यायालयाचा आदेश आलेला नाही आणि आपण जर आपले आयुष्य संकटात टाकले तर या समस्येवर तोडगा निघणार नाही. शिक्षक मित्र आत्महत्या करुन तो जाईल, नंतर त्याच्या परिवाराचे काय होईल, त्याच्या मुलांचे काय होईल, म्हणून सर्व शिक्षक मित्रांना माझी विनंती आहे की, आयुष्यात कधीच लढाईमध्ये पराभव येता कामा नये, आत्मविश्वास गमावून चालणार नाही. आमचा मार्ग आत्महत्येचा मार्ग असू शकत नाही. एकदा न्यायालयाचा आदेश येऊ द्या. उत्तर प्रदेश सरकार काय म्हणते, ते जरा ऐका. मी सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करेन आणि उत्तर प्रदेश सरकार माझ्यासोबत या मुद्यावर चर्चा करणार असेल तर मी चर्चेची जबाबदारी घेतो आणि मी आपली समस्या उत्तर प्रदेश सरकारपर्यंत एक खासदार या नात्याने अवश्य पोहचवण्याचा प्रयत्न करेल. मला खात्री आहे की, माझे शिक्षक मित्र, जे विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतात, जे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास बुलंद करतात. जे विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची प्रेरणा देतात त्यांच्या आयुष्यात आत्महत्येचा मार्ग कधीच योग्य असू शकत नाही.

उत्तर प्रदेश सरकारही या संवेदनशील मुद्यावर गांभीर्याने विचार करेल, असा मला विश्वास आहे. म्हणून एकदा न्यायालयाचा आदेश येऊ द्या. उत्तर प्रदेश सरकारला जरा वेळ द्या. मला नाही वाटत की, उत्तर प्रदेश सरकार तुमच्यासोबत अन्याय करु इच्छित असेल आणि मी सुद्धा उत्तर प्रदेश सरकारसोबत चर्चा करेन. समाधानकारक तोडगा काय आहे, यावर मार्ग काढण्यात येईल. भारत माता की…

बंधु आणि भगिनिंनो आज काशीमध्ये पर्यटनाला चालना देण्याची मोठी आवश्यकता आहे. आज सकाळी मी पर्यटनाला चालना मिळेल, अशा प्रकारच्या रिक्षांचे लोकार्पण केले. ते भविष्यात पर्यटन घटकांसाठी एक आदर्श प्रस्थापित करेल. आम्ही येथील छोट्या-छोट्या लोकांनाही या कामात जोडू इच्छितो. मी वाराणसीत आलो तेंव्हा मला काही लोकांनी सांगितले की, 07 ऑगस्ट ही तारीख हातमाग दिन (हँडलूम डे) म्हणून जाहीर केली पाहिजे. काशीच्या विणकरांचीही ही मागणी होती. आज मी अभिमानाने सांगतो की, आज आम्ही हातमाग दिनाची घोषणा केली आहे. चेन्नईमध्ये याचा मोठा सोहळा पार पडला. माझ्या काशीतून विणकर चेन्नईत आले होते आणि त्यांचाही मान-सन्मान वाढवण्याची संधी मला मिळाली.

काशीची जी शक्ती आहे ती, तिच्या कलाकृतीचे एक वैशिष्ट्य आहे. काशीची जी संस्कृती आहे ती त्या कलेच्या वैशिष्ट्यामध्ये आहे. काशीची जी शक्ती आहे, ती तिच्या संगीताच्या वारशात आहे. काशीला तर पुढे घेऊन जायचे आहे, शिवाय आधुनिकही करावयाचे आहे. सोबतच काशीच्या या परंपरा, हा वारसा टिकवून ठेवायचा आहे. अनेक क्षेत्रात तुम्ही पाहिले असेल की, बरेच मंत्री वेळोवेळी आले असतील. अनेक नव्या योजनांना त्यांनी बळकटी दिली आहे. या नव्या योजनांचा एक सामुहिक परिणाम म्हणून काशी विकासाचे नवे शिखर गाठणार आहे.

मी वाराणसीवासीयांना विश्वास देतो की, तुम्ही मला खासदारपदी निवडून दिलेत, आणि तुमच्यामुळेच मला आज पंतप्रधानपदी बसून देशाची सेवा करण्याचे भाग्य मिळाले. देशाचा चौफेर विकास कसा होईल, देशात तरुणांना रोजगार कशाप्रकारे मिळेल आणि शक्य झालेच तर आपापल्या परिसरात रोजगार कसा मिळेल, या अनुषंगाने कौशल्य विकासाची मोठी चळवळ सुरू आहे.

कोट्यावधी युवकांच्या हाती पदवीचे प्रमाणपत्र तर आहे, मात्र हातात कौशल्य नाही, फक्त हाती कागद असणे उपयोगाचे नाही, त्यामुळे गाडी चालणार नाही. त्याच्याकडे कौशल्य पाहिजे. जगभरात आपण सर्वात तरुण आहोत. 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षापेक्षा कमी वयाची आहे. जर, या लोकसंख्येच्या भुजांमध्ये कौशल्य असेल तर पूर्ण जगाचे प्रभुत्व करण्याची ताकद भारतीय युवकांमध्ये येईल. म्हणूनच कौशल्य विकासाच्या माध्यमातून पूर्ण देशभर विकासाचे एक नवे शिखर गाठण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

तुम्ही पाहिलं असेल, मी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन घोषणा केली होती, मी म्हटले होते, ही जी मुलाखत आहे, चालक पाहिजे घ्या मुलाखत, शिपाई पाहिजे घ्या मुलाखत, छोटा कारकून जरी हवा असेल तर मुलाखत घेतली जाते आणि त्यामुळे लाखो तरुणांना रोजगारासाठी कोणाची ना कोणाचीतरी शिफारस शोधावी लागते. कोणीतरी मध्यस्थ त्यांच्या हाती लागतो, आणि नोकरी मिळो न मिळो त्यांचा खिसा मात्र कापला जातो. छोट्या जागेवर फार मोठ्या प्रमाणात मुलाखती होतात. मोठ्या संख्येने लोकांची भरती करावी लागते. जर एका व्यक्तीकडून 5-5, 10-10 हजार रुपयांची लुटमार केली तर गरीब व्यक्ती 10 हजार रुपयांसाठी आयुष्यभर कर्जबाजारी बनतो. म्हणून माझ्या सरकारने 15 ऑगस्ट रोजी सुचवले होते की, मुलाखतीचा हा प्रकार बंद झाला पाहिजे. आणि मी आज युवकांना सांगतो की, सरकार त्या दिशेने वेगाने प्रयत्न करत आहे. काही विभागांनी यादृष्टीने कामही सुरू केले आहे. आताच दोन दिवसांपूर्वी रेल्वे खात्याच्या लोकांनी सांगितले की, त्यांची एका विशिष्ट दर्जाच्या खालची जी भरती होणार आहे ती मुलाखतीशिवाय ऑनलाईन परीक्षा घेऊन केली जाणार आहे. आमच्या तरुणांना रोजगारासाठी अशाप्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागते म्हणून आगामी काळात या क्षेत्रामध्ये ज्या अपप्रवृत्ती आहेत त्यांचा बिमोड करणारच, याची मी तरुणांना खात्री देतो.

आपण सर्वांनी लोकसहभागातून देशाला कसे पुढे नेता येईल. आज जो पूर्ण दिवस मी इथे व्यतीत केला आहे, त्यातील प्रत्येक मिनिट फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्यावर खर्ची घातला आहे. मी आज याठिकाणी पाय ठेवल्यापासून प्रत्येक विषयावर ज्यांच्याशी भेटलो, ज्यांच्याशी बोललो, आज वाराणसीच्या सर्व क्षेत्रातील लोकांशी संवादाची संधी मला मिळाली. त्यांच्याशी मी भरपूर बोललो. पूर्ण दिवसभर मी त्यांच्या गोष्टी ऐकल्या. त्यांच्याकडून बरेच विषय समजून घेतले आणि या सर्वांचा केंद्रबिंदू फक्त विकास हाच होता. मला खात्री आहे की, आमच्या सर्व समस्यांचे निराकरण एकाच गोष्टीवरुन होणार आहे, ते म्हणजे विकास. जर विकास झाला तर रोजगार मिळेल, रोजगार मिळाला तर गरीबीविरुद्धची लढाई लढता येईल, रोजगार मिळाला तर मुलाबाळांना शिक्षण देता येईल. रोजगारामुळे विकासाची नवनवी शिखरं गाठता येतील. नवनव्या व्यवस्था विकसित होतील आणि म्हणून सरकार व्यवस्थेलाच विकसित करु इच्छिते आणि नागरिकांनाही सामर्थ्यवान बनवू इच्छिते. आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांच्या आयुष्यात चांगले दिवस येतील यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत.

आज जगाने भारताचा जय-जयकार सुरू केला आहे, जो पूर्वी नव्हता. जग भारताकडे पाहण्यासाठीही तयार नव्हते. आता आम्ही जून महिन्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव जगासमोर ठेवला होता. प्रत्येक भारतीयाला आनंद होईल आणि वाराणसीच्या लोकांना जास्त आनंद होईल कारण या बाबींचा उगम वाराणसीच्या भूमीवर झाला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन आम्ही साजरा केला, याचे जगातील 193 देशांनी समर्थन केले आणि जगातील सर्व देशांनी योग दिवस साजरा केला. योग दिवस साजरा करणे म्हणजे काही फक्त हात-पाय हलवण्याचा मुद्दा नाही, भारताशी जोडण्याचा मुद्दा आहे. हा योग जगाला भारतासोबत जोडण्याचे काम करतो. हा योग आहे जो आम्हाला जोडत आहे, एकच बाब किती मोठे परिवर्तन घडवून आणू शकते, याचे हे उदाहरण आहे. आज संपूर्ण जग भारताकडे आशेने व गर्वाने पाहत आहे. याच बाबींमुळे देशाला नव्या शिखरावर घेऊन जाण्याची संधी प्राप्त होते, आणि यासाठी आम्ही दिवसरात्र मेहनत घेत आहोत. माता गंगेच्या स्वच्छता अभियानामध्ये ज्या पाच राज्यांमधून गंगा वाहते त्या सर्व मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन जात आहोत. मी त्यांना सांगितले आहे की, बाकी तुम्ही काही करु शकाल अथवा नाही, पण गंगेत आता घाण नको, घाण सर्व निघून गेली पाहिजे. कोणत्याही शहराच्या गटारातील पाणी गंगा नदीत सोडण्यासाठी राज्यांनी प्रतिबंध केला पाहिजे. त्यासाठी दंड ठोठावला पाहिजे. दंडासाठी तयार राहा. आता माता अमृतानंदमयी केरळमध्ये आहेत. आश्रम केरळमध्ये आहे पण गंगामातेसाठी त्यांनी 100 कोटी रुपये दान केले आहेत. सव्वाशे कोटी भारतीयांच्या मनात गंगेप्रती एवढी भक्ती आहे. प्रत्येक नागरिक गंगेसाठी काही ना काही करु इच्छितो, पण त्याची सुरुवात आम्हाला करावी लागेल. आम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. राज्यांकडे जी जबाबदारी आहे ती त्यांना पूर्ण करावी लागणार आहे. भारत सरकार खांद्याला खांदा लावून राज्यांसोबत काम करेल आणि गंगामातेच्या स्वच्छतेचे काम आम्हाला निर्धारीत वेळेत पूर्ण करावयाचे आहे.

मला माहीत आहे, हे काम कठीण आहे. 1984 पासून हा विषय सुरू आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे, म्हणून योजनेच्या यशस्वीतेसाठी काही शंकाही निर्माण होतात. त्यानंतरही आम्ही आमचे प्रयत्न सोडले नाहीत. आपल्या एवढ्या मोठ्या देशाने हे काम करुन दाखवले पाहिजे. गंगा शुद्ध झाली पाहिजे, साफ झाली पाहिजे, गंगेचे पुत्र म्हणून आपण सर्वांची ही जबाबदारी आहे आणि ती आपण सर्वांनी पूर्ण केली पाहिजे.

मला खात्री आहे, बंधुंनो याबाबत जागरुकता निर्माण झाली आहे. परिवर्तन घडून आले आहे. घरातही मुले आता कचरा फेकणाऱ्याला टोमणे मारतात, हे पूर्वी कधी होत नव्हते. स्वच्छता एका दिवसात येईल असा विचार कोणी केला नव्हता. पूर्वीही कोणी असा विचार करत नव्हते. पण, प्रथमच, मला नाही वाटत यापूर्वी देशाच्या संसदेत स्वच्छतेच्या विषयावर चर्चा झाली. मी जेंव्हापासून स्वच्छता अभियान सुरू केले आहे त्यामुळे आज संसदेतही स्वच्छता या विषयावर चर्चा होते, विरोधी पक्ष आमच्यावर टीका करतो, पण कमीत कमी देशाच्या संसदेत स्वच्छतेवर चर्चा करण्यास वेळ तर मिळाला. हा लहान मुद्दा नाही. जर संसद स्वच्छतेप्रती एवढी जागरुक आहे तर, मला खात्री आहे की ही बाब खालच्या पातळीवर नक्कीच पोहचेल.

आपल्या देशात विकासासाठी दोन शब्द कायम वापरले जातात, आर्थिक विकास आणि औद्योगिक विकास. एक शब्दप्रयोग वापरला जातो, खासगी क्षेत्र (प्रायव्हेट सेक्टर), दूसरा शब्दप्रयोग केला जातो, सार्वजनिक क्षेत्र (पब्लिक सेक्टर) म्हणजे सरकारचे जे पीएसयू आहेत, एक तर कॉर्पोरेट हाऊस आहेत, मोठमोठे उद्योगपती आहेत. आम्ही आर्थिक विकासाची गाडी या दोन रुळांवर चालवण्याचा प्रयत्न केला आहे. मी मान्य करतो, या दोन रुळांवर गाडी ज्या वेगाने गेली पाहिजे ती जाणार नाही. सार्वजनिक क्षेत्र, खासगी क्षेत्र या दोनच आधारांवर जर देशाला पुढे न्यायचे असेल तर तेवढी ताकद मिळणार नाही. म्हणून मी तिसऱ्या घटकावर जोर देत आहे. एकीकडे आहे सार्वजनिक क्षेत्र, खासगी क्षेत्र आणि मी एक विचार घेऊन जात आहे, वैयक्तिक क्षेत्र (पर्सनल सेक्टर) एक व्यक्ती ही देशाची फार मोठी संपत्ती आहे. हे वैयक्तिक क्षेत्र कसे पुढे जाईल? खासगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्राच्या बरोबरीने वैयक्तिक क्षेत्र दोन पावलं कसे पुढे चालेल यावर मी काम करत आहे.

या वैयक्तिक क्षेत्रासाठी आम्ही एक योजना तयार केली आहे मुद्रा बँकेची. आपल्या देशात खालच्या स्तरावरील व्यापारी 6-7 कोटी आहेत. छोटे-छोटे व्यवसाय करतात. एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला रोजगार देतात.

छोटा व्यवसाय चालवतात पण कोणापुढे हात पसरत नाहीत, आपल्या पायावर उभे आहेत. या लोकांची ताकद एवढी मोठी आहे, की ते सुमारे 15 कोटी लोकांना रोजगार देतात. दूध विकणाराही एखाद्या मुलाला रोजगार देतो. जर हे वैयक्तिक क्षेत्र आहे, या वैयक्तिक क्षेत्राला जर बळकटी दिली तर, जे आज 15 कोटी लोकांना रोजगार पुरवतात ते 30 कोटी लोकांना रोजगार पुरवू शकतात, एवढी ताकद यांच्यामध्ये आहे. म्हणून न्हावी असेल, धोबी असेल, चहावाला, सामोसे विकणारा, रिक्षा चालवणारा, भाजीपाला विकणारा, फळे विकणारा, छोट्या दुकानावर रेडिमेड कपडे विकणारा, प्रसाद विकणारा, छोटे-छोटे व्यवसाय करणारे लोक. मला या वैयक्तिक क्षेत्राला ताकदवान बनवायचे आहे. त्यांना आर्थिक मदत करायची आहे. मुद्रा बँकेच्या माध्यमातून कोणत्याही तारणाशिवाय, 10 हजार ते 50 हजार त्या नागरिकाला द्यायचे जेणेकरुन त्याची सावकाराच्या जाचातून सुटका होईल. तो आपल्या पायांवर उभा राहिल. त्यादिशेने आम्ही एक मोठी मोहीम राबवणार आहोत. हे वैयक्तिक क्षेत्र भारतासाठी फार मोठी आर्थिक चळवळ बनू शकते. आम्ही 50 वर्षे खासगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र याविषयी बोललो आहोत. आता वेळ आली आहे, ती पर्सनल सेक्टरवर जोर देण्याची आणि पर्सनल सेक्टरच्या माध्यमातून एकेका व्यक्तीच्या उद्योजकतेवर भर देण्याची. त्याला पैसे पाहिजे असतील तर पैसे मिळतील, तंत्रज्ञान पाहिजे असेल तर तंत्रज्ञान द्या, कौशल्य विकास पाहिजे तर कौशल्य विकासाचे प्रशिक्षण, रोजगारासाठी तरुणांची गरज आहे, तर तरुणांची भरती, त्याला उद्योगासाठी जागा पाहिजे असेल तर जागा द्या, व्यवसाय करण्यासाठी संधी पाहिजे तर संधी दिली पाहिजे. पूर्ण मोकळे रान दिले पाहिजे. मग पाहा देशाचा हा सामान्य नागरिक देशाला नव्या शिखरावर घेऊन जाऊ शकतो.

यासाठी मी आज काशीच्या भूमीवर प्रथमच पर्सनल सेक्टरच्या विषयावर बोलत आहे आणि आगामी काळात या पर्सनल सेक्टरबाबत काशीच्या भूमीचे आशीर्वाद घेऊन सव्वाशे कोटी नागरिक ज्यामध्ये 35 वर्षापेक्षा कमी वय असलेल्यांचे प्रमाण 65 टक्के आहे, तो वर्ग वैयक्तिक क्षेत्र आहे ज्याला एक ताकद देऊन मला देशाला पुढे घेऊन जायचे आहे. तुम्ही मला आशीर्वाद द्या. माझ्यासोबत म्हणा- भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। खूप-खूप धन्यवाद।

S.Thakur/M.Desai