Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत छोडो आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विशेष चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी लोकसभेला संबोधित केले


 भारत छोडो आंदोलनाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत  भाषण केले.

 ते म्हणाले की भारत छोडो आंदोलनासाख्या घटनांचे स्मरण हा प्रेरणेचा स्रोत आहे आणि अशा घटनांचा ठेवा भावी पिढीकडे  सोपवण्याची जबाबदारी सध्याच्या पिढीची आहे.

 पंतप्रधानांनी आठवण सांगितली की महात्मा गांधींसारखे ज्येष्ठ नेते भारत छोडो आंदोलनाच्या सुरुवातीला तुरुंगात असताना ही पोकळी भरुन काढण्यासाठी नेत्यांची नवीन पिढी उदयाला आली आणि त्यांनी हे आंदोलन पुढे नेले.

 स्वातंत्र्याचा लढा अनेक  टप्प्यातून गेल्‍याचे नमूद करुन 1857 पासून विविध टप्प्यांवर उदयाला आलेले अनेक नेते आणि आंदोलने यांचे पंतप्रधानांनी स्मरण केले. ते म्हणाले की 1942 मध्ये सुरु झालेले भारत छोडो आंदोलन हा निर्णायक लढा होता. करो या मरो या महात्मा गांधींच्या हाकेला प्रतिसाद देत समाजातील सर्व‍ घटकातील लोक त्यात सहभागी झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. राजकीय नेत्यांपासून सामान्य जनतेपर्यंत, प्रत्येकजण या प्रेरणेने भारलेला होता. संपूर्ण देशाने निर्धार केल्यानंतर, स्वातंत्र्याचे उद्दिष्ट गाठायला पाच वर्ष लागली  असे पंतप्रधान म्हणाले.

 त्या काळच्या मनातील भावनांचे वर्णन करण्यासाठी पंतप्रधानांनी लेखक रामवृक्ष बेनीपुरी आणि कवी सोहनलाल द्विवेदी यांचे विचार सांगितले.

 भ्रष्टाचार, दारिद्रय, निरक्षरता आणि कुपोषण या आव्हानांचा सध्या भारताला सामना करायचा आहे असे पंतप्रधान म्हणाले. यासाठी सकारात्मक परिवर्तन आणि सामाईक निर्धार आवश्यक असल्‍याचे ते म्हणाले. स्वातंत्र्य लढयातील महिलांच्या भूमिकेचाही त्यांनी उल्लेख करतांना ते म्हणाले की आजही आपल्या सामाईक उद्दिष्टांना महिला अतीव सामर्थ्य देऊ शकतात.

अधिकार आणि कर्तव्ये याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की आपल्या अधिकारांबाबत आपण सजग असतो, मात्र आपण आपली कर्तव्ये विसरता कामा नये आणि या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनशैलीचा भाग बनायला हव्यात.

 पंतप्रधान म्हणाले की, वसाहतवादाला भारतात  सुरुवात झाली आणि भारताच्या स्वातंत्र्याबरोबरच त्याचा अंतही झाला आणि त्यानंतर लगेचच आशिया आणि आफ्रिकेतून वसाहतवाद नाहीसा व्हायला लागला.

 1942 मध्ये, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिस्थिती  भारतासाठी अनुकूल होती असे  सांगून पंतप्रधान म्हणाले की आज पुन्हा एकदा  जागतिक परिस्थिती भारतसाठी अनुकूल आहे. 1857 ते 1942 या कालावधीत स्वातंत्र्य लढा व्यापक बनत गेला मात्र 1942 ते 1947 ही पाच वर्षे परिवर्तन  घडवून आणणारी होती आणि उद्दिष्ट साध्य करता आले. पंतप्रधानांनी खासदारांना मतभेद विसरुन  2017 ते 2022 या पाच वर्षात, स्वातंत्र्याला  75 वर्ष पूर्ण होत असताना स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातील भारत निर्मितीत सहभागी  होण्याचे आवाहन केले.

 पंतप्रधान म्हणाले की जर 1942 मध्ये करेंगे या मरेंगे असा नारा होता, तर आज करेंगे और करके रहेंगे असा नारा असायला हवा. ते म्हणाले की पुढली पाच वर्षे संकल्प से सिध्दी – पूर्णत्वाला नेण्याचा निर्धार करणारी असायला हवीत.

 भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे निर्मूलन, गरीबांना त्यांचे अधिकार देण्याचा, तरुणांना स्वयं राजगार देण्याचा, कुपोषण संपवण्याचा आणि महिला सक्षमीकरणातील अडथळे  दूर करण्याचा आणि निरक्षरता संपवण्याचा  पुढील निर्धार केला.

 आपण सर्व मिळून देशातला भ्रष्टाचार दूर करु आणि करुन दाखवू.

 आपण सर्व मिळून गरीबांना त्यांचे अधिकार मिळवून देऊ आणि देऊनच दाखवू.

 आपण सर्व मिळून तरुणांना  स्वयंरोजगाराच्या अधिक संधी देऊ आणि देऊनच दाखवू.

 आपण सर्व मिळून देशातील कुपोषणाची समस्या दूर करु आणि करुनच दाखवू.

 आपण सर्व मिळून महिलांना पुढे जाण्यापासून रोखणाऱ्या बेडया नाहीशा करु आणि करुनच दाखवू.

 आपण सर्व मिळून देशातून निरक्षरता संपवू आणि संपवूनच दाखवू.

 

B.Gokhale/S.Kane/Anagha