Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वाराणसी येथे पंतप्रधान यांनी विविध विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी केलेले भाषण


व्यासपीठावर उपस्थित असलेले उत्तर प्रदेशचे राज्यपाल श्रीमान राम नाईक, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथ, केंद्रामध्ये माझ्या मंत्रिमंडळामध्ये असलेल्या सहकारी मंत्री स्मृती ईराणी, केंद्रीय मंत्रिमंडळात सहकारी असलेले अजय टम्टा, राज्याचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, या मतदारसंघाचे खासदार आणि अनेक वर्षे माझ्या मंत्रिमंडळामध्ये उत्तम सहकार्य करणारे तसेच आता उत्तर प्रदेश भारतीय जनता पार्टीचे कार्य संभाळणारे महेंद्रनाथ पांडे, रेल्वे मंडळाचे अध्यक्ष अश्वनी, ज्यांनी गरीबांच्या कल्याणासाठी, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी अतिशय हुशारीने, वित्तीय सहभागीतेचा खूप मोठा संकल्प केला आहे अशा उत्कर्ष बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक गोविंद सिंह, आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले माझ्या बनारसच्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.

आज एकाच कार्यक्रमामध्ये एकाच व्यासपीठावरून एक हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि काही प्रकल्पांचा शिलान्यास होत आहे. मी उत्तर प्रदेश सरकारचा खूप आभारी आहे की, त्यांनी बनारस क्षेत्राचा विकासाचे पूर्व भारताच्या विकासाचे आमचे स्वप्न आहे. पूर्ण करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. आणि म्हणूनच राज्य सरकारचेही अभिनंदन करण्याची आवश्यकता आहे. आज जवळपास 300 कोटी रूपयांची गुंतवणूक करून वस्त्रोद्योग मंत्रालयाच्यावतीने ज्या प्रकल्पाचे लोकार्पण केले जात आहे, ते पाहून मला वाटतं, गेल्या अनेक दशकांमध्ये बनारसच्या या भूमीवर इतका मोठ्या प्रकल्पाची योजना साकार झाली असेल. ज्या प्रकल्पाचा आम्ही शिलान्यास करतो, त्याचे उद्घाटनही आम्हीच करतो. नाही तर राजकारणाच्या हिशेबांमध्ये शिलान्यास केला जातो आणि योजना तशीच अर्धवट राहते. प्रकल्प पूर्ण होत नाही. यावर्षी दोन सेतूंचे लोकार्पण झाले, कितीतरी काळापासून ही कामे अर्धवट राहिली होती. परंतु योगीजींनी येवून जो संकल्प केला आहे, आज तो साकार होत आहे. आणि त्या पलिकडच्या लोकांसाठी विकासाची नवी दारे मोकळी झाली आहेत. मोठ्याप्रमाणावर सुविधा उपलब्ध होत आहेत.

आज विणकर आणि शिल्पकार बंधू आणि भगिनींसाठी मला वाटत एक स्वर्णिम संधी निर्माण झाली आहे. तुमच्याजवळ पूर्वापार चालत आलेले कौशल्य आहे. संपूर्ण जग आश्चर्यचकीत होईल, अशा गोष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्‍य तुमच्यामध्ये आहे. परंतु वनामध्ये मोराने नृत्य केले, ते दृश्य पाहिले कोणी? अशीच परिस्थिती राहिली तर या काशी क्षेत्रातल्या माझ्या शिल्पकार बंधूंना, विणकर बंधूंना, जगापुढे आपल्यातील कलेचे प्रदर्शन करून आपल्या सामर्थ्‍याचा परिचय करून देण्याची संधी मिळणार नाही. असा पुढाकार घेतला तरच आमच्या या लहान लहान विणकर बंधूंना, शिल्पकार बंधू-भगिनींना आपली हस्तकला दाखवण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही लोक आपल्या हस्तकलेव्दारे जे काही निर्माण करता, त्याला जागतिक बाजारपेठ मिळत नाही. त्यामुळे आर्थिक व्यवहार होत नाहीत. मी ज्यावेळी नवीन खासदार होतो, त्यावेळी या विणकर बंधूंशी चर्चा करीत होतो. त्यावेळी मला एकच गोष्ट ऐकायला मिळत होती, की आमच्या मुलांना, पुढच्या पिढीला आता या कामात रस वाटत नाही. त्यांना हा व्यवसाय करायची इच्छा नाही. आमच्या कुटुंबातल्या सदस्यांना यातून बाहेर पडायचे आहे. त्यांना शिक्षण घेवून कुठंतरी बाहेर जायचं आहे. आणि त्याचवेळी मला वाटलं की, इतक्या मोठ्या आर्थिक व्यवहाराची बाजारपेठ, समृद्धीचे हत्यार जर या विणकर परिवारांकडून गेले तर आगामी काळातला इतिहास आपल्याला माफ करणार नाही. कारण एका बहुमूल्य गोष्टीचा ठेवा आपल्याजवळ आहे की, तिच्या मदतीने तुम्ही जगाला चकीत करू शकता. आणि जस जसा काळ पुढे जात आहे, तसतसे जगाला भारताकडे असलेल्या विशेष गोष्टींचे आकर्षण वाटत आहे, ते दिवसेंदिवस वाढतेय. आणि म्हणूनच 300 कोटी खर्चून बांधलेली ही इमारत काही फक्त इमारत नाही. ही एक भारताच्या सामर्थ्‍याचे परिचय देणारी वास्तू आहे. आमच्या काशी क्षेत्राच्या शिल्पकार, विणकरांच्या सामर्थ्‍याची एक कथा जतन करून ठेवणारी आणि उज्ज्वल भविष्याचे नवे दरवाजे उघडण्याची ताकद या वास्तूमध्ये आहे. मी इथल्या ऑटो रिक्षाचालक, टॅक्सीचालक यांना आग्रह करतो की, जर कोणीही पर्यटक या नगरीत आला, तर त्या पर्यटकाला जरूर इथे त्यांनी घेवून यावे. आग्रह करून आणावे, आणि एकाच स्थानी काशी क्षेत्राच्या सामर्थ्‍याचा परिचय त्या पर्यटकाला करून द्यावा. जो कोणी पर्यटक इथे येईल, तो काही ना काही खरेदी करून जाणारच आहे. परदेशी पर्यटक तर कदाचित इथून जाण्याचे नावच घेणार नाही. हे जे संग्रहालय बनवले आहे, ते काशीच्या पर्यटनाला प्रोत्साहन देणारे आहे. जो कोणी श्रद्धापूर्वक काशीच्या यात्रेला येईल, त्याने जर हे सगळे पाहिले तर काशीचे सामर्थ्‍य किती आहे, हे त्याला ठाऊक होणार आहे. आणि मला विश्वास आहे की, यामुळे काशीच्या पर्यटनवृद्धीला खूप मदत होणार आहे. काशीच्या या कलाकौशल्याला ताकद मिळणार असून एक नवी आर्थिक उलाढालीचे केंद्र बनण्यास मदत मिळेल.

मी आज माझ्या सर्व विणकर बंधू भगिनींना, माझ्या शिल्पकार बंधू भगिनींना ही भेट देतांना अगदी हृदयापासून खूप खूप अभिनंदन करतो. आणि त्यांच्या प्रगतीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. बंधू भगिनींनो, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शेवटी विकासामध्ये आहे. याआधी अशी सरकारे येवून गेली की, त्यांचे विकासाशी जणू वाकडे असावे असे वातावरण होते. त्यांच्यासाठी सरकारी तिजोरी, निवडणुका जिंकण्याच्या कार्यक्रमात नष्ट होऊन जात होती. आमचा प्रयत्न असा आहे की, विकासाची कामे प्रत्यक्षात साकार व्हावीत. म्हणजे गरीबातल्या गरीबाच्या आयुष्यात परिवर्तन होण्याच्या संधी निर्माण होतील. आमच्या गरीबांचे सशक्तीकरण झाले, जर आमच्या गरीबांच्या हातामध्ये सामर्थ्‍य आले, काही आर्थिक व्यवहार त्यांना करता आले, त्यांना कामाची संधी मिळाली तर खूप लाभ होईल. मला खात्री आहे, हिंदुस्तानचा एकही गरीब, गरीब राहू इच्छित नाही. तुम्ही कोणाही गरीबाशी बोलून पहा, त्याला गरीबीमध्ये राहायला आवडणार नाही. एखाद्या गरीबाला विचारा, तुम्ही ज्या प्रकारे आयुष्य कंठले आहे, तशाच प्रकारे तुमच्या मुलांनीही गरीबीमध्ये जगावे असं तुम्हाला वाटत का? आपल्या मुलांच्या नशिबीही गरीबीचे आयुष्य असावे , असं कुणाही गरीबाला वाटणार नाही. गरीबातला गरीब व्यक्ती म्हणतो, माझ्या नशिबात होतं ते तर मी भोगलं. माझ्या वाडवडिलांनी मला जे काही दिलं होतं, ते नशीब घेवून मी आयुष्य कंठलो. परंतु आता मात्र माझ्या येणा-या पिढयांना, आपल्या मुलांना वारसा म्हणून गरीबी देवू इच्छित नाही. वारसा म्हणून त्यांच्या वाट्याला गरीबी यावी, असे आयुष्य मला नको, आता त्यांचे आयुष्य चांगले जावे यासाठी कष्ट करतो. मुले आपल्या पायावर उभी रहावीत, परिश्रम करावे, त्यांनी काम करावे, नवे काम शिकून परंतु सन्मानाने जगावे, असे मला वाटते. प्रत्येक गरीबाचे आपल्या भावी पिढीसाठी जे स्वप्न आहे, तेच स्वप्न माझ्याही सरकारचे आहे. आणि म्हणूनच आमच्या सरकारच्या सगळया योजना समाजाच्या प्रत्येक घटकाच्या सशक्तीकरणासाठी आहेत. त्यांना आपल्या पायावर उभे राहण्याचे सामर्थ्‍य यावे, या दिशेने आम्ही प्रयत्न करीत आहोत. या परिसरामध्ये विशेषता उत्कर्ष बॅंकेच्या माध्यमातून या कामाला बळ देण्यात येत आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो. ज्या समर्पित भावनेने आमचे गोविंदजी आणि त्यांचे सहकारी काम करीत आहेत, ते पाहता त्यांचे अभिनंदन करणे उचित ठरेल.

बंधू, भगिनींनो, काशीमध्ये आज एका जल अॅम्बुलन्सचेही लोकार्पण करण्यात आले. जल शववाहिनीचे लोकार्पण केले आहे. ज्यावेळी मी पहिल्यांदा जल शववाहिनीचा विचार समोर ठेवला होता, त्यावेळी अनेक लोकांना आश्चर्य वाटलं होतं. मी म्हणालो, काशीमध्ये होणारी वाहतुकीची कोंडी आणि स्मशान यात्रेच्या कामामध्ये गुंतलेल्या लोकांची समस्या लक्षात घेता आपण जलमार्गाच्या पर्यायाचा विचार केला पाहिजे. या कामासाठी जलमार्गाचा वापर केला पाहिजे. आपल्या जलमार्गामध्येही एक ताकद आहे. त्याला आर्थिक विकासाच्या कामामध्ये जोडण्याची तसेच सामान्य मानवी सुविधांशी जोडण्याची, पर्यटकांसाठी त्याचा वापर करण्याची अतिशय आवश्यकता आहे. जलमार्गाचा वापर वाढवला पाहिजे. या दिशेने आम्ही अनेकविध प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे आज जल शववाहिनी, जल अॅम्ब्युलन्स यांचे लोकापर्ण करण्यात येत आहे.

बनारसच्या माझ्या प्रिय बंधू, भगिनींनो, आपल्याला माहिती आहे की, मी निवडणूक लढविण्यासाठी ज्यावेळी बनारसला आलो होतो, त्यावेळी बनारसबरोबरच मी बडोद्यावरूनही निवडणूक लढवत होतो. आणि बडोद्याने मला प्रचंड बहुमताने विजयी केलं होतं. बनारसनेही मला प्रचंड बहुमताने विजयी केलं. परंतु ज्यावेळी एक जागा सोडण्याची वेळ आली त्यावेळी मी विचार केला की, बडोद्याला पुढे नेण्यासाठी माझे अनेक सहकारी तिथं आहेत. ते बडोद्याच्या प्रगतीसाठी कोणतीही कसर बाकी ठेवणार नाहीत. परंतु या काशीसाठी मी आपला वेळ खर्ची घातला तर मला माझा हा जीवनभराचा आनंदाचा ठेवा होईल. आणि म्हणूनच मी काशीची सेवा करण्यासाठी निवड केली. आज मला खूप आनंद आहे की, बडोदा आणि बनारस यांना जोडण्यात येत आहे. बडोदा आणि बनारस महामना एक्सप्रेसने जोडले जात आहेत. आज इथूनच बडोद्यासाठी महामना एक्सप्रेसला प्रारंभ झाला आहे. बडोदा ते सूरतमार्गे ही महामना एक्सप्रेस बनारसला पोहोचणार आहे. गुजरातमधील वस्त्रोद्योग आधी अहमदाबादमध्ये होऊन हा वस्त्रोद्योग बनारसला आला. आज पुन्हा एकदा महामना एक्सप्रेसच्या माध्यमातून बडोदाही वस्त्रोद्योगात अग्रेसर झाला बनारसही सांस्कृतिक नगरी आहे, विद्येचे धाम आहे. दोन्ही नगरांना जोडणे आणि सूरतमार्गे, जे वस्त्रोद्योगाचे धाम आहे. ही एक अशी रेल्वे सुविधा निर्माण झाली आहे की, त्यामुळे याचा संबंध पूर्वेकडील उत्तर प्रदेशातील सामान्य नागरिकांशी आहे. याचा संबंध आर्थिक उलाढालींशी जास्त आहे. भारताचे रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी आत्ताच बडोद्यावरून महामना एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. आणि सूरतमध्ये या भूमीचा पूत्र आमचे रेल्वे मंत्री मनोज सिन्हा सूरतवरून तिची पाठवणी करीत आहेत. एक अद्भूत योगायोग आज या महामना एक्सप्रेसच्या लोकार्पणाच्या दिवशी झाला आहे. बंधू , भगिनींनो मी आपला खूप वेळ घेवू इच्छित नाही. परंतु आज देश वेगाने प्रगती करत आहे. गरीब आणि मध्यम वर्गाच्या कल्याणासाठी त्यांना केंद्रस्थानी ठेवून सरकार खूप काही करत आहे. अनेक धाडसी पावले उचलण्यात येत आहेत. 20-20, 25-25 वर्षांपासून अर्धवट, लटकत राहिलेल्या मुद्यांचा निपटारा मोठ्या हिंमतीने केला जात आहे. मोठ्या हिंमतीने निर्णय घेतले जात आहेत. आणि त्याचा परिणाम आज संपूर्ण जग पाहत आहे. भारत तेजगतीने पुढे जात आहे, हे जग पाहत आहे. भारत बदलतोय. आपल्याला पूर्व उत्तर प्रदेशालाही बदलायचे आहे. आपल्याला भारताला बदलायचे आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पश्चिमेकडे ताकद आहे, तशी पूर्वेकडेही ताकद आली पाहिजे, या दिशेने आम्ही काम करीत आहोत. आजच्या या योजनांसाठी एक हजार कोटी रूपयांची गुंतवणूक आहे. मला खात्री आहे की, इथल्या आर्थिक जीवनात परिवर्तन घडून आणण्यासाठी, इथल्या सामाजिक जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी, इथल्या पायाभूत सुविधांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी या प्रकल्पांचा एक मोठी शक्ती म्हणून उपयोग होणार आहे. मी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये योगीजींच्या नेतृत्वाखाली जे अनेक कार्यक्रम तेजगतीने होत आहेत, सहा महिन्यांच्या अल्पकाळामध्ये योगीजींनी जी कमाल करून दाखवली, त्याबद्दल मी त्यांचे हृदयापासून खूप खूप अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद देतो.

B.Gokhale/S.Bedekar