पीएम्इंडिया
आदरणीय राष्ट्रपती, सर्व उपस्थित मान्यवर. आपल्या शास्त्रांमध्ये सहस्त्र चंद्र दर्शनाला विशेष महत्त्व आहे. 50 वर्ष, 75 वर्ष यापेक्षाही 80 वा जन्मदिन सहस्त्र चंद्र दर्शनाच्या रुपात साजरा केला जातो आणि यांचे तात्पर्य असे आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती 80 वर्षाची होते तोपर्यंत त्यांनी एक हजार वेळा पूर्ण चंद्राचे दर्शन घेतलेले असते. आपल्याबरोबर उपस्थित असलेले आदरणीय राष्ट्रपती सहस्त्र चंद्र दर्शनानंतर अनुभवलेल्या शीतलतेची अनुभूती सर्व राष्ट्राला देत आहेत. मी मनापासून त्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा देतो. आणि मला विश्वास आहे की, त्यांचे दीर्घकालीन जीवन आगामी अनेक वर्षापर्यंत राष्ट्रासाठी एक खूप मोठी ठेव म्हणून काम करत राहील, प्रेरणा देत राहील आणि राष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे जे आम्हा सर्वांचे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यात त्यांचे आशीर्वाद सदैव बरोबर राहतील. मी त्यांना अनेक शुभेच्छा देतो.
आज येथे दोन पुस्तकांचे लोकार्पण झाले आहे. यापैकी एक अशी वैचारीक यात्रा आहे ज्या यात्रेचा प्रसाद वेळोवेळी राष्ट्राला प्राप्त होत राहिला आहे. आदरणीय राष्ट्रपतींनी वेगवेगळया विषयांवर जी मते मांडली, वेगवेगळया वेळी मांडली ती सर्व मते एक प्रकारे विचारांची ठेव आहे. एका प्रकारे हे शासन व्यवस्था आणि समाज व्यवस्थेचे एक दर्शनच आहे, जे त्यावेळच्या तत्कालीन परिस्थितीचेही दर्शन घडवते. त्याचबरोबर भविष्यातील विचारांची द्वारेही खुली करते. आगामी काळात हे सर्व खूपच उपयोगी पडेल.
कधी कधी मी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांबरोबर बोलतो, त्यावेळी मला एक उणीव नक्कीच जाणवते तीही की, त्यांची जी अभ्यासाची पुस्तके असतात, त्यात एका निश्चित विचारांनी बांधलेल्या लोकांच्या लेखांचा संग्रह असतो. आणि हेच त्यांना शिकवले जाते. पण अशा प्रकारचा ग्रंथ पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी जर का एक प्रोजेक्ट म्हणून उपयोगात आणला तर अनेक विषयांची पार्श्वभूमी समजण्याची, अनेक घटनांची पार्श्वभूमी जाणून घेण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळेल. कोणताही निर्णय अचानक घेतला जात नाही. त्यामागे खूप मोठी वैचारिक पार्श्वभूमी असते. खूप मोठी प्रक्रियाही असते. जेव्हा आपण एखाद्या महान पदावरील व्यक्तीच्या विचारांना त्यांच्या मूळ स्वरुपात पाहतो तेव्हा या गोष्टी समजणे अधिक सुलभ होते. आणि एकाअर्थी अशा प्रकारच्या विषयांचे संकलन आणि संपादन भावी काळात नव्या पिढीसाठी खूप मोठी प्रेरणादायी ठरु शकते. आणखी एका पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे भाग्य मला मिळाले. आणि एका प्रकारे हे पुस्तक आमच्या वारशाची ओळख आहे. एक समाज म्हणून आपण इतिहासाची जाण ठेवणारा समाज नाही आणि यासाठी आपणच दोषी आहोत. यामुळेच आमच्या अनेक बहुमूल्य गोष्टी, ज्यांचा आपण गौरव करायला पाहिजे, त्या सांभाळून ठेवल्या पाहिजेत आणि नव्या पिढीकडे हस्तांतरीत केल्या पाहिजेत, त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो असेही असू शकते की, “आत्मवत्सव भूतेषू” हे मूळ चिंतन असल्यामुळे या गोष्टीचे माहात्म्य आपल्याला वाटत नाही. पण जेव्हा आपण जगातल्या सर्व लोकांची तुलना करतो तेव्हा आपल्याला जाणवते की, आपल्याकडे काहीच कमी नाही देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील प्रत्येक दगडाला आपला इतिहास आहे. प्रत्येक दगडाजवळ सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहे. परंतु त्या गोष्टी ऐकणारा कोणी राहिला नाही, ना कोणी समजणारा आणि या गोष्टी शब्दांमध्ये उतरवणारा. आणि याच कारणामुळे एवढा मोठा इतिहास दगड बनून राहिला आहे. या दगडांना पुन्हा एकदा जीवित करणे ही काळाची हाक आहे. रामायणात “शीळेपासून अहिल्या” होण्याची घटना कोणत्या रुपात आहे हे मला माहित नाही पण भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील दगडांमध्ये अडकलेला इतिहास हा आमचा मोठा वारसा आहे एवढे मात्र मी जाणतो आणि आपण हा वारसा पुन्हा एकदा जीवित करु शकतो. आमच्या या इमारती कुठल्या उद्देशाने तयार झाल्या ? कशा तयार झाल्या ? याबाबत कोणते निर्णय झाले ? या इमारतींचे कोणते कोणते पैलू आहेत याबाबतच्याया वारशावर हा जो ग्रंथ आहे, त्यात प्रकाश पाडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. विशेष करुन या विषयात मोठे स्वारस्य राखणाऱ्या ओमिताजी आहेत, त्यांनी खूप छान काम केले आहे. मी त्यांचे विशेष अभिनंदन करतो. ज्या सहकाऱ्यांनी हे काम केले आहे त्यांचेही मी अभिनंदन करतो.
प्रणव दा ! हे असे भाग्यवान व्यक्ती आहेत ज्यांना माता सरस्वतीचा आशीर्वाद लाभला आहे आणि हा आशीर्वाद लाभल्यामुळेच ते लेखणीचे धनी बनले आहेत. त्यांनी जे काही लिहिले आहे, त्यांची जी काही पुस्तके आहेत त्यात परिस्थितीचे मूल्यांकन कमीत कमी शब्दात करण्याची त्यांची जी ताकद आहे, ती एका महान व्यक्तीमत्वाचे परिचय करुन देणारी आहे. एवढे प्रदीर्घ सार्वजनिक जीवन… आणि तेही अनेक उच्च पदांवरील. एवढी वर्ष संसदेत राहाणे, तेही वेगवेगळया पदांवर राहणे… प्रणव दां नी एवढे विभाग सांभाळले आहेत की, भारताच्या इतिहासात आणखी कुठल्याही व्यक्तीने इतके विविध विभाग सांभाळले नसतील. ज्यांनी व्यापार मंत्रालय सांभाळले, त्याबरोबरच संरक्षण, वित्त आणि एकीकडे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयही. अशाप्रकारचे आणखी कोणी व्यक्तीमत्व आपल्याला भेटू शकेल असे मला तरी वाटत नाही. केवढा सखोल अनुभव, आणि अनेक वैविध्यांनी भरलेला व्यापक अनुभव. आणि अशा महापुरुषाबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली हे माझे मोठे भाग्य आहे. माझ्यासाठी ही एक खूप गौरवाची बाब आहे आणि आपण सगळयांनी याचा अनुभवही घेतला असेल की, त्यांना कुठल्याही गोष्टींचा संदर्भ शोधावा लागत नाही. जेव्हा ते एखाद्या इमारतींबद्दल बोलतात तेव्हा अतिशय बारकाईने बोलतात. कुठल्याही काळाबद्दल बोलतांना तेवढीच बारकाई असते. कुठल्याही व्यक्तींबद्दल तितक्याच बारकाईने चर्चा करतात आणि अगदी निसर्ग आणि संगीताबद्दल चर्चा करतांनाही तितकीच बारकाई असते. जे सर्वार्थाने जीवन जगायला शिकतात त्यांच्यातच एवढी सखोलता आणि एवढी व्यापकता असू शकते. जीवन तर सगळेच जगतात, अनेक पदांवर सगळेच काम करतात, पण जे जीवन जगायला शिकतात तेच प्रत्येक क्षण आपल्यात सामावून घेतात, प्रत्येक ज्ञान समजून घेतात, त्या ज्ञानाला आपल्या अनुभवाच्या कसोटीवर, पारखून घेतात तेव्हा कुठे अशी अमृतधारा निरंतर वाहत राहाते जी सहस्त्रचंद्र दर्शनाच्या वेळी अधिक प्रकाशमान होते आणि एक शीतलताही देते आणि हे सर्व आज आपल्याला आपल्या राष्ट्रपतींद्वारे प्राप्त होत आहे. मी त्यांना वंदन करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. आणि आज मला येथे येण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे.
खूप खूप धन्यवाद.
J.Patnakar/S.Tupe/M.Desai
President Mukherjee can talk about any issue. Such is his depth: PM @narendramodi https://t.co/7g7Lisg4jR @RashtrapatiBhvn
— PMO India (@PMOIndia) December 11, 2015
On Rashtrapati ji's birthday, released 2 books. The books give an insight to the thoughts & vision of our President. https://t.co/CbP91KLWQR
— Narendra Modi (@narendramodi) December 11, 2015
Recalled PranabDa's distinguished political career in my speech. Am fortunate to have got the opportunity to work with him @RashtrapatiBhvn
— NarendraModi(@narendramodi) December 11, 2015