पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सूरत इथल्या रसिलाबेन सेवंतीलाल शाह व्हिनस रुग्णालय या सुपर स्पेशालिटी अत्याधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन झाले. या रुग्णालयात आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार दिले जाणार आहेत. याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, सरकार निरोगी भारताचे उदिृष्ट गाठवण्यासाठी प्रयत्न करत आहे. गरीबांसाठी सरकारने सुरु केलेल्या योजनांची त्यांनी माहिती दिली. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान आणि इंद्रधनुष्य अभियानामुळे माता-बाल मृत्यू दर कमी होण्यात मदत झाली आहे असे पंतप्रधान म्हणाले.
सरकारने जोरकसपणे राबवलेल्या स्वच्छता अभियानामुळे आज देशातल्या 97 टक्के लोकांना शौचालयाची सुविधा उपलब्ध झाली आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधांवर भर देताना पंतप्रधानांनी सुदृढ आरोग्यासाठी योग आचरण्याचा सल्ला दिला.
आयुष्मान भारत योजनेमुळे निरोगी भारत निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या योजनेमुळे छोट्या शहरांमध्ये नवी रुग्णालये बांधली जातील. ज्यातून आरोग्य क्षेत्रात रोजगार निर्मितीही होईल असे त्यांनी सांगितले. सर्वसामान्यांसाठी आता जनेरिक औषधे उपलब्ध असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी 10 टक्के आरक्षण लागू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केल्याबद्दल गुजरात सरकारचे त्यांनी अभिनंदन केले.
B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar