Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत-बांग्लादेश पॉवरग्रीड ट्रान्समिशन लाईनच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे वक्तव्य

भारत-बांग्लादेश पॉवरग्रीड ट्रान्समिशन लाईनच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे वक्तव्य


माझ्या दृष्टीने ही ऐतिहासिक वेळ आहे. आधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून दोन देशांचे पंतप्रधान, एका मुख्यमंत्र्यासह एखाद्या योजनेचे लोकार्पण करतात अशी वेळ क्वचितच आली असेल. यादृष्टीने मी ही बाब महत्वपूर्ण मानतो. पंतप्रधानांनी आपल्या अभिभाषणाच्या माध्यमातून ही बाब मांडली, प्रोत्साहन दिले यासाठी मी त्यांचे आभार मानतो. बंगबंधु शेख मुजिबुर रहमान यांचे भारताशी अतूट नाते होते. संकटाच्या त्या काळात, मानवतेच्या कार्यात भारत तुमच्या दु:खात कसा सहभागी झाला याचे सदैव स्मरण केले आहे आणि भारताप्रती आभार व्यक्त केले आहेत. आजही त्या भावना तितक्याच तीव्रतेने आपण व्यक्त केल्या आहेत.

त्या काळात बांग्लादेशात दु:ख, वेदना आणि व्यथा भरल्या होत्या. आज बांग्लादेश नवी उंची गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तेव्हाही आम्ही तुमच्या खांद्याला खांदा भिडवून वाटचाल करत राहिलो आणि तुम्ही आमच्याबरोबर चालत राहिला. आपण दोन्ही देश मिळून जगासमोर एक उदाहण घालून देत आहोत की शेजारी राष्ट्रांबरोबर कसे संबंध राखायचे. एकमेकांवर अवलंबून असणारे जग साकारण्यासाठी कोणकोणते उत्तम मार्ग असू शकतात आणि मी पाहतोय की सहप्रवासातल्या सहकार्याच्या अपल्या प्रयत्नात उत्तम फलदायी ठरण्याची ताकद आहे. या संधीला मी त्या दृष्टिकोनातून पाहतो. एका छोटया व्हिडिओ कॅमेराद्वारे एका छोटया खोलीत होणाऱ्या या कार्यक्रमाकडे जागतिक समुदाय, जागतिक स्तरावरही या घटनेकडे बघेल असा मला विश्वास आहे
आजचीच घटना-भारतातून बांग्लादेशमध्ये वीज जात आहे. एक नवी ऊर्जा, विकासाच्या ऊर्जेची ही संधी आहे. दुसऱ्या बाजुला आमच्यासाठी एक नवा रस्ता खुला होत आहे. कारण आतपर्यंत तर दुसरा दक्षिणेकडून होता. मात्र पूर्वेचा हा मार्ग अद्याप चोखाळला नव्हता. मी ॲक्ट इस्ट धोरण स्वीकारले आहे त्यामुळे माझ्यासाठी हा पूर्वेचा मार्ग महत्वाचा आहे. बांग्लादेशच्याबरोबर राहून डिजिटल जगाचा पूर्वेचा मार्ग खुला होणे हे भारताच्या पूर्वेकडच्या विशेषत: आसाम, त्रिपुरासह ईशान्य, सिक्कीम हा आमचा अष्टलक्ष्मीचा प्रदेश आहे. तिथल्या युवकांसाठी नवा उमेदीचा किरण आहे. सध्याचे जग कम्युनिकेशन अर्थात दळणवळणाच्या बळावर चालते. या दळणवळणाला प्रोत्साहन देण्याची ही संधी आहे, आणि म्हणुनच तुम्ही जे सहकार्य दिले ज्या सुविधा दिल्या त्याबद्दल मी आभार मानतो.

आगामी काळासाठी विद्युत पारेषण वाहिन्या टाकल्या जात आहेत त्यांची क्षमता पहिल्यापेक्षा जास्त ठेवण्यात आली आहे. जेणेकरुन येत्या काळात जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा आपल्याबरोबर ऊर्जाक्षेत्रात आम्ही काम करु शकू. आमचे प्रयत्न निरंतर राहतील. काही दिवसांपूर्वी रस्ते मार्गे दळणवळण वाढविण्यासाठी बांग्लादेश, नेपाळ, भारत आणि भूतान यांनी सफल प्रयत्न केले आहेत. वीजेच्या माध्यमातून आम्ही नवी ऊर्जा देत आहोत 21व्या शतकातील महत्वाची कनेक्टिव्हिटी, डिजिटल कनेक्टिव्हिटीला जोडत आहे. पाणी असो, आकाश असो, जमीन असो. बांग्लादेश आणि भारत एकत्र येत आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे खांद्याला खांदा भिडवून पुढे जात आहेत.

आता आम्हाला अंतराळ क्षेत्रात एकमेकांच्या साथीने पुढे जायचे आहे. बंग-बंधु उपग्रह, आपण जसे रस्ता मार्गे जोडले जात आहोत, जलविषयक सहकार्य करत आहोत डिजिटल दुनियेत आपले सहकार्य आहे तसे अंतराळ क्षेत्रात आपल्याबरोबर वाटचाल करु इच्छितो. बंगबधू उपग्रहासाठीही आम्ही आपल्या साथीने वाटचाल करु इच्छितो. मी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. भारतात आज होळीचा सण साजरा केला जात आहे, आमच्याकडे होळीचा सण पवित्र मानला जातो, बांग्लादेशातही काही भागात होळी साजरी केली जाते. होळीच्या या पवित्र सणाच्यावेळी ही संधी उभय देशातले संबंध नव्या रंगाने उजळवेल आणि एक नवी ऊर्जा, नव्या कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देईल.

आज आणखीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती महत्वाची गोष्ट म्हणजे बांग्लादेश आणि भारत यांच्यात आज टी-20 क्रिकेट सामना आहे. मी दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. भारत-बांग्लादेश जेव्हा खेळाच्या मैदानात असतात तेव्हा आमच्या युवकात जय-पराजयाच्या पलिकडे जाऊन एक खिलाडू वृत्तीही निर्माण होते. वीज जशी नवी ताकद देते तशी ही खिलाडू वृत्तीही नवी ताकद देते. याच खिलाडू वृत्तीने दोन्ही संघांनी खेळावे आणि जगाला खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवावे दोन्ही संघांना माझ्या शुभेच्छा. आपल्या सर्वांना धन्यवाद.

N.Chitale/S.Tupe/M.Desai