पीएम्इंडिया
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र यांच्याशी संबंधित असलेल्या महादई नदी पाणीमुद्याबाबत लवादाबाहेर जाऊन तोडगा काढण्यासाठी पंतप्रधानांनी मध्यस्थी करावी, अशी शिष्टमंडळाने मागणी केली. सध्या हा प्रश्न लवादासमोर आहे. लवादाबाहेर जाऊन परस्पर संमतीने हा प्रश्न सोडविण्यासाठी तिन्ही राज्यांच्या विविध राजकीय पक्षांचे मतैक्य होणे आवश्यक आहे, अशी सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली.
कर्नाटक राज्यातील विशेष करून राज्याच्या उत्तर भागातील दुष्काळाच्या तीव्र समस्येचा मुद्दाही शिष्टमंडळाने पंतप्रधानांसमोर यावेळी मांडला. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लवकरात लवकर एक केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर पाठवले जाईल, असे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले.
साखरेच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. देशभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हा प्रश्न भेडसावत असून केंद्र सरकार यासंदर्भात पावलं उचलत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
राज्यातील मलबेरी उत्पादकांच्या हित रक्षणासाठी रेशीमचे आयातशुल्क 30 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात यावे अशी विनंती या शिष्टमंडळाने केली. यासंदर्भात विचार केला जाईल असे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, अनंत कुमार, सदानंद गौडा, लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे या बैठकीला उपस्थित होते.
S.Tupe/N.Sapre
Met an All Party Delegation from Karnataka. http://t.co/V68b265Y7E pic.twitter.com/Y7bQ20AQIc
— Narendra Modi (@narendramodi) August 24, 2015