पीएम्इंडिया
महामहिम,
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग,
राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा,
राष्ट्राध्यक्ष मिशेल टेमर,
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन
अतिशय जिव्हाळ्याच्या स्वागताबद्दल आणि या शिखर परिषदेच्या अतिशय उत्तम आयोजनाबद्दल सर्वप्रथम मी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे आभार मानतो. मर्यादित सत्रादरम्यान आमच्यात अतिशय विधायक संवाद झाला. त्यामुळे आमच्यातील परस्पर सामंजस्य आणि दृष्टिकोन अधिक समृद्ध झाले. सुमारे एक दशकाहून अधिक काळाच्या वाटचालीनंतर ब्रिक्स परिषदेने सहकार्याचे एक भक्कम जाळे उभारले आहे. अनिश्चिततेच्या दिशेने भरकटणा-या जगात स्थैर्य निर्माण करण्यासाठी आणि विकासासाठी आम्ही योगदान देत आहोत. आमच्या सहकार्याचा पाया व्यापार आणि अर्थव्यवस्था असताना, आम्ही तंत्रज्ञान, परंपरा, संस्कृती, कृषी, पर्यावरण, ऊर्जा, क्रीडा आणि माहिती दळणवळण तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांनाही प्राधान्य देत आहोत. ब्रिक्स देशांमधील पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासाकरिता आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्याच्या आपल्या ठरावाला अनुसरून नवीन विकास बँकेने कर्जांचे वितरण करायला सुरुवात केली आहे. त्याचवेळी आमच्या केंद्रीय बँकेने आकस्मिक राखीव व्यवस्था पूर्णपणे कार्यरत राहण्यासाठी पावले उचलली आहेत. आम्ही ज्यावर अवलंबून राहू शकतो असे हे प्रगतीपथावरील मैलाचे दगड आहेत. यापुढे पाहताना आमच्या या प्रवासात आमची जनता केंद्रस्थानी राहणे अतिशय महत्त्वाचे आहे. गेल्या वर्षीपासून चीनने आमच्यातील देवाणघेवाणीला चालना देण्यासाठी जनतेशी-जनतेचा संवाद घडवण्यात पुढाकार घेतला आहे. अशा त-हेच्या धाग्यांची परस्परांमध्ये गुंफण झाल्याने आमचे संबंध अधिक दृढ होणार आहेत आणि परस्परांना जाणून घेण्याची भावना वाढीला लागणार आहे.
सर्व मान्यवरांनो,
भारताच्या स्वतःच्या परिवर्तनाचा हा प्रदीर्घ प्रवास आमच्या जनतेसाठी अभिमानास्पद आहे. दारिद्र्याचे निर्मूलन करण्यासाठी, आरोग्य, स्वच्छता, कौशल्य, अन्न सुरक्षा, स्त्री-पुरुष समानता, ऊर्जा, शिक्षण आणि नवनिर्मितीसाठी आम्ही मोहिमेच्या स्वरुपात काम करत आहोत. गंगा स्वच्छता, अपारंपरिक ऊर्जा, डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटीज, सर्वांसाठी घरे आणि स्किल इंडिया यांसारख्या राष्ट्रीय कार्यक्रमांमुळे स्वच्छ, हरित आणि समावेशक विकासाचा पाया घातला जात आहे. आमच्या 80 कोटी युवकांच्या नवनिर्मितीक्षम उर्जेला सुद्धा त्यामुळे वाव मिळत आहे. आमच्या महिला सक्षमीकरण कार्यक्रमांमुळे महिलांना राष्ट्र उभारणीच्या मुख्य प्रवाहात आणले जात आहे आणि त्यामुळे अधिक चांगले परिणाम दिसून येत आहेत. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधातील संघर्ष आम्ही आणखी तीव्र केला. आमच्या राष्ट्रीय अनुभवांच्या बळाचा उपयोग करून ब्रिक्स देशांमधील भागीदारी आणखी बळकट करून त्यातून यशदायी परिणाम साध्य करता येतील. परस्पर सामंजस्यात आणखी सुधारणा करण्यासाठी काही विचार मनात येत आहेत. पहिला म्हणजे गेल्या वर्षी आपण ब्रिक्स मानांकन संस्था स्थापन करण्यासंदर्भात चर्चा केली होती आणि त्या संदर्भातील एका आराखडयाला लवकरात लवकर अंतिम स्वरुप देण्यात यावे असे आवाहन मी करीन. दुसरा विचार म्हणजे आपल्या केंद्रीय बँकांनी त्यांची क्षमता आणखी जास्त बळकट केली पाहिजे आणि आकस्मिक राखीव व्यवस्था आणि आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्यात सहकार्य निर्माण केले पाहिजे. तिसरा विचार म्हणजे आपल्या देशांच्या विकासासाठी परवडण्याजोग्या दरात उपलब्ध असलेली, विश्वासार्ह आणि शाश्वत उर्जेची उपलब्धता. हवामानाला तोंड देणा-या विकासासाठी सर्व उपलब्ध संसाधनांच्या स्रोतांचा वापर करणे आपल्याला भाग पडत आहे. विशेषतः अनेक टप्प्यांवर अपारंपरिक उर्जा महत्त्वाची आहे. हे लक्षात घेऊन भारताने फ्रान्सच्या साथीने नोव्हेंबर 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय सौर आघाडी नावाचा एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय उपक्रम सुरू केला. या उपक्रमाच्या माध्यमातून 121 देशांना परस्परांना सौर उर्जेच्या अधिक प्रभावी वापराद्वारे फायदा करून देणारी आघाडी तयार होणार आहे. ब्रिक्स देशांनाही या आघाडीसोबत सौर उर्जेच्या वापराचे धोरण राबवण्यासाठी काम करता येईल. आपल्या पाच देशांमध्ये अपारंपरिक आणि सौर उर्जा वापराला चालना देण्यासाठी आवश्यक असलेली परस्परपूरक कौशल्ये आणि क्षमता आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या सहकार्यासाठी नवीन विकास बँकेला आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसोबत प्रभावी संबंध प्रस्थापित करता येतील. या बँकेने स्वच्छ उर्जा कार्यक्रमांसाठी विशेषतः सौर उर्जा कार्यक्रमांसाठी अधिक निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. चौथा विचार म्हणजे आपल्या देशांमध्ये खूप मोठ्या संख्येने युवाशक्ती उपलब्ध आहे. आपल्या युवकांना आपल्या सामाईक उपक्रमांच्या मुख्य प्रवाहात जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी करून घेणे गरजेचे आहे. कौशल्य विकास आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण यातील वाढीव सहकार्य एक महत्त्वाचे साधन ठरेल. पाचवा विचार म्हणजे गेल्या वर्षी गोवा येथील परिषदेमध्ये आपण आपल्या शहरांच्या संदर्भात स्मार्ट शहरे, शहरीकरण आणि आपत्ती व्यवस्थापन या बाबींवर विचारांची देवाणघेवाण केली होती. या मार्गावर अधिक गतीने वाटचाल करणे गरजेचे आहे. सहावा विचार म्हणजे तंत्रज्ञान आणि नवनिर्मिती, भावी काळातील जागतिक विकास आणि परिवर्तनाचा पाया आहेत. गरिबी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी तंत्रज्ञान व डिजिटल संसाधने प्रभावी साधने असल्याचा अनुभव भारतालाही आला आहे. नवनिर्मिती व डिजिटल अर्थव्यवस्था या संदर्भात ब्रिक्स देशांची एक भक्कम भागीदारी विकासाला, पारदर्शकतेला चालना देण्यात आणि शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना पाठबळ देण्यासाठी सहाय्यकारी ठरेल. ब्रिक्स चौकटी अंतर्गत, खाजगी उद्योजकतेसह एका सहकार्यकारी पथदर्शी प्रकल्पाची स्थापना करावी असे मी सुचवेन. अंतिमतः ब्रिक्स आणि आफ्रिकन देशांशी कौशल्य, आरोग्य, पायाभूत सुविधा, उत्पादन आणि संपर्कव्यवस्था या क्षेत्रांमध्ये भागीदारी करण्यासाठी आवश्यक असलेली क्षमतावृद्धी निर्माण करण्याच्या दिशेने अधिक लक्ष केंद्रित करण्याला भारताची पसंती असेल, असे मी सांगतो.
महामहिम,
गेल्या दशकामध्ये ब्रिक्सची स्थापना आणि उदयामध्ये आपल्या नेत्यांच्या दोन पिढ्यांनी योगदान दिले. आपण विश्वासार्हता निर्माण केली आहे, प्रभाव निर्माण केला आहे आणि विकासाला चालना दिली आहे. आता यापुढचे दशक अतिशय महत्त्वाचे आहे. स्थैर्य, शाश्वत विकास आणि समृद्धी असलेले वातावरण निर्माण व्हावे अशी अपेक्षा आपण करत आहोत. ब्रिक्स नेतृत्व या परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. जर आपण ब्रिक्स या नात्याने या क्षेत्रांच्या संदर्भात एक धोरण निश्चित करू शकलो तर जग या दशकाला सुवर्ण दशक समजू लागेल. उदयोन्मुख बाजारपेठांसोबत आपला उद्या विचारविनिमय होणार आहे. त्यामध्ये मी या संदर्भात माझे विचार मांडेन. भागीदारीची नवी शिखरे सर करणा-या आपल्या सामाईक प्रवासामध्ये ब्रिक्सला त्याचा फायदा होईल असा मला ठाम विश्वास आहे.
धन्यवाद.
B.Gokhale/S.Patil/Anagha
Here are highlights on my intervention at the BRICS Summit plenary session. https://t.co/DRFUwh8WCk
— Narendra Modi (@narendramodi) September 4, 2017
Talked about furthering cooperation in key areas like agriculture, energy, environment, climate change, sports & culture.
— Narendra Modi (@narendramodi) September 4, 2017
Shared details about India’s continuous efforts to eradicate poverty, ensure better healthcare, food security, sanitation & education.
— Narendra Modi (@narendramodi) September 4, 2017