Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधानांनी प्रसार माध्यमांसमोर केलेले निवेदन (मे 01, 2017)

तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधानांनी प्रसार माध्यमांसमोर केलेले निवेदन (मे  01, 2017)


 महामहीम एर्दोगन, मान्यवर प्रतिनिधी,

प्रसारमाध्यमांचे सदस्य,

राष्ट्राध्यक्ष एर्दोगन आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करायला मला आनंद होत आहे.

महामहीम,

जी-20 देशांच्या शिखर परिषदेसाठी नोव्हेंबर 2015 मध्ये मी तुर्कस्तानला भेट दिली होती. या भेटीची आठवण मी कायम जतन करेन. तुमच्या भारत भेटीमुळे, तुमच्या सुंदर देशात जो जिव्हाळा आणि प्रेम मी अनुभवले होते ते आणखी वाढवण्याची संधी आम्हाला उपलब्ध झाली आहे.

मित्रांनो,

भारत आणि तुर्कस्तानच्या जनतेने उभय देशांच्या दरम्यान असलेल्या अतिशय दृढ आणि ऐतिहासिक संबंधांची जोपासना केली आहे. शेकडो वर्षांपासून आपले समाज संस्कृती आणि भाषा या दुव्यांनी जोडले गेले आहेत. 

रुमीला तुर्कस्तानमध्ये त्याचे निवासस्थान सापडले, त्यांच्या वारशामुळे भारतातीलही सूफी संस्कृती समृध्द होत गेली आहे.

मित्रांनो, आज आमच्या सर्वसमावेशक चर्चेमध्ये राष्ट्राध्यक्ष एर्दोगन आणि मी आमच्या देशांमधील सर्व प्रकारच्या संबंधांचा आढावा घेतला, विशेषतः आमच्या राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंधांचा आम्ही  विचार केला. आमच्या भागातील विकासासंदर्भातील दृष्टीकोनाबाबत आम्ही विचारांची देवाणघेवाण केली.

मित्रांनो,

भारत आणि तुर्कस्तान या दोन महाकाय अर्थव्यवस्था आहेत. आमच्या अर्थव्यवस्थांच्या क्षमतेमुळे आमच्या दोन्ही देशांदरम्यान असलेले वाणिज्यिक संबंध अधिक बळकट करण्याच्या आणि विस्तारण्याच्या अमाप संधी आहेत याची आम्हाला स्पष्ट जाणीव आहे. तसेच आम्हाला असेही वाटते की आमच्या देशांमध्ये असलेल्या व्यावसायिक संधींचा पुरेपूर वापर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आणि दीर्घ काळासाठी झाला पाहिजे. आपल्या द्विपक्षीय व्यापाराचे आकारमान सुमारे 6 अब्ज डॉलर इतके आहे आणि आपल्या अर्थव्यवस्थांच्या पूर्ण क्षमतेला ते न्याय देत आहे असे वाटत नाही. साहजिकच दोन्ही बाजूंचे व्यवसाय व उद्योग यांना आणखी बरेच काही करता येईल.

राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्या सोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारतात आले आहे याचा मला आनंद होत आहे. आम्ही दोघांनीही त्यांना आणि भारतीय उद्योगातील अग्रणी असलेल्यांना आज सकाळी संबोधित केले.

झपाट्याने विकसित होणा-या भारतामध्ये निर्माण होत असलेल्या विविध प्रकारच्या आणि वैशिष्ट्यपूर्ण संधींचा तुर्कस्तानमधील उद्योग त्वरेने फायदा घेण्याचा प्रयत्न करतील याची मला खात्री आहे. भारताच्या पायाभूत सुविधाविषयक गरजांबाबत मला असे वाटते आणि आज सकाळीच झालेल्या व्यापारविषयक शिखर परिषदेमध्ये मी याविषयी माहिती दिली आणि स्मार्ट शहरे विकसित करण्याविषयीचा आमचा दृष्टिकोन तुर्कस्तानच्या क्षमतांना अनुरूप आहे.

आमचे आघाडीचे कार्यक्रम आणि योजनांमध्ये तुर्की कंपन्यांनी एकतर एकट्याने किंवा भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने भक्कम भागीदारी करावी यासाठी प्रोत्साहन देण्याची आमची इच्छा आहे.

 

आज करण्यात आलेले करार आणि आमच्यात झालेल्या संवादातील मुद्दे यांमुळे दोन्ही देशांदरम्यान संस्थात्मक सहकार्य अधिक बळकट होणार आहे याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही.

मित्रांनो,

आपण सध्या अशा काळात राहात आहोत ज्या काळात आपल्या समाजांना नवे धोके आणि आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. जागतिक पातळीवर सध्या अस्तित्वात असलेले आणि नव्याने उदयाला येणारे सुरक्षाविषयक धोके ही आपली सामाईक चिंता आहे.

 विशेषतः सातत्याने वाढत जाणारा दहशतवादाचा धोका आपल्या दोन्ही देशांसाठी चिंतेची बाब आहे. या विषयावर मी राष्ट्राध्यक्षांशी अतिशय सखोल चर्चा केली. कोणताही उद्देश, कोणतेही लक्ष्य ठेवून दहशतवादाचे कोणत्याही कारणासाठी समर्थन करायचे नाही याबाबत आम्ही सहमती व्यक्त केली आहे.

त्यामुळेच जगभरातील देशांनी दहशतवादाच्या जाळ्याचे उच्चाटन करण्यासाठी आणि त्यांना सीमेपलीकडून  होणारा अर्थपुरवठा थांबवण्यासाठी एकजूट होऊन काम करण्याची गरज आहे. तसेच जे देश हा दहशतवाद जन्माला घालतात, त्याला वाढवतात, आश्रय देतात आणि अशा हिंसाचारी विचारसरणीचा आणि साधनांचा प्रसार करतात त्यांच्या विरोधातही जगभरातील देशांनी खंबीरपणे उभे ठाकण्याची गरज आहे.

या समस्येला तोंड देण्यासाठी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय स्तरावर आमचे सहकार्य बळकट करण्यावर राष्ट्राध्यक्षांची आणि माझी सहमती झाली आहे.

मित्रांनो,

आम्ही संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला अधिक जास्त प्रतिनिधींच्या माध्यमातून उत्तरदायी आणि प्रभावी बनवण्यासाठी तिच्या विस्तारासह संयुक्त राष्ट्रांमधील सर्वसमावेशक सुधारणांच्या आवश्यकतेबाबतही चर्चा केली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये विसाव्या शतकाचे नाही तर सध्याच्या एकविसाव्या शतकाचे प्रतिबिंब दिसण्याची गरज आम्ही दोघांनीही लक्षात घेतली आहे.

महामहिम.

 पुन्हा एकदा मी तुमचे भारतात स्वागत करत आहे. अतिशय फलदायी चर्चेबद्दल मी तुमचे आभार मानत आहे. आपले निर्णय नक्कीच भारत-तुर्कस्तान भागीदारीला एका नव्या उंचीवर नेतील. भारतातील तुमचे वास्तव्य फलदायी होवो, अशा मी शुभेच्छा देत आहे.

धन्यवाद,

खूप खूप धन्यवाद.

 

B.Gokhale/S.Patil/Anagha