पीएम्इंडिया
देशभरातील सुमारे 90 आशा प्रतिनिधींच्या गटाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आनंद व्यक्त केला आणि मानधन आणि वीमा संरक्षणात वाढ करण्याबाबत अलीकडेच केलेल्या घोषणेबद्दल त्यांचे आभार मानले.
पंतप्रधानांनी देशभरातील “आशा” आणि “अंगणवाडी” कर्मचाऱ्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुकत्याच साधलेल्या संवादाची आठवण करुन दिली. त्या दिवशी आशा प्रतिनिधींनी सांगितलेले अनुभव आणि वैयक्तिक कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली. अनेकांसाठी हे अनुभव नक्कीच प्रेरणादायी ठरतील असे ते म्हणाले.
आज आशा कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप करुन गरीब माता आणि बालकांचे प्राण वाचवण्यात कशी मदत केली याचे अनुभव कथन केले.
पंतप्रधानांनी आशा कर्मचाऱ्यांच्या कौशल्य आणि समर्पणाची प्रशंसा केली. काळा आजारासारख्या रोगांचे निर्मूलन करण्यात आशा कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांची, बील आणि मिलिंदा गेट्स यांनीही प्रशंसा केल्याची आठवण त्यांनी करुन दिली.
आपल्या गावातील जीवनमान सुधारण्यासाठी त्यांनी अन्य सरकारी संस्थांच्या समन्वयातून काम करण्यासाठी आपली ऊर्जा वापरावी अशी सूचनाही त्यांनी दिली. सरकारी योजना आणि उपक्रमांचा उद्देश गरीबी विरोधात गरीबांना सक्षम करण्याचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा हे देखील यावेळी उपस्थित होते.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar