Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नरेंद्र मोदी ऐप च्या माध्यमातून विविध सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी केलेले भाषण


हे ते लोक आहेत ज्यांनी वेळेत विचारपूर्वक पावले उचलली आणि आयुष्यातील प्रत्येक आव्हानासाठी स्वतःला तयार केले. मला पूर्ण खात्री आहे की आज ते ज्या गोष्टी सांगतील त्या देशभरातील कोट्यवधी लोकांना प्रेरित करतील. आपणा सर्वाना माहित आहे की, आयुष्यात एक गोष्ट निश्चित आहे आणि ती आहे आयुष्याची अनिश्चितता. उद्याचा दिवस, येणारा क्षण आपल्या आयुष्यात काय घेऊन येणार आहे हे आपल्यापैकी कुणालाही माहित नसते.

जन सुरक्षा योजना आयुष्यातील अनिश्चितता आणि परिस्थितीशी लढण्याची आणि जिंकण्याची हिंमत देतात. आणि ही हिंमत आता देशभरातील कोट्यवधी लोकांपर्यंत पोहचली आहे. मग ती पंतप्रधान जीवन विमा योजना असेल, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना असेल, अटल पेन्शन योजना असेल किंवा पंतप्रधान वय – वंदना योजना असेल.

जन सुरक्षा योजना सामान्य माणसाला आणि विशेषतः आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाना सशक्त करत आहेत. ज्यामुळे संकट समयी ते खंबीरपणे उभे राहू शकतील. आयुष्यात हार मानणार नाहीत. जेव्हा आमचे सरकार आले, आम्ही सरकारमध्ये आलो, तेव्हा आर्थिक मदत तर दूरची गोष्ट, गरीबाकडे स्वतःचे बँक खाते देखील नव्हते.

आम्ही तीन गोष्टींवर भर दिला –  दलित, पीड़ित, शोषित, वंचित, आदिवासी, महिला; या सर्वाना सशक्त बनवण्यासाठी बँकिंग सुविधेपासून वंचित लोकांपर्यंत बँकेच्या सुविधा पोहचवणे. लघु उद्योग आणि छोट्या व्यापाऱ्यांना वित्तीय साहाय्य उपलब्ध करून देणे आणि आर्थिक दृष्ट्या असुरक्षित लोकांना आर्थिक सुरक्षा पुरवणे. म्हणजेच बँकिंग द अन बॅंकड , फंडिंग द अनफन्डेड आणि फिनान्शिअली सेक्युरिंग द अन सेक्युअर्ड.

आणि तुम्हा सर्वांना खूप आनंद होईल की, जागतिक बँकेच्या फिनटॅक्स अहवालात म्हटले आहे की पंतप्रधान जन धन योजना एक यशस्वी आर्थिक समावेशक कार्यक्रम आहे ज्यात तीन वर्षात 2014 ते 2017  या काळात 28 कोटी नवीन बँक खाती उघडण्यात आली. ही संख्या या अवधीत संपूर्ण जगभरात उघडण्यात आलेल्या सर्व नवीन बँक खात्यांच्या 55 टक्के आहे.- निम्म्याहून अधिक. पूर्वी आपल्याकडे म्हण असायची- एक बाजू राम, एक बाजू गांव म्हणजेच एका बाजूला भारत आणि एका बाजूला संपूर्ण जग.

याशिवाय अहवालात असेही म्हटले आहे की भारतात बँक खाते असलेल्यांची संख्या 2014 मध्ये म्हणजे आमचे सरकार येण्यापूर्वी अंदाजे 50-52 टक्के होती. ती या तीन वर्षात 80 टक्क्यांवर गेली आहे. आणि विशेषतः महिलांच्या बँक खात्यांमध्ये वाढ झाली आहे. अनेक वर्षांपासून म्हटले जात होते की वेगवेगळ्या देशांमध्ये सामाजिक सुरक्षेची व्यवस्था आहे, मात्र भारतात नाही.

जेव्हा आम्ही सरकारमध्ये आलो तेव्हा अशीच परिस्थिती होती. देशातील सामान्य माणूस सामाजिक सुरक्षेपासून वंचित होता. ही गोष्ट खरी आहे की, भारतात पारंपरिक रित्या संयुक्त कुटुंबाची व्यवस्था होती. एकेका कुटुंबात 20-20, 25-25, 30-30 लोक एकत्र राहायचे, त्यामुळे सुरक्षेची सामाजिक व्यवस्था होती. मात्र आता कुटुंबे छोटी होत आहेत, वृद्ध आई वडील वेगळे राहतात, मुले वेगळी राहतात. सामाजिक व्यवस्था बदलत आहे.

आम्ही ही परिस्थिती बदलण्यासाठी या नव्या परिस्थितीत सुरक्षा प्रदान करण्यासाठी आज पंतप्रधान जन-धन योजनेअंतर्गत, जीवन विमा आणि रूपे कार्ड, अपघात विमा कवचाच्या माध्यमातून विमा सुविधा उपलब्ध केली जात आहे. याचबरोबर जन सुरक्षा योजनेअंतर्गत दोन विमा आणि एक निवृत्तीवेतन योजना सुरु करण्यात आली.

याचा परिणाम असा झाला कि 2014 मध्ये सरकारच्या विमा योजनांतर्गत केवळ 4 कोटी 80 लाख म्हणजे पाच कोटी पेक्षा कमी ग्राहक होते, आज 2018 मध्ये जनसुरक्षा योजनांतर्गत ही संख्या दहा पटीने अधिक वाढली आहे आणि सुमारे 50 कोटी ग्राहक झाले आहेत.

जनसुरक्षा अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या योजना वेगवेगळ्या परिस्थितीसाठी आहेत. आणि खूप कमी प्रिमिअमवर सुरु करण्यात आल्या आहेत. जेणेकरून देशातील प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक वर्गातील, सर्व वयोगटातील लोक याचा लाभ घेऊ शकतील.

मी आज ज्या लोकांशी संवाद साधणार आहे – मला माहित आहे या योजना अशा आहेत कि ज्याच्याशी वेदना जोडल्या आहेत, दुःख जोडले आहे, एक खूप मोठा हादसा जोडला आहे. मात्र ज्यांनी हा संकटकाळ झेलला आहे , कठीण प्रसंगातून गेले आहेत, त्यांना या योजनेतून कशी मदत मिळाली आहे. जेव्हा त्यांचे म्हणणे देशातील आणि आपले भोळे भाबडे गरीब लोक ऐकतात, तेव्हा त्यांचा विश्वास दुणावतो, त्यांनाही वाटते की मलाही या योजनांचा लाभ मिळायला हवा. आणि अशा प्रकारे दुःखाचे वारंवार स्मरण करणे देखील दुःख देते, मात्र कधी-कधी एखाद्या व्यक्तीच्या दुःखामुळे संकटाच्या काळात जी मदत मिळाली आहे, ती जर अन्य लोकांना समजली तर ते देखील संभाव्य संकटांपासून वाचण्याचा मार्ग शोधू शकतील.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्ही पाहिले असेल की या घटना ऐकून आपणा सर्वांना दुःख तर होते, मात्र एखादी व्यक्ती निघून गेल्यामुळे त्याच्या कुटुंबाला जी हानी पोहचते त्याची भरपाई कुणीही करू शकत नाही. स्वतः परमेश्वर देखील करू शकत नाही. मात्र अशा कठीण प्रसंगी कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली, या प्रसंगी काही क्षण ते टिकले तर तो आपला मार्ग शोधू लागतो. आणि याच उद्देशाने पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना सुरु करण्यात आली.

या  योजनेअंतर्गत केवळ, आणि मला वाटते माझे देशबांधव हे समजून घेतील,केवळ 330 रुपयात दोन लाख रुपयाचे विमाछत्र उपलब्ध होते. 330 रुपये प्रतिवर्ष, म्हणजे एका दिवसाला एक रुपयापेक्षा कमी. म्हणजे एवढ्या कमी पैशात आज बाजारात काहीही मिळत नाही. अशा वेळी याचा लाभ कसा घ्यावा. या योजनेत आतापर्यंत साडे पाच कोटी लोकांनी याचा लाभ घेतला आहे. आणि अडचणीच्या काळात लोकांना कोट्यवधीं रुपये देखील मिळाले आहेत. चला, काही लोक आपल्याशी संपर्कात आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांचे म्हणणे ऐकुया.

आपण सर्व पाहत आहोत की संकट काही सांगून येत नाही. कधी सूचना देऊन संकट येत नाही. आणि तुम्ही श्रीमंत आहात म्हणून संकट येईल आणि गरीब आहात तर संकट येणार नाही आणि गरीब असाल तर येईल आणि श्रीमंत असाल तर येणार नाही असे नाही, ते तर कुठेही येऊ शकते. मात्र आपण या दुर्घटनांचा सामना करण्यासाठी स्वतःला तयार करू शकतो, आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करू शकतो.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना याच उद्देशाने सुरु करण्यात आली होती. या अंतर्गत प्रतिवर्ष 12 रुपये म्हणजेच दर महिना एक रुपया प्रिमिअम प्रमाणे दोन लाख रुपयांचे अपघात विमा कवच मिळते. आतापर्यन्त ही योजना सुमारे 13-14 कोटीहून अधिक लोकांनी स्वीकारली आहे. ही 13-14 कोटी संख्या म्हणजे, जर आपण जगातील मेक्सिको देश पाहिला किंवा जपान देश पाहिला तर त्या देशाची जी एकूण लोकसंख्या आहे , त्याहीपेक्षा आपल्याकडील सुरक्षा कवच असलेल्यांची संख्या अधिक आहे. एवढी मोठी व्याप्ती आहे आणि एवढ्या कमी वेळेत एवढ्या मोठ्या संख्येने लोकांचे यात सहभागी होणे हे दाखवते की लोकांमध्ये विमा आणि त्याचे लाभ याबाबत खूप जागरूकता आली आहे.

जेव्हा कधी एखाद्य व्यक्तीबरोबर काही अघटित घडते, तेव्हा त्याच्या संपूर्ण कुटुंबासमोर संकट उभे राहते. सर्व स्वप्ने विरून जातात. योजना आखली असेल, दोन वर्षात करू, तीन वर्षात करू, सगळे तसेच राहते. तरीही अनेकदा असे आढळून आले आहे कि लोक विम्याकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा असेही होते विमा काढू, होईल, खूप वेळ आहे, आवश्यकता काय आहे. आज संपूर्ण देश पाहत आहे आणि मला वाटते की विम्याबाबत अशा प्रकारची मानसिकता बदलायला हवी. जास्तीत जास्त लोक सामाजिक सुरक्षा योजनेत सहभागी व्हायला हवे.

काही वर्षांपूर्वी रोज कमावणारा आणि रोज कमावून खाणारा माणूस विम्याबाबत विचारही करत नव्हता. आणि याचे कारण होते विम्याचे हप्ते भरण्यासाठी लागणारे पैसे. आता तो आपल्या कमाईतून आजची गरज पूर्ण करेल कि त्याला भविष्याची चिंता करायला लावायची, ही दुविधा असायची. असे लोक जे भाज्यांचे ठेले लावतात, ऑटो रिक्षा चालवतात किंवा मोलमजुरी करतात किंवा दुसरे काही छोटे-मोठे काम करून आपला उदरनिर्वाह करतात, त्यांच्यासाठी विम्याबाबत विचार करणे अशक्यच होते.

आज हे अशक्य शक्य केले आहे आणि माझे दलित, पीडित, शोषित, वंचित, गरीब , आमच्या बहिणी-मुली यांच्यासाठी केले आहे. केवळ एक रुपया दरमहिना प्रमाणे लोकांना जीवनविमा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत जो समाज आपले भवितव्य ईश्वरावर सोपवून चालायचा आता त्याने त्यात विम्याचा विश्वास देखील जोडला आहे. चला आपण आणखी काही लोकांशी बोलू या.

हे पहा, वृद्धावस्था हा आयुष्याचा एक महत्वपूर्ण टप्पा आहे. एक असा काळ आहे जेव्हा आपल्याला अनेक गोष्टींसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. त्यावेळी आर्थिक दृष्ट्या आपण आत्मनिर्भर असायला हवे, याच उद्देशाने निवृत्तिवेतनाची कल्पना करण्यात आली होती. थोरा-मोठ्यांचा आशीर्वाद सदा मिळत राहो आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण सर्व देश पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने निरंतर प्रयत्न करत राहू. हे सरकार आपल्या ज्येष्ठांप्रती कटिबद्ध सरकार आहे आणि यासाठी सरकारने त्यांच्या आरोग्यापासून त्यांच्या आर्थिक व्यवहारापर्यंत सर्व सुविधा सोप्या बनवण्याचे काम केले आहे.

वृद्धापकाळातील समस्यांचे गांभीर्य जाणून त्यावर उपाययोजना करण्यासाठी गेल्या चार वर्षात अनेक धोरणे आणि योजना आखण्यात आल्या. गेल्या वर्षी सरकारने पंतप्रधान वय-वंदना योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत 60 वर्षांवरील नागरिकांना 10 वर्षे 8 टक्के दराने निश्चित परतावा मिळतो. व्याजदरात चढ-उतार काहीही असतील, यात काही फरक होऊ दिला जात नाही.

जर परतावा 8 टक्क्यांहून कमी आला तर सरकार स्वतःच्या तिजोरीतून त्याची भरपाई करते, पैसे देते. या योजनेअंतर्गत, ज्येष्ठ नागरिक मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक आधारावर परताव्याचा पर्याय देखील निवडू शकतात. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. आतापर्यंत सुमारे तीन लाखांहून अधिक लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. याशिवाय सरकार ज्येष्ठ नागरिकांना कर सवलती देखील देत आहे. त्यांच्यासाठी प्राप्तिकरात सवलतीची मूळ मर्यादा अडीच लाखांवरून वाढवून तीन लाख करण्यात आली आहे. याच बरोबर व्याजावरील वजावटीची मर्यादा जी पूर्वी 10 हजार होती ती वाढवून 50 हजार करण्यात आली आहे. म्हणजे आता जमा रकमेतून मिळालेल्या 50 हजार रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त करण्यात आले आहे.

अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या उपाययोजना करण्यात आल्या त्या सर्वांचे फलित काय, हे जर आपण आकडेवारीतून पाहिले तर समजा एक ज्येष्ठ नागरिक, ज्याचे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपये आहे, तर 2013-14 मध्ये, आमचे सरकार येण्यापूर्वी त्यांना अंदाजे 13-साडेतेरा हजार 390 रुपये कर बसायचा. मात्र जेव्हपासून आमचे सरकार आले आहे, आम्ही सर्व सूत्र बदलून टाकले.

2018-19 मध्ये ते केवळ दोन हजार सहाशे झाले. म्हणजे 13 हजारापेक्षा अधिक होते ते आता केवळ 2600 रुपये आहे म्हणजे एकतृतीयांश झाले आहे, म्हणजे केवढे मोठे परिवर्तन आले आहे. केवळ आर्थिक आघाडीवरच नाही तर ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कल्याणाशी संबंधित अन्य मुद्द्यांवर देखील सरकारने योजनाबद्ध पद्धतीने काम केले आहे.

आपण सर्वांना माहित आहे कि वय झाल्यानंतर आरोग्याशी संबंधित तक्रारी देखील सुरु होतात. औषधे आणि उपचाराचा खर्च वाढतो. हे लक्षात घेऊन जन औषधी योजना सुरु करण्यात आली जेणेकरून औषधे स्वस्त दरात उपलब्ध होतील.अशाच प्रकारे स्टेंटच्या किमती देखील कमी करण्यात आल्या आहेत. गुडघ्याची शस्त्रक्रिया देखील आता पूर्वीपेक्षा स्वस्त आणि परवडणारी झाली आहे.

पूर्वी ज्येष्ठ नागरिकांना आपण हयात असल्याचे  स्वतः जाऊन सिद्ध करावे लागायचे. मात्र आता ते देखील सोपे करून जीवन प्रमाणपत्राची व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना विविध सुविधा सरळ आणि सहज उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्या आसपास उपलब्ध व्हाव्यात जेणेकरून त्यांना धावपळ करावी लागणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ते तंदुरुस्त राहावे आणि स्वाभिमानाने आपले आयुष्य जगावे. हे सुनिश्चित करण्याच्या दिशेने आम्ही काम केले आहे.

म्हातारपणी कुणावरही आर्थिकदृष्टया अवलंबून राहावे लागू नये आणि आयुष्य सन्मानपूर्वक जगता यावे. निवृत्तीवेतन स्वरूपात एक निश्चित रक्कम मिळत राहावी . हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारने अटल पेन्शन योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत, आतापर्यंत एक कोटीहून अधिक ग्राहक आहेत ज्यापैकी सुमारे 40 टक्के या आमच्या अर्चनाताईंसारख्या बहिणी आहेत. यामध्ये आतापर्यंत चार हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे.

एकूण पाहिले तर पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजना या तीन योजनांच्या माध्यमातून केवळ तीन वर्षात सुमारे 20 कोटी लोकांना विमा योजनांच्या सुरक्षित जाळ्यात आणण्यात आले आहे. आणि यापैकी 52 टक्के- 50 टक्क्यांहून अधिक लोक आपल्या गावातले आहेत. ग्रामीण भागातील आहेत.

सर्व योजनांच्या मुळाशी दोन महत्वपूर्ण गोष्टी आहेत- पहिली सर्वाना विमा संरक्षण मिळावे आणि कमीत कमी प्रिमिअमवर मिळावे. जेणेकरून गरीबातील गरीब व्यक्तीला देखील याच लाभ मिळेल. आमचे सरकार गरीबांप्रती संवेदनशील आहे, गरीबांच्या कल्याणाला महत्व देते आणि त्यांना सशक्त बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.

आताच आपण निरनिराळ्या योजनांच्या लाभार्थ्यांकडून ऐकले की कशा प्रकारे कठीण काळात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळाली , त्यांना एक आश्रय मिळाला.

मला माहित आहे त्यांच्या कथा आपणा सर्वांसाठी प्रेरणा स्रोत आहेत. यातून हे दिसून येते कि विमा सुरक्षा आपणा सर्वांसाठी किती आवश्यक आहे. माझी सर्वाना विनंती आहे कि तुम्ही सर्वानी या विमा योजनांचा लाभ घ्यावा आणि त्याचबरोबर तुमच्या घराच्या आसपास कुणी व्यक्ती असेल, तुमच्या कार्यालयात एखादी व्यक्ती असेल, तुम्ही त्यांना देखील या योजनांबाबत सांगा, त्यांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करा.

इथे जेवढे लाभार्थी आहेत , तुम्ही तर यांच्या उपयुक्ततेचे जिवंत उदाहरण आहात. मी तुम्हा लोकांना आग्रह करतो की, तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना यासाठी प्रेरित करा. मी तुम्हाला सांगतो कि पंतप्रधान सुरक्षा योजना आणि पंतप्रधान जीवन ज्योती योजनेसाठी तुम्ही कोणत्याही बँक अथवा टपाल कार्यालयात जाऊन स्वतःचे नाव नोंदवू शकता, आपले नामांकन करू शकता.

अटल पेन्शन योजनेसाठी तुम्ही कुठल्याही बँकेच्या शाखेत जाऊन स्वतःची नोंदणी करू शकता. आणि पंतप्रधान वय-वंदना योजनेसाठी देशभरातील कुठल्याही एलआयसी कार्यालयात जाऊन तुम्ही याचा लाभ घेऊ शकता.

मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी कशा-कशा योजना आहेत, त्यांनी सन्मानाने आपले आयुष्य जगावे, यासाठी या योजना आहेत. मात्र माझ्या देशातील ज्येष्ठ नागरिक देखील इतके सन्मानाने जगणारे लोक आहेत , खूप प्रेरणा देतात. तुम्हा लोकांना कदाचित माहित नसेल, याबाबत अद्याप बाहेर अजून चर्चा झालेली नाही. जेव्हा मी देशवासियांना लाल किल्ल्यावरून आवाहन केले होते की गॅसवरील अनुदानाची गरज काय, सोडून द्या. आणि याच देशातील एक कोटी-सव्वा कोटी लोकांनी गॅसवरील अनुदान सोडून दिले होते.

आता रेल्वेमध्ये जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना रेल्वेच्या तिकिटात काही रक्कम सवलत मिळते. मात्र रेल्वेवाल्यानी आपल्या अर्जात लिहिले आहे कि तुम्हाला ही सवलत सोडायची आहे का? तुम्ही तिकिटाचे पूर्ण पैसे देऊ इच्छिता का?

आम्हा सर्वाना अभिमान वाटेल, माझ्या देशातील लाखो ज्येष्ठ नागरिक, ज्यांना याचा लाभ मिळू शकत होता, रेल्वेच्या तिकिटाच्या कमी पैशात ते प्रवास करू शकत होते मात्र देशासाठी असे लाखो ज्येष्ठ नागरिक पुढे आले ज्यांना रेल्वे तिकिटात जी सवलत मिळत होती, ती घ्यायला नकार दिला, पूर्ण पैसे भरले आणि प्रवास केला. कुठे ढोल नाही वाजवले गेले, कुठलेही आवाहन करण्यात आले नाही. मी देखील कधी चर्चा केली नाही. केवळ एका अर्जावर लिहिले होते, मात्र सन्मानाने जगणाऱ्या आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी एवढा मोठा त्याग केला, ही देशासाठी छोटी बातमी नाही.

आणि जेव्हा माझ्या देशातील लोक इतके सारे करतात, माझे ज्येष्ठ नागरिक इतके करतात, तर आम्हा सर्वांचीही तुमच्यासाठी दररोज काही ना काही नवीन करण्याची इच्छा होते , काही चांगले करण्याची इच्छा होते. चला आपण सर्वजण मिळून आपल्या देशातील गरीबांचे भले व्हावे, आपल्या माता-भगिनींचे कल्याण व्हावे, आपल्या वयोवृद्ध-अपोवृद्ध सर्व महानुभावांना सन्माननीय आयुष्य जगण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करत राहू. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप-खूप आभार मानतो.

धन्यवाद .

 

 

B.Gokhale/S. Kane/P.Malandkar