Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे राष्ट्रार्पण

पंतप्रधानांच्या हस्ते अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे राष्ट्रार्पण

पंतप्रधानांच्या हस्ते अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे राष्ट्रार्पण

पंतप्रधानांच्या हस्ते अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे राष्ट्रार्पण


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे राष्ट्रार्पण झाले.

 

धन्वंतरी जयंती आयुर्वेद दिवस म्हणून साजरा होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी यावेळी अभिनंदन केले. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या स्थापनेबाबत त्यांनी आयुष मंत्रालयाचे  कौतुक केले.

 

आपला इतिहास, वारसा, यांचे मोल  जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत  राष्ट्र प्रगती करु शकत नाही. जे राष्ट्र आपला वारसा विसरतो ते स्वत:ची ओळख विसरतो, असे पंतप्रधानांनी सांगितले.

 

भारत जेव्हा स्वतंत्र नव्हता तेव्हा योगा आणि आयुर्वेदासारख्या आपल्या परंपरांना ज्ञानाला कमी लेखण्यात यायचे. यावर असलेला भारतीयांचा विश्वास घटवण्याचे प्रयत्नही करण्यात आले. गेल्या तीन वर्षात मात्र परिस्थिती बरीच बदलली आहे आणि आपल्या सर्वोत्तम वारशाबाबत लोकांना पुन्हा विश्वास वाटू लागला आहे. आपल्या वारशाबाबत लोकांना वाटत असलेला अभिमान ते योगा दिवस किंवा आयुर्वेद दिवसाला उपस्थित राहून व्यक्त करत आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.

 

आयुर्वेद ही केवळ वैद्यकीय उपचार पध्दती नाही तर त्यात सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणीय आरोग्य यांचाही समावेश आहे.

 

देशातल्या प्रत्येक जिल्हयात आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्यासाठी सरकार काम करत आहे. गेल्या तीन वर्षात 65 हून अधिक आयुष रुग्णालये विकसित करण्यात आली आहेत अशी माहिती  पंतप्रधानांनी यावेळी दिली.

 

वनौषधी आणि औषधी वनस्पती जगभरात उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत ठरु शकतात आणि यासंदर्भात भारताने आपल्या क्षमता वाढवल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. आरोग्य व्यवस्थेत 100 टक्के  परदेशी थेट  गुंतवणूकीला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

 

गरीबांना परवडणाऱ्या आरोग्यसुविधा पुरविण्यावर सरकारचा भर आहे. प्रतिबंधात्मक काळजी, सर्वांना उपचार मिळावेत आणि ते परवडावेत यासाठी सुधारणा करण्यावर सरकार भर देत आहे, असे त्यांनी सांगितले. स्वच्छता हे प्रतिबंधात्मक उपायांचे सर्वात सोपे तंत्र आहे. गेल्या तीन वर्षात केंद्र सरकारने पाच कोटी शौचालये बांधली, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

 

गरीबांना सुलभतेने आरोग्यसुविधा मिळावी यासाठी नवीन एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था स्थापन करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले. परवडणाऱ्या दरात लोकांना औषधे पुरविण्यासाठी जनऔषधी केंद्र स्थापन करण्यात आली असून इतर उपायांबाबतही  पंतप्रधानांनी माहिती दिली.

 

 

 

B.Gokhale/S.Kulkarni/Anagha