Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला

पंतप्रधानांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज एका उच्चस्तरीय बैठकीत गुजरातमधील दुष्काळ आणि काही भागात असलेल्या पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, केंद्र सरकार आणि गुजरात सरकारचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

जलसंधारण, पुनर्भरण आणि जलसाठ्यांची निर्मिती यांसदर्भातील राज्याच्या प्रयत्नांबाबत मुख्यमंत्र्यांनी विस्तृत माहिती दिली. राज्यात एक लाख 68 हजार बंधारे, 2 लाख 74 हजार शेततळी, एक लाख 25 हजार बोरी बांध बांधण्यात आले असून यामुळे 42.3 अब्ज घनफूट पाण्याची साठवण क्षमता निर्माण झाली असून याचा 6 लाख 32 हजार हेक्टर क्षेत्राला फायदा झाला असल्याची माहिती पटेल यांनी दिली.

राज्यातील 77 टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सलग दुसऱ्या वर्षी कमी पर्जन्यमान असूनही राज्यात जल जोडणी क्षेत्रात झालेल्या कामामुळे काही दुर्गम भागात पाणी पुरवण्यासाठी केवळ 568 टँकर्स लागले. या प्रयत्नांचे कौतुक करतानाच राज्य टँकरमुक्त करण्यासाठी आणखी पावले उचलण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली.

सूक्ष्म सिंचन क्षेत्रात राज्याने भरीव प्रगती केली आहे. 3789 गावांमधे शंभर टक्के ठिबक/ तुषार सिंचन साध्य करण्यात आले आहे.

कमी, विषम आणि अल्पकालीन पर्जन्यमान या परिस्थितीतही राज्याने हाती घेतलेल्या प्रयत्नांमुळे दुष्काळाशी समर्थपणे सामना करता आला. सलग दोन वर्ष दुष्काळी स्थिती असूनही राज्यातील पीक उत्पादन सामान्य उत्पादनाच्या 95 टक्के राहील असा अंदाज आहे.

सरदार सरोवर, सिंचन योजनेअंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या कालव्यांच्या विस्तृत जाळ्यामुळे पीक उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे आणि कृषी उत्पादनावर त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. या संदर्भात पंतप्रधानांनी मूल्यवर्धित फलोत्पादन आणि नगदी पीके यावर भर दिला.

मत्स्योत्पादन, मधुमक्षिकापालन, मोत्यांची आणि समुद्रशैवालांची शेती यामधे विकासाला चालना देण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.

केंद्र आणि राज्याने एकत्रित काम करण्याचा निर्धार व्यक्त करुन या बैठकीचा समारोप झाला.

J.Patankar/ S.Tupe/M.Desai