Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अर्थसंकल्प 2026-27 विषयी व्यक्त केलेली प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अर्थसंकल्प 2026-27 विषयी व्यक्त केलेली प्रतिक्रिया


 

आज मांडलेल्या  केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 विषयीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्‍य माध्‍यमाव्दारे आपली प्रतिक्रिया व्यक्त  केली. आजचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असून त्यात  देशातील सक्षम महिलांच्या  भावनांचे प्रतिबिंब दिसत आहेअसे पंतप्रधानांनी म्हटले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प सलग नऊ वेळा सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री असून, हा एक विक्रम आहे असे त्यांनी अधोरेखित केले. हा अर्थसंकल्प म्हणजे अनंत संधींनी परिपूर्ण असा एक महामार्ग असून भारताच्या वर्तमानातील स्वप्ने पूर्ण करणारा तसेच उज्वल भवितव्याची  पायाभरणी करणारा आहेअसे ते म्हणाले. हा अर्थसंकल्प वर्ष  2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या संकल्पाकडे झेप घेण्यास देशाची तयारी करत आहेअसे त्यांनी म्हटले.

भारत प्रवासी  असलेल्या सुधारणा  एक्सप्रेसला या अर्थसंकल्पामुळे नवी ऊर्जा आणि  नवी गती मिळेल असे त्यांनी नमूद केले. या अर्थसंकल्पात प्रस्तावित क्रांतिकारक सुधारणांमुळे देशातील आकांक्षी, धडाडीच्या आणि  प्रतिभाशाली युवकांसाठी संधींचे नवे क्षितिज खुले केल्याचे त्यांनी म्हटले. या अर्थसंकल्पामुळे विश्वासाधारित सुशासन आणि  मानवकेंद्रित आर्थिक संरचना आणण्याचे दृष्टिचित्र साकार होत आहेअसे त्यांनी म्हटले. वित्तीय तूट कमी करणे, महागाई कमी करणे, तसेच उच्च भांडवली खर्च आणि उच्च प्रगती साध्य करणारा हा एकमेवाद्वितीय असा अर्थसंकल्प आहे.

या अर्थसंकल्पामुळे भारताची  जागतिक स्तरावरील भूमिका नव्याने बळकट होत आहे. भारताच्या 140 कोटी नागरिकांना केवळ वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होऊन समाधान नाही, तर भारताला  आता जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था व्हायचे आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. कोट्यवधी भारतीयांचा हा एकत्रित दृढनिश्चय आहे, असे ते म्हणले. एक विश्वसनीय लोकशाही भागीदार आणि  विश्वसनीय गुणवत्तापूर्ण पुरवठादार म्हणून भारताची भूमिका सतत वाढत आहे. अगदी अलिकडेच  भारताने  केलेल्या अनेक मुक्त व्यापारी करारांमधून  देशाच्या युवकांना, लघु आणि  मध्यम उद्योजकांना जास्तीतजास्‍त  फायदा कसा होईल, याची काळजी घेतली गेली आहे. या अर्थसंकल्पातून त्याच दिशेने प्रगतीसाठी पावले उचलली गेली आहेतअसे त्यांनी सांगितले.

मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला गती देण्यासाठी हा अर्थसंकल्प एक महत्त्वाकांक्षी मार्गाचे रेखाचित्र सादर करतो, असे अधोरेखित करत मोदी यांनी सांगितले की बायोफार्मा शक्ती मिशन, सेमीकंडक्टर मिशन 2.0, इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन योजना, रेअर अर्थ कॉरिडॉरची निर्मिती, महत्त्वपूर्ण खनिज क्षेत्राचे बळकटीकरण, वस्त्रोद्योग क्षेत्रातील नवीन योजना, हाय-टेक टूल उत्पादनाला प्रोत्साहन आणि चॅम्पियन एमएसएमईंची तयारी अशा नव्याने उभारी घेणाऱ्या क्षेत्रांना दिलेला अभूतपूर्व पाठिंबा भविष्योन्मुख आहे आणि देशाच्या वर्तमान तसेच भविष्यातील गरजांना संबोधित करतो. पंतप्रधानांनी नमूद केले की लघु व कुटीर उद्योगांसह एमएसएमईंना दिलेला पाठिंबा त्यांना स्थानिक स्तरावरून जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी सक्षम करेल.

पंतप्रधान मोदी यांनी पुढे सांगितले की या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी अनेक मोठी पावले उचलण्यात आली आहेत, ज्यामध्ये स्वतंत्र मालवाहतूक कॉरिडॉर, देशभरातील जलमार्गांचा विस्तार, उच्चगती रेल्वे कॉरिडॉर, टियर-2 आणि टियर-3 शहरांच्या विकासावर विशेष लक्ष, तसेच शहरांना मजबूत आर्थिक पाया देण्यासाठी म्युनिसिपल बाँड्सना प्रोत्साहन यांचा समावेश आहे. त्यांनी अधोरेखित केले की ही सर्व पावले विकसित भारताच्या दिशेने प्रवास वेगाने पुढे नेतील.

पंतप्रधानांनी सांगितले की कोणत्याही राष्ट्राची सर्वात मोठी भांडवल म्हणजे त्याचे नागरिक असून, अलिकडच्या वर्षांत त्यांच्या क्षमतावृद्धीसाठी सरकारने अभूतपूर्व गुंतवणूक केली आहे. त्यांनी नमूद केले की सातत्याने कौशल्य, प्रमाण आणि शाश्वततेला बळ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा युवकशक्तीचा अर्थसंकल्प असल्याचे म्हटल्याचे पुन्हा अधोरेखित करत, मोदी यांनी सांगितले की अर्थसंकल्पातील तरतुदी विविध क्षेत्रांतील नेते, नवप्रवर्तक आणि निर्माते घडवतील. वैद्यकीय हब्सची स्थापना, अलाईड हेल्थ प्रोफेशनल्स, ऑडिओ-व्हिज्युअल्ससह ऑरेंज इकॉनॉमीला चालना, गेमिंगला प्रोत्साहन, पर्यटन आणि खेलो इंडिया मिशनद्वारे युवकांसाठी नव्या संधी उघडतील, असे त्यांनी सांगितले. भारताला जगातील डेटा सेंटर हब बनवण्यासाठी मोठी करसवलत जाहीर करण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले. युवकांचे विशेष अभिनंदन करत त्यांनी सांगितले की हा अर्थसंकल्प रोजगारनिर्मितीस मोठी चालना देईल. विशेषतः ईशान्येकडील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली असल्याने आणि विविध राज्यांना सक्षम करून संतुलित विकासाचा पाया मजबूत झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.

10 कोटींहून अधिक महिला स्वयं-सहायता गटांशी जोडल्या गेल्या असल्याचे नमूद करत मोदी यांनी सांगितले की हा अर्थसंकल्प महिलांच्या नेतृत्वाखाली व महिलांद्वारे चालवल्या जाणाऱ्या स्वयं-सहायता गटांसाठी आधुनिक परिसंस्था उभारण्यास प्राधान्य देतो, जेणेकरून प्रत्येक घरात समृद्धी येईल. प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी नवीन वसतिगृहे उभारण्याच्या मोहिमेमुळे शिक्षण अधिक सुलभ होईल, असेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी अधोरेखित केले की शेती, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय यांना सरकारने नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. या अर्थसंकल्पात नारळ, काजू, कोको आणि चंदन उत्पादनात गुंतलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. भारत विस्तार एआय साधन शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत माहिती देऊन मोठी मदत करेल, असे त्यांनी नमूद केले. मत्स्यपालन आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील उद्योजकतेला प्रोत्साहन दिल्याने गावांमध्ये अधिक रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील, असेही त्यांनी सांगितले. शेवटी पंतप्रधानांनी म्हटले की हा अर्थसंकल्प महत्त्वाकांक्षी असून तो राष्ट्राच्या आकांक्षांना उत्तर देतो. गाव, गरीब आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी समर्पित असा दूरदर्शी आणि संवेदनशील अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल त्यांनी पुन्हा एकदा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्या चमूचे अभिनंदन केले.

***

हर्षल अकुडे/सुवर्णा बेडेकर/उमा रायकर/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com