Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  आंध्र प्रदेशातील विजयनगरम येथील भोगपुरम येथे 17,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या  अनेक विकास प्रकल्पांची  पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  आंध्र प्रदेशातील विजयनगरम येथील भोगपुरम येथे 17,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या  अनेक विकास प्रकल्पांची  पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील विजयनगरम येथील भोगपुरम येथे 17,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. ‘स्वर्ण आंध्र’च्या संकल्पनेसाठी या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी अशा पवित्र महिन्यात उत्तर आंध्रच्या भूमीला भेट देण्याची संधी आपल्याला लाभली, याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि भगवान श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी, श्री कूर्मनाथ स्वामी आणि माता पैदिथल्ली अम्मावारू यांच्याप्रति भक्तीभाव व्यक्त केला. “या महत्त्वपूर्ण प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी आज उत्तर आंध्र प्रदेशच्या पवित्र भूमीवर येण्याची संधी मिळाली, हा माझा मोठा सन्मान आहे,” मोदी यांनी नमूद केले.
सुमारे अठरा हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करताना पंतप्रधानांनी यावर भर दिला की विमानतळ पायाभूत सुविधा, रस्ते जोडणी आणि ऊर्जा सुरक्षा यांचा समावेश असलेले हे विविध क्षेत्रांमधील उपक्रम राज्याच्या वेगवान प्रगतीचे प्रतीक आहेत. “ही विकासकामे आंध्र प्रदेश ज्या अविश्वसनीय वेगाने प्रगती करत आहे त्याचे खरे प्रतीक आहेत,” असे मोदी म्हणाले.
अभूतपूर्व ऐतिहासिक महत्त्व असलेला क्षण, असे या कार्यक्रमाचे वर्णन करून, पंतप्रधानांनी नमूद केले की, पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण टप्प्यांबरोबरच, पारंपरिक ‘धिमसा’ नृत्याच्या माध्यमातून साकारलेला नेत्रदीपक सांस्कृतिक जागतिक विक्रम हे देखील या दिवसाचे एक वैशिष्ट्य ठरले. “आजचा कार्यक्रम एक नवीन इतिहास घडवणारा आणि अनेक आघाड्यांवर नवीन विक्रम प्रस्थापित करणारा आहे,” असे मोदी म्हणाले.
13 हजारांहून अधिक आदिवासी भगिनी आणि कन्यांनी सादर केलेल्या अप्रतिम कामगिरीचे कौतुक करताना, पंतप्रधानांनी त्यांच्यातील अथांग उत्साह आणि शिस्तीची प्रशंसा केली. या नयनरम्य सादरीकरणाने आपल्या देशातील समृद्ध विविधता आणि जतन केलेला आदिवासी वारसा अतिशय सुंदरपणे साकारला असल्याचे ते म्हणाले. “येथे पाहायला मिळालेला आपल्या आदिवासी संस्कृतीचा अभिमान खरोखरच एक भव्य आणि अविस्मरणीय देखावा होता.” असे त्यांनी सांगितले.
अल्लूरी सीताराम राजू यांच्या महान पराक्रमाला आणि आदिवासी कल्याणासाठी त्यांनी आयुष्यभर दिलेल्या योगदानाला अभिवादन करत, पंतप्रधानांनी या भूमीवर नव्याने सुरू झालेल्या विमानतळाचा उल्लेख प्रादेशिक विकासाची नवी दिशा आणि तरुणांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा असा  केला. “आंध्र आणि उत्तर आंध्रच्या विकासाला नवी गती देणारा हा विमानतळ, आंध्रातील तरुणांच्या समृद्ध भविष्यासाठी एक भक्कम व्यासपीठ ठरेल,” असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
या नवीन विमानतळाला महान स्वातंत्र्यसेनानींचे नाव देण्याच्या सरकारच्या अधिकृत निर्णयाची घोषणा करताना, पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की, हे भव्य अभिवादन येथून प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रीय कर्तव्याची प्रखर भावना निर्माण करेल. “या विमानतळावरून प्रवास करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला अल्लूरी सीताराम राजू यांच्या नावावरून लोकसेवा आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा त्वरित मिळेल.” असे ते म्हणाले.
गेल्या बारा वर्षांत नागरी विमान वाहतूक क्षेत्रात झालेल्या अभूतपूर्व बदलांचा आढावा घेताना, पंतप्रधानांनी 2014 मधील अवघ्या 74 कार्यान्वित विमानतळांची तुलना सध्याच्या 166 विमानतळांशी केली. विद्यमान सरकारच्या काळात लहान शहरांतील सामान्य नागरिकांसाठी विमान प्रवास सुलभ झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. “पूर्वी विमान प्रवास केवळ मोठ्या महानगरांपुरताच मर्यादित होता; परंतु आज लहान शहरांतील सामान्य जनताही अत्यंत सहजतेने विमानाने प्रवास करत आहे.” असे ते म्हणाले.
नागरी विमान वाहतूक क्षेत्राचा कायापालट करण्याचे श्रेय पंतप्रधानांनी ‘उडान’ योजनेला दिले. या उपक्रमाने अत्यंत गरीब कुटुंबांचेही विमानाने प्रवास करण्याचे स्वप्न साकार झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच, 29,000 कोटी रुपयांच्या भरीव गुंतवणुकीसह या योजनेचा दुसरा टप्पा अलीकडेच सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. “या योजनेमुळे अत्यंत गरीब कुटुंबांनाही त्यांच्या आयुष्यातील हे स्वप्न पूर्ण करण्यास प्रत्यक्ष मदत झाली आहे.” असे ते म्हणाले.
विमान वाहतूक क्षेत्रातील आणखी एका महत्त्वपूर्ण टप्प्याचा उल्लेख करताना, पंतप्रधानांनी काशीमध्ये अलीकडेच सुरू केलेल्या ‘स्पोक एअरपोर्ट’ मॉडेलचा संदर्भ दिला, ज्याचा आता अमृतसरमध्ये यशस्वी विस्तार करण्यात आला आहे. यामुळे पंजाबमधील हे शहर 25 हून अधिक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी थेट जोडले गेले आहे. “आंध्रच्या याच भूमीवरून मी या यशाबद्दल पंजाबच्या जनतेचेही मनापासून अभिनंदन करतो.” असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या प्रशासनाचे पंतप्रधानांनी कौतुक केले. हे नेतृत्व आता राज्याच्या विकासाचा अजेंडा दुप्पट वेगाने पुढे नेत असल्याचे त्यांनी नमूद केले. “आपल्या आंध्र प्रदेशात ‘विकसित भारता’चे एक प्रमुख विकास इंजिन बनण्याची अथांग क्षमता नेहमीच राहिलेली आहे.” असे मोदी म्हणाले.
ब्लू इकॉनॉमीला (सागरी अर्थव्यवस्थेला) वेगाने बळकट करण्याच्या राष्ट्रीय रणनीतीविषयी सांगताना, पंतप्रधानांनी संपूर्ण किनारपट्टीला एका एकात्मिक आर्थिक कॉरिडॉरमध्ये बदलण्याचा महत्त्वाकांक्षी दृष्टिकोन मांडला. यासाठी विशाखापट्टणम ते कृष्णपट्टणम पर्यंतच्या ऐतिहासिक बंदरांचे आधुनिकीकरण आणि मुलापेटा व रामायपट्टणम येथे नवीन सागरी हबच्या उभारणीचा समावेश आहे. “या संपूर्ण परिसराला एक समृद्ध कोस्टल इकॉनॉमिक कॉरिडॉर (किनारपट्टी आर्थिक कॉरिडॉर) म्हणून सर्वसमावेशकपणे विकसित करणे, ही आमची रणनीती आहे.” असे पंतप्रधानांनी सांगितले.
व्यापक बंदर विकास प्रकल्पांना पूरक ठरत असल्याचे सांगतानाच पंतप्रधानांनी राज्यात वेगाने उभारल्या जात असलेल्या महामार्ग आणि द्रुतगती मार्गांच्या जाळ्याचा उल्लेख केला. विशाखापट्टणम- रायपूर द्रुतगती मार्गासारखे महत्त्वाचे मार्ग या प्रदेशाच्या विकासाला निर्णायक गती देत असल्याचे त्यांनी नमूद केले. हे द्रुतगती मार्ग प्रकल्प संपूर्ण भौगोलिक प्रदेशाच्या विकासाला अभूतपूर्व वेग देत आहेत, असे मोदी म्हणाले.
या प्रदेशाला देशातील प्रमुख औद्योगिक केंद्रांशी अखंडपणे जोडण्याची तातडीची गरज अधोरेखित करताना, सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांवर सध्या काम सुरू असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. संपूर्ण रेल्वे जाळ्याचे विद्युतीकरण करण्यात आले असून सत्तरहून अधिक स्थानकांचे आधुनिकीकरणही सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. हा संपूर्ण प्रदेश देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक केंद्रांशी सहजपणे जोडला जाईल, यासाठी आम्ही सक्रियपणे काम करत आहोत, असे मोदी यांनी सांगितले.
रेल्वे, बंदरे आणि हवाई पायाभूत सुविधा यांना एकत्र जोडणाऱ्या पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय आराखड्याच्या महत्त्वावर भर देताना, या आधुनिक बहुविध वाहतूक व्यवस्थेमुळे वाहतूक आणि मालवाहतूक व्यवस्था अधिक कार्यक्षम होईल, स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होईल आणि उद्योगसुलभतेतही मोठी सुधारणा होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. हे आधुनिक लॉजिस्टिक्स नेटवर्क पूर्णपणे तयार झाल्यानंतर उद्योगांना अधिक चांगली जोडणी मिळेल, आपल्या शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल आणि ईज ऑफ डुइंग बिझनेसमध्येही सुधारणा होईल, असे मोदी म्हणाले.
राज्याच्या दूरदृष्टीपूर्ण नवोन्मेषाच्या परंपरेचे कौतुक करताना, सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान क्षेत्रात राज्यातील युवकांनी जागतिक स्तरावर मिळवलेल्या यशाचा पंतप्रधानांनी गौरव केला. या प्रतिभावान युवकांच्या क्षमतेचा थेट राज्याच्या विकासासाठी उपयोग करून घेण्याबाबत सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
देशातील या तरुण प्रतिभेला देशातच टिकवून तिचा उपयोग करण्याची नितांत गरज अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी भविष्योन्मुख तंत्रज्ञान उद्योगांकडे लक्ष वेधले. विशाखापट्टणम येथे नव्या सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी हा त्या दिशेने उचललेला महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या प्रतिभावान युवकांची क्षमता पूर्णपणे विकसित करण्यासाठी सेमीकंडक्टरसारख्या भविष्योन्मुख तंत्रज्ञान उद्योगांवरच आमचे मुख्य लक्ष केंद्रित आहे, असे मोदी म्हणाले.
राज्यातील औद्योगिक परिवर्तनाचा वेध घेताना, सॉफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीबरोबरच हे राज्य एक प्रभावी उत्पादन केंद्र म्हणूनही उदयास येईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. त्यामुळे भविष्योन्मुख रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि तंत्रज्ञान उद्योगांसाठी नवे परिसंस्थात्मक वातावरण विकसित होईल, असे त्यांनी सांगितले. या धोरणात्मक परिवर्तनामुळे भविष्योन्मुख रोजगार निर्माण होतील आणि राज्यभर तंत्रज्ञान उद्योगांसाठी नवे वातावरण तयार होईल, असे मोदी यांनी नमूद केले.
जागतिक आर्थिक विकास केंद्रांची रचना स्पष्ट करताना, केवळ स्वतंत्र कारखाने उभारून विकास साध्य होत नसून त्यासाठी व्यापक औद्योगिक परिसंस्था आणि पोषक वातावरण आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अहोरात्र परिश्रमांमुळे राज्यात अशी परिसंस्था उभारली जात असल्याने अनेक मोठ्या जागतिक कंपन्या येथे गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रगत तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटा सेंटर्समधील समांतर प्रगतीवर प्रकाश टाकला. त्यांनी गुगलने जाहीर केलेल्या 15 अब्ज डॉलरच्या विशाल कॅम्पसचा उल्लेख करत सांगितले की, हा प्रकल्प जागतिक कंपन्यांचा या प्रदेशावरील वाढता विश्वास दर्शवतो आणि त्याचा थेट लाभ राज्यातील व देशातील युवकांना होणार आहे. “अनेक जागतिक कंपन्यांना येथे नव्या संधी दिसत आहेत आणि त्याचा मोठा फायदा राज्यातील तसेच देशातील युवकांना होणार आहे,” असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
राज्याच्या औद्योगिक विकासाचा विस्तार केवळ डिजिटल तंत्रज्ञानापुरता मर्यादित नसल्याचे सांगत पंतप्रधानांनी नक्कापल्ली येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य औषधनिर्माण उद्यानासाठी केंद्र सरकारने दिलेल्या मोठ्या पाठबळाचा उल्लेख केला. या प्रकल्पामुळे आंध्र प्रदेश देशातील अग्रगण्य औषधनिर्माण केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “या पाठबळामुळे आंध्र प्रदेश वेगाने देशातील सर्वात मोठ्या औषधनिर्माण केंद्रांपैकी एक बनेल,” असे नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी सांगितले की, केवळ रायलसीमा प्रदेशातच 5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आकर्षित झाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सरकार दिवस-रात्र कार्यरत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. “या सर्व मोठ्या संधी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आमचे सरकार अहोरात्र काम करत राहील,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.
सर्व क्षेत्रांतील विकासाच्या वेगाचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी सांगितले की, त्यांच्या मागील केवळ तीन दौऱ्यांमध्येच 2 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले आहे. “या भव्य प्रकल्पांवरून प्रत्येक क्षेत्रात विकासाची गती किती वेगवान आहे, याचा सहज अंदाज येतो,” असे नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
राज्यातील सर्वसमावेशक विकासाच्या पार्श्वभूमीवर उत्तर आंध्र प्रदेशाच्या सक्षमीकरणाबद्दल समाधान व्यक्त करताना पंतप्रधानांनी विशाखापट्टणम आर्थिक क्षेत्राचे आशियातील प्रमुख आर्थिक केंद्र म्हणून होत असलेले रूपांतर स्पष्ट केले. या उद्दिष्टासाठी प्रत्येक नवीन सुविधा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. “विशाखापट्टणम आर्थिक क्षेत्र हे आशियातील सर्वात प्रमुख आर्थिक केंद्र बनावे, हेच आमचे अंतिम लक्ष्य आहे,” असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
गुंतवणुकीचे थेट रोजगारामध्ये रूपांतर करण्याच्या सरकारच्या आर्थिक धोरणाचे स्पष्टीकरण देताना पंतप्रधानांनी सांगितले की, सार्वजनिक आणि खासगी गुंतवणूक वाढल्याने उत्पादनक्षमता वाढते, निर्यात मजबूत होते आणि त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या उत्पन्नात व जीवनमानात सुधारणा होण्यात होतो. “रोजगार वाढला की लोकांचे उत्पन्न वाढते आणि कुटुंबांचे दैनंदिन जीवन अधिक समृद्ध होते,” असे नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
भाषणाच्या शेवटी प्रदेशाच्या उज्ज्वल भविष्याबद्दल पूर्ण विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी सांगितले की, आज सुरू करण्यात आलेले विविध विकास प्रकल्प ‘स्वर्ण आंध्र’ आणि ‘विकसित भारत’ या दोन्ही संकल्पना साकार करण्यासाठी भक्कम पाया ठरतील.

***

सुषमा काणे/राजश्री आगाशे/वैभवी जोशी/राज दळेकर/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai