Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रिटिश संसदेसमोर केलेले भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रिटिश संसदेसमोर केलेले भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रिटिश संसदेसमोर केलेले भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रिटिश संसदेसमोर केलेले भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रिटिश संसदेसमोर केलेले भाषण


लॉर्ड सभापती

श्रीयुत सभापती

श्रीयुत पंतप्रधान

लंडनमध्ये आल्यानंतर मला अतिशय आनंद झाला आहे. सध्याच्या जागतिकीकरण झालेल्या या जगामध्ये लंडन अजूनही आमच्यासाठी एक प्रमाणक आहे. या शहराने जगाच्या विविधतेला आपल्यात सामावून घेतले आहे आणि मानवाच्या सर्वोत्तम कामगिरींचे प्रतिनिधित्व हे शहर करत आहे. ब्रिटिश संसदेसमोर भाषण करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे.

श्रीमान सभापती आमच्यासाठी या असामान्य शाही दरबाराचे दरवाजे खुले केल्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. संसदेचे सत्र सध्या सुरू नाही याची मला कल्पना आहे. पंतप्रधान कॅमेरोन निवांत आणि मोकळे दिसत आहेत.

पण श्रीमान पंतप्रधान मला तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून दयायची आहे. तुमच्या शाही निवडणुकीतील घोषणेबद्दल तुम्ही मला देणे लागता. आज संध्याकाळी चेकर्समध्ये तुम्ही माझे आदरातिथ्य करणार आहात याची मला कल्पना आहे आणि सदनामधील दोन्ही पक्षांबाबत माझी समन्यायी भूमिका तुम्ही समजून घ्याल हे देखील मला ठाऊक आहे. विशेषतः भारतीय वंशाचे ब्रिटिश खासदार राजकोष आणि विरोधी बाक अशा दोन्ही बाजूला संतुलितरित्या विभागले गेले आहेत. म्हणून मी मजूर पक्षालाही माझ्या शुभेच्छा देत आहे. खरोखरच निवडणुकीनंतरचा हा अगदी सुरुवातीचा काळ असल्याने मी या सदनातील सर्व सदस्यांचे अभिनंदन करतो आणि ब्रिटनमधील प्रमुख नेते आणि येथे उपस्थित असलेल्या भारताच्या हितचिंतक मित्रांना शुभेच्छा देतो.

या इमारतीशी, भारताच्या आधुनिक इतिहासाचा बराचसा संबंध आहे.आपल्या नातेसंबंधाभोवती मोठ्या इतिहासाची गुंफण आहे. इतिहासामधील जुन्या गोष्टी आणि देणी यांच्याबद्दल अनेकांनी कठोर वक्तव्ये केली आहेत. मात्र मी इतकेच सांगेन की, भारतातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटनमधील संस्थांपासूनच प्रेरणा घेतली. आधुनिक भारताची जडणघडण करणारे माझ्या जवाहरलाल नेहरूंपासून डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या नामवंत पंतप्रधानांनी या मार्गावर वाटचाल केली.

अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या भारतीय आहेत की ब्रिटिश हे सांगणे खरोखरच अवघड आहे. जॅग्वार की स्कॉटलंड यार्ड. उदाहरणार्थ ब्रुक बॉन्डचा चहा की माझे दिवंगत मित्र गुलाम नन यांची करी. लॉर्ड्सच्या खेळपटटीवर खूपच जास्त स्विंग होतो की इडन गार्डनच्या खेळपट्टीला लवकर तडे जातात यावरही आमचे जोरदार वादविवाद होत असतात. जशा तुम्हाला भारतात लिहिलेल्या इंग्रजी कादंब-या जशा आवडतात तसा आम्हालाही लंडनचा भांगडा रॅप आवडतो.

या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कॅमेरोन आणि मी संसदेच्या बाहेर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळयाला आदरांजली वाहिली. त्यावेळी मला परदेश दौ-यावर असताना विचारलेल्या एका प्रश्नाची आठवण झाली. ब्रिटिश संसदेच्या बाहेर महात्मा गांधीजींचा पुतळा कसा काय? या प्रश्नाला माझे उत्तर असे आहे की, त्यांची महानता ओळखण्याइतपत ब्रिटिश विद्वान आहेत आणि त्यांच्यासाठी वाटेकरू होऊ देण्याचे औदार्य भारतीयांमध्ये आहे, त्यांचे आयुष्य आणि त्यांची चळवळ यांचा प्रभाव अनुभवण्याचे भाग्य आम्हा दोघांनाही लाभले आहे आणि एकमेकांशी जोडल्या गेलेल्या या इतिहासांच्या क्षमतांचा वापर आमच्या भावी नातेसंबंधांना वृद्धिंगत करण्यासाठी करण्याची हुशारी दोघांमध्येही आहे.

म्हणून मी आज या ठिकाणी उभा आहे. लोकशाहीच्या या मंदिरात एका सरकारचा प्रमुख म्हणून मला बोलायला संधी मिळाली आहे, असे नसून या मंदिरासारख्या दुस-या मंदिराचा आणि सामाईक परंपरांचा एक प्रतिनिधी म्हणून मी येथे आहे.

उद्या वेम्ब्ले येथे मी व पंतप्रधान असणार आहोत. भारतातही प्रत्येक तरुण फूटबॉलपटूला बेकहॅमसारखी कामगिरी करावीशी वाटते म्हणजे बेकहॅमसारखे बनावेसे वाटते. वेम्ब्ले हा आम्हाला बांधणा-या पंधरा लाख आयुष्यांचा बंध आहे, भारतामध्ये असलेल्या त्यांच्या वारशांचा आणि ब्रिटनमध्ये त्यांचे निवासस्थान असल्याचा अभिमान असलेले पंधरा लाख यांचा उत्सव असणार आहे.

आमची मूल्ये, संस्था, राजकीय प्रणाली, क्रीडा, संस्कृती आणि कला या संर्वांमध्ये असलेल्या आमच्या भागीदारीच्या आनंदाची ही भावना असणार आहे आणि आमच्यातील सचेतन भागीदा-या आणि सामाईक भविष्याची ओळख असणार आहे.

भारतामध्ये गुंतवणूक करणा-या सिंगापूर आणि मॉरिशसनंतर युनायटेड किंग्डम तिस-या क्रमांकाचा सर्वात मोठा गुंतवणूकदार देश आहे. युनायटेड किंग्डममधील थेट परकीय गुंतवणुकीच्या प्रकल्पांचा भारत हा तिस-या क्रमांकाचा स्रोत आहे. भारतीय लोक युरोपीय संघातील देशांमधील एकत्रित गुंतवणुकीपेक्षाही जास्त प्रमाणात ब्रिटनमध्ये गुंतवणूक करतात. त्यांना भाषांतराचा खर्च वाचवायचा आहे असा त्याचा अर्थ नसून त्यांना हे वातावरण जास्त परिचित आणि स्वागतार्ह वाटते.

भारतामध्ये स्वतःची प्रतिमा असलेले टाटा ब्रिटनची प्रतिमा म्हणून ओळख असलेली संस्था चालवतात आणि तुमच्या देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठे रोजगारनिर्माते बनतात.

भारतीय विद्यार्थ्यांसाठी युके हे पसंतीचे शिक्षणकेंद्र राहिले आहे. तर एक भारतीय कंपनी सुमारे एक हजार ब्रिटिश विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी भारतात नेत आहे हे ऐकून आनंद झाला.

विज्ञान व तंत्रज्ञान या सर्वात आधुनिक क्षेत्रांमध्ये आपण एकत्र काम करत आहोत. मानवाला भेडसावणा-या अन्न आणि आरोग्याचे रक्षण या समस्यांवर आपण उपाय शोधत आहोत. तसेच नव्याने निर्माण झालेल्या हवामानबदलांसारख्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहोत.

आपली मुले घरी सुरक्षित परत यावीत यासाठी आणि आपल्या सातत्याने वाढत असलेल्या इंटरनेट जाळ्याच्या वापराच्या पार्श्वभूमीवर सायबर स्पेसमध्ये निर्माण झालेल्या धोक्यांना कोणी बळी पडू नयेत म्हणून आपल्या सुरक्षा संस्था एकत्रितपणे काम करत आहेत.

आपण प्रतिनिधित्व करत असलेल्या मूल्यांचे आपल्याला भक्कमपणे रक्षण करता यावे आपली संरक्षण दले एकत्र युद्ध सराव करतात. या वर्षातच आपले एकत्र तीन युद्धसराव झाले.

जागतिक पातळीवर तुमच्या पाठबळामुळेच भारताला जागतिक संस्था आणि नियामक प्राधिकरणांमध्ये हक्काचे स्थान प्राप्त करता आले. त्यामुळे आपल्या दोघांनाही आपल्या सामाईक हितसंबंधांच्या दिशेने आगेकूच करण्यासाठी मदत मिळाली

श्रीमान सभापती

आपल्यामध्ये असलेल्या नातेसंबंधासाठी आपली भागीदारी जितकी बळकट आहे तितक्याच मोठ्या महत्त्वाकांक्षा आपण बाळगल्या पाहिजेत. आपण दोन लोकशाही आहोत, दोन भक्कम अर्थव्यवसथा आहोत आणि नवनिर्मितीकारक दोन समाज आहोत.

आपल्या दोघांमध्ये असलेल्या चांगल्या परिचयाची भावना आणि प्रदीर्घ भागीदारीचा अनुभव आहे. ब्रिटनचे पुनरुत्थान खरोखरच परिणामकारक आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या भविष्यावर ब्रिटनचा भक्कम प्रभाव कायम आहे.

श्रीमान सभापती. भारत जगासाठी एक नवा आशेचा तेजस्वी किरण आहे आणि एक संधी आहे. हे केवळ आंतरराष्ट्रीय संस्थाचे सार्वत्रिक निष्कर्ष नाहीत. केवळ आकडयांच्या आधारे केलेले तर्क नाहीत. 35 वर्षांहून कमी वयाचे 80 कोटीहून लोक असलेला सव्वाशे कोटी लोकसंख्येचा एक देश आहे.

हा आशावाद बदलासाठी उत्सुक असलेल्या आणि लक्ष्य साध्य करण्याचा आत्मविश्वास असलेल्या आमच्या युवावर्गाच्या उद्यमशीलतेमुळे आणि ऊर्जेमुळे निर्माण झाला आहे. आमचे कायदे, धोरणे, संस्था आणि प्रक्रियांमध्ये सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या धाडसी आणि शाश्वत उपाययोजनांचा हा परिणाम आहे.

आमच्या शेतांना अधिक उत्पादक आणि संवेदनाक्षम बनवून, आमच्या सेवा अधिक नवनिर्मितीक्षम आणि कार्यक्षम करून, आमच्या तरुणांमध्ये जागतिक कौशल्य विकसित करण्याच्या दिशेने तातडीने प्रयत्न करून, नव्या उद्योगनिर्मिती प्रक्रियांमध्ये क्रांतीकारक बदल आणून आणि या पृथ्वीतलावर आपला ठसा उमटवू शकेल अशा प्रकारच्या पुढच्या पिढीतील पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देऊन आम्ही आमच्या उत्पादन क्षेत्रांच्या इंजिन्सला प्रदीप्त करत आहोत.

आम्ही पाठपुरावा करत असलेल्या विकासप्रक्रियेमुळेच ही चालना मिळालेली नसून आमच्या देशातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनाच्या दर्जामध्ये सुधारणा करण्याच्या आग्रहामुळे हे बदल दिसत आहेत.

भारताविषयी आम्ही जे स्वप्न पाहिले आहे ते अद्याप पूर्ण व्हायचे आहे. सर्वांसाठी घरे, वीज, पाणी आणि स्वच्छता, बँक खाती आणि विमा, सर्व प्रकारची संपर्क यंत्रणा असलेले आणि समृध्द गाव आणि स्मार्ट व शाश्वत शहरे. हे केवळ एक मृगजळ नसून एका कालमर्यादेने निर्धारित केलेली उद्दिष्टे आहेत.

गांधीजींपासून प्रेरणा घेऊन आमच्यामध्ये बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या प्रकारे सरकार काम करत आहे. प्रशासनामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण झाले आहे. निर्णय प्रक्रिया धाडसी आणि गतिमान झाली आहे.

केंद्र आणि राज्यांमध्ये संघवाद आता उतलेला नाही, तर टीम इंडियाच्या नव्या भागीदारीची व्याख्या आहे. नागरिकांमध्ये आता सर्व प्रक्रिया सुलभ झाल्याचा विश्वास निर्माण झाला आहे. पुरावे आणि प्रक्रियांचे ओझे नाही. व्यवसायासाठी खुले आणि सहजसोपे वातावरण निर्माण झाले आहे. सेलफोन्सने जोडल्या गेलेल्या देशात डिजिटल इंडिया सरकार आणि जनता यांच्यातील संबंधामध्ये परिवर्तन आणत आहे. म्हणून श्रीमान सभापती, टी.एस.एलियट या कवीची क्षमा मागून मी असे म्हणेन आम्ही कल्पना आणि वस्तुस्थिती यात कोणतीही छाया पडू देणार नाही. जर तुम्ही भारताला भेट दिली तर तुम्हाला बदलाचे वारे अनुभवता येतील.

जगभरातून वाढलेल्या गुंतवणुकीच्या ओघातून ते प्रतिबिंबित होत आहे, आमच्या अर्थव्यवस्थेच्या वाढलेल्या स्थैर्यात आशा आणि समावेशकतेच्या 19 कोटी खात्‍यात वार्षिक सुमारे 7.5 टक्के इतक्या वाढलेल्या विकासदरात आणि व्यवसायाला अनुकूल वातावरणासाठी दिलेल्या मानांकनात अतिशय जलदगतीने झालेल्या सुधारणांमध्ये ते दिसून येत आहे.

‘सबका साथ सबका विकास’ हे घोषवाक्य आमचा देशविषयीचा दृष्टीकोन आहे, ज्या देशात प्रत्येक नागरिकाची मालकी आहे, सहभाग आहे आणि समृध्दी आहे.

केवळ आर्थिक समावेशकतेचे हे आवाहन नाही तर हा एक विविधतेचा उत्सवही आहे, सामाजिक एकात्मतेचा ध्यास आहे आणि प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि अधिकार प्रदान करण्याची बांधिलकी आहे. आमच्या संस्कृतीची अनादी कालापासून चालत आलेली ही मूल्ये आहेत. आमच्या संविधानाचा हा आधार आहे आणि भविष्याचा पाया आहे.

श्रीमान सभापती,

सदस्य आणि मित्रांनो,

भारताची प्रगती हे जगातील लोकसंख्येच्या सहाव्या भागातील लोकांचे विधिलिखीत आहे आणि त्यामुळे जगालाही आपल्या समृध्दीबाबत आत्मविश्वास वाटू लागेल आणि भविष्याबाबत अधिक सुरक्षिततेची भावना निर्माण होईल.

आपले आर्थिक संबंध फारच थोड्या काळात उंचावणार आहेत. ही प्रक्रिया स्वाभाविक आणि अटळ आहे. जर आपण आपली वैशिष्ट्यपूर्ण क्षमता आणि भारतात उपलब्ध असलेल्या संधींचे आकारमान आणि प्रमाण यांचे एकत्रिकण केले तर आपली असामान्य भागीदारी निर्माण होईल. आम्ही अधिकाधिक गुंतवणूक आणि व्यापाराच्या प्रतिक्षेत आहोत. आम्ही सेवा क्षेत्रात नवी प्रवेशद्वारे खुली करणार आहेत. आपल्या या ठिकाणी आणि भारतात संरक्षण सामग्री आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात अधिक सहकार्य करणार आहोत. आपण अणुऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात एकत्र काम करणार आहोत.

आपण विज्ञानातील रहस्यांचा उलगडा करणार आहोत आणि तंत्रज्ञान व नवनिर्मितीच्या सामर्थ्याचा वापर करणार आहोत. आपण डिजिटल विश्वातील संधींचा उपयोग करून घेणार आहोत. आपले युवक एकमेकांकडून अधिकाधिक ज्ञान मिळवतील.

पण आपले अशा प्रकारचे समृध्द आणि विश्वासाचे नातेसंबंध केवळ परस्परांच्या संपन्नतेच्या परिणामात मोजता येणार नाहीत.

श्रीमान सभापती,

आपण जगामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या परिवर्तनाच्या युगात आहोत. आपल्यासमोर उलगडणाऱ्या भवितव्याला तोंड देण्याची आपली सज्जता अद्याप बाकी आहे. यापूर्वीच्या काळात आपल्याला माहीत असलेल्या जगापेक्षा ती वेगळी असेल. त्यामुळे आपल्या अनिश्चित काळातील अनोळखी प्रवाहामध्ये आपल्याला एकत्रितपणे या जगासाठी एक स्थिर मार्ग निश्चित करावा लागेल, ज्यातून आपण एकत्रितपणे अवलंब करत असलेल्या मुल्यांचे दर्शन घडेल.

त्यासाठी केवळ आपल्या दोन देशांचे यश पुरेसे नसून आपण ज्या जगाच्या निर्मितीची इच्छा व्यक्त करत आहोत त्यांची वचनबध्दता आवश्यक आहे. आपल्या भागीदारीचे बळ आणि संयुक्त राष्ट्रांचे राष्ट्रकुल आणि जी-20 देशांचे सदस्यत्व आपल्याकडे आहे.

आपण एका अशा जगात आहोत जिथे आपल्यापासून दूर असलेल्या भागातल्या अस्थिरतेचे परिणाम आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचतात. आपल्याला ही आव्हाने मूलतत्ववाद आणि निर्वासितांच्या प्रश्नांमधून दिसत आहेत.

या समस्या देशांच्या सीमांवरुन आपल्या समाजाच्या जाळ्यामध्ये आणि शहरांच्या रस्त्यांवर दाखल होऊ लागल्या आहेत. दहशतवाद आणि कट्टरवाद जागतिक पातळीवरचे बळ बनू लागले असून त्यांची बदलणारी नावे, गट, प्रांत आणि त्यांची लक्ष्ये यांच्यापेक्षाही ते मोठे होऊ लागले आहे. आपल्या काळातील या आव्हानाला तोंड देण्यासाठी संपूर्ण जगाने एका सुरात विरोध केला पाहिजे आणि एकत्रित कृती केली पाहिजे. कोणताही विलंब न करता संयुक्त राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात एक सर्वसमावेशक ठराव स्वीकृत केला पाहिजे. दहशतवादी गट किंवा देश या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ नये. दहशतवाद्यांना जे आश्रय देतात त्यांना एकाकी पाडण्याचा आणि जे देश प्रामाणिकपणे या लढ्याला साथ देत आहेत त्यांच्या पाठिशी राहण्याचा ठराव झाला पाहिजे. ज्या देशांमध्ये दहशतवादाचा सर्वाधिक प्रभाव आहे त्या देशांमध्ये धर्म आणि दहशतवाद यांच्यातील परस्पर संबंध नष्ट करण्याचा प्रत्येक प्रयत्न झाला पाहिजे आणि त्यासाठी एक सामाजिक चळवळ उभारली गेली पाहिजे.

आपल्या समृध्दीसाठी महासागर फार महत्त्वाचे ठरले आहेत. आता आपल्याला आपल्या सायबर आणि बाह्य जागेचे ही संरक्षण करायचे आहे. अनेक प्रदेशांशी आपले हितसंबंध जोडले गेले आहेत. स्थिर, समृध्द आणि एकात्मिक दक्षिण आशियामध्ये आपले एकत्रित हितसंबंध आहेत. समृध्दीकडे परस्परांसोबत वाटचाल करण्याच्या उद्देशाने त्यांची निर्मिती झाली आहे.

महान अफगाणी जनतेच्या स्वप्नातील अफगाणिस्तान आपल्याला साकारायचा आहे. इतरांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षी आणि तर्कविसंगत भीतीच्‍या सावटाखाली असलेला नव्हे.

जागतिक व्यापार आणि भरभरारीटीसाठी हिंदी महासागर क्षेत्रातील शांतता आणि स्थैर्य अतिशय महत्त्वाचे आहे. आशिया प्रशांत क्षेत्राच्या भवितव्याचा आपल्या सर्वांवर व्यापक प्रभाव पडणार आहे. पश्चिम आशिया आणि आखातामध्ये आपले खूप जास्त हितसंबंध गुंतलेले आहेत. आणि आफ्रिकेमध्ये अनेक आव्हानांच्या दरम्यान आपल्याला धैर्य, विद्वत्ता, नेतृत्‍व आणि उदयशीलता यांची आश्वासक चिन्हे दिसत आहेत.

भारताने नुकतेच आफ्रिका परिषदेचे आयोजन केले होते ज्यामध्ये 55 देश आणि 42 नेते सहभागी झालेत.

आपल्या ग्रहाच्या शाश्वत भवितव्यासाठी अल्प कार्बन युगाची सुरुवात करण्यासाठी आपण सहकार्य केलेच पाहिजे. या महिन्याच्या उत्तरार्धात पॅरिसमध्ये ही जागतिक जबाबदारी आपण स्वीकारलीच पाहिजे.

जगाने एकत्रित कृतीचे एक सुंदर संतुलन साधले आहे. सामाईक परंतु विभागलेली जबाबदारी आणि संबंधित क्षमता ज्यांच्याकडे सर्व प्रकारची साधने आहेत आणि तंत्रज्ञान आहे त्यांनी मानवतेकडून स्वच्छ ऊर्जा व निरोगी पर्यावरणासाठी मानव जमातीकडून व्यक्त होणाऱ्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मदत केली पाहिजे आणि ज्यावेळी आपण निर्बंधांबाबत बोलतो त्‍यावेळी आपण केवळ जीवाश्म इंधनांला आळा घालण्यापुरता विचार न करता, आपल्या जीवनशैलीला सामान्य करण्याबाबतही विचार केला पाहिजे.

आपण सर्वांनीच आपली भूमिका पार पाडली पाहिजे. भारतासाठी 2022 पर्यंत 175 गिगावॅट अतिरिक्त अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य आणि 2030 पर्यंत उत्सर्जनाच्या तीव्रतेमध्ये 33-35 टक्के कपात ही दोन पावले सर्वसमावेशक धोरणाचा भाग आहेत.

सौर ऊर्जेला कोणतीही वीज जोडणी नसलेल्या गावांमध्ये आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवण्यासाठी COP-21 या बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन करण्याचा मी प्रस्ताव ठेवला आहे.

ब्रिटनमध्ये तुम्ही उन्हापेक्षा पावसापासून बचाव करण्यासाठी छत्रीचा वापर करण्याची शक्यता जास्त आहे. मात्र माझ्या संघाने सौर आघाडीची व्याख्या अधिक ठळकपणे केली आहे. तुमचे स्थान कटिबंधीय क्षेत्रामध्ये असणे आवश्यक आहे. आणि युनायटेड किंग्डम यासाठी पात्र ठरला आहे हे सांगायला मला आनंद होत आहे. त्यामुळे या प्रयत्नांमध्ये नवनिर्मितीक्षम ब्रिटनमध्ये आम्ही एक महत्त्वाचा भागीदार म्हणून पाहात आहोत. परवडण्याजोग्या आणि सहज उपलब्ध होणाऱ्या स्वच्छ ऊर्जेसाठी सहकार्य हा आमच्या संबंधांचा एक महत्वाचा स्तंभ आहे आणि त्याबद्दल मी आणि पंतप्रधान कॅमेरॉन खूपच आनंदी आहोत.

श्रीमान सभापती,

दोन्ही देशांसाठी हा सर्वात मोठा क्षण आहे. त्यामुळे आपण आपल्या संधी साधल्याच पाहिजेत, सहकार्यातील सर्व अडथळे दूर केले पाहिजेत, आपल्या संबंधांबाबत पूर्ण विश्वास वाढवला पाहिजे आणि परस्परांच्या हितसंबंधांबाबत संवेदनशील राहिले पाहिजे. हे करताना आपल्या संरक्षणात्मक भागीदारीचे आपण रुपांतर करू आणि जगातील महत्त्वाच्या भागीदाऱ्यांपैकी एक म्हणून या नातेसंबंधांची ओळख निर्माण करू. अगदी नेहमीच ब्रिटनच्या प्रसिध्द उक्तीनुसार माणसांच्या गडबडीत आपण योग्य लाटेवर स्वार झाले पाहिजे, कृती करण्यासाठी जग तुमच्या प्रेरणेची वाट पाहत आहे आणि आपण तेच केले पाहिजे पण आपल्या भागीदारीच्या उद्दिष्टांची व्याख्या करताना आपण भारताच्या महान सुपूत्राचा विचार केला पाहिजे. या सुपूत्राचे घर सामाजिक न्यायासाठी शनिवारी देशाला अर्पण करणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीचे वर्ष आम्ही साजरे करत आहोत, ते केवळ भारतीय संविधानाचे आणि संसदीय लोकशाहीचे शिल्पकारच नव्हते, दीनदुबळ्यांच्या, उपेक्षितांच्या आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी भरीव कार्य केले आणि आपल्या सर्वांना मानवतेच्या सेवेच्या महान कार्यासाठी प्रेरित केले. न्याय, समानता आणि सर्व मानवांचा सन्मान करायला आणि लोकांमध्ये शांतता राखायला शिकवले. याच कारणासाठी आज भारत आणि युनायटेड किंग्डम यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे.

धन्यवाद -खूप खूप आभार.

S. Patil/B.Gokhale