Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ब्रसेल्समधील भारतीय समुदायाला पंतप्रधानांचे संबोधन

ब्रसेल्समधील भारतीय समुदायाला पंतप्रधानांचे संबोधन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रसेल्समधील भारतीय समुदायाला आज संबोधित केले. हा भारतीय समुदाय म्हणजे भारताचे लोकदूत आहेत, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी गेल्या आठवडयात ब्रसेल्सवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना हल्ल्यात जखमी झालेल्या आणि दगावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. दहशतवाद हे मानवतेसाठी आवाहन असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र येऊन दहशतवादाशी मुकाबला करणे ही सध्याची गरज आहे असे ते म्हणाले.

दहशतवाद हा फार मोठा धोका असतानाही जगाला त्याचा समर्थपणे मुकाबला करता आलेला नाही, “चांगला दहशतवाद” आणि “वाईट दहशतवाद” अशा शब्दांनी दहशतवाद अधिक प्रबळ होत जातो, असे पंतप्रधान म्हणाले. भारताने 40 वर्षांच्या दीर्घ काळात दहशतवादाच्या समस्येचा मुकाबला केला आहे, या संपूर्ण काळात भारतावरील हल्ले म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित समस्या असल्याचे वारंवार बोलले गेले. मात्र 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर हे चित्र बदलले. भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही, असे पंतप्रधानांनी यावेळी निक्षून सांगितले. आपण दहशतवादासंदर्भात अनेक जागतिक नेत्यांशी चर्चा केली असून धर्म आणि दहशतवाद यांच्यातील संबंध संपुष्टात आणण्यावर भर दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या जागतिक सुफी परिषदेचा संदर्भ देत, स्वतंत्रवादी इस्लामिक विद्वानांनी दहशतवादाला दोषी ठरवल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. जहाल विचार रोखण्यासाठी हा पवित्रा योग्य असल्याचे ते म्हणाले. दहशतवाद संपवण्यासाठी योग्य वातावरणाची निर्मिती करणे गरजेचे आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाला भरीव पावले उचलणे शक्य न झाल्याबद्दल पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला. या संदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाला आपली जबाबदारी निभावता आली नाही आणि योग्य त्या उपाययोजना राबवता आल्या नाही, असे ते म्हणाले. ज्या संस्था उद्‌भवणाऱ्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी योग्य पावले उचलू शकत नाहीत, त्या कालबाह्‌य ठरण्याचा धोका असतो, असे पंतप्रधान म्हणाले.

आर्थिक मंदीच्या लाटेचा सामना करणारे संपूर्ण विश्व भारताकडे आशेचा किरण म्हणून पाहत आहे. भारत ही वेगाने विकसित होणारी मोठी अर्थव्यवस्था ठरला आहे आणि यामागे केवळ सुदैव नाही, असे पंतप्रधान म्हणाले. सलग दोन वर्षे दुष्काळ पडल्यानंतरही हा चमत्कार घडला आहे. चांगले हेतू आणि योग्य धोरणे यांचा हा परिणाम असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. 2015 वर्षाबद्दल बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, आपल्या सरकारने केलेल्या कामाबद्दल माहिती दयायची त्यांची इच्छा आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळणे, वाढीव उत्पादनामार्फत युरियाची कमतरता भरुन काढणे आणि कडुनिंब लेपन या बाबींचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.

गरीबांना मोठया संख्येने स्वयंपाकाच्या गॅसच्या जोडण्या देण्यात आल्या आहेत. सुस्थितीतील कुटुंबांनी स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान रद्द करण्यासाठी राबविलेल्या अभियानामुळे हे प्रामुख्याने शक्य झाले आहे. 90 लाख लोकांनी स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या संदर्भातील केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतूदींचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.

2015 या वर्षात ऊर्जा आणि कोळशाचे कमाल उत्पादन झाल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जाऊ शकतो, त्यामुळे रेल्वेमधील गुंतवणूकीतही तुलनेने वाढ करण्यात आली. 2015 या वर्षात कारचे उत्पादन आणि सॉफ्टवेअर निर्यातीच्या आकडयांनी कमाल मर्यादा गाठल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

आर्थिक समावेशन मोहिमेचा एक भाग म्हणून 21 कोटी नवीन बँक खाती उघडण्यात आली. “जनधन आधार मोबाईल” च्या संकल्पनेमुळे स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदानातील भ्रष्टाचार आणि पळवाटा कमी झाल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्य मिळून 7 दशके उलटल्यानंतरही 18,000 गावे विजेअभावी अंधारात राहिली आहेत. या गावांना 1000 दिवसांच्या अवधीत वीज पुरवठा केला जाईल, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. आतापर्यंत अशा 7000 पेक्षा जास्त गावांमध्ये वीज पोहोचल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. रस्ते बांधणीच्या कामालाही वेग आल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. 175 गीगावॅट्‌स नवीकरणीय ऊर्जेचे लक्ष्य घोषित केल्यानंतर संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले होते, मात्र आता भारत निश्चितपणे हे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सशस्त्र दलांसाठी समान श्रेणी-समान निवृत्ती वेतन देण्याचे वचनही पूर्ण केल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

बांग्लादेश बरोबरचा भू-सीमा करार, हे वादग्रस्त मुद्दे शांततापूर्ण पध्दतीने सोडवण्याचे उत्तम उदाहरण आहे, असे पंतप्रधान म्हणाले. “नरेंद्र मोदी ॲप”चा उल्लेख करत, भारत-बेल्जियम संबंधांबाबत सूचना प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले.

अनिवासी भारतीयांच्या हितासाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या निर्णयांबद्दलही पंतप्रधानांनी माहिती दिली.

M.Pange/I.Jhala/M.Desai