Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भोपाळ, मध्य प्रदेश येथे माजी सैनिकांना उद्देशून पंतप्रधानांचे भाषण

भोपाळ, मध्य प्रदेश येथे माजी सैनिकांना उद्देशून पंतप्रधानांचे भाषण

भोपाळ, मध्य प्रदेश येथे माजी सैनिकांना उद्देशून पंतप्रधानांचे भाषण


महामहिम हुतात्मे अमर राहोत, हुतात्मे अमर राहोत, अमर राहोत

हुतात्मे अमर राहोत, अमर राहोत

हुतात्मे अमर राहोत, अमर राहोत

वंदे मातरम वंदे मातरम

वंदे मातरम वंदे मातरम

वंदे मातरम वंदे मातरम

या महत्वाच्या ऐतिहासिक प्रसंगी आपणा सर्वांसोबत या ठिकाणी या देशाच्या शूर जवानांना अभिवादन करण्याची, श्रद्धासुमने अर्पण करण्याची संधी मला लाभली आहे, हे माझे सौभाग्यू आहे. आपल्या देशात जेव्हा आपण सैन्याबाबत बोलतो तेव्हा साधारणपणे एकाच प्रकारची चर्चा होते, गणवेष, हातात शस्त्रे आणि प्रत्येक क्षणी शत्रुचा वेध घेण्यास उत्सुक असणारी धगधगती नजर. मात्र आपले हे भारतीय सैन्य म्हणजे माणुसकीचे फार मोठे उदाहरण आहे, असा विचारसुद्धा आपण केला पाहिजे. नैसर्गिक आपत्तीच्या काळातही आपले सैन्य कायम मदतीस तत्पर असते. बद्रिनाथ, केदारनाथ येथे अलिकडेच उद्‌भवलेली परिस्थिती आपल्या सर्वांच्या स्मरणात आहे. ज्या प्रकारे त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून, प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून संकटात सापडलेल्या लोकांना वाचवले, ते पाहून आजघडीला संपूर्ण देश आपल्या स्थानावरून देशाच्या जवानांना वंदन करीत आहे.

दोन वर्षांपूर्वी श्रीनगरमध्ये मोठा पूर आला होता. श्रीनगरमध्ये इतका मोठा पूर येण्याची ती पहिलीच वेळ होती. अशा संकटाचा सामना करणे हे सरकारसाठी सुद्धा आव्हान असते. त्या प्रसंगी सुद्धा आमच्या सैन्यातील जवान श्रीनगरच्या खोऱ्यात पूरग्रस्तांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत होते. जेव्हा ते या संकटात सापडलेल्या लोकांची सेवा करीत होते, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत होते तेव्हा माझ्या या सैन्याचे प्रशिक्षण बघा, त्यांची माणुसकी बघा, संकटग्रस्त लोकांना वाचवताना त्यांनी असा विचार केला नाही की आमच्यावर दगड मारणारे, आमचे डोळे फोडणारे तर कधी आमची डोकी फोडणारे हेच लोक आहेत. दगडांचा हा हल्ला काही वेळा इतका तीव्र असतो की मृत्युही स्वीकारावा लागतो. असे अनुभव घेतल्यानंतरही जेव्हा माणुसकीने साद दिली तेव्हा तत्पर प्रतिसाद देत माझे हे सैन्य, माझे हे जवान काल काय झाले होते, कोणी काय केले होते याचा अजिबात विचार न करता सेवेत रुजू झाले. संकटात सापडले, ते आपले देशवासी आहेत, इतकाच विचार त्यांनी केला आणि त्यांचे प्राण वाचविण्यासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले.

आज संपूर्ण जगात जी संरक्षण दले आहेत, संरक्षण बले आहेत, ती पाहता जगातील अनेक देशांकडे आमच्या तुलनेत जास्त सैन्यदले असतील. मात्र जेव्हा जग विविध निकषांवर आमच्या सैन्यदलांचे परिक्षण करते तेव्हा शिस्त, आचरण, सर्वसामान्य नागरिकांशी वर्तणुक या निकषांवर भारताचे सैन्य आघाडीवर असल्याचे दिसून येते. संपूर्ण जगात आघाडीवर असल्याचे दिसून येते.

संपूर्ण जगात शांतता अबाधित राखण्यासाठी एक शांती रक्षक बलाची निर्मिती करण्यात आली आहे. यात संपूर्ण जगभरातील संरक्षण बलातील जवान आळीपाळीने कार्यरत असतात. काही दोन वर्षे सेवा करतात, काही तीन वर्षे सेवा करतात. ज्या देशात त्यांची नेमणूक केली जाते, तेथे ते जातात, त्या देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावतात.

जगाची ही जी शांती सेना आहे, त्यात वर्षानुवर्षे अखंड सेवा देत सर्वाधिक योगदान देणारा देश भारत आहे, ही प्रत्येक भारतीयासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. आमच्या संरक्षण दलाच्या जवानांनी केवळ शस्त्राच्या आधारे नाही तर नितीमत्तेच्या अधिष्ठानावर, आपल्या सदाचरणाच्या बळावर, आपल्या वर्तणुकीने जगाला जिंकून घेण्यात यश मिळविले आहे, तेव्हा ही सिद्धी प्राप्त झाली आहे.

गेल्या काही दिवसात पश्चिम आशियामध्ये वारंवार बॉम्बस्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. दहशतवादाने भयंकर रूप धारण केले आहे. येमेन मध्ये भारताचे हजारो नागरिक अडकले होते, बॉम्बचा वर्षाव होत होता, जीवन आणि मरणाच्या मध्ये भारतीय नागरिक संकटात सापडले होते. आम्ही सैन्याच्या जवानांना तेथे पाठवले, मदतीची सर्व सोय करून पाठविले. आणि आमच्या सैन्यदलाचा पराक्रम पाहा, तेथे अडकलेल्या ५ हजारपेक्षा जास्त भारतीय बंधु-भगिनींना ते भारतात सुखरूप घेऊन आले. केवळ भारतीय नागरिकांनाच नाही तर देशाच्या इतर अनेक देशांच्या नागरिकांना, अगदी पाकिस्तानच्या नागरिकांनाही सुखरूप घेऊन आले होते. हे आहे आमचे भारताचे सैन्यदल. या सैन्याची अशी विविध रूपे आम्हाला वेळोवेळी दिसत राहतात. मात्र त्या दिसण्यात सातत्य नसते त्यामुळे आपण कधी-कधी या शक्तीला विसरून जातो. आपण आपल्या सैनिकांना केवळ सीमा, बॉम्ब, गोळ्या, बंदूक, पिस्तुल, शत्रु अशा बाबींवर, अशा निकषांवरच तोलत राहतो. फार कमी लोकांना माहिती असेल की आमचा हजारो वर्षांचा इतिहास आहे, आमच्या पूर्वजांनी कधीही कोणाच्या इंचभर जागेसाठीसुद्धा आजवर कधीही भांडण केलेले नाही, युद्ध केलेले नाही. भारताचा इतिहास साक्षीदार आहे, आम्ही जगातील कोणत्याही देशावर कब्जा करण्यासाठी, त्यावर स्वामित्व प्रस्थापित करण्यासाठी आक्रमण केलेले नाही. मात्र जेव्हा नितीमत्तेचा प्रश्न उपस्थित झाला, आदर्श जपण्यासाठी जीवन मरणाचा खेळ खेळायची वेळ आली, तेव्हा भारतीय सैन्याने कधीही माघार घेतली नाही.

माझ्या प्रिय बंधु-भगिनिंनो, फार कमी लोकांना माहिती असेल की पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध, ही दोन्ही युद्धे आम्ही केली नव्हती, आमच्यासाठी झाली नव्हती आणि त्यापासून आम्हाला कोणता लाभही अपेक्षित नव्हता. आम्हाला त्या महायुद्धांशी काहीही देणे-घेणे नव्हते. मात्र तरीही या दोन्ही महायुद्धांमध्ये या धरतीच्या सुपुत्रांनी, माझ्या शूरवीर सैनिकांनी, तब्बल दीड लाख जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. सर्व जग ही गोष्ट विसरून गेले आहे, दुर्दैव म्हणजे आम्हीसुद्धा अनेकदा ही बाब सहज विसरून जातो. खरे तर आपल्या पूर्वजांनी मानवतेसाठी केलेले हे बलिदान आणि त्यागाबद्दल आपण सर्वांनी वारंवार सर्व जगाला स्मरण करून दिले पाहिजे. या भूमीवर उगाच गांधी जन्म घेत नाहीत, बुद्ध उगीच जन्म घेत नाहीत. या देशाला एक महान परंपरा आहे, जेथे वीर सैनिक मानवतेसाठी मृत्युला कवटाळतात आणि गांधी मानवतेसाठी आपले आयुष्य खर्ची घालतात. या भूमीचे हे वैशिष्ट्य आहे. आणि या वैशिष्ट्यामुळे आम्ही जगात आमच्या सैन्याबाबत अभिमानाने बोलू शकतो. सच्चा अभिमान बाळगू शकतो. जल असो, धरती असो, आभाळ असो, आमची इतर सैन्यदलेसुद्धा, बीएसएफचे जवान ज्या प्रकारे सीमेवर तैनात असतात, सीआरपीएफचे जवान, तटरक्षक दलाचे जवान आणि अशा अगणित व्यवस्था, ज्या आपल्या सुखनिद्रेसाठी आपले आयुष्य, आपले तारूण्य खर्ची घालतात. आमची सैन्यदले आम्हाला शांतपणे झोपता यावे, यासाठी आनंदाने सीमेवर तैनात राहतात. आम्ही शांतपणे झोपतो, याबद्दल त्यांची तक्रार नसते. मात्र जागृत राहण्याच्या काळातही जर आम्ही झोपी गेलो तर मात्र आमची सैन्यदले आम्हाला माफ करणार नाहीत आणि दुर्दैवाची बाब अशी की काही वेळा जागृत राहण्याची गरज असतानाही आम्ही झोपी गेल्याचे दिसून येते. संस्कृतमध्ये वचन आहे:

राष्ट्रायाम जागरयाम्‌ वयम्‌ अर्थात अनंतकाळाची दक्षता ही स्वातंत्र्याची किंमत आहे.

सतत जागृत राहा. आणि केवळ सैन्यदलाचे जवान जागृत राहिले तर हा त्यांच्यावर अन्याय असेल. जागृत राहण्याची आवश्यकता असेल, तेव्हा आम्ही जागृत राहिलेच पाहिजे. त्या वेळी झोपण्याचा आम्हाला काहीच हक्क नाही. हातात किती आधुनिक शस्त्र आहे, गोळी किती दूरवर जाईल, हे पाहता सैन्य नक्कीच जिंकेल, असे कोणाला वाटत असेल तर तो भ्रम आहे. मनोबल हे सैन्याचे सर्वात मोठे शस्त्र असते. त्यांच्या मनाची ताकत महत्वाची असते. आणि ही मनाची ताकत कोणत्याही शस्त्राने मिळत नाही, सव्वा कोटी देशवासी एक होऊन त्यांच्या मागे उभे राहतात, तेव्हा ती ताकत मिळते.

आमच्या देशातील एक फार मोठी घटना मला आठवते आहे. १९६२ सालच्या युद्धानंतरची दिवाळी होती. तेव्हा सर्वसामान्य लोक सैन्याला मिठाई पाठवत. योग्य पत्ता मिळाला तर ठिक नाहीतर कोणत्याही पत्त्यावर पाठवत. सैन्यातील जवानासाठी म्हणून मिठाई पाठवत. त्यांच्याकडे ती पोहोचेपर्यंत कदाचित खराबही होत असेल, मात्र ती भावना महत्वाची होती, मोलाची होती. मी ऐकले होते की बडोद्याहून एका मुलीने कोणत्यातरी जवानाला मिठाई पाठवली आणि सोबत आपला पत्तासुद्धा पाठवला. ज्या जवानाला ती मिठाई मिळाली, त्याला तो पत्ता सुद्धा मिळाला. नंतर मला समजले की पुढे आयुष्यभर त्या जवानाने त्या बहिणीवर आपल्या सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त माया केली. सैन्याचे हे रूप आपल्याला अनेकदा समजत नाही. हे आहे आमचे सैन्य. मी म्हटले होते, आमचे सैन्य बोलत नाही, ते पराक्रम गाजवते. त्या काळात रोज माझे केस ओरबाडले जात होते, मोदी झोपला आहे, मोदी काहीच करत नाही. पण मी म्हटले, त्याप्रमाणे आमचे सैन्य बोलत नाही, पराक्रम गाजवते, त्याचप्रमाणे आमचे संरक्षणमंत्रीसुद्धा बोलत नाहीत.

प्रिय देशवासियांनो, मी मध्य प्रदेश सरकारचे विशेष अभिनंदन करतो. त्यांनी हे शौर्याचे स्मारक उभारले. युद्धाची स्मारके असतात, हुतात्मा स्मारकेसुद्धा असतात मात्र शौर्य स्मारकात हे सारे समाविष्ट असते, त्याहून अधिक असते. हे शौर्याचे स्मारक आम्हा सर्वांसाठी एक तीर्थक्षेत्र आहे. आमच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी हे प्रेरणेचे मंदिर आहे. आपण पाहू या तरी, अनुभवू या तरी, सैन्य काय आहे हे जाणून तरी घेऊ या?त्यांचे आयुष्य कसे आहे, हे तरी जाणून घेऊ या… असे काय प्रशिक्षण घेतात ते, की ज्यामुळे त्यांच्या कणाकणात भारत भिनतो. असे काय कारण आहे की त्यांनी संपूर्ण भारताला आपले कुटुंब मानले आहे आणि आपली स्वप्ने एकाकी सोडून ते पुढे निघून आले आहेत… मित्रांनो, हा त्याग लहान नाही. याचे शब्दात वर्णन करता येणार नाही. ही वीरांची गाथा आहे. या वीरांमुळे आम्हाला प्रत्येक क्षणी, प्रत्येक पावलावर प्रेरणेची नवी शक्ती प्राप्त होत राहते. त्यांचे जगणे, त्यांचे कार्य प्रत्येक भारतीयाच्या आयुष्याला देशासाठी जगण्याची, देशासाठी काही करण्याची प्रेरणा देते. आमच्या देशाचे जनमान्य कवी, त्यांच्या लेखण्या सर्वांनीच या वीरांची महती जाणली आहे. देशाच्या या वीर जवानांचे, हुतात्म्यांचे, योद्ध्यांचे, सैनिकांचे स्मरण केले नसेल, श्रद्धांजली वाहिली नसेल, असा कोणताही कवी नसेल. आम्ही लहानपणी माखनलाल चतुर्वेदी जी यांची कविता अभ्यासली होती आणि माखनलाल जी म्हणाले होते:-

मुझे तोड़ लेना वनमाली, उस पथ पर देना तुम फेंक

मातृभूमि पर शीश चढ़ाने, जिस पथ जावें वीर अनेक।

बंधु-भगिनींनो, आज या शौर्य स्मारकाच्या उद्‌घाटन प्रसंगी रामधारी सिंह दिनकर यांची एक कविता मला आठवते आहे, जी या प्रसंगासाठी अगदी अनुरूप आहे. ते म्हणतात :-

कलम, कलम, आज उनकी जय बोल

कलम आज उनकी जय बोल

जला अस्थियां बारी-बारी, जला अस्थियां बारी-बारी

चिटकाई जिनमें चिन्गा-री

जला अस्थियां बारी-बारी, चिटकाई जिनमें चिन्गाबरियां

जो चढ़ गए पुण्यं वेदी पर, जो चढ़ गए पुण्यि वेदी पर

लिए बिना गर्दन का मोल, लिए बिना गर्दन का मोल,

वो चढ़ गए पुण्यक वेदी पर

अशा महापुरुषांना, अशा वीरांना वंदन असो. आपण सगळेच जाणतो की आमच्या देशाचे जवान गेली कित्येक दशके वन रँक-वन पेंशन ची मागणी करीत होते. अनेक जण निवृत्त झाले, मागणी करीत राहिले, पण ते जवान होते, शिस्तबद्ध होते, त्यांचे प्राधान्य देशाला होते, स्वत:चा विचार त्यानंतर होता, त्यामुळे त्यांनी इतर संघटनांप्रमाणे भांडण केले नाही, योग्य मार्गाने आपले म्हणणे सांगत राहिले. प्रत्येक सरकारने उत्तमोत्तम शब्दात आश्वासने दिली. आश्वासन दिले नाही, असे कोणतेच सरकार नाही. काही लोक तर इतके हुशार की त्यांनी दोनशे, पाचशे कोटी रूपये अर्थसंकल्पातही दाखवले. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही वचन दिले होते की आम्ही वन रँक-वन पेंशन लागू करू आणि आज आम्ही वीर जवानांसमोर नतमस्तक होत सांगू इच्छितो की आम्ही आमचे वचन पूर्ण केले आहे. आज मी त्यामुळे अतिशय समाधानी आहे. चार हफ्त्यांमध्ये, ही रक्कम चार हफ्त्यांमध्ये देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हा फार मोठा आर्थिक भार आहे त्यामुळे एका वर्षात इतकी मोठी रक्कम देणे भारत सरकारसाठी कठीण आहे. म्हणूनच ही रक्कम चार हफ्त्यांमध्ये विभागून दिली जाणार आहे. आतापर्यंत यापैकी साडे पाच हजार कोटी रूपये इतक्या रकमेचे वितरण करण्यात आले आहे. हे पैसे जवानांच्या घरी, त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. आणि लाभ किती मिळाला, तर सैन्यात काम करणाऱ्या एका हवालदाराला १७ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाल्यावर OROP लागू होण्यापूर्वी ४०९० रूपये मिळत होते, OROP लागू झाल्यानंतर त्याला आता ७६०० रूपये मिळू लागले आहेत. म्हणजेच प्राप्त होणाऱ्या रकमेत ३० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

बंधु–भगिनिंनो, आता सातवा वेतन आयोग लागू झाला. प्रत्येक वेतन आयोगात काही विसंगती आढळून येते. प्रत्येक वेळी ती आढळून येते. आयोगासाठी समितीची स्थापना झाली की ती या विसंगतीवर उपाय शोधते. भारत सरकारसुद्धा त्याच दिशेने प्रयत्नशील आहे. सातव्या वेतन आयोगानंतर आमच्या लष्करप्रमुखांनी आम्हाला एक चिठ्ठी दिली, त्यावर आम्ही काम करत आहोत. आणि त्याचाही सकारात्मक परिणाम निश्चितच दिसून येईल. पण मी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार मिळणाऱ्या वेतनात २.५७ टक्के वाढ केली जावी असे सातव्या वेतन आयोगाने सांगितले आहे. सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार भारत सरकारला हे करता आले असते. मात्र आम्ही असे केले नाही. आम्ही विचार केला की सहाव्या वेतन आयोगाला आधारभूत मानून सैन्यदलांची वेतनवाढ केली किंवा त्यानुसार त्यांना निवृत्तीवेतनात वाढ दिली तर त्यांना फारच कमी लाभ मिळेल. मग आम्ही सांगितले की OROP लागू झाल्यानंतर मिळणाऱ्या वेतनाला आधारभूत मानून त्यानुसार वेतन आयोगाची शिफारस लागू व्हावी. त्यांना दुप्पट लाभ मिळाला तरी चालेल, पण माझ्या देशाच्या जवानांसाठी हे करणे गरजेचे होते आणि आम्ही ते केले.

प्रगतीसंदर्भात माझा एक कार्यक्रम सुरू आहे, ज्यात मी व्हिडीयो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व विभाग, सर्व राज्यांच्या समस्यांचे निराकरण करतो. सैनिकांच्या समस्यांची सद्यस्थिती काय आहे, याचा आढावा मी घेतला. त्यांच्या असंख्य समस्या प्रलंबित असल्याचे मी पाहिले आणि मला धक्काच बसला. आम्ही सैनिकांच्या या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेतला आणि अतिशय वेगाने या समस्यांचे निराकरण करण्यात आम्ही सफल झालो आहोत. आम्ही आणखी एक काम केले. सर्वसामान्य नागरिकांना हे लक्षात येत नाही, याची आम्हाला कल्पना आहे. सर्वसामान्य नागरिकांना असे वाटते की तारूण्यातच जे काही करायची इच्छा आहे, ते करून घ्यावे, नंतर काय करता येईल? त्यांच्या मनात तारूण्याबद्दलच्या संकल्पना वेगळ्या असतात. ३०-३५ वर्षांचे झाल्यानंतर ते विचार करतात की चला, आता आपण बरेच काही साध्य केले. आता आरामात आपले आयुष्य जगू या. सैन्याचे मात्र नेमके उलट असते. आपण ज्या वयात मौज-मजेचा विचार करतो, सैनिक ते वय काही भरीव करण्यासाठी, देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी खर्ची घालतो. सुख-वैभव, ऐशोआराम, मौज, स्वप्ने, इच्छा सर्व काही भारत मातेच्या चरणी समर्पित करून आपले आयुष्य वेचतो. १५-१७ वर्षे सैन्यात नोकरी करून जेव्हा तो घरी परततो तेव्हा त्याने वयाची ४०-४२ वर्षं गाठलेली असतात. ज्या वयात आपण ऐषारामात जगायचा विचार करतो त्या वयात सैनिकाला मात्र नवे आयुष्य कसे सुरू करावे, असा प्रश्न पडलेला असतो. एका प्रश्नचिन्हासह तो आपल्या पुढच्या आयुष्याला सुरूवात करतो.

आज आम्ही सेवानिवृत्त सैनिकांना, ५०००० लोकांना तात्काळ रोजगार उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील आहोत. भारत सरकारने लुकतेच एक महत्वाचे काम केले आहे. सैन्यातून ज्याला निवृत्त होण्याची इच्छा असेल, त्याला एक विशिष्ट वय गाठल्यानंतर जाऊ देतात. तत्पूर्वी सेवेच्या शेवटच्या वर्षात त्याला सरकारतर्फे कौशल्य विकासाच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाते. भारत सरकारने कौशल्य विकास विभाग आणि तिन्ही सैन्यदलांशी सामंजस्य करार केला आहे. कौशल्य विकास साध्य केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र दिले जाते. सैन्यातील लोकांना सैन्यातच प्रशिक्षण दिले जाते. तेथेसुध्दा संवाद तज्ञ असतात, तंत्रज्ञानातील तज्ञ असतात, कुशल वाहनचालक असतात. पण ते सैन्यातून बाहेर पडले की लोक त्यांच्याकडे प्रमाणपत्राची मागणी करतात आणि केवळ प्रमाणपत्राअभावी त्यांना काम मिळू शकत नाही.

पहिल्यांदा भारत सरकारने सैन्यातून निवृत्त होणाऱ्या लोकांना, त्यांच्या सेवेच्या अंतिम वर्षात त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याचे विशेष प्रशिक्षण देणे, त्याचे प्रमाणपत्र देणे आणि भावी आयुष्यात रोजगार मिळण्याच्या दृष्टीने बाजारपेठेला अनुकुल असे प्रशिक्षण देणे, असा उपक्रम सुरू केला. त्यामुळे सैन्यातून बाहेर पडल्यानंतर त्याला आतापर्यंत केवळ सुरक्षारक्षकाचे काम मिळत असे, त्याऐवजी त्याला प्रशिक्षक म्हणून काम करता येईल, कौशल्य विकासक म्हणून काम करता येईल, देशाच्या युवा पिढीला कौशल्य प्रदान करेल. सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणूनच फार मोलाचा आहे.

फार कमी नागरिकांना आणखी एक गोष्ट माहिती असेल. संरक्षण मंत्र्यांकडे एक विशिष्ट निधी असतो, ज्याच्या आधारे सेवानिवृत्त सैनिकांना अडचणीत मदत केली जाते, मुलांचे शिक्षण असेल, मुलीचे लग्न असेल, अशा कोणत्याही कामासाठी ही मदत केली जाते. आतापर्यंत सरासरी १० ते १२ हजार लोकांना या निधीचा लाभ मिळत असे. मात्र आमचे संरक्षण मंत्री इतके सक्रीय आहेत की आजघडीला या निधीच्या माध्यमातून सरासरी ५० हजार कुटुंबांना मदत केली जाते आहे. पूर्वी सेवानिवृत्त सैनिकांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जात असे आणि ती साधारण वर्ष संपता संपता ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असे. आता ही रक्कम तंत्रज्ञानाच्या आधारे प्रदान केली जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रातच ही रक्कम प्राप्त होते आणि विद्यार्थ्यांना त्या रकमेचा योग्य वेळी लाभ घेता येतो.

आतापर्यंत शिष्यवृत्तीपोटी ४००० रूपये दिले जात असत, या सरकारने मात्र जवानांच्या या अपत्यांसाठीची ही रक्कम वाढवून ५५०० रूपये इतकी केली. हवालदार श्रेणीचे जे जवान असतात, त्यांची संख्या ८०-९० टक्के इतकी असते, इतर सर्व उरलेल्या १० टक्क्यात मोडतात. तर हवालदार पदावरून सेवानिवृत्त होणाऱ्या जवानांच्या मुलीचा विवाह असेल तर तेव्हा पूर्वीचे सरकार १६००० रूपये देत असे. आमच्या संरक्षणमंत्र्यांनी औदार्य दाखवत ही रक्कम ५०००० रूपयांपर्यंत वाढवली. आमच्या सैन्यातून जे लोक शारिरिकदृष्ट्या अक्षम होतात, जखमी होतात, त्यांना अपंगत्वाची टक्केवारी जाणून घेण्यासाठी रूग्णालयातून प्रमाणपत्र घ्यावे लागते. हे फार कटकटीचे काम असते आणि मोठ्या कष्टाने सैनिकाला ते पूर्ण करावे लागते. कोणी म्हणते, २० टक्के अपंगत्व आहे तर कोणी म्हणते २५ टक्के, तर कोणी ३० टक्के. जास्तीत जास्त अगदी ४५, ५०, ५५ टक्क्यांपर्यंतही अपंगत्व असते आणि त्या आधारे त्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. या प्रक्रियाचा आमच्या जवानांना खरोखर त्रास होत होता. सैन्यातील काही लोकांशी माझी भेट झाली आणि त्यांनी ही बाब माझ्या निदर्शनाला आणून दिली. आता आम्ही एक नवी व्यवस्था सुरू केली ज्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी, ५० ते ७५ टक्के आणि ७५ टक्क्यांपेक्षा जास्त असे तीन वर्ग सुनिश्चित केले. आता जवानांना होणारा मनस्ताप बराच कमी झाला आहे आणि त्यांना ही प्रक्रीया सहजपणे करता येते आहे.

इतकेच नाही तर आमच्या सैन्यातून निवृत्त होणाऱ्या जवानांना निवृत्तीनंतर वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी आम्ही ४७२ नवी रूग्णालये सूचिबद्ध केली आहेत, ज्यात जवानांना रोखरहित सेवा प्रदान केली जाते. आमच्या मध्य प्रदेशात आम्ही अशी ६४ रूग्णालये सूचिबद्ध केली आहेत. तर अशा प्रकारे भारत सरकारने आपल्या जवानांसाठी संवेदनशिलता बाळगत देशाची शान अबादित राखणाऱ्या सैनिकांना प्राधान्य देत अनेक योजना अंमलात आणल्या. संरक्षण क्षेत्रात भारताला स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. आपल्या देशात शस्त्रनिर्मिती करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. आमच्या देशाच्या युवकांमध्ये क्षमता आहे, बुद्धिमत्ता आहे, हिंमत आहे. गेली दोन वर्षे आम्ही या दृष्टीने प्रयत्नशील आहोत आणि मला विश्वास वाटतो की एक दिवस आम्ही निश्चिपणे भारतात आपल्या आवश्यकतेनुसार शस्त्रास्त्रांची निर्मिती करू आणि जगाला ती विकता येतील इतके सामर्थ्यवान होऊ. या देशाकडे ही क्षमता आहे आणि आम्ही त्या दिशेने सक्रिय आहोत.

माझ्या प्रिय बंधु-भगिनिंनो, पुन्हा एकदा मी शूरवीर हुतात्म्यांना वंदन करतो. या वीरांना जन्म देणाऱ्या मातांना मी अभिवादन करतो. आपल्या पतीचे प्राण गमावणाऱ्या भगिनींना मी अभिवादन करतो, भावाला गमावणाऱ्या बहिणींना मी अभिवादन करतो. आणि भारत मातेच्या सेवेसाठी आपले प्रियजन गमावणाऱ्या या सर्व कुटुंबांना मी अभिवादन करतो.

बंधु-भगिनिंनो, जगात अनेक देशांमध्ये ही परंपरा आहे. आपल्या देशात अद्याप ती परंपरा नाही, पण ती असावी, यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. आपण पाहिले असेल की एखाद्या देशाच्या विमानतळावर आपण बसले आहात, अनेक प्रवासी विमानतळांवर बसलेले असतात. सैन्यातील काही गणवेशधारी जवान तिथून जात असतील तर विमानतळावर बसलेले सर्व नागरिक उठून उभे राहतात, टाळ्या वाजवून त्यांना अभिवादन करतात आणि ते आपल्या मार्गाने चालत राहतात. ज्या विमानातून जायचे असेल, त्यातून निघून जातात. रेल्वेत जवान दिसले तर तेथेही त्यांना पाहून नागरिक उठून उभे राहतात, टाळ्या वाजवतात आणि त्यांना अभिवादन करतात. आपण आपल्या देशात ही परंपरा अस्तित्वात आणू शकतो का? माझ्या सैन्यातील जवान कोठेही जात असतील, केवळ युद्धाच्या वेळी त्यांची आढवण काढणे योग्य नाही. आपल्या मनात चोविस तास त्यांच्याप्रती आदराची भावना असली पाहिजे, भक्तीची भावना असली पाहिजे.

मला सांगा, जर आपण कधी अशा प्रकारे सैन्यातील जवानांना येताना किंवा जाताना पाहिले तर त्यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांना अभिवादन कराल का? विसरणार तर नाही? या अगदी किरकोळ बाबी असतात पण सर्वसामान्यांच्या आयुष्यात, विशेषत: सैनिकांच्या आयुष्यात त्यामुळे मोठा प्रभाव पडतो. शौर्य स्मारकासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही आमच्या नागरिकांनाही प्रशिक्षित करू शकू, असा विश्वास मला वाटतो. हा केवळ जवानांचा सन्मान नाही तर पुढच्या अनेक पिढ्यांवर संस्कार घडविणारी खुली शाळा आहे. एखाद्या मुक्त विद्यापिठाप्रमाणे याचा वापर व्हावा, असे मला वाटते. मी पुन्ही एकदा आपणा सर्वांचे ह्रदयापासून अभिनंदन करतो, मध्य प्रदेश सरकारचेही अभिनंदन करतो. संपूर्ण शक्तीसह दोन्ही मुठी आवळून माझ्यासोबत बोला:-

हुतात्मे अमर राहोत,

आपला आवाज दूरवर पोहोचला पाहिजे…

हुतात्मे अमर राहोत,

हुतात्मे अमर राहोत,

हुतात्मे अमर राहोत,

मन:पूर्वक आभार!!!

B.Gokhale/M.Pange/Anagha