Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मार्क झुकेरबर्ग यांच्यासोबत फेसबुक मुख्यालयात प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान पंतप्रधानांचे वक्तव्य

मार्क झुकेरबर्ग यांच्यासोबत फेसबुक मुख्यालयात प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान पंतप्रधानांचे वक्तव्य

मार्क झुकेरबर्ग यांच्यासोबत फेसबुक मुख्यालयात प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान पंतप्रधानांचे वक्तव्य

मार्क झुकेरबर्ग यांच्यासोबत फेसबुक मुख्यालयात प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान पंतप्रधानांचे वक्तव्य

मार्क झुकेरबर्ग यांच्यासोबत फेसबुक मुख्यालयात प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान पंतप्रधानांचे वक्तव्य

मार्क झुकेरबर्ग यांच्यासोबत फेसबुक मुख्यालयात प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान पंतप्रधानांचे वक्तव्य

मार्क झुकेरबर्ग यांच्यासोबत फेसबुक मुख्यालयात प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान पंतप्रधानांचे वक्तव्य


मार्क झुकेरबर्ग : पंतप्रधान मोदीजी, तुमचे फेसबुकमध्‍ये स्‍वागत, हा आमच्‍यासाठी एक गौरवपूर्ण क्षण आहे, येथे हॅकर स्‍केअरवर जमलेल्‍या व भारतात तसेच जगभर याचे थेट प्रक्षेपण बघणाऱ्‍या आमच्‍या सर्व समुदायाचे आम्‍ही आभार मानतो.

आमच्‍या कंपनीच्‍या इतिहासामध्‍ये वैयक्तिकरित्‍या भारताचे स्‍थान महत्‍वाचे आहे. ही गोष्‍ट मी कधी सांगितली नाही व खुपच कमी लोकांना माहित आहे. आमच्‍या सुरूवातीच्‍या काळात जेव्‍हा सर्व गोष्‍टी सुरळीत चालु होत्‍या आणि एक कठीण प्रसंग आला तेव्‍हा अनेक जणांना फेसबुक खरेदी करायचे होते आणि आम्‍ही ही कंपनी विकावी असे म्हणू लागले. मी माझे मागदर्शक-स्‍टीव्‍ह जॉब यांच्‍याकडे गेलो आणि त्‍यांनी मला सांगितले की कंपनीबाबत मी जे स्वप्न पाहिले होते ते साकार करण्यासाठी मी भारतातील त्या मंदिराला भेट दयावी, जिथे तयांनी ॲपल कंपनी सुरु करण्याच्या काळात भेट दिली होती.

म्‍हणून मी तेथे गेलो आणि जवळ जवळ एक महिना मी तेथे प्रवास करून, लोक एकमेकांसोबत कसे जाडले जातात याची पाहणी केली. प्रत्‍येकाला एकमेकांसोबत जोडण्‍याची एक प्रबळ क्षमता असेल तर, जग किती चांगले होईल,या गोष्‍टीची जाणीव मला झाली. या गोष्‍टीची मला फेसबुक निर्मितीच्‍या 10 वर्षानंतरही नेहमी आठवण येते.

गेल्‍या वर्षी दिल्‍लीला आपली चांगली चर्चा झाली व मी तुमच्‍या सोबत व संपूर्ण समुदायासोबत तुमच्‍या जगाच्‍या व भारताविषयीच्या भविष्याबाबत चर्चा करणार आहे. भविष्‍याचा विचार जेव्‍हा मी करतो, तेव्‍हा अनेक कारणांसाठी मी भारताविषयी वैयक्तिकरित्‍या उत्‍सुक असतो.

प्रथम आपल्‍याला सर्व जगाला इंटरनेटने जोडण्‍याची एक मोठी संधी आहे. इंटरनेट केवळ मनोरंजन व संवादासाठी वापरले जात नाही तर ते आरोग्‍य, शिक्षण, रोजगार यासंबधी पण महत्‍वाची माहिती पुरवते. खरे तर, इंटरनेटचा वापर करणाऱ्‍या प्रत्‍येकी 10 लोकांपैकी एक जण द्रारिद्रयातून बाहेर पडतो व नव्या रोजगाराची निर्मिती होते.

सध्‍या भारतातील आणखी सुमारे एक अब्‍ज लोकांना आम्‍हाला इंटरनेटने जोडायचे आहे व त्‍यांना जोडण्‍याची एक महान संधी आज मानवतेसाठी उपलब्‍ध आहे. यासाठीच, मी पंतप्रधान मोदी यांच्‍या डिजीटल इंडियाप्रती बांधिलकीची हृदयपूर्वक प्रशंसा करतो की त्यांनी या प्रचंड मोठया संधीचे भारतीयांसाठी एका वास्‍तवात रूपांतर केले. भारतीय नागरिकांसोबत इंटरनेट व सोशल मिडीयाच्‍या माध्‍यमातून पंतप्रधान मोदी यांनी जो संपर्क साधला, त्‍यांच्‍या या उदाहरणाने मी स्‍वत: वैयक्तिकरित्‍या प्रभावित झालो. शांतीसंदेशाचा प्रसार करणे असो किंवा महिलांच्‍या अधिकारासाठी, बालकांच्‍या विकासासाठी, डिजिटल इंडियासाठी अभियान चालवणे असो, या सर्वांसाठी जगातील सर्वात मोठया लोकशाहीच्‍या नेत्याने, जागतिक नेत्‍यांना त्‍यांच्‍या नागरिकांशी भविष्‍यात कसे जुळता येईल याबाबत एक आदर्श घालून दिला. जेव्‍हा आपण भविष्‍यासंबंधी अर्थपूर्ण चर्चा करू तेव्‍हाच आपण प्रत्‍येकाच्‍या समस्‍या ऑनलाइन ऐकु शकतो.या प्रकारे, समाज एकत्र येऊन सामाजिक ध्‍येयपूर्ती करू शकतो.

कॅलिफोर्नियामध्‍ये भारताचे पंतप्रधान 1982 मध्‍ये आले होते आणि तेव्‍हापासून खूप बदल झाला आहे. आज भारत जगाचे नेतृत्‍व करत आहे, भारतीय उद्योग व संस्‍कृती जगभरातील लोकांच्‍या जीवनात परिवर्तन घडवून आणत आहे. भारताला अशीच प्रगतीची कास धरून ठेवण्‍यासाठी, ऑनलाइन राहणाऱ्‍या नेत्‍याची गरज आहे.

पंतप्रधान मोदीजी तुम्‍ही त्यासारखेच एक उदाहरण म्‍हणून मला दिसता. तुमच्‍या या ध्‍येयाविषयी व भारताबद्दलच्‍या भविष्‍यासंदर्भातील आशावादाबाबत ऐकून घेण्‍यास मी फार उत्‍सुक आहे. धन्‍यवाद आणि पुन्‍हा एकदा मी तुमचे फेसबुमध्‍ये स्‍वागत करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी : मार्क मी तुमचा आभारी आहे, ज्या फेसबुकमुळे सर्व जग एकमेकांसोबत जोडले गेले आहे, त्या फेसबुक मुख्यालयात येऊन तुमच्यासोबत चर्चा करण्याची संधी मला मिळाली.

विज्ञान व अध्यात्माचे असेपण नाते असू शकते, ते कदाचित मार्कने आता सांगितले नसते, तर हे जगाला समजले नसते. अमेरिकेमधील एक युवक काही करण्याचे स्वप्न बघतो व विज्ञानाच्या क्षेत्रात यशस्वी झेप घेणारे त्यांचे गुरु त्याला सांगतात की, काही करण्याअगोदर भारतातील एखाद्या मंदिराला भेट देऊन ये, तेथे तु तुझी इच्छा सांग, तुला मार्ग सापडेल. हे स्वत:च एक आश्चर्य आहे. मार्क जगातील लोकांना तुमचीही गोष्ट ऐकून फार आश्चर्य वाटले असेल. मला अशी आशा आहे की, ज्या प्रेरणेमुळे तुम्हाला या कार्यक्रमाची सुरूवात करता आली, ती केवळ बँकेची खाते वाढवण्याचे काम करणार नाही तर ही या जगातील कोटी-कोटि लोकांचा आवाज बनेल.ते कोटी-कोटी लोकांच्या आकाक्षांचे व अभिव्यक्तींचे एक प्रभावी माध्यम म्हणून उदयास येईल. तुमचा हा प्रयत्न मानवाच्या इच्छा- अपेक्षांची पूर्ती करण्याची ज्याच्यावर जबाबदारी आहे, त्यांना नेहमी सजग ठेवेल. या तुमच्या प्रयत्नासाठी मी तुमचे हार्दिक अभिनंदन करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. भारताकडे लोक आशेने पाहतात, असा प्रश्न तुम्ही विचारला. तुम्हाला काय वाटते? जेव्हा तुम्ही भारतामध्ये आलात, तेव्हा कुठल्यातरी मंदिरात मोठ्या आशेने गेलात आणि बघा तुम्ही कुठल्या कुठे पोहोचलात. भारताकडून ज्या आशा अपेक्षा आहेत, भारताकडे सामर्थ्य आहे, हे तुमचा स्वत:चा अनुभव सांगत आहे. भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे.

आपण जर आर्थिक दृष्टिकोनातून बघितले तर, जागतिक बँक असो, आंतरराष्‍ट्रीय नाणे निधी असो, किंवा जगातील दुसऱ्‍या मानांकन संस्था असो त्‍या साऱ्‍या एकासुरात सांगत आहेत की, जगातील मोठया देशांमध्‍ये वेगाने वाढणारी अर्थव्‍यवस्‍था जर कोणती असेल तर ती भारत आहे. आज आम्ही 8 ट्रिलियन डॉलर एवढी मोठी अर्थव्‍यवस्‍था आहोत. व माझे स्‍वप्‍न आहे की 20 ट्रिलियन डॉलरमध्‍ये रूपांतरित करण्‍याचा, त्‍या कामासाठी मला तीन गोष्‍टींवर बळ दयावे लागत आहे. कृषी क्षेत्र, सेवा क्षेत्र व निर्मिती क्षेत्र. तुम्‍ही लोक जे जगाशी जोडले गेले आहात, त्यांचे सर्वात मोठे योगदान हे सेवा क्षेत्रात आहे व मला सेवाक्षेत्राचे मोठे सामर्थ्‍य दिसत आहे.

आज केवळ पर्यटन हे क्षेत्र घेतले, तर भारताजवळ पर्यटनच्‍या क्षेत्रात रोजगारनिर्मितीच्‍या असंख्‍य संधी आहेत. आजच्‍या तंत्रज्ञानामुळे जग खूप जवळ आले असून एक आपलेपणा निर्माण झाला आहे. पर्यटन जर वाढले तर या सेवा क्षेत्राला, रोजगार निर्मितीला, जीवन शैलीला एक बदल घडवून देण्‍यासाठी एक मोठी ताकद मिळेल. आज भारतीय विदेशातील कोणत्‍याही ठिकाणी गेले तर त्‍यांच्‍याकडे पाहण्‍याचा दृष्टिकोन गेल्‍या सव्‍वा वर्षामध्‍ये बदलला आहे, आज कोणताही विदेशी व्‍यक्‍ती भारतीयांकडे गर्वाने बघतो. इतक्‍या कमी वेळात ही जाणीव निर्माण होणे, ही त्‍या विश्‍वासाच्या पायामुळे शक्य होते. गेल्‍या 15 महिन्‍यात कोणते मोठे कार्य आमच्‍या सरकारने हाती घेतले आहे, तर ते म्‍हणजे गमावलेल्‍या विश्‍वासाला पुर्नजिवीत करणे व एक आत्‍मविश्‍वासाची पातळी आणणे, या गोष्‍टींमुळेच बदल घडून येतो. अतिदक्षता विभागात असलेला रूग्‍णसुध्दा जेव्‍हा त्‍याला खात्री पटते की आता डॉक्टर आले आहेत, तेव्हा मी आता बरा होईन.

मार्क झुकेरबर्ग – ठीक, तर आतापर्यंत आपल्‍याला 40,000 प्रतिक्रिया आणि प्रश्‍न या प्रश्‍नोत्‍तराच्‍या सत्रादरम्‍यान मिळालेले आहेत. ही खरोखरच अतुलनीय बाब आहे. खूप लोक आज इथे प्रश्‍न विचारण्‍यासाठी आले आहेत. पण त्यांना अगोदर इथे बोलवण्‍याआधी, मला तुम्‍हाला एक प्रश्‍न विचारायचा आहे. तुम्‍ही इंटरनेट व फेसबुक यांचा वापर सर्वात आधी सुरू केला. तुम्‍हाला एखादया क्षणी असे वाटले का, की हा सोशल मिडीया व इंटरनेट प्रशासन नागरिकांचा सहभाग व धोरणासंबंधी एक प्रभावी माध्‍यम म्‍हणून उपयोगात येईल ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी : मी जेव्‍हा सोशल मिडीयाचा वापर सुरू केला तेव्‍हा मला असे माहित नव्‍हते की, मी कधी मुख्‍यमंत्री, पंतप्रधान बनेन किंवा हा सोशल मिडिया मला प्रशासनात उपयोगात येईल. या सोशल मि‍डियासोबत मी जेव्‍हा जोडलो गेलो, तेव्‍हा तंत्रज्ञानाविषयी एक उत्‍सुकता माझ्यात होती, मला असे लक्षात आले की, केवळ पुस्‍तकाद्वारे ज्ञान आत्‍मसात करण्‍यापेक्षा एखादया मार्गदर्शकपुस्तिकाद्वारे जर आपणास कोणी खात्रीशीर मार्गदर्शन देत असेल, तर ते चांगले ठरेल. माझे हे काम सोशल मिडीयाने केले. मला कमी वेळात दोन-चार शब्‍दांमध्‍येच पाहिजे त्या विषयाची माहिती उपलबध झाली.

मी जास्‍त शिकलेलो नाही, व माझे असे सौभाग्‍य पण नव्‍हते की मी जास्‍त ज्ञान मिळवु शकेल. पण, या उणीवेची भरपाई करण्‍याचे काम सोशल मिडीयाने केले, हा दुसरा फायदा मला झाला. दोन-चार शब्‍दामध्‍ये मला महिती कळायला लागली व माझ्या विचार-प्रक्रियेत परिवर्तन घडून आले. माझ्या आजु-बाजुच्‍या जगाच्‍या माहितीसोबतच मला संपूर्ण विश्‍वाच्या बातम्‍या कळु लागल्या. मी या सर्वांशी जुळत गेलो व जसे जसे मी सर्वांशी जोडत गेलो तेव्‍हा जगाने मला मी जसा आहे त्‍या स्‍वरूपात मला स्‍वीकारणे चालू केले. मनुष्‍यासाठी सर्वांत आनंदाची गोष्‍ट कोणती असेल, तर ती म्‍हणजे तुम्‍ही जसे आहत, तसेच जगाने तुम्‍हाला स्‍वीकारणे. अन्‍यथा लोकच असे म्‍हणतात, तुम्‍ही तर चांगले आहात, पण जरा हे असते तर चांगले झाले असते वगैरे. पण, सोशल मिडियामध्‍ये ही समस्‍या नसते. आपण जसे आहोत तसे तुम्‍हाला जग स्‍वीकारत असते. त्‍यावर कोणी प्रश्‍न विचारत नाही आणि तुमचे कार्यक्षेत्र झपाटयाने वाढते. मी याआधी पण असा अनुभव घेतला आहे.मी सरकारमध्‍ये आलो तेव्‍हा माझ्यासाठी सर्व दारे उघडली गेली. माझ्या लक्षात असे आले की, जनता व सरकार यांच्‍यात एक दरी असते.जेव्‍हा निवडणुका होतात, पाच वर्ष पूर्ण होतात तेव्हा लक्षात येते की, एवढी मोठी दरी होती. सोशल मिडीयामुळे आज रोज मतदान होते. मी आता बोलत असतांना मतदान चालु असेल की, मोदी योग्य करत आहेत की अयोग्‍य ?

आज कोणत्‍याही सरकारला चुकीचे पाऊल उचलण्‍यापासून कोणी रोखत असेल तर ते सोशल मिडीयाचे सामर्थ्‍य आहे. सरकारला त्‍याची चुक सुधारवण्‍यासाठीची संधी यापूर्वी पाचवर्षानंतर होणाऱ्‍या निवडणुकीच्‍या माध्‍यमातून मिळायची, पण तीच संधीआज प्रत्‍येक 5 मिनिटानंतर या सोशल मिडीयामुळे मिळते व हीच लोकशाहिीची एक मोठी ताकद बनली आहे. यासाठीच, मी जगातील सर्व राजकीय नेत्‍यांना, सोशल मिडीया पासून दूर जाण्‍याऐवजी, त्‍यांच्‍यासोबत जोडून त्‍याला माहित करून घेण्‍याचे आवाहन करतो. चांगले सरकार तेव्‍हाच चालते जेव्‍हा, माहितीच्‍या वाहिन्‍या पुष्कळ असतील व वास्तववादी माहिती मिळणार असेल.

सरकार जवळ या आधी जी यंत्रणा होती, ती फारच मंद होती. कधी कुठे काही घडले, तर 24 तासानंतर जेव्‍हा ते वर्तमानपत्रात येत असे, तेव्‍हा माहित पडत होते की असे काही घडले. आज 24 सेकंदाच्‍या आत माहित पडते की, जगातल्‍या या भागात असे घडले. यासाठीच, प्रत्‍यक्ष वेळेतील माहितीसाठी सोशल मिडीया सर्वांत मोठा स्रोत आहे. सरकार दक्ष आहे, सजग आहे तर ते या माहितीच्‍या आधारे सुधारणात्‍मक उपाय योजु शकते, धोरणात्‍मक आराखडा बनवू शकते व या कार्याचा वेग पण वाढवू शकते.या अर्थाने, सोशल मिडीयाने प्रशासनामध्‍ये एक महत्‍वाची भूमिका पार पाडली आहे.

तुम्‍ही मला मुत्सद्देगिरीबाबत प्रश्‍न विचारला आधी काय होत होते ? देश व राजधानी एकमेकांसोबत जोडले जात होते. दिल्‍ली वॉशिंग्‍टनसोबत जोडल्‍या जात होती ,दिल्‍ली टोकीयोसोबत जोडली जात होती. नेत्‍यांसोबत जोडले जात होते. सोशल मिडीयामुळे आज एका देशाचे नागरिक दुसऱ्‍या देशाच्‍या नागरिकांसोबत जोडले जात आहेत. आज मी चीनच्‍या सोशल मिडिया ,ज्‍याची रचना वेगळी आहे, तेथे पण सक्रीय आहे आणि मी तेथे चीनी भाषेमध्‍ये संवाद साधतो. तुम्‍हाला आश्‍चर्य वाटेल, जेव्‍हा चीनच्‍या विबोवर त्‍यांच्‍या पंतप्रधानांना मी वाढदिवसानिमित्‍त शुभेच्‍छा दिल्‍या तेव्‍हा, चीनच्‍या नागरिकांमध्‍ये त्‍यांच्‍या पंतप्रधानाविषयीच्‍या या बातमीचा प्रसार अगदी झपाटयाने झाला. आता मुत्सद्देगिरीचे हे स्‍वरूप कधी कोणी विचारात पण घेतले नसेल. मी इस्राईलच्‍या पंतप्रधानांना त्‍यांच्‍या एका उत्सवानिमित्‍त हिब्रू भाषेत शुभेच्‍छा संदेश दिला. तो पण खुप प्रसिद्ध झाला. पण सर्वात महत्‍वाचे म्‍हणजे, त्‍यांचे उत्‍तर मला धन्‍यवाद, असे हिंदी मध्‍ये आले. हे मुत्सद्देगिरीचे एक नवे रूप आहे, जे थेट जनतेसोबत जोडले. हे जग एका कुटंबाप्रमाणे असून यांच्‍या बांधणीमध्ये सोशलमिडीया एका मध्यस्थाची महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

मार्क झुकेरबर्ग – तुम्‍ही आता जे सांगितले, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. त्‍यामुळेच तुमच्‍या नेतृत्‍वाची प्रशंसा फेसबुकच्‍या या कार्यालयात आम्‍ही सर्वजण नेहमी करत असतो. आपल्‍याला पुढचा प्रश्‍न विचारणार आहेत, वीर कश्‍यप, तुम्‍ही कोठून आलात वीर ?

वीर कश्‍यप : सुप्रभात मार्क व पंतप्रधान मोदी, येथे बोलावल्‍याबद्ल मी आपला आभारी आहे. मी सध्‍या बंगळूरू येथे राहत असून भारतामध्‍ये 8 वर्षापूर्वीच येथून आलो होतो. भारतातील डिजिटल क्रांतीमध्ये योगदान देण्यात सक्षम असल्याचे वाटल्यामुळे कंपनीचा सहसंस्थापक झालो. या डिजिटल क्रांतीमुळे, लाखो लोकांना इंटरनेटच्‍या वापर करून जगभरात चांगला रोजगार मिळू शकतो. यापूर्वीच्‍या सरकारांचा भर भौतिक पायाभूत संरचनेत गुंतवणूक करण्‍याकडे होता, पण आजच्‍या सरकारची मुख्‍य भूमिका ही डिजीटल संरचना विकसित करण्‍याकडे जास्‍त असावी, ज्‍यामुळे नागरिकांना एकमेकांसोबत जोडता येईल आणि या जागतिक समाजाचा एक उत्पादनशील नागरिक म्‍हणून त्‍यांना राहता येईल. पंतप्रधान महोदय,तुमच्‍या सरकारतर्फे भारतातील 800 दशलक्ष ते एक अब्‍ज लोकांना जोडण्‍यासाठी काय तरतूद करण्‍यात आली आहे ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी : वीर मी तुमचा खुप आभारी आहे. की तुम्‍ही भारतात घेऊन आपले नशीब आजमावले . मी भारतीय युवकांना वीर पासून प्रेरणा घेण्‍याचे व भारतात येण्‍याचे आवाहन करतो. भारताला दोन बाबींवर समान भर देणे आवश्‍यक आहे. एक म्‍हणजे भौतिक पायाभूत संरचना, ज्‍याला आपण नाकारू शकत नाही. दुसरे म्‍हणजे डिजीटल संरचना, मला ही सर्व कामे सोबत-सोबत करावी लागतील, आणि माझा असा ठाम विश्‍वास आहे की, 21 व्‍या शतकात जितके महत्‍व “हाय-वे” चे आहे तितकेच महत्‍व “आय-वे” चे देखील आहे. महामार्ग पण पाहिजेत, माहिती मार्गही पाहिजेत. भारतात 6 लाख खेडी आहेत व अंदाजे 2.5 लाख पंचायती आहेत. हा आकडा ऐकूनच लोक घाबरतात. येत्‍या 5 वर्षामध्‍ये या सर्व गावांना ऑप्टिकल फायबर नेटवर्कच्‍या माध्‍यमातून जोडण्‍याचा माझा प्रयत्न असेल. जे लोक भारताला ओळखत असतील त्‍यांना माहित असेल की पूर्वी नदी जेथे वाहत होती, त्‍या ठिकाणी लोक वस्‍ती करून राहायचे तेथे मानवी संस्‍कृतीचा विकास होत होता. पण आता हा काळ बदलला, आता जेथून महामार्ग जातात त्‍या ठिकाणी शहरे स्‍थापन होत आहेत. येत्‍या दिवसांमध्‍ये जेथून ऑप्टिकल फायबर नेटवर्क गेले, त्‍या ठिकाणी हे शहर वसु लागतील,या बदलणाऱ्‍या जगाकडे आपण बघितले पाहिजे आणि यासाठीच प्रशासनामध्‍ये तंत्रज्ञानाला आम्‍ही खूप मोठया प्रमाणात आणत आहोत. पारदर्शकतेसाठी ते खूपच महत्‍वाचे आहे. कार्यक्षम प्रशासन, सोपे प्रशासन किंवा आर्थिक प्रशासन करायचे असेल,तर तंत्रज्ञानाचे हे सामर्थ्‍य खूप मोठे आहे.सरकारच्‍या फायदयासाठी हे स्‍थानांतरण संपूर्णपणे डिजीटल, जगात होणे अनिर्वाय आहे, पायाभूत संरचनेच्‍या जगात जेथे पैशांचा प्रश्‍न येतो, तेथे माझ्या मते, विश्‍वात पैशांची काही कमतरता नाही. पुष्‍कळ देशांना तर हे सुद्धा माहित नसेल की पैसे कोठे गुंतवावे त्‍या सर्वांना मी हाच संदेश देतो की, ही ती जागा आहे.

मार्क झुकेरबर्ग: ठीक आहे. पुढचा प्रश्न टी. एस. खुराना यांचा आहे; जे खरतर इथेच फेसबुकमध्ये काम करतात. तर, टी. एस. तुम्ही कुठले आहात?

टी. एस. खुराना : मी भारतात जन्मलो पण १९७१ मध्ये आम्ही अमेरिकेत स्थलांतर केले. मी केंटकीच्या रस्त्यांवर इंग्रजी शिकलो. पंतप्रधान आमच्या संकुलात तुमचे स्वागत आहे आणि मार्क, या छानशा रविवारच्या सकाळी आम्हाला पाहुणे म्हणून बोलावल्याबद्दल धन्यवाद. पंतप्रधानांसाठी माझा प्रश्न असा आहे की गेल्या १५ महिन्यात भारतासोबत व्यवसाय करणे सोपे झाले आहे असे तुम्हाला वाटते की नाही? लाल फितीचा कारभार कमी करण्यासाठी “मेक इन इंडिया” नावाचा कार्यक्रम तुम्ही सुरु केलात. पण असा एक समज आहे की सुधारणांचा वेग कमी आहे. तुम्हाला वाटते की सरतेशेवटी ‘मेक इन इंडिया’ यशस्वी होईल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी: हे बघा, एक स्कूटर जेव्हा वळत असते, ती काही क्षण घेते आणि तुम्हाला कळते की हं इथून स्कूटर अशी जात होती; पण जर ४० डब्यांची रेल्वे तिकडून इकडे आणायची आहे, तर बराच वेळ लागतो.

तर इतका मोठा देश, बदल निरंतर होत असतात, बरेच होतात, जेव्हा त्याचा एकत्रित परिणाम काही काळानंतर लक्षात यायला लागतो, तेव्हा वाटते इतका बदल कसा झाला. आता पहा भारतात ४० वर्षांपूर्वी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले. गरिबांसाठी बँक उपयोगी पडावी अशा हेतूने ही प्रक्रिया झाली. परंतु ४० वर्षात ६० टक्के लोकसंख्येचे बँक खाते नव्हते. आता काम होत आहे की नाही याचा हिशोब कसा लावणार? ४० वर्षात १८० दशलक्ष लोकांचे बँक खाते नव्हते.

हे सरकार आले, १०० दिवसात १८० दशलक्ष बँक खाती सुरु झाली. आता तुम्ही वेग पहा, प्रमाण पहा, हे पहा की अरे वा! हे कसे झाले? जे ४० वर्षात नाही झाले ते १०० दिवसात कसे झाले? तर हा बदलाचा वेग आहे. ज्याप्रकारे आता मी एक अभियान चालविले आणि जागतिक बँकेने पुढाकार घेतला; तो म्हणजे “इज ऑफ डुइंग बिजिनेस”. याच्या मानांकनात भारत १४०व्या क्रमांकावर आहे. हा अहवाल बघून भारतात येण्याचा कोणी विचार करणार नाही. हे स्वाभाविक आहे कारण कंपनीचे संचालक मंडळ बैठक घेते तेव्हा ते कागद घेऊन बसतात; प्रत्यक्ष बघायला थोडी येतात; जसे हे फेसबुकवाले मंदिरात आले. ते तर आपले संचालक मंडळ बघतात. आता मार्कचे म्हणणे ऐकून लोक विचार करतील की अरे, कागद पाहून नाही, तर प्रत्यक्ष जाऊन बघू.

पण आम्ही ठरविले आहे की “इज ऑफ डुइंग बिजिनेस” करायचे आहे. मी सगळ्या राज्यांची बैठक घेतली; आमच्याकडे संघरचना सरकार पद्‌धत आहे आणि अधिकतर आमच्याकडे राज्यांना जास्त अधिकार आहेत. त्यांना बोलावले, “इज ऑफ डुइंग बिजिनेस” मध्ये काय काय अडथळे आहेत ते ऐकून घेतले आणि आता जागतिक बँकेने मानांकन दिले तेव्हा मी आश्चर्यचकित झालो, सर्व राज्यांमध्ये ‘इज ऑफ डुइंग बिजिनेस’ची एक अभूतपूर्व स्पर्धा सुरु झाली होती. एक राज्य दुसऱ्या राज्याच्या पुढे जाऊ इच्छित होते आणि गेल्या सहा महिन्यात या अभूतपूर्व उपलब्धीमध्ये भारताने यश प्राप्त केले आहे. येणाऱ्या दिवसात जेव्हा राष्ट्रीय मानांकन येईल मला विश्वास आहे १४० पेक्षा आम्ही बरेच वर असू.

सांगण्याचा अर्थ असा की शक्यता आहे. दुसरे, “मेक इन इंडिया”च्या यशाचे रहस्य काय आहे? जगातील कोणतीही व्यक्ती आपला व्यवसाय बंद करू इच्छित नाही. स्पर्धात्मक जगात तो उभा राहू इच्छित आहे. समजा, फेसबुकच्या मुख्यालयाला लोकांना दर महिन्याला 10 दशलक्ष पगार द्यावा लागतो, आणि हेच काम भारतात 1 दशलक्ष पगारात होते, तर व्यावसायिक येईल की नाही? तर कमी उत्पादन खर्च निर्मिती, प्रभावी शासन, कौशल्यपूर्ण मनुष्यबळ, कच्चा माल आणि भारतातील उपलब्ध असलेला सर्वात मोठा बाजार, या सर्व शक्यता अशा आहेत की “मेक इन इंडिया” जगातील कोणत्याही निर्मात्यासाठी स्वर्ग आहे.

आणि त्या अर्थी मी पाहतो की, “मेक इन इंडिया”साठी खूप संधी आहेत. तुम्ही पाहिले असेल मागच्या 15 महिन्यात एकट्या अमेरिकेकडून थेट विदेशी गुंतवणुकीत 87 टक्के वाढ आहे… 87 टक्के! कल्पना करू शकता! एफआयआयमध्ये खूप वेगाने वाढ होत आहे. सर्वसाधारणपणे आमच्या देशाची थेट विदेशी गुंतवणूक वाढ 40 टक्के झाली आहे. आज जगात जी मंदी आहे, त्यामुळे बाकी देशांमध्ये वजा 16 टक्के आहे; तर भारतात 40 टक्के अधिक आहे. ही गोष्ट सांगते की “मेक इन इंडिया”चे यश याच्याशी जोडलेले आहे. मी पाहतो आहे की “मेक इन इंडिया” यशस्वी होणार.

दुसरी गोष्ट अशी की भारताने आता ज्या सुविधा दिल्या आहेत त्या बाकी देशांमध्ये नाहीत. आमच्याकडे 3 डी आहे, आणि ही आमची वेगळी ताकद आहे. ताकद अशीच नाही, ती अद्वितीय ताकद आहे- डेमोग्राफिक डिव्हिडंड, डेमोक्रेसी आणि डिमांड, ८०० दशलक्ष लोकसंख्या ३५ वर्षांखालील आहे. जो तरुण देश आहे, व्हायब्रंट लोकशाही आहे, व्हायब्रंट न्यायव्यवस्था आहे, व्हायब्रंट माध्यमे आहेत, एकसारख्या विचारांच्या देशांसाठी ही एक मोठी संधी असते. आणि मागणी… १.२५ अब्ज लोक! किती मोठी मागणी आहे! आणि त्यात मी येऊन एक नवीन डी वाढविला आहे; deregulaisation. मी सर्व सरकारी विळख्यांना बाजूला करत आहे. मी सरकार लहान करत आहे. आणि माझे तत्वज्ञान आहे की “व्यवसायात असणे हे सरकारचे काम नाही”. हॉटेल चालविणे आमचे काम नाही. लोकांनी चालवावे आणि चांगल्या पद्धतीने चालवावे. आणि खुराना साहेब या गोष्टींमुळे मी पाहत आहे की खूप संधी आहेत.

मार्क झुकेरबर्ग: आपला पुढचा प्रश्न डॉ. रंजना कुमारी यांच्याकडून आहे. ज्या मला वाटते दिल्लीवरून आल्या आहेत. डॉक्टर तुम्ही आम्हाला सांगाल तुम्ही कुठून आला आहात आणि तुमचा प्रश्न काय आहे?

डॉ. रंजना कुमारी: हो, मी भारतातील, दिल्लीमधील, महिला सशक्तीकरणासाठी “केअर फॉर सोशल रिसर्च”ची संचालक आहे. माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे, मोदी जी, मागील काळात, जगामध्ये भारतीय महिलांबाबत खूप काही ऐकले-बोलले गेले आहे. त्यामुळे सर्व लोक जाणू इच्छितात की महिला आणि मुलींच्या सशक्तीकरणासाठी तुमच्या काय योजना आहेत? आणि विशेषत: “पुरोगामी भारतात” महिलांच्या बरोबरीबाबत आपले काय मत आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी : दोन पैलू आहेत. एक पैलू असा आहे जो बरेच लोकांना आवडत नाही. पण मार्कने मंदिराची गोष्ट काढली आहे तर माझे मन म्हणतेय मी देखील असे काही सांगावे. जगात देवाची कल्पना सर्व समाजात आहे. ईश्वराची कल्पना प्रत्येक समाजात आहे. परंतु प्रत्येक समाजात देव हा पुरुषच आहे. प्रत्येक समाजात! एकटा भारत आहे, जेथे स्त्री देवतेची कल्पना करण्यात आली आहे. दुर्गा, सरस्‍वती, अंबा, काली, म्हणजे आमच्या मुलभूत चिंतनाचे जे अधिष्ठान आहे त्यामध्ये स्त्रीच्या या रुपाची कल्पना करण्यात आली आहे.

हे खरे आहे की हजारो वर्षात त्यामध्ये बदल होतात, त्याचा ह्रास होतो, बदलणाऱ्या समाजाचा तो एक प्रभाव असतो. जेथपर्यंत एका सरकारचा प्रश्न आहे, भारताला जर आपल्या आर्थिक विकासाच्या ध्येयाला प्राप्त करायचे आहे तर 50 टक्के लोकसंख्येला घरात बंद करून होऊ शकत नाही. या 50 टक्के स्त्रीशक्तीला खांद्याला खांदा लाऊन भारताच्या विकास यात्रेत 100 टक्के भागीदारी द्यायला हवी. सरकारची धोरणे सकारात्मक हवीत. आणि त्या दिशेने आम्ही प्रयत्न करत आहोत. आज भारतात, शिक्षण घ्या, आरोग्य घ्या, इथे स्थिती अशी आहे की पुरुषांसाठी राखीव जागा काढाव्या लागणार आहेत. जर तुम्ही आज शिक्षण क्षेत्राची बैठक बोलावली, १००० लोकांना बोलावले, तर ८०० महिला असतात आणि २०० पुरुष असतात.

इतक्या मोठ्या प्रमाणात भारतातील संपूर्ण शिक्षण उपक्रम महिलांच्या हातात आहे. आरोग्य विभाग- आज तुम्ही आरोग्य क्षेत्राची कोणतीतरी परिषद घ्या; तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात विशेषत: नर्सिंग, रुग्णसेवा कर्मचारी क्षेत्रात- पूर्ण नियंत्रण महिलांनी मिळविले आहे. मागील दिवसात आम्ही निर्णय घेतला, पोलिस खात्यात जे केंद्रशासित प्रदेश आहेत, जिथे भारत सरकार निर्णय घेते, तिथे महिलांसाठी 30 टक्के राखीव जागा देण्याचे आम्ही ठरविले आहे.

आजही जगातील बरेच देश असे आहेत जिथे स्त्रीला निवडणूक जिंकणे कठीण आहे. खूप शिक्षित देशांमध्ये देखील. भारतात निवडणूक प्रक्रिया आहे, अनेक राज्य अशी आहेत जिथे स्थानिक सरकारमध्ये ५०टक्के महिला आरक्षण आहे. जर १०० माणसांचे मंडळ आहे तर ५० स्त्रिया असणारच. हा छोटा निर्णय नाही आणि संसदेमध्ये देखील यासाठी चर्चा सुरु आहे की तिथे देखील महिलांचा सहभाग असावा जेणेकरून निर्णयप्रक्रियेत त्यांचा देखील सहभाग असेल. मी मानतो की महिला सबलीकरणात एक गोष्ट आपल्याला मिळविली पाहिजे ती म्हणजे निर्णय प्रक्रियेतील त्यांचा सहभाग असायला हवा.

जेव्हा घर बनते तेव्हा भिंतींचा रंग कोणता हवा इथपर्यंत त्यांची भूमिका मर्यादित नसावी, घर कसे उभे करावे यातही त्यांचा सहभाग असावा. कुटुंबातही सबलीकरण व्हायला हवे. या दिशेने आम्ही एक अभियान चालविले “बेटी बचाओ, बेटी पढाओ”. मी गुजरातमध्ये जेव्हा मुख्यमंत्री होतो, जून महिन्यात गुजरातमध्ये ४५ डिग्री तापमान असते. मी जून महिन्यात १२, १३, १४,१५ या चार दिवशी स्वत: गावात गेलो. गावातच राहत होतो, ४५ डिग्री तापमान असायचे. प्रत्येक घरी जाऊन सांगायचो मुलीला शाळेत पाठवा. मला तुमच्या मुलीला शिकवायचे आहे आणि मी 100 टक्के मुलींचे शिक्षण प्राप्त करण्यात यशस्वी झालो होतो. आजही माझा प्रयत्न आहे; “बेटी बचाओ, बेटी पढाओ” एक फार मोठी चळवळ देशभरात सुरु आहे आणि अशी अनेक कामे आहेत. जसे सरकारची कोणती योजना आहे; सरकारी योजनेतून आपण गरिबांना घर देतो. तेव्हा हे बंधनकारक आहे की घरावर मालक म्हणून पहिले नाव महिलेचे असेल, दुसरे नाव त्या घरातील पुरुषाचे असेल. यापूर्वी मुला-मुलींना शाळेत घालताना मुला-मुलीच्या नावामागे वडिलांचे नाव असायचे; मी जेव्हा गुजरातमध्ये होतो तेव्हा मी हे अनिवार्य केले होते की मुलांच्या नावासोबत फक्त वडिलांचेच नाही तर आईचेही नाव लावावे. आपल्याला समाज जीवनाचा जो जुना विचार आहे तो बदलावा लागेल. एका नंतर एक.. मग तो सामाजिक स्तर असो, आर्थिक असो वा सरकारी व्यवस्थेतील स्तर असो; या सर्व विषयात हे जोडले जात आहे आणि मी मानतो की यामुळे खूप मोठा बदल घडून येत आहे.मार्क झुकेरबर्ग:ठीक आहे, आता पुढचा प्रश्न, मला तुम्हाला एक वैयक्तिक प्रश्न विचारायचा आहे. लोकांना कदाचित हे जाणवणार नाही पण अशा काही गोष्टी आहेत ज्या आमच्यात एकसारख्या आहेत. त्यातील एक म्हणजे की आमचे कुटुंब आम्हा दोघांसाठी खूप महत्वाचे आहे. खरंतर माझे आई-वडील दोघेही आज येथे आहेत. मला माहित आहे त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात आईचे खूप महत्व आहे. तर मी आशा करतो की तुम्ही त्यांच्याबद्दल थोडे आम्हाला सांगाल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी : मी त्या आई-वडिलांचे खूप अभिनंदन करतो आणि त्यांना येथून प्रणाम करतो की ज्यांनी मार्क सारखा मुलगा अशा कामासाठी दिला आहे, ज्याने सर्व जगाला जोडण्याचे काम केले आहे. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही उभे राहाल? आम्हाला तुम्हाला पाहायला आवडेल आणि मला वाटते मार्कने आज पहिल्यांदाच तुम्हाला इथे बोलावले आहे.

तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात पहा, कोणाचेही चरित्र-आत्मचरित्र पहा, प्रत्येकाच्या आयुष्यात दोन गोष्टी नेहमी येतात- की माझ्या जीवनात शिक्षकाची काय भूमिका आहे आणि माझ्या जीवनात आईची काय भूमिका आहे. प्रत्येकाच्या जीवनात येतात. मी सुद्धा एका सामान्य कुटुंबातील आहे. माझ्या जीवनातही आई-वडिलांची खूप मोठी भूमिका आहे. मी खूप गरीब कुटुंबातील आहे. तुम्हाला माहित आहे की मी रेल्वे स्थानकावर चहा विकायचो. कोणी कल्पना करणार नाही की जगातील इतक्या मोठ्या लोकशाहीने चहा विकणाऱ्याला आपला नेता मानले. आणि म्हणून मी सर्वात आधी त्या सव्वाशे कोटी भारतीयांना नमन करतो की ज्यांनी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला आपले बनवले.

दुसरी गोष्ट आहे, खूप सामान्य कुटुंबात कसे दिवस काढायचे, आमचे वडील तर राहिले नाहीत. आई ९० पेक्षा जास्त वयाची आहे. आजही आपली सगळी कामे स्वत: करते, सर्वकाही स्वत: करते. शिकलेली नाही, पण टीव्हीमुळे तिला सर्व बातम्या माहित असतात, जगात काय सुरु आहे. नाहीतर काही माहित नसायचे. आम्ही लहान होतो तेव्हा घर चालवण्यासाठी शेजारच्या घरांमध्ये भांडी घासणे, पाणी भरणे, मजदूरी करणे… तुम्ही कल्पना करू शकता आपल्या मुलांना मोठे करण्यासाठी एका आईने किती कष्ट सोसले असतील. आणि हे केवळ नरेंद्र मोदीच्या बाबतीत नाही. भारतात अशा लाखो माता आहेत, ज्यांनी आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी आपल्या आयुष्याची आहुती दिली.

म्हणून मी सर्व मातांना शतश: नमन करतो आणि त्यांची प्रेरणा, त्यांचे आशीर्वाद केवळ आम्हाला शक्ती नाही तर योग्य मार्गावर ठेवोत. हीच आईची सगळ्यात मोठी ताकद असते. आईला कधीच इच्छा नसते तुम्ही काहीही बनावे; पण तुम्ही कसे बनावे याची नेहमी इच्छा बाळगते. या आईचे स्वप्न असते “कसे बना”. “काहीही बना” असे आईचे स्वप्न नसते… हा फरक असतो… त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात आईचे खूप मोठे योगदान असते.

धन्यवाद मार्क. 128258

D.Wankhede/S.Pophale/S.Tupe