Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीला पंतप्रधानांचे संबोधन, 2016

राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीला पंतप्रधानांचे संबोधन, 2016


देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले एनसीसीचे सर्व कॅडेटस आणि मोठ्या संख्येने जमलेल्या पाहुण्यांनो,

26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक पर्व अतिशय उत्साहाने आपण साजरे केले आणि लोकशाहीप्रती आपली श्रध्दा आणि निष्ठा, राज्यघटनेच्या प्रती आमची आस्था याविषयी आम्ही पुन्हा एकदा संकल्प केला आहे.

हे वर्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीचे वर्ष आहे. ज्या महापुरुषाने देशाला अशी उत्तम राज्यघटना दिली, या महापुरुषाने संपूर्ण जीवन संकटांशी सामना केला, त्रास सहन केला, उपेक्षा सहन केली, त्यानंतरही त्यांनी स्वतःला आपल्या मार्गापासून विचलित होऊ दिले नाही. अडथळे आले, संकट आले, कधी-कधी सामाजिक उपेक्षा, जी एवढी खोलवर जखम करते की आयुष्यभर सामान्य व्यक्ती ती विसरु शकत नाही. पण बाबासाहेब आंबेडकर आपल्यासारखे सामान्य नव्हते. आयुष्यभर उपेक्षा सहन करुनही जेव्हा देशासाठी राज्यघटना देण्याची वेळ आली, त्या राज्यघटनेच्या कोणत्याही भागात कोणाविषयीही वाईट भावना नाही, बदल्याची भावना नाही. त्यातच आयुष्यभर जे सहन केले होते, त्यामुळे जे मंथन झाले, त्या मंथनातून संविधानरुपी अमृत निघाले, जे आज आम्हाला प्रजासत्ताक पर्वाच्या एवढ्या वर्षानंतरही, स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही आम्हाला जोडण्याचे, खांद्याला खांदा लावून चालण्याचे, देशाप्रती आपल्या जबाबदाऱ्या निभावण्यासाठी आम्हाला प्रेरित करते, आमचे मार्गदर्शक आहे.

तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यातून आला आहात, ती कोणती बाब आहे जी आम्हाला ओढून आणते, ती कोणती बाब आहे, जी आम्हाला भाषेच्या अडचणीतही, वेगवेगळी वेशभूषा, वेगवेगळे राहणीमान असूनही एकजूट राहण्याचे बळ देते. ती आहे आमची भारतमाता, आमचा तिरंगा ध्वज, ही आमची राज्यघटना. सव्वाशे कोटी देशवासियांचे स्वप्न, त्यांच्या आशा-आकांक्षा, इच्छा आम्हाला काहीतरी करण्याची प्रेरणा देतात.

एनसीसी कॅडेट रुपाने परेडमध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी, आपल्याला एनसीसीचा गणवेश परिधान करुन, ताठ मानेने एकमेकांसोबत चालण्याची संधी मिळेल. कधी कॅम्पचा अनुभवही घेता येईल, कधी शस्त्रास्त्रांना जवळून पाहण्याची संधी मिळेल. हे वय असे असते की, या सर्व बाबींमध्ये एक आनंद असतो, काही धाडसाची भावनाही असते आणि अंगात देशभक्ती सतत ऊर्जा बनून आम्हाला नव्या स्वप्नांसाठी, जगण्यासाठी संकल्पबद्ध करते.

जेंव्हा तुम्ही 26 जानेवारीच्या या परेडसाठी एक महिन्यापासून एक समूह जीवनाचा अनुभव घेत होता. ही तर अडचण ठरली असेल की, सकाळी तीन-साडेतीन वाजता उठा, आपल्याला वाटते या थंडीत जरा उशीरा उठावे, पण बिगूल वाजतो, शिट्टी वाजते, उठावे लागते. सुरुवातीचे पाच-दहा मिनिट तर असेच जातात की, अरे आजचा दिवस टाळता येईल का? पण जसंही सर्वजण एका लयीमध्ये येतात, त्यानंतर वाटते की हा मार्ग सोडायचा नाही, हीच आयुष्याची ताकद ठरते. काही क्षण भलेही गुंतागुंतीचे असतील, पण क्षणातच जो स्वतःला सांभाळतो, एका ध्येयासाठी स्वतःला झोकून देतो, त्याला आयुष्य जगण्याचा वेगळा आनंद मिळतो. तुम्ही सर्व कॅडेटसनी एक समूह जीवनाचा अनुभव घेतला आहे. मैदानात जी शिकवण आहे ती मिळाली आहे. आदेशानूसार हात-पाय चालत असतील. शिस्तीचे जग आहे. पण त्यानंतर आपल्या नव्या मित्रांसोबत, नव्या सहकाऱ्यांसोबत महिनाभर राहिला असाल. जेव्हा तुम्ही त्यांच्याकडून छोट्या छोट्या विषयाची माहिती घेत असाल. खाण्या-पिण्याविषयी विचारत असाल, राहणीमानाविषयी विचारत असाल, तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये हळूहळू भारतमातेला आत्मसात करता आहात. काश्मीरचा बालक जेव्हा केरळच्या बालकासोबत बोलतो तेव्हा तो मनाने काश्मीर आणि केरळला जोडला जातो. आपलेपणाची भावना निर्माण होते. स्वतःचा विकास होतो. सामूहिक आयुष्य अहम् ला व्यम् कडे नेते. स्व ला अखिल शब्दाशी जोडले जाण्याची संधी प्रदान करुन देते. सामूहिक जीवन एक नवी ऊर्जा प्रदान करते. एकटेपणाचा जो अनुभव आहे, सामूहिक आयुष्यात एक नवीन अनुभव मिळतो आणि अशाच कार्यक्रमांच्या माध्यमातून एक सामूहिक जीवन जगण्याची संधी मिळते. मैदानात जे शिकतो, त्यापेक्षा जास्त इतर वेळी सामूहिक जीवनात शिकायला मिळते आणि मला माहित आहे तुम्ही याठिकाणाहून निरोप घेणार, तो क्षण कसा असेल. तुमच्यापैकी कितीतरी जणांच्या डोळ्यात अश्रू असतील. प्रत्येकाला वाटेल पुन्हा कधी भेट होईल, ही आपलेपणाची भावना कोठून आली? जेव्हा तुम्ही तुमच्या गावापासून याठिकाणी येण्यासाठी निघाला असाल, महिन्यासाठी तेव्हा ना कोणी सोडायला आले ना कोणाच्या डोळ्यात पाणी आले असेल ना तुमच्या मनाला वेदना झाल्या असतील की मी आपल्या गावापासून दिल्लीला जात आहे, पण आज दिल्लीहून आपल्या गावी जात आहात, आपल्या माणसांमध्ये जात आहात, तेव्हा काहीतरी हरवल्यासारखे वाटेल. हे जे आपलेपण आहे, हीच देशाची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीला संस्काररुपाने जिवंत ठेवणे, देशासाठी प्राणांची आहुती देण्याची संधी प्रत्येकाच्या नशीबात नसते, पण देशासाठी जगण्याची संधी प्रत्येकाच्या आयुष्यात असते.

जर आम्ही जागृत प्रयत्न करू, आम्ही जगू ते देशासाठी. काही करुन जाऊ तर देशवासियांसाठी, आयुष्याच्या संकल्पातून कष्ट करण्याची तयारी, अशाप्रकारचे आयुष्य मिळवेल की जे आयुष्य देशाच्या कामी येईल. तेंव्हा कुठे आयुष्याचा आनंद येईल. म्हणून आज सर्व कॅडेटस जेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यात वापस जात आहेत, मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि याठिकाणी जे दृश्य पाहायला मिळत आहे, हेच दृश्य आपल्या भागात कसे पाहता येईल, जर आम्ही या ठिकाणी स्वच्छता पाहिली आहे तर स्वच्छतेची भावना गावात कशी पोहचवता येईल. जर आम्ही याठिकाणी देशप्रेम अनुभवले आहे तर आपल्या गावात देशप्रेमाचे वातावरण कसे निर्माण करता येईल. याठिकाणी आम्ही जो अनुभव घेतला आहे, त्याचा विस्तार आम्ही कसा करु, हे संकल्प घेऊन चला. मी पुन्हा एकदा सर्व कॅडेटसना, एनसीसीला, एनसीसीच्या या परंपरेचे मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो.

भारत माता की जय, भारत माता की जय। भारत माता की जय। खूप-खूप आभार।

S.Thakur/I.Jhala/M.Desai