Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलेले भाषण

राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलेले भाषण


भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या युवा मित्रानो !

आज १२ जानेवारी, स्वामी विवेकानंदाच्या जयंतीचा हा दिवस आपण सर्वजण युवा दिन म्हणून साजरा करतो. या देशातील युवक दोन महापुरुषांना विशेष मानतात, त्यांचा आदर करतात. जर कोणी आपल्यासमोर शहीद भगतसिंह किंवा स्वामी विवेकानंद याचं नाव घेतलं तर त्यांच्याविषयीच्या आदराने आपण नतमस्तक होतो. इतक्या लहान वयात कोणी किती मोठं कार्य करू शकतो. जर माणसाकडे संकल्पाची ताकद असेल, संकल्प पूर्ण करण्यासाठीचा समर्पण भाव असेल, जीवन अर्पण करण्याची, वाहून देण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असेल, तर अशा व्यक्तीसाठी वय महत्वाचे ठरत नाही. आज भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो युवक इथे माझ्यासमोर बसले आहेत. तुम्हा प्रत्येकाचे संगोपन वेगवेगळ्या पद्धतीने झाले आहे. यांच्या खाण्यापिण्याच्या , राहणीमानाच्या सवयी वेगवेगळ्या आहेत., भाषा वेगळी आहे, पेहराव वेगळे आहेत, असे असले तरी हे सगळे युवक एका धाग्याने जोडले गेले आहेत. या प्रत्येकाच्या मनात एकच मंत्रघोष सुरु आहे. आणि तीच आम्हा सर्वांची प्रेरणा आहे. काय आहे तो मंत्र ? अगदी स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासून या “ वंदे मातरम्” मंत्राने काश्मीर ते कन्याकुमारी आणि अटक ते कटक अशा सर्व देशाला एका सूत्रात बांधले आहे. एक असा मंत्र असतो , जो आयुष्यात काहीतरी करण्याची प्रेरणा आपल्याला देतो. आज कोणी “ भारत माता की जय” म्हणेल किंवा कोणी “वंदे मातरम” म्हणेल , पण या आधी या मंत्राने आपल्याला भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्याची ताकद दिली होती, आणि आज हाच मंत्र, स्वतंत्र भारताला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी, विकासाची नवनवी शिखर गाठण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी, भारतातील गावे, गरीब शेतकरी, मजूर अशा सर्वांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे. आधी हाच मंत्र देशासाठी आयुष्याचे बलिदान देण्याची प्रेरणा देत होता. आज तोच या देशासाठी जगण्याची प्रेरणा देतो. आज तुम्ही सगळे युवक स्वतःसाठी नाही, तर देशासाठी काहीतरी करण्यासाठी संकल्पबद्ध झाले आहात. देशासाठी काहीतरी करण्याची तुमची इच्छा आहे. जेव्हा देशातले सव्वाशे कोटी लोक संकल्पबध्द होऊन काही पावले चालण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा देश प्रगती करतो. आपण सर्वानी आपल्या संकल्पासाठी अविरत प्रयत्न केले, तर देश आपोआप आपल्या उद्दिष्टापर्यंत पोचतो.

आज संपूर्ण जगाकडे नजर टाकून बघा. सगळा देश भारताकडे मोठ्या आशेने बघतो आहे. का ? कारण भारत एक संधीचा देश आहे, या देशात अनेक संधी आज वाट बघत आहेत. जग भारताकडे आशेने बघते आहे कारण आज आपला देश सर्वात तरुण देश आहे. ज्या देशाची ६५ टक्के लोकसंख्या तरुण असेल, ३५ वर्षांच्या आतली असेल, तो देश किती भाग्यवान आहे, आमच्याकडे आज कोटी कोटी युवा जनता आहे. आणि जिथे ही तरुणाई असते न, तिथे संकल्पाना काही सीमा नसतात, बंधने नसतात. कधी कधी आपल्या देशात युवकांच्या वेगवेगळ्या व्याख्या ऐकायला मिळतात. शास्त्रापासून आजपर्यंत तरुणाईच्या अनेक व्याख्या झाल्या आहेत. प्रत्येकाचा आपापला दृष्टीकोन असतो, अनेकांना वय हेच तारुण्याची ओळख आहे असे वाटते. मात्र मला वाटते की तारुण्याचा वयाशी, किंवा परिस्थितीशी संबंध नाही, तर मनःस्थितीशी आहे, जी युवकांची ओळख आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या भूतकाळाविषयी, घडून गेलेल्या घटनांविषयी वारंवार बोलते, त्या आठवणी सांगत बसते, तेव्हा मी त्याचा सरळ सरळ अर्थ काढतो की त्याने आता आपले तारुण्य गमावले आहे, त्याचा आता प्रौढत्वाकडे प्रवास सुरु झाला आहे. मात्र जो घडून गेलेल्या गोष्टी उगाळत न बसता, भविष्यातल्या स्वप्नांचा वेध घेतो, तो माझ्या मते, खरा तरुण आहे, कारण त्याचे मन तरुण आहे. जर तुम्ही स्वतःला तरुण समाजात असाल, तर तरुण कधीही घडलेल्या घटनांना आठवत वेळ वाया घालवत नाहीत, तर येणाऱ्या स्वप्नांच्या पूर्ततेचा विचार करतो, त्याचा ध्यास घेतो आणि आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी अविश्रांत कठोर मेहनत करतो तो खरा युवक !!

देशभरातून आलेले हे तरुण या तरुणाईच्या स्वप्नाचेच एकत्र रुप आहे. आपण आज इथे देशभरातल्या विविधतांमध्ये बसलो आहोत, त्याचे काय कारण आहे? काय कारण आहे, ज्यामुळे आपण एकमेकांना जोडले गेलो आहोत? सद्भावना! ही स्वतःच एक मोठी ताकद आहे. जर आपल्याला एकमेकांविषयी आदर आणि प्रेम नसते, आपलेपणाची भावना नसती, तर आपण सगळे एकमेकांशी जोडले गेलो असतो का? भारत विकास करण्याची इच्छा बाळगतो आहे आणि म्हणूनच यंदाच्या युवा परिषदेचा विषयही अतिशय महत्वाचा आहे.

एकीकडे व्यक्ती, त्याची ताकद आणि युवाशक्तीशी निगडीत विषय घेऊन आलो आहे, तो आहे, कौशल्य आणि दुसरा विषय आपल्या देशाविषयीचा आहे, तो म्हणजे भारताचा विकास आणि तिसरी गोष्ट जी तुम्ही सांगितली, ती आहे, सद्भावना! आता हे सगळे कसे, केव्हा आणि का जोडायचे? यावर आपण पुढच्या चार दिवसात चर्चा करणार आहोत, त्याची सुरुवात आजपासून होते आहे. जर आपल्या देशात एकता नसेल, परस्परांविषयी सद्भाव, प्रेम नसेल आदर नसेल, एकमेकांच्या परंपरा, उत्सव-संस्कृती याविषयी आदर नसेल, तर भारताच्या विकासात अडथळे येतील, आणि त्यामुळेच भारताच्या युवा पिढीकडून आमची अपेक्षा आहे, आणि त्या अपेक्षेनुसारच भारताने नेहमीच जगाला हे दाखवून दिले आहे, की ज्या देशाजवळ अनेक बोलीभाषा आहेत, अनेक परंपरा, विविधता आणि वेगवेगळे स्वभावधर्म, जे आपल्याला आपल्या पूर्वजांकडून वारशाच्या रूपाने मिळाले आहेत, हा सर्व समृद्ध वारसा स्वामी विवेकानंदासारख्या महापुरुषांनी आपल्याला दिला आहे, तो आपल्याला जतन करायचा आहे.

वेदांपासून ते विवेकानंदापर्यंत आणि उपनिषदापासून ते उपग्रहापर्यंत आपण याच परंपरेत वाढले आहोत. या परंपरेचे वारंवार स्मरण करून, तिला समृद्ध करत भारताला एकतेच्या सूत्रात बांधण्यासाठी आपण सद्भावनेच्या या सेतूला जितके मजबूत करू, तितके उत्तम! अशाच प्रकारे, जर व्यक्तीच्या जीवनात सामर्थ्य नसेल तर राष्ट्र सामर्थ्यवान कसे बनेल? एकविसावे शतक आशियाचे शतक आहे, असे आपण म्हणतो, पण हे शतक भारताचे शतक बनू शकते. कसे? तर जेव्हा आपण खऱ्या अर्थाने आपल्या युवा शक्तीचे सामर्थ्य ओळखू शकू तेव्हा! जेव्हा या शक्तीला आपण आपल्या विकासाच्या प्रवासात आणू आणि विकासाची नवनवी शिखरे गाठताना या युवाशक्तीला त्याचे भागीदार बनवू तेव्हा, आणि तेव्हाच आपण आपल्या राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करू शकू. अनेक मार्ग आहेत, त्यातला एक मार्ग आहे, कौशल्य! कौशल्य विकास! आपल्या देशातील तरुणाच्या हातात केवळ कागद पेन असेल तर देश पुढे नाही जाऊ शकणार. अपार ज्ञानाचे भांडार आणि कागद-लेखणीची शक्ती तर आवश्यक आहेच, मात्र पूर्ण देशाची प्रगती करायची असेल, तर कौशल्य हवे, कला हवी, आजच्या बदलत्या काळात जिथे तंत्रज्ञान एक महत्वाची भूमिका बजावते आहे, तिथे भारतात उत्पादनाचे मोठे केंद्र बनण्याची क्षमता आहे. आणि ही क्षमता, यासाठी नाही, की आपल्याकडे उत्पादनाला लागणारा कच्चा माल आहे, किंवा बाजारपेठ आहे, ती आपली गरज आहे. याचे पहिले कारण आहे की आपल्या देशातील युवकांकडे कौशल्य असेल, कला असेल, तर ती आपली खूप मोठी ताकद आहे. आणि म्हणूनच आमच्या सरकारने कौशल्याला अतिशय महत्त्व दिले आहे.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कौशल्य विकासासाठी एक वेगळे मंत्रालय बनवले गेले. कौशल्य विकासासाठी वेगळे धोरण आणि निधी दिला. आमचा असा प्रयत्न आहे की कौशल्य विकासाचे एक विस्तृत जाळे देशभर बनवावे, ज्यामुळे देशातल्या प्रत्येक गरीब, अशिक्षित व्यक्तीला, ज्‍याला काही शिकायची इच्छा आहे, त्याला ते शिकायची संधी मिळावी. त्याच्या हातात काही कौशल्य असावे, यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ रमन सिंह यांनी तर कौशल्य विकासाला एका अधिकाराच्या रूपाने विकसित केले आहे. यासाठी त्यांनी कायदेशीर तरतूद केली आहे. गेल्या वेळी जेव्हा मी छत्तीसगडला गेलो होते, तेव्हा त्यांनी कौशल्य विकासाच्या क्षेत्रात केलेले काम मी स्वतः बघितले. ज्या भागात नक्षलवादी युवकांना भरकटवण्याचे प्रयत्न करत आहेत, त्याच भागात त्यांच्या छातीवर बसून कौशल्य विकासाच्या आधारे युवकांच्या स्वप्नांना पंख देण्याचे काम छत्तीसगड मध्ये सुरु आहे. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. जर तुम्ही छत्तीसगडला गेलात तर युवकांच्या विकासासाठी तिथे सुरु असलेली कामे तुमच्या लक्षात येतील

मला हेच तुम्हाला सांगायचे आहे, की आपण कौशल्य विकासाच्या मदतीने देशाची प्रगती कशी करू शकू. आणखी एक गोष्ट मला देशातील युवकांना सांगायची आहे. दुर्दैवाने आपल्या देशात लोकांची मानसिकता अशी आहे की बुद्धीचे काम हे श्रेष्ठ काम, महत्वाचे काम आणि हाताचे, कष्टाचे काम हे कमी दर्जाचे काम. ही मानसिकता आपल्याला बदलावी लागणार आहे आपण आपल्या आईचा सन्मान करतो, आदर करतो, मात्र खूप कमी जणांच्या आईला बुद्धीचे काम करण्याची संधी मिळाली असेल. बाकी आपल्यासारखे अनेक लोक असे आहेत की ज्यांची आई कपडे धुणे, स्वयंपाक, केरवारे अशी कामे रोज करते, त्याच आईचा आपण आदर करतो, तिला मानसन्मान देतो. मात्र बाहेरच्या जगात जर कोणी हीच कामे करत असेल तर आपण ती हलकी कामे समजतो. चांगले कपडे घालून टेबल खुर्चीवर बसलेला बाबू आपल्याला मोठा वाटतो, मात्र रिक्षाचालक आपल्याला कमी दर्जाचा वाटतो. प्लंबर, मेकॅनिक, वायरमन, अशी कामे करणारे लोक आपल्याला कमी दर्जाचे वाटतात. ही मानसिकता आपण आधी बदलायला हवी.

त्यांच्याविषयी आदराची भावना जागृत करायला हवी. आणि हा आदर तेव्हाच वाटेल जेव्हा त्या कामांकडे आपण समानतेने बघू.

समभाव असले तिथे सद्भाव आपोआपच निर्माण होईल. माझ्यात आणि त्याच्यात काही अंतर नाही, हे भाव आपल्या मनात यायला हवेत, तरच आपल्याकडे प्रचलित व्हाईट कॉलर जॉब, ब्लू कॉलर जॉब अशी वर्गवारी होणार नाही. जो आपल्या पायांवर उभा आहे, जो आपल्या मनगटाच्या बळावर आपले आयुष्य घडवतो आहे, ज्याच्या बोटात नवनिर्माणाची ताकद आहे त्याचा गौरव करण्यासाठी आणखी कशाची गरज आहे? आणि म्हणूनच आम्ही कौशल्य विकासावर भर देत आहोत, आपल्या समाजाची मानसिकता बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे.

कुठलेच काम छोटे नसते. आणि हेच ठसवण्यासाठी आम्ही एक चळवळ सुरु केली आहे, श्रम एव जयते. श्रमाचा सन्मान!

आपल्याकडे अशी मानसिकता आहे, की जोवर मुलगा कमीतकमी पदवीधर होत नाही, तो पर्यंत त्याच्या आईवडिलानांही चारचौघात त्याची ओळख करून देण्याचा संकोच वाटतो. त्यांना वाटते की पदवीधर होणे अतिशय गरजेचे आहे. मात्र सातवी पास, किंवा दहावी पास मुलगा जर तंत्रशिक्षण घेऊन तंत्रकौशल्यात निपुण झाला तरीही आईवडिलांना त्याची ओळख करुन देण्यात संकोच वाटतो. त्यामुळेच पदवीधर होणे म्हणजेच सर्वकाही अशी चुकीची मानसिकता रुजली गेली आहे. मात्र आपल्याकडे पदवी असेल, आणि आपण बेरोजगार असू, तर अशा शिक्षणाला काय अर्थ आहे? शिक्षण कमी असले तरी आपल्या हातात कौशल्य असले पाहिजे आणि स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी कमाविण्याची ताकद असली पाहिजे. समाजात हा बदल आम्हाला अपेक्षित आहे, आणि त्यासाठी आम्ही युवकांना अधिकाधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत. विकासाचा माझा सरळ साधा अर्थ आहे. देशातल्या गरीबाच्या आयुष्यात बदल, भारताच्या ग्रामीण जनतेच्या आयुष्यात बदल! गावात उत्तम शिक्षण मिळेल, चांगले शिक्षक मिळतील, रुग्णालय असेल , वृद्धांना स्‍वस्त आणि चांगल्या आरोग्यसेवा मिळतील, चांगली घरे असतील, रस्ते चांगले असतील, पिण्याचे शुद्ध पाणी असेल…. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष होऊनही आपण या मूलभूत गोष्टी देऊ शकलेलो नाही. या सर्व गोष्टींची पूर्तता करणे आपली जबाबदारी आहे, आणि हाच खरा विकास आहे. आपण किती मोठ्या इमारती उभारतो, किती बंगले बांधतो, किती बाबू तयार करतो यावर देशाचा विकास ठरत नाही. आमचे विकासाचे मॉडेल हे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवणारे मॉडेल आहे. त्यासाठी आम्ही कोशल्यविकासावर भर दिला आहे.

येत्या काही दिवसात म्हणजेच १६ जानेवारीला आम्ही एक कार्यक्रम सुरु करतो आहोत. ‘स्टार्ट अप इंडिया- स्टँड अप इंडिया”. आपल्या देशातील युवक खूप कल्पक आहेत, त्यांच्याजवळ स्वतःचा विचार आहे, समस्या सोडवण्यासाठी ते स्वतःचे मार्ग स्वतःच शोधून काढतात. तुम्ही पाहिले असेल, शेतात काम करणारे लोक सुद्धा आपल्या कामासाठी आवश्यक तंत्रज्ञान शोधून काढतात आणि आपली कामे सोपी करतात. आपली साधी मोटार सायकलच घ्या ना, गावातले लोक त्या मोटारसायकलचे दहा उपयोग करतात, त्याचे मार्ग शोधून काढतात. याचा अर्थ भारतात संशोधनाची, कल्पकतेची कमतरता मुळीच नाही. अनेक नवनव्या गोष्टी तयार करण्याची शक्ती त्यांच्यात आहे. मात्र या कल्पकतेला, प्रतिष्ठेची, पुरस्काराची आणि पैशाची जोड मिळायला हवी, त्यांना आयुष्याचा मार्ग सापडायला हवा, यासाठी सरकार गांभीर्याने विचार करत आहे, आणि म्हणूनच आम्ही ही योजना सुरु करतो आहोत. १६ जानेवारीला जेव्हा हा कार्यक्रम होईल तेव्हा तुम्ही सगळे व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. कौशल्यविकासाचा पुढचा टप्पा स्टार्ट अप इंडिया हा आहे.

त्यासोबत, सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु केली आहे. आपल्या देशात असे अनेक लोक आहेत, ज्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे, मात्र पैशाअभावी ते आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत, त्याना बँकेकडून कर्ज मिळू शकत नाही, अशा लोकांसाठी आम्ही ही योजना आणली आहे, आम्ही त्यांच्यासाठी बँकेचे दरवाजे उघडे केलेत.

मुद्रा योजनेच्या माध्यमातून बँकेकडून अशा तरुणांना आता कर्ज मिळायला लागले आहे. अतिशय कमी वेळात तयार झालेल्या या योजनेंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी लोकांना कर्ज मिळाले आहे, तेही काहीही तारण न ठेवता, सुमारे ८० कोटी रुपये युवकांना हातात मिळाले आहेत. तरुणांवर माझा पूर्ण विश्वास आहे, युवा शक्तीवर विश्वास आहे, देशाची स्वप्न या युवकांच्या मनात वसतात, त्यामुळे मी त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ इच्छितो. ज्या लोकांना काही करण्याची इच्छा आहे, त्यांनी नोकरी शोधत का बसावे? ते आपल्या पायावर उभे राहू शकतात. माझ्या देशातील तरुणांनी केवळ नोकरी शोधत बसावे, अशी माझी इच्छा नाही. उलट त्यांनी स्वतःच्या व्यवसायाच्या माध्यमातून इतरांना नोकरी देण्याचा प्रयत्न करावा. मी रोजगारासाठी तडफडणारा नाही, तर रोजगार देणारा तरुण शोधतो आहे. जर तुम्ही असे स्वप्न घेऊन पुढे गेलात, तर तुम्हाला मार्ग नक्की सापडेल. आणि मी तुम्हाला ग्वाही देतो की या स्वयंउद्योजकतेच्या मार्गावर मी तुमच्यासोबत आहे, सरकार तुमच्या सोबत आहे, इतकेच नाही, तर सगळा देश तुमच्या सोबत आहे. तुम्ही एकदा ही वाटचाल सुरु तर करा.. आणि यासाठीच कौशल्यविकासाचे, स्टार्ट अप इंडियाचे, मुद्रा योजनेचे वेगळे महत्त्व आहे.

आम्ही देशात एक स्वच्छता अभियान सुरु केले आहे. १५ ऑगस्टला मी लाल किल्यावरुन केलेल्या भाषणात या अभियानाची घोषणा केली होती. मात्र मी आज अतिशय आनंदाने सांगू शकतो की, हे आता केवळ माझे अभियान राहिलेले नाही, संपूर्ण देशाने उत्साहात सुरु केलेली ती एक चळवळ बनली आहे. या चळवळीत प्रत्येकाला काहीतरी सहभाग द्यायचा आहे. मी मध्ये असा विचार मांडला की, येत्या २६ जानेवारीला आपण देशभरातल्या महापुरुषांच्या स्मारकांची, पुतळ्यांची स्वच्छता केली तर? आणि मला असे कळले आहे, देशभरातल्या अनेक तरुणांनी या विचाराला उत्तम प्रतिसाद देत स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. शाळा, महाविद्यालये, अनेक स्वयंसेवी संस्था, नेहरू युवा केंद्र, एनसीसी, एन एस एस अशा सर्व संघटनाचे तरुण पुढे सरसावले आहेत. काही जण, तर २६ जानेवारीची वाट न बघता, आधीच स्वच्छतेचे काम सुरु केले आहे. पूर्वी आपण फक्त अशा अस्वच्छतेवर टीका करायचो, आता मात्र हा कचरा, अस्वच्छता दूर करण्यासाठी आपण स्वतःच प्रयत्न करतोय, हा एक सकारात्मक बदल आहे. नेहरू युवा केंद्र आणि एन एस एस ने ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे, आणि त्यांना त्यात यश मिळेल असा मला विश्वास आहे.

आपण गेल्या २० वर्षांपासून युवा दिनाच्या निमित्ताने हे संमेलन भरवतो आहोत, माझी तुम्हाला सर्वाना अशी विनंती आहे, की आज इथून २०१९ पर्यंत पूर्ण करण्यासाठीच एक संकल्प सोबत घेऊन जा. २०१९ यासाठी, की त्या वर्षी महात्मा गांधींची १५० वी जयंती आहे. गांधीजींना स्वच्छता खूप प्रिय होती. आपण २०१९ पर्यंतचे एक टाईमटेबल बनवू शकतो का? आपण दर महिन्यात याचा आढावा घेऊ शकतो, त्यानुसार संकल्प निश्चित करू शकतो, एक योजना बनवून तिच्या अंमलबजावणीचा आराखडा तयार करू शकतो. आणि दुसरे स्वप्न २०२२ सालासाठीचे आपण मनात ठेवू शकतो. २०२२ साली भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. ही पंचाहत्तरी आपण कशी साजरी करणार? काय काम करणार याचा विचार करा, आणि त्यानुसार कृतीलाही सुरुवात करा. जेव्हा तुम्ही रायपूर मधून बाहेर पडाल, तेव्हा मनात ही दोन्ही स्वप्ने पूर्ण करण्याचा संकल्प करा. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी एक आराखडा बनवा, त्यासाठी तुम्ही किती वेळा देऊ शकला हे निश्चित करा.

एका गोष्टीसाठी मला देशातील तरुणांचे आभार मानायचे आहेत. आजच्या कार्यक्रमासाठी मी युवकांना नरेंद्र मोदी अॅपवर सूचना पाठवण्याची विनंती केली होती. आणि या विनंतीला भरघोस प्रतिसाद देत देशभरातील तरुणांनी अगदी कानाकोपऱ्यातून मला हजारो सूचना पाठवल्या. आपल्या देशातील तरुण खूप जागरुक आहेत आणि या तरूणाईशी थेट संवाद साधण्यासाठी नरेंद्र मोदी अॅप हे मला मिळालेले उत्तम आणि सरळ माध्यम आहे. सर्व युवकांनी वेळात वेळ काढून मला ज्या सूचना पाठवल्या त्याबद्दल मी त्या सर्वांचा आभारी आहे.

२६ जानेवारीसाठी मी देशातील लोकांसाठी एक विषय ठेवला आहे. त्या विषयावर चर्चा व्हावी. अधिकार आणि कर्तव्य, भारतीय संविधानाने आपल्याला या दोन जबाबदाऱ्या दिल्या आहेत. मात्र स्वातंत्र्यानंतर सर्वानी केवळ अधिकारांना प्राधान्य दिले, कर्तव्याची जाण केवळ व्यक्तिगत आयुष्यापुरती मर्यादित राहिली, सामाजिक आयुष्यातली कर्तव्ये लोक विसरून गेली. कर्तव्य हा सामाजिक स्वभाव व्हायला हवा. केवळ काही लोकांनाच आपली सामाजिक कर्त्यव्य पार पाडण्याची जाणीव असेल आणि इतरांना ती नसेल, तर असा देश चालू शकत नाही. देशातील सव्वा कोटी जनतेला आपल्या कर्तव्यांची जाणीव असली पाहिजे. जर ती असेल, तर प्रत्येकाच्या अधिकारांचे संरक्षण आपोआप होईल. मी मन की बात मध्ये या गोष्टीचा उल्लेख केला होता, त्यानंतर अनेकांनी या विषयावर चर्चा सुरु केली, विचार मांडले. तुम्ही सुध्दा या विषयावर चर्चा करा अशी माझी विनंती आहे, अपेक्षा आहे.

छतीसगढचे प्रेम, पाहुणचार तुम्हा सर्वाना नेहमीच स्मरणात राहील. छत्‍तीसगढ़ मध्ये खूप दिवस राहण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्यच आहे. त्यांची स्वागताची परंपरा मला चांगली माहिती आहे, मात्र माझ्या जबाबदाऱ्यांमुळे मला या पाहुणचाराचा आनंद घेता येणार नाही, मनाने मात्र मी तुमच्या सोबतच असेन. तुम्हाला या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही बघा, या कठीण आणि धोकादायक परिस्थितीत इथले लोक कसे आयुष्य घालवतात. गेल्या काही वर्षांपासून छत्‍तीसगढ़ नक्षलवादाने ग्रस्त आहे. म्हणूनच मी तरुणांना आवाहन करतो की तुमच्या हातात कौशल्य असू द्या, बंदूक घेऊन कुणाची हत्या करण्यासाठी कधीही हात उचलू नका. या नक्षल संकटातही इथल्या युवकांनी छत्‍तीसगढ़चा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे, आपल्या राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेले आहे. संकटातूनही आपले संकल्प तडीस नेता येतात, विकासाचा मार्ग गाठता येतो, याचे मूर्तिमंत उदाहरण आपल्याला छत्‍तीसगढ़ मध्ये बघायला मिळेल.

पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. आपले क्रीडामंत्री श्री सोनोवाल आपल्यासोबत आहेत, खूप उत्साही आहेत ते. त्यांच्या सहवासाचा तुम्हाला नक्की लाभ मिळेल.

सर्वांना धन्यवाद !

R. Aghor/ S. Tupe/ M. Desai