Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांसमोर दिलेले निवेदन

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांसमोर दिलेले निवेदन


तुम्हा सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ! आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. काही वेळातच माननीय राष्ट्रपती दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील.गेल्यावेळी सभागृहाचे वातावरण आपण सगळ्यांनी अनुभवले आहे. आज देशात अतिशय जागृत वातावरण आहे. प्रत्येक नागरिक देशातल्या सर्व घडामोडींकडे बारकाईने बघतो आहे. आज देशातील सर्व छोट्या मोठ्या घटना लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी अनेक यंत्रणा उपलब्ध असल्यामुळे सर्वसामान्य माणसांपर्यत सगळ्या गोष्टी सहजतेने पोहचतात. त्यामुळे ज्यांना सभागृहात विविध विषयांवर चर्चा करण्यात, वादविवाद करण्यात ज्यांना रस नसतो, त्यांच्याविषयी जनतेच्या मनात स्वाभाविकच नाराजीची भावना निर्माण होते.

आपल्या संसदेतले सर्व सन्माननीय खासदार या लोकभावनेचा विचार करत, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उपयोग अनेक मुद्यांवर विस्ताराने, सखोल चर्चा करण्यासाठी करतील अशी मी आशा करतो. सर्व खासदारांनी अभ्यास करून चर्चेत भाग घ्यावा, आपले विचार सभागृहात मांडावे, आपल्या अभ्यासाचा सरकारलाही लाभ द्यावा आणि आमच्या जवळ या सत्रात जितके काम आहे ते संसदेतील काम संपवून वेळेचा सदुपयोग करावा, अशी मी विनंती करतो. या सर्व खासदारांना नंतर आपापल्या प्रदेशात जायचे आहे. आपल्या मतदारसंघातील जनतेचा सामना करायचा आहे. त्यामुळे जर सभागृहात त्यांचा उत्तम आणि सकारात्मक व्यवहार असेल तर त्याचा लाभ त्यांना आपापल्या मतदारसंघातही होईल. जनतेमध्ये एक सकारात्मक संदेश जाईल. लोकांमध्ये खासदारांविषयी आदराची भावना निर्माण होईल.

या गोष्टीचे गांभीर्य सगळे सदस्य समजून घेतील असा मला विश्वास आहे. ‘सबका साथ-सबका विकास’ हा मंत्र घेऊन आम्ही वाटचाल करतो आहोत. आणि पुढेही आम्ही यासाठी वचनबद्ध आहोत. सभागृहातही सर्वाना सोबत घेऊन, देशाच्या विकासाचे निर्णय घेऊन आम्हाला पुढे वाटचाल करायची आहे. इथे प्रत्येक विषयावर चर्चा करण्यासाठी आम्ही केवळ तयारच नाही तर उत्सुकही आहोत. कोणत्याही चर्चेचे आम्ही खुल्या मनाने स्वागत करु. सभागृहाचे कामकाज उत्तम प्रकारे चालावे, असे मी त्यांना आवाहान करतो. संसदेतील सर्व सदस्य मिळून भावी भारताच्या निर्मितीसाठी काही ना काही तरी योगदान देण्याचा आनंद आणि आणि अभिमान आपण सगळे मिळवूया, या विचाराचे मी स्वागत करतो.

खूप खूप धन्यवाद !!

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar