Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सीआयआय-केडीनरेन भोजनाच्या वेळी पंतप्रधानांचे भाषण (11 नोव्हेंबर 2016)

सीआयआय-केडीनरेन भोजनाच्या वेळी पंतप्रधानांचे भाषण (11 नोव्हेंबर 2016)


 

या महान देशाला पुन्हा एकदा भेट देतांना मला आनंद होत आहे. इथे अनेक ओळखीचे चेहरे पाहणे हे ही खूप आनंददायी आहे. ही संधी निर्माण केल्याबद्दल मी सीआयआय आणि केडीनरेन यांना धन्यवाद देतो. तुमच्या सोबत होणारी भेट ही नेहमीच उपयुक्त असते, असे मी नेहमीच मानतो.

गेल्या अनेक वर्षात मी जपानला अनेक वेळा भेट दिली आहे. जपानचं नेतृत्व, सरकार, उद्योग आणि जपानी नागरिकांबरोबरच्या माझ्या वैयक्तिक भेटी आता जवळपास दशकाहून अधिक जुन्या आहेत.

मित्रांनो,

भारतात “जपान” हा शब्दच दर्जा, प्रमाणिकपणा, एकात्मकता आणि अत्युक्तपणा याचा मापदंड आहे.

निरंतर विकास कार्यात जपानी लोकांनी जगाचे नेतृत्व केले आहे. तसेच सामाजिक जबाबदारी आणि नितीमूल्याधारित वर्तणूक याची सखोल जाणीवही आहे.

जगाच्या इतर भागात विशेषत: आशिया आणि आफ्रिकेत विकासाच्या प्रक्रियेतील जपानच्या मोठ्या योगदानाबद्दलही आम्ही परिचित आहोत.

भारताची मूलभूत नितीमूल्यांची मूळं ही आमच्या सांस्कृतिक वारश्यात दडलेली आहेत. गौतम बुध्द आणि महात्मा गांधीच्या सत्याच्या शिकवणुकीतून त्यांना प्रेरणा मिळाली आहे.

आमची लोकशाहीची परंपरा, संपत्ती आणि नितीमत्ता या दोन्हीच्या निर्मितीवर दिलेला भर, आपली अर्थव्यवस्था अत्याधुनिक आणि भरभराटीची व्हावी याचा शोध आणि उद्यम शीलतेचा जोमदार जाणीव या माध्यमातून त्यांना पंख लाभले आहेत.

यामुळेच एकत्रित कार्य करण्यासाठी भारत आणि जपान एकमेकांना पूरक आहेत.

खरं तर,

आपल्याला एकत्र उभे ठाकण्यासाठी आपल्या भुतकाळाने प्रेरीत केले आहे.

आपला वर्तमान काळही आपल्याला एकत्र कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.

मित्रांनो,

हे 21 वे शतक आशियाचे शतक आहे, असे मी सांगत आलो आहे. आशिया जागतिक वाढीचे नवे केंद्र म्हणून उदयाला येत आहे.

निर्मिती आणि सेवा क्षेत्रात आशिया स्पर्धात्मक आहे, जागतिक नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी ते हब बनत आहे, मोठ्या हुशार मनुष्यबळाचे ते माहेरघर आहे आणि जागतिक लोकसंख्येच्या 60 टक्के असल्याने, कायम विस्तारीत होणारा बाजारही आहे.

अशियाच्या उदयात भारत आणि जपानला महत्वपूर्ण भूमिका बजावणे सुरुच ठेवावे लागेल.

विशेष सामाजिक आणि जागतिक भागीदारीतील भारत आणि जपान दरम्यानच्या दृष्टीकोनातील वाढती एकरुपता यामध्ये प्रादेशिक अर्थव्यवस्था आणि विकासाला कार्यान्वित करण्याची आणि जागतिक वाढीला चालना देण्याची क्षमता आहे.

मजबूत भारत-मजबूत जपान यामुळे केवळ आपले दोन देशच समृध्द होतील असे नाही, तर हा आशिया आणि जगासाठीही स्थिरतेचा घटक ठरेल.

मित्रांनो,

आज भारत अनेक महत्वपूर्ण बदलांच्या मार्गावर आहे. आम्ही अनेक निर्णायक पावले उचलली आहेत आणि शासन पध्दती तयार केली आहे जी भारताला आपली क्षमता जाणून घेण्यात सहाय्यभूत ठरेल. याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत.

दुर्बल आंतरराष्ट्रीय आर्थिक पार्श्वभूमीवरही, भारतातून मजबूत विकास आणि अमर्याद संधी याबाबतच वृत्त येत आहे. ह्या बातम्या आश्चर्यकारक संधी आणि भारताच्या विश्वासार्ह धोरणाबद्दल आहे.

2015 मध्ये, इतर मोठ्या अर्थव्यवस्थांपेक्षा भारतीय अर्थव्यवस्था अधिक वेगाने विकसित झाली. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने हा कल सुरुच राहील, असे मूल्यमापन केले आहे. मजूरीचा कमी दर, देशांतर्गत मोठी बाजारपेठ आणि सूक्ष्म-आर्थिक स्थिरता, यामुळे भारत हे गुंतवणुकीचे स्थान बनले आहे.

गेल्या दोन आर्थिक वर्षात आमच्याकडे, 55 अब्ज डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक झाली. ही आत्तापर्यंतची केवळ सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूकच नव्हती तर भारतातल्या थेट परदेशी गुंतवणुकीतील सर्वाधिक वाढही होती.

आज प्रत्येक मोठ्या जागतिक कंपनीचं भारत विषयक धोरण आहे आणि याला जपानी कंपन्याही अपवाद नाहीत. आज जपान भारतातील थेट परदेशी गुंतवणुकीचा चौथ्या क्रमांकाचा स्त्रोत आहे.

जपानी गुंतवणूक ही ग्रीन फिल्ड आणि ब्राऊन फिल्ड प्रकल्पामध्ये आहे, निर्मिती आणि सेवा क्षेत्रात आहे, पायाभूत सुविधा आणि विमा तसेच ई-कॉमर्स आणि समभाग क्षेत्रातही आहे.

आम्हाला अर्थातच जपानी गुंतवणुकीचा अधिक ओघ हवा आहे. यासाठी अम्ही तुमच्या चिंतांचे समाधान करण्यात कार्यरत आहोत. आणि आम्ही जपानी औद्योगिक शहरांसह विशेष यंत्रणा मजबूत करु.

जपानी पर्यटकांनी आम्ही देत असलेल्या ई-टूरीस्ट व्हिसा आणि व्हिसा ऑन अरायव्हल या सुविधांचा वापर करावा यासाठी मी प्रोत्साहन देतो.

जपानशी झालेल्या सामाजिक सुरक्षा कराराचीही अंमलबजावणी झाली आहे. दोन्ही बाजूंकडील मोठ्या संख्येने वाढणाऱ्या व्यावसायिकांसाठी ही चांगली बातमी आहे.

मित्रांनो,

भारताच्या विकासविषयक गरजा प्रचंड आहेत. आम्हाला आमची विकासविषयक प्राधान्य झपाट्याने साध्य करायची आहेत, पण तीही पर्यावरण स्नेही पध्दतीने.

– आम्हाला वेगाने रस्ते आणि रेल्वेमार्ग बांधायचे आहेत.

– आम्हाला हरित मार्गाचा अवलंब करुन खनिजे आणि हायड्रोकार्बनचे उत्खनन करायचे आहे.

– आम्हाला स्मार्ट घरे आणि नागरी सुविधा उभारायच्या आहेत.

– आम्हाला स्वच्छ ऊर्जा निर्मिती करायची आहे.

– याखेरीज भविष्यातील पायाभूत सुविधा प्रकल्प आहेत, यामध्ये मालवाहतुकीसाठी विशिष्ट कॉरीडॉर, औद्योगिक कॉरीडॉर, वेगवान रेल्वे, स्मार्ट शहरे, किनारपट्टीवरील क्षेत्र आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पांचा समावेश आहे.

जपानी उद्योगांना या सर्व क्षेत्रातून अभूतपूर्व संधी उपलब्ध आहेत. मेड इन इंडिया आणि मेड बाय जपान हे समीकरण प्रत्यक्षात उत्तमरित्या कार्य करु लागले आहे.

जपानी वाहन निर्मात्यांनी भारतात निर्मित केलेल्या गाड्या जपानमध्ये विकल्या जात आहेत. तुमच्यापैकी जे आधीच भारतात आले आहेत, त्यांचे मी आभार मानू इच्छितो तसेच त्यांचे अभिनंदन करु इच्छितो.

जे या बाबत अधिक शोध घेऊ इच्छितात, त्यांना मी ग्वाही देऊ इच्छितो की मेक इंडियाला गती देणारी आमची धोरणे आणि प्रक्रिया अधिक करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत.

मित्रांनो,

व्यवसायासाठी सुयोग्य वातावरण निर्मिती आणि गुंतवणुकीला आकर्षित करण्याला माझे सर्वाधिक प्राधान्य आहे. स्थैर्य आणि पारदर्शी नियमन हे भारतात व्यवसाय करण्यासाठीची पध्दत सुस्पष्ट करतात.

ई-गव्हर्नन्स आता केवळ कल्पनाभास राहिला नसून, मूलभूत सुविधा झाली आहे. आम्ही वस्तू आणि सेवा कराबाबत नवीन विधेयक यशस्वीरित्या मंजूर केले आहे.

नुकतीच मंजूर झालेली नादारी आणि दिवाळखोरी नियमावलीमुळे गुंतवणुकदारांना बाहेर पडणे अधिक सोपे होईल. वाणिज्य विषयक प्रकल्पांचा वेगवान निकाल लागावा यासाठी आम्ही वाणिज्य न्यायालये आणि वाणिज्य विभाग स्थापन करत आहोत.

लवाद कायद्यात सुधारणा केल्यामुळे आता लवाद प्रक्रिया अधिक वेगवान झाली आहे. यावर्षी जून मध्ये आम्ही थेट परदेशी गुंतवणूक पध्दती अधिक शिथील केले. तसेच आम्ही नव्या बौध्दिक संपदा हक्क धोरणाची घोषणाही केली.

भारत पाठपुरावा करत असलेल्या आर्थिक सुधारणांच्या नव्या दिशेचे हे द्योतक आहेत. भारताला जगातील सर्वात खुली अर्थव्यवस्था बनवणे हा माझा निश्चय आहे. आमच्या प्रयत्नांचा परिणाम जाणवू लागला असून त्याची जागतिक दखल घेतली जात आहे.

– गेल्या 2 वर्षात थेट परदेशी गुंतवणुकीच्या समभागात 52 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

– जागतिक बँकेने जारी केलेल्या 2016 च्या जागतिक अंतर्गत कामगिरी सूचकाकांत भारताने 19 स्थानांची झेप घेतली आहे.

– उद्योग सुलभता क्षेत्रातही आम्ही लक्षणीय सुधारणा केली आहे. आमच्या मानांकनात लक्षणीय वाढ झाली आहे.

– जागतिक आर्थिक व्यासपीठाच्या जागतिक स्पर्धात्मक कृती सूचकांकात 2 वर्षात भारताच्या स्थानात 32 क्रमांकांनी सुधारणा झाली आहे. भारत आता जगातल्या थेट परदेशी गुंतवणुकीच्या 10 सर्वोत्तम ठिकाणांमध्ये आहे.

मित्रांनो,

भारताला कौशल्य, आणि वेगाची गरज आहे, असे मी पूर्वीपासून स्पष्ट करत आलो आहे. या सर्व तीन क्षेत्रात जपानला महत्वपूर्ण भूमिका बजावायची आहे.

समर्पित वाहतूक कॉरीडॉर, दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरीडॉर, मेट्रो रेल्वे आणि अतिजलद रेल्वे यासारख्या आमच्या मेगा प्रकल्पांमधील जपानचा सहभाग हा वेग अधोरेखित करतो.

कौशल्य विकासाबाबतच्या हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांमुळे आमच्या प्राधान्यक्रमातील या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये आमच्या भागीदारीचा विस्तार झाला आहे. जपानचे तंत्रज्ञान आणि भारतातील मनुष्यबळ या दोन्हीचा संयोग यामुळे दोघांसाठी विजयी स्थिती निर्माण होईल, यासंदर्भात इथे उपस्थित असलेले जपानी उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातील अग्रणी माझ्याशी सहमत होईल.

तुमचे हार्डवेअर आणि आमचे सॉफ्टवेअर यांचे एकत्रिकरण हा अप्रतिम संयोग आहे, असंही मी आधीच सांगितले आहे. दोन्ही देशांनाही याचा फायदा होईल.

आपण अधिक जोमाने आणि जवळकीने हातमिळवणी करुया. चला आपण आगेकूच  करुन अधिक शक्यतांचा आणि तेजस्वी आशादायक यशाचा शोध घेऊया.

धन्यवाद,

खूप खूप आभार.

 

M.Desai/J.Patnkar/Anagha