Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय मंचावर पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलेली मते

सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय मंचावर पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलेली मते


हवामान विषयक :

याआधी केकेल्या भाषणाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण नव्या भारताचा दृष्टीकोन आणि संकल्पना स्पष्ट केली होती. ५००० वर्षांपूर्वी रचलेल्या वेदांमधल्या दाखल्यांचाही त्यांनी उल्लेख केला होता. वेदांनुसार, निसर्गाचा उपभोग घेणे योग्य आहे, मात्र निसर्ग ओरबाडून त्याचे शोषण करणे पूर्णपणे अयोग्य आहे.

तीन दिवसांपूर्वी त्यांना हा प्रश्न जर्मनीत विचारण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी उत्तर दिले की, पॅरीस करार असो अथवा नसो, भारताची परंपरा ही वसुंधरा स्वच्छ राखण्याची आहे. आमच्या पुढच्या पिढीला स्वच्छ हवा आणि स्वच्छ पर्यावरण देण्याची आमची कटिबद्धता आहे. याठिकाणी , प्रश्न हा येणाऱ्या पिढ्यांच्या भवितव्याचा असून कुठलीतरी एक बाजू घेण्याचा नाही असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

भारत-रशिया संबंध आणि चीनविषयीची मते –

गेल्या काही दशकांपूर्वी जग जसे दोन धृवांमध्ये विभागले गेले होते तशी परिस्थिती आता नाही, असे पंतप्रधान म्हणाले. जेव्हा आपण जागतिक स्तरावरच्या संबंधांविषयी चर्चा करतो, तेव्हा आपण हे समजून घेतले पाहिजे की आज सगळे जग परस्परांशी जोडलेले आहे आणि परस्परांवर अवलंबून आहे. प्रत्येक देश, इतरांशी या ना त्या कारणाने जोडलेला आहे. प्रत्येकाचे एकमेकांशी काही मतभेद नक्कीच असतील, पण त्यासोबत काही सह्कार्याचेही मुद्दे आहेत.

भारत आणि रशियादरम्यानचे संबंध आजही मजबूत असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. हे संबंध किती पुढे गेले आहेत याचा अभ्यास करण्यासाठी संपूर्ण जग सेंट पीटर्सबर्गचा जाहीरनामा काळजीपूर्वक वाचेल, तेव्हा त्याना हे निश्चित लक्षात येईल.

चीनविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, जरी दोन्ही देशांमध्ये सीमाप्रश्न असला, तरीही गेल्या ४० वर्षात, एकही गोळी सीमापार गेलेली नाही. दोन्ही देशांमधील वित्तीय संबंध विस्तारत आहेत. कोणत्याही दोन देशांमधील संबंध, तिसऱ्या भिंगाच्या दृष्टीने पाहणे योग्य नाही, असे पंतप्रधान म्हणाले. ब्रिक्स संघटनेत सर्व सदस्य देश एकत्र काम करत आहेत, ब्रिक्स बँक हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे पंतप्रधान म्हणाले.भारताचा ‘सबका साथ, सबका विकास’ या उक्तीवर विश्वास आहे. देशातल्या प्रत्येकाला या विकासपथावर घेऊन जाण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे पंतप्रधान म्हणाले.

दहशतवादाविषयी

ऐंशी आणि नव्वदच्या दशकात जगाला दहशतवादाविषयी आणि त्यापासून असलेल्या धोक्याविषयी नीटशी कल्पना नव्हती. भारत गेल्या ४० वर्षांपासून सीमापार दह्शतवादाचा बळी ठरतो आहे, त्याविषयी तक्रार करतो आहे . मात्र ९/११ च्या हल्ल्यानंतरच जगाला दहशतवादाच्या खऱ्या धोक्याची आणि त्यामागच्या भीषणतेची कल्पना आली. दहशतवादाला सीमा नसतात, हे वास्तवही तेव्हाच जगाच्या लक्षात आलं, असं पंतप्रधान म्हणाले.

आज जगातल्या सर्व मानवी शक्तींनी एकत्र येऊन जगाला दहशतवादी शक्तींपासून सोडवण्याची गरज आहे. मात्र, दुर्दैवाने गेल्या ४० वर्षात संयुक्त राष्ट्रसंघाला दहशतवादाची साधी सर्वमान्य व्याख्याही निश्चित करता आलेली नाही, अशी खंत पंतप्रधानानी व्यक्त केली. हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित करण्याचे आश्वासन रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी दिल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले.

दहशतवादी स्वतः शस्त्र तयार करू शकत नाही आणि नोटाही छापू शकत नाही, असं लक्षात आणून देत, या शक्तीना कुठलेतरी देश मदत करत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. हा प्रश्न केवळ मानवतेशी संबंधित आहे, हे जेव्हा जग लक्षात घेईल, तेव्हाच, जग दहशतवादाच्या संकटातून बाहेर पडू शकेल, असे पंतप्रधान म्हणाले.

जागतिक बाजाराविषयी :

भारताचा मुक्त अर्थव्यवस्थेवर विश्वास आहे, असे पंतप्रधान म्हणाले. जागतिक बाजारात, सर्व देश एकमेकांसोबत काहीतरी तडजोडी करत असतात. तसेच सर्वच देशांनी एकमेकांची मदत करायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पी.आई.बी./बी.गोखले, आर. अघोर