पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 जुलै 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता दूरदृश्य प्रणाली द्वारे, ‘विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम 2026’ मधील सहभागींशी संवाद साधणार आहेत.
भारतातील सीमावर्ती गावांना देशातील ‘पहिले गाव’ मानणे आणि ‘विकसित भारत’च्या प्रवासात त्यांना सक्रिय भागीदार बनवणे या पंतप्रधानांच्या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी ‘माय भारत’ द्वारे, ‘विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम’ची रचना करण्यात आली आहे.
‘विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम 2026’ चे आयोजन 4 जून ते 30 जून 2026 दरम्यान दोन टप्प्यांत करण्यात आले असून, यात लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील 74 ‘व्हायब्रंट’ (सदैव कार्यतत्पर) गावांचा समावेश होता. 3 लाखांहून अधिक तरुणांनी भाग घेतलेल्या देशभरातील ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेतून प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 400 हून अधिक तरुणांची यासाठी निवड करण्यात आली होती.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, सहभागी तरुणांनी सीमावर्ती गावांतील स्थानिक नागरिकांसोबत वास्तव्यास राहून स्वच्छता मोहीम, सरकारी योजनांविषयी जनजागृती मोहीम, युवा संमेलने, सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम, वृक्षारोपण मोहीम, मिनी मॉडेल पंचायत सिम्युलेशन (ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे प्रात्यक्षिक किंवा अनुकरण), स्थानिक कारागिरांशी संवाद आणि धोरणात्मक दृष्टीने महत्त्वाच्या संस्थांना भेटी, यासारखे उपक्रम राबवले. या कार्यक्रमाने सहभागींना भारताच्या सीमावर्ती भागातील सामाजिक-आर्थिक परिस्थिती, सांस्कृतिक वारसा आणि विकासाच्या अपेक्षांचा प्रत्यक्ष परिचय करुन दिला. तसेच समुदाय सहभाग, राष्ट्रीय एकात्मता आणि सीमावर्ती गावांचे धोरणात्मक महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत केली.
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai