Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ऊर्जा गंगा प्रकल्प, पीएनजी पाईपलाईन आणि वाराणसी-अलाहाबाद रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण इत्यादी प्रकल्पांचे भूमिपूजन केल्यानंतर पंतप्रधानांनी केलेले भाषण

ऊर्जा गंगा प्रकल्प, पीएनजी पाईपलाईन आणि वाराणसी-अलाहाबाद रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण इत्यादी प्रकल्पांचे भूमिपूजन  केल्यानंतर पंतप्रधानांनी केलेले भाषण


मला सर्वप्रथम काशीवासीयांचे आभार मानायचे आहेत, त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. जेव्हा मी टीव्हीवर पाहिले, वृत्तपत्रांमध्ये वाचले, येथील काही स्थानिक नागरिकांनी मला दूरध्वनीवरून सांगितले की आम्ही काशीवासीयांनी छोटी दिवाळी साजरी केली. २९ सप्टेंबर रोजी जेव्हा देशाच्या सैन्याने पराक्रम गाजवला तेव्हा संपूर्ण काशी प्रफुल्लित झाली. काशीवासीयांनी देशाच्या सुरक्षा दलांचे जे गुणगान केले, माता गंगेची आरती ज्याप्रकारे समर्पित केली, इथला खासदार या नात्याने तुमच्याकडून सैन्यदलाचा एवढा सन्मान झाला, गौरव झाला, त्यामुळे माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही.

 ही जी तुम्ही छोटी दिवाळी साजरी केलीत त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. कित्येक वर्षांनंतर सव्वाशे कोटी देशबांधव सैन्यदलाच्या जवानांना जाणीव करून देण्यात  यशस्वी ठरले कि तुम्ही एकटे नाही आहात, सव्वाशे कोटींचा देश तुमच्या पाठीशी आहे. आता आपण मोठी दिवाळी साजरी करणार आहोत. आम्ही आमच्या कुटुंबीयांबरोबर दिवाळी साजरी करू, आप्तस्वकीयांमध्ये आनंद साजरा करू दिवे लावू ,अंधार दूर करू, प्रकाशमान करू, सर्व काही करू, मात्र हे तेव्हाच शक्य होते, जेव्हा कुणा मातेचा सुपुत्र सीमेवर तैनात होऊन आपणा सर्वांच्या सुख-शांतीसाठी स्वतः झटत असतो.

हि छोटी दिवाळी साजरी करून तुम्ही देशाला दिशा दिलीत. मी काशीवासीयांना  उत्तर प्रदेशच्या नागरिकांना, भारतीय नागरिकांना काशीच्या धरतीवरून आवाहन  करतो कि या दिवाळीत आपण आपल्या माणसांना ज्याप्रकारे शुभेच्छा देतो . त्याच प्रकारे आपण सैन्यातील आपल्या जवानांना, आपल्या सुरक्षा दलांना, दिवाळीचा संदेश पाठवून त्यांच्याप्रती आपल्या प्रेमाची जाणीव करून देऊया. मग ते लष्करातील असो, नौदलातील असो, हवाई दलातील असो, तटरक्षक दलातील असो, इंडो-तिबेटियन दलातील असो, आसाम रायफल्समध्ये असो, सीमा सुरक्षा दलातील असो – प्रत्येक जण सव्वाशे कोटी देशबांधवांच्या सुरक्षेसाठी तैनात आहे. या दिवाळीत आपणा सर्वांकडून त्यांना एक संदेश जायला हवा.

पाठवाल ? कसा पाठवाल ?

तुम्ही तुमच्या मोबाईलवरून १९२२ क्रमांकावर मिस्ड कॉल द्या.तुम्हाला एक संदेश येईल. त्या संदेशाद्वारे तुम्ही नरेंद्र मोदी ऍप आपल्या फोनवर डाउनलोड करू शकता. त्यामध्ये सैन्यातील जवानांना संदेश पाठवण्यासाठी एक जागा आहे, त्यातून तुम्ही संदेश पाठवा. देशाच्या सुरक्षा दलांना तुमचे संदेश मिळतील.

देशाच्या सुरक्षा दलांना प्रत्येक क्षणी वाटायला हवे कि आपले तारुण्य आपण देशाच्या सेवेत घालवत आहोत , त्यामुळे देशबांधवांना आपला किती गौरव वाटतो, किती अभिमान वाटतो. त्यांना याची  क्षणाक्षणाला प्रचिती यायला हवी. केवळ बॉम्ब, बंदूक आणि गोळ्यांच्या आवाजात असणे हे पुरेसे नाही . जगभरातील अनेक देशांमध्ये, जर सैन्यातील जवान विमानाने जात असतील, रेल्वेने जात असतील आणि तिथे अन्य प्रवासी त्यांना पाहतात, तेव्हा सर्व टाळ्या वाजवून त्यांचा गौरव करतात आणि ते तिथून निघून जातात. हा सामान्य स्वभाव बनला आहे. आपल्या देशात जेव्हा विशिष्ट परिस्थिती निर्माण होते, पराक्रमाचा मुद्दा येतो, तेव्हा तर अचानक देशभक्तीचा उमाळा येतो. आणि नंतर हळूहळू सगळे थंडावते. सैन्याबरोबर,सुरक्षा दलांबरोबर एक प्रकारची आत्मीयता, गौरवपूर्ण , सन्मानजनक नाते जोडण्याची संस्कृती कायमस्वरूपी रुजायला हवी. विशिष्ट प्रसंगीच असणे पुरेसे नाही.

म्हणूनच मी यावेळी सैन्यातील जवानांना संदेश पाठवला आहे आणि देशबांधवांनाही सांगितलं आहे कि तुम्ही देखील माझ्याबरोबर या संदेशात सहभागी व्हा.

बंधू -भगिनींनो,  आज मी सर्वप्रथम या सर्व मंत्र्यांचे . त्यांच्या मंत्रालयांचे आभार मानतो कारण माझ्या संसदीय क्षेत्रात तुम्ही एवढ्या साऱ्या योजना लागू केल्यात आणि माझ्या इथल्या मतदारांच्या सोयीसाठी तुम्ही एवढी छान छान कामे केली. मी प्रथम तुमचे आभार मानतो . मी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करू इच्छितो कि तुम्ही माझा स्वभाव योग्य प्रकारे समजून प्रकल्प वेळेपूर्वी पूर्ण केलात. नाहीतर सरकारे अशी असतात कि भूमिपूजन एक सरकार करते, उदघाटन दुसऱ्या किंवा तिसऱ्या सरकारच्या नशिबी येते. सरकारे येतात, जातात, बदलतात मात्र तो दगड तिथेच पडलेला असतो.

हे असे सरकार आहे कि भूमिपूजन देखील आम्हीच करतो आणि उदघाटन देखील आम्हालाच करायचे आहे. प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण व्हायला हवेत. निर्धारित खर्चात व्हायला हवेत. शक्य झाल्यास वेळ देखील वाचला पाहिजे, पैसे देखील वाचले पाहिजेत आणि काम उत्तम व्हायला हवे. हि संस्कृती विकसित करण्याचा प्रयत्न दिल्लीमध्ये जे तुम्ही सरकार बसवले आहे, ते प्रयत्न करत आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो कि हे प्रत्येक क्षेत्रात होणार आहे.

तुम्ही पाहिले असेल, आमचे जेवढे मंत्री इथे बोलले, तुम्हाला जेवढ्या कार्यक्रमाच्या योजना सांगितल्या, त्याच बरोबरीने वेळ देखील सांगितली . कारण माझा एक आग्रह असतो, मी योजनेवर किंवा एखाद्या फाईलवर सही करतो तेव्हा विचारतो, जरा सांगा हे पूर्ण कधी करणार आहात? योजना केवळ वृत्तपत्रात छापण्यासाठी नसतात, केवळ वृत्तपत्रांमधून वाहवा मिळवण्यासाठी नसतात, योजना सर्वसामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी,कार्यान्वित करण्यासाठी असतात. आणि या सरकारचा आग्रह आहे कि आम्ही ज्या योजना आणू,  त्या लागू करून दाखवू. 

आता तुम्ही इथे पाहिलंत , सुकन्या समृद्धी योजना . ज्या दिवशी आम्ही ही योजना जाहीर केली, वृत्तपत्रांमध्ये देखील आली असेल , काही लोकांना समजले , काही लोकांना नाही समजले, आणि बातमी आली -गेली , मात्र आम्ही असे करत नाही , आम्ही मागे लागतो कि सांगा बघू, करत आहात कि नाही ? सर्व मुलींपर्यंत लाभ पोहोचत आहे कि नाही पोहोचत? मागे लागताय कि नाही लागत ? तर पहा, करत आहोत.

इथे तुम्ही पाहिलंत, मला काही कुटुंबांना गॅस सिलिंडर देण्याची संधी मिळाली. आम्हाला माहित आहे, गॅस सिलिंडर मिळवणे किती जिकिरीचे काम होते ते. शिफारस करावी लागत होती. खासदाराच्या मागेपुढे फिरावे लागत होते. मोठमोठे अधिकारीदेखील खासदारांना धरत होते, कि साहेब माझी बदली इथे झाली आहे, मी इथे आलो आहे, जरा बघा मला गॅसची जोडणी मिळाली तर, बघा ना मोठी अडचण आहे. खासदाराला २५ कुपन मिळत होती गॅसची जोडणी मिळवून देण्यासाठी.  आणि तो खासदार २५ कुपन घेऊन फिरत असायचा, त्याच्या मागे २००-२०० लोक फिरत असायचे कि साहेब, एखादे कुपन मलादेखील द्या. हे सगळे संपले. सरकार समोरून गरीबांना शोधत आहे, गरीबांचे घर शोधत आहे.

माझे स्वप्न आहे कि ३ वर्षात, आहे भारतातील गरीब कुटुंबांच्या घरात जिथे लाकडी चूल पेटते, जिथे स्वयंपाक करताना प्रत्येक मातेच्या तोंडात खूप धूर जातो, त्या मातांना धुरापासून वाचवायचे आहे. गरीबाच्या घरात गॅसची चूल पेटवायची आहे. हा प्रयत्न करत आहे.

मात्र, याचबरोबर, आज वाराणसीत गॅस पाइपलाइनच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन होत आहे . प्रत्येकाच्या घरातील स्वयंपाकघरात नळातून पाणी येते कि नाही मला माहित नाही. अजूनही घरातून बाहेर पाणी आणण्यासाठी लोकांना बहुधा जावे लागत असेल. माझा प्रयत्न आहे, आणि विशेषतः काशीच्या माता भगिनी मला आशीर्वाद द्या कि स्वयंपाक घरात नळ सुरु केल्यावर गॅस येईल, जेवण बनणे सुरु होईल. निर्धारित वेळेत शेकडो कोटी रुपये खर्चून गॅसची पाईपलाईन टाकण्याच्या दिशेने आज कामाचा शुभारंभ होत आहे.

अर्थव्यवस्थेत उर्जेला खूप महत्व असते. वायूवर आधारित अर्थव्यवस्था, खतांच्या उत्पादनात वायूची आवश्यकता असते. त्यासाठी जगदीशपूर-हल्दिया पाईपलाईनचे जे काम होते ते तर होणारच आहे मात्र त्याचबरोबर आम्ही देशातील सात शहरांमध्ये , विशेषतः पूर्वेकडील भागात पाईपलाईनद्वारे गॅस देण्याचे ठरवले आहे. ती शहरे आहेत वाराणसी, रांची, कटक, पाटणा, जमशेदपूर, भुवनेश्वर आणि कोलकाता. त्याअंतर्गत, आज माझ्या मतदारसंघातील घरांमध्ये पाईपलाईनद्वारे गॅस पोहोचवण्याच्या दिशेने काम होत आहे.

वाहतुकीतदेखील जिथे आपण पेट्रोल-डिझेल वापरून गाड्या चालवतो, आता सीएनजी वापरून गाड्या चालवू शकू. पेट्रोल-डिझेल पेक्षा सीएनजी स्वस्त देखील पडते, पर्यावरणालादेखील अनुकूल असते. येथील सुमारे २० लाख वाहने आहेत ज्यांना फायदा मिळेल, जेव्हा सीएनजीची स्टेशन तयार होतील. आणि या सातही शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाहने आहेत, त्यामुळे पर्यावरणाला खूप मोठा लाभ होईल. देशाला परदेशातून पेट्रोलियम आणावे लागते, त्यातदेखील आर्थिकदृष्ट्या देशाची बचत होईल. तर अशी एक योजना जी जनसुविधा असलेली देखील आहे आणि भावी पिढीच्या भविष्यासाठी देखील पर्यावरणाचे संरक्षण करणारी आहे.

हे माझे स्पष्ट मत आहे कि जर आपण विचार केला कि भारताचा एखादा भाग विकसित झाला तर देश पुढे जाईल तर ते शक्य नाही. देश तेव्हाच पुढे जाईल जेव्हा भारताच्या कानाकोपऱ्यात विकास होईल, विशेषतः भारताच्या पूर्वेकडील भागात विकास होईल. मग तो उत्तर प्रदेशचा पूर्वेकडील भाग असो, बिहार असो, बंगाल असो, झारखंड असो, ओदिशा असो, ईशान्येकडील भाग असो, आसाम असो -हा संपूर्ण प्रदेश आर्थिक घडामोडींचे केंद्र बनवायचे असेल तर आपल्याला अशा प्रकारच्या सुविधांशी त्याला जोडावे लागेल.

काही दिवसांपूर्वी आपण पाहिले असेल, काशीच्या संगीत विश्वाला वारसा यादीत स्थान मिळाले आहे. तो काशीसाठी गौरवाचा विषय होता. ते सर्व विद्येचे केंद्र आहे. संगीत क्षेत्रात काशीने देशाला आणि जगाला खूप काही दिले आहे. त्या ठेव्याला वारसा स्वरूपात जगात स्थान मिळाले. त्यापासूनच प्रेरणा घेऊन आज काशीचे टपाल तिकीट … आणि माझी इच्छा आहे कि काशीच्या लोकांनी आपल्या पत्रांवर काशीचेच हे टपाल तिकीट लावण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे आपोआप तुमची  स्वतःची ओळख वाढेल. एकदा का टपाल तिकीट गेले कि जगभरात पर्यटनाचे ते निमित्त ठरते. त्यामुळे एक ओळख मिळते. काशीचे गुणगान होते. आपल्या देशात खूप वर्षांपूर्वी शहरांचे टपाल तिकीट काढण्याची कल्पना समोर आली होती, मात्र ती कल्पना प्रत्यक्षात उतरली नाही. आम्ही काशीची यासाठी निवड केली. पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे आणि यामुळे आपल्या या प्राचीन शहराची एक ओळख नव्या पद्धतीने जगासमोर आणण्यात याची मदत होईल.

आज येथे शेतकऱ्यांसाठी देखील एका खूप मोठ्या महत्वपूर्ण राजा तलाव प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आहे. आपले शेतकरी शहरांच्या आजूबाजूला भाज्यांची लागवड करतात . हा राजा तलाव एक असे ठिकाण आहे जे पूर्व, पश्चिम आणि उत्तरेकडे रस्ते आणि रेल्वे जोडणीतील केंद्रबिंदू आहे. हाच तो परिसर आहे, जिथे आपले शेतकरी सर्वात जास्त भाज्या, फळे, आणि फुलांची  शेती करतात. जर त्यांना अशा प्रकारची सुविधा मिळाली आणि त्यांचे नुकसान वाचले आणि वाहतुकीची सोय झाली तर आपल्या शेतकऱ्याला सर्वात जास्त फायदा होईल. आणि हि व्यवस्था अशी आहे कि या परिसरातील शेतकऱ्यांसाठी ती खूप लाभदायक ठरेल. तो आपल्या मर्जीनुसार जेव्हा किंमत मिळेल तेव्हा माल विकू शकतो, नाही तर तोपर्यंत आपला माल सुरक्षित ठेवू शकतो. सुविधा मिळाल्या, व्यवस्था मिळाली, वाहतुकीच्या व्यवस्थेशी तो  जोडला गेला, तर शेतकरी केवळ याच परिसरात नाही तर कोलकात्यापासून दिल्लीपर्यंत कुठेही आपल्या भाज्या विकण्यासाठी पोहोचू शकतो., इथली फुलकोबी वगैरे तर खूप प्रसिद्ध आहे. इथले पदार्थ खूप स्वादिष्ट असतात. इथल्या कृषी उत्पादनांवर माता गंगेचा आशीर्वाद आहे. त्याची एक वेगळी चव आहे. तर यामुळे बाजारात त्याची एक ओळख निर्माण होईल.

आज आपल्या मनोज सिन्हा यांनी काशीला आणखी एक गौरव मिळवून दिला. टपाल विभाग आपल्याकडील खूप प्राचीन व्यवस्था आहे. जेव्हा तंत्रज्ञान आले नव्हते, पोस्टमन प्रत्येक घरात प्रतिक्षेचे कारण असायचा. पत्र येऊ दे किंवा नको, मात्र प्रत्येक कुटुंब वाट पाहत असायचे कि पोस्टमन येऊन तर गेला नाही ना? जर मुलगा बाहेरगावी राहत असेल तर दररोज पोस्टमनची आठवण काढली जायची. टपालाचे आपले एक महत्व आहे.

आधुनिक काळात आता टपालाचे स्वरूप बदलले आहे. आम्ही टपाल खात्याला बँकिंग क्षेत्रात रूपांतरित करत आहोत. पोस्ट ऑफिस बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. देशभरात आज जेवढ्या बँकांच्या शाखा आहेत, तेवढ्याच एकट्या टपाल विभागाच्या आहेत. दीड लाखांहून अधिक. ती सर्व बँकांचे कामकाज करतील. जेव्हा एक नवीन क्षेत्र निर्माण होते तेव्हा तेथील सुविधांवर एक विशेष देखरेख ठेवली जाते, कौशल्य येते, आणि परिणाम मिळतो. ते काम करण्यासाठी एक क्षेत्रीय व्यवस्था काशीच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांना जोडून बनली आहे. नवीन क्षेत्र निर्माण केले गेले आहे.

आजकाल ई-कॉमर्सचे प्रकरण खूप वाढले आहे. लोक ऑनलाईन आपल्या वस्तू खरेदी करतात. मात्र तो काळ दूर नाही जेव्हा टपाल कार्यालय डिलिव्हरीचे खूप मोठे केंद्र बनेल. आज मनरेगाचे पैसे द्यायचे आहेत, शिष्यवृत्तीचे पैसे द्यायचे आहेत, निवृत्तिवेतनाचे पैसे द्यायचे आहेत -बँकांच्या शाखा कमी आहेत. ही सुविधा वाढल्यामुळे जे वयस्कर लोक आहेत, विद्यार्थी आहेत, विधवा आहेत, त्यांना टपाल आणि बँक जोडले गेल्यामुळे या सुविधा सहज उपलब्ध होतील. यामुळे, व्यापारी वर्गाला देखील, विशेषतः छोट्या- छोट्या व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय चालवण्यासाठी एक नवीन सुविधा उपलब्ध होईल. हे काम देखील आज तुमच्यासमोर सादर करण्यात आले आहे.

रेल्वे आपल्या देशातील खूप जुनी व्यवस्था आहे. जेव्हा संसदेत रेल्वे अर्थसंकल्प मांडला जायचा, आणि रेल्वे मंत्री हजारो लाखो कोटींची घोषणा करायचे, कोणताही खासदार त्यांचे ऐकत नसायचा, मात्र जेव्हा ते म्हणायचे कि अमुक शहरापासून तमुक शहरापर्यंत एक डबा जोडला जाईल, तेव्हा तात्काळ टाळ्या वाजवायला सुरुवात करायचे. अमुक ठिकाणी थांबे दिले जातील, टाळ्या वाजायच्या. अमुक ठिकाणी नवीन गाडी धावेल, टाळ्या वाजायच्या. रेल्वे अर्थसंकल्प एवढ्यापुरताच मर्यादित राहिला कि कोणत्या खासदारांच्या कोणत्या भागात गाडी थांबणार कि नाही थांबणार, जाणार कि नाही जाणार. एवढ्यापुरती रेल्वे सीमित राहिली.

रेल्वे भारताचे एवढे मोठे जाळे आहे मात्र तिची हालचाल, रूप, रंग, ढंग मागच्या शतकातील आहे. आम्ही स्वप्न पाहिले आहे कि रेल्वेला आधुनिक बनवण्याची गरज आहे. रेल्वेचा वेग वाढवण्याची गरज आहे . रेल्वेच्या विद्युत रूपांतरची गरज आहे . गेज रूपांतर आवश्यक आहे . दूर-सुदूर प्रदेशांना जोडण्याची गरज आहे  आणि म्हणूनच एक खूप मोठी योजना, आमचे रेल्वे मंत्री सांगत होते, स्वातंत्र्यानंतर जेवढे रुपये खर्च करण्यात आले, जितके काम झाले नाही, गेल्या अडीच वर्षात आणि मागील महिन्यांमध्ये आम्ही तेवढे काम केले आहे. आणि त्याच अंतर्गत, जेव्हा हा अलाहाबाद दुहेरी मार्ग होईल, नवीन पूल होईल, वेग देखील वाढेल, व्यापारालाही लाभ होईल. एकदा अशा प्रकारचा गतिशील पायाभूत आराखडा उपलब्ध होतो, तेव्हा आर्थिक घडामोडींना देखील वेग येतो.  हा केवळ रुळांचा खेळ नाही, हा केवळ रेल्वेगाडी धावण्याचा खेळ नाही, तो संपूर्ण अर्थव्यवस्था बदलून टाकतो. या कामासाठी हे खूप महत्वाचे पाऊल आज आम्ही येथे उचलले आहे. त्याचा देखील लाभ तुम्हाला मिळणार आहे.

आज विजेसाठी देखील लोकार्पण झाले. वीज तर असते, मात्र बहुतांश लोकांना माहित नसते कि वीज प्रकल्पात वीज तयार झाल्यामुळे वीज मिळत नाही. विजेची कंपनी सुरु झाली, तारा बसवल्या तरी त्यातून वीज येत नाही. ज्याप्रमाणे पाण्याच्या प्रवाहाला पोहचवण्यासाठी बंधारा गरजेचा असतो किंवा ट्यूबवेलच्या माध्यमातून पाणी वर नेऊन टाकीत भरल्यानंतर पाणी खाली पोहोचते, त्याचप्रमाणे विजेलादेखील  अशा प्रकारच्या उप-केंद्रांची गरज असते ज्यामुळे विजेला पुढे पोहचवण्यासाठी धक्का बसतो.

हे खूप खर्चिक काम असते. मात्र उप-केंद्र नसेल तर वीज येते, जाते, कधी टीव्ही संच जाळतो, कधी मोटर जळते, कधी एसी जळतो, स्थिरता नसते. दर्जेदार वीज मिळत नाही. यासाठी पायाभूत सुविधांची गरज असते. मात्र बहुतांश सरकारांना अशा प्रकारचा खर्च करायला भीती वाटते. त्यांना वाटते, ठीक आहे, लोक चालवून घेतील , वीज आली नाही आली, ते थोडे दिवस चालवून घेतील . नाही, दर्जेदार वीज असेल तर आर्थिक विकासाचा एक खूप मोठा सरळ रस्ता तयार होतो. उद्योगपती देखील पैसे तेव्हाच लावतात, जेव्हा  दर्जेदार वीज मिळते. येते, जाते, विचारतो, करतो, झाले, नाही झाले  अशा गोष्टींनी कधी विकास होत नाही. हे जे विजेचे उप-केंद्र बसवण्यात आले आहे, ज्याचे आज उदघाटन झाले, ते दर्जेदार विजेची हमी देते.

एक प्रकारे, आज एका समारंभात सुमारे ५००० कोटी रुपयांचे काम काशीच्या धरतीला अर्पण होत आहे.

हे छोटे काम नाही. आणि मोठमोठ्या योजना मी सांगायच्या तर  आज सात योजना माझ्या काशीवासीयांसमोर लोकार्पण स्वरूपात किंवा भूमिपूजन स्वरूपात मी सादर केल्या आहेत. एक प्रकारे त्या सप्तर्षी आहेत. ज्याप्रमाणे आकाशात सप्तर्षी दिशा दाखवण्याचे काम करतात, सप्तर्षीना पाहून समुद्रात नाविक आपली दिशा ठरवतात, पूर्वीच्या काळी जंगलातून जाणारे लोक सप्तर्षीना पाहून आपला मार्ग आखतात. काशीच्या विकासाचा मार्ग तयार करणारा हा सप्तर्षी आज मला इथल्या धरतीला देण्याची संधी मिळाली आहे.

काशीचे निर्मळ  प्रेम मला मिळत आले आहे. भरपूर प्रेम मिळत आहे. मी तुमचा मनापासून खूप-खूप आभारी आहे आणि मला विश्वास आहे कि विकासाची यात्रा वेगाने संपूर्ण पूर्वेकडील भारताला बदलण्याचे काम करेल आणि काशी आपले सामर्थ्य दाखवूनच देईल या विश्वासासह तुम्हा सर्वांचे खूप-खूप धन्यवाद.‍ि

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor