Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधल्या वडोदरा इथे सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधल्या वडोदरा इथे सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन


नवी दिल्ली, 11 मे 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वडोदरा, गुजरात इथे सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन केले. वडोदरा इथल्या सरदारधाममध्ये एका प्रतिष्ठित मेळाव्याला संबोधित करताना, ज्या दिवशी सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा 75 वा वर्धापन दिन साजरा केला गेला, त्याच दिवशी शैक्षणिक संस्थांच्या उद्घाटनाचा आध्यात्मिक स्मरणाशी असलेल्या शुभ योगाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. यावेळी  डॉ. दुष्यंत आणि दक्षा पटेल संकुलाचे उद्घाटन, अध्यापन सहाय्य योजनेचा शुभारंभ तसेच अनेक शैक्षणिक प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधानांनी या विविध उपक्रमांचे वर्णन तरुणांच्या भावी करिअरसाठी ‘लाँचिंग पॅड्स’ असे केले. “काही तासांपूर्वी मी प्रभास पाटण येथे सोमनाथ अमृत महोत्सव साजरा करत होतो आणि आता आपण इथे परिवर्तन घडवणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे उद्घाटन करत आहोत, हा समन्वय वारसा आणि प्रगती एकत्रितपणे कशी पुढे जाते याचे प्रतीक आहे,” असे मोदी यांनी नमूद केले.

सरदार धामच्या 75 वर्षांच्या शैक्षणिक परंपरेचा आढावा घेताना पंतप्रधानांनी संस्थेचा विस्तार देशभर कसा झाला याचा उल्लेख केला. 2021 मधल्या आपल्या भेटीची आठवण करून देताना त्यांनी मुलींच्या वसतिगृहाच्या भूमिपूजनाचा संदर्भ दिला आणि संस्थेच्या सूरत, राजकोट, भुज, मेहसाणा आणि दिल्ली इथल्या उपस्थितीचा उल्लेख केला. अहमदाबादमधल्या निकोल परिसरात 1000 क्षमतेच्या मुलींच्या नव्या वसतिगृहाच्या भूमिपूजनाचा उल्लेख करत त्यांनी या क्षेत्रातले बदल अधोरेखित केले. “गेल्या वर्षी हजारो मुलींना इथे शिक्षणाची संधी मिळाली आणि आजचे भूमिपूजन देशभरातील मुलींसाठी शिक्षणाचा विस्तार करण्याच्या बांधिलकीचे प्रतीक आहे,” असे त्यांनी सांगितले.

समाजातल्या व्यापक परिवर्तनाच्या संदर्भात शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणा स्पष्ट करताना, सर्वंकष बदलांसाठी सरकार आणि समाज यांचे सहकार्य अत्यावश्यक आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भाषिक भेदभाव दूर करणे, अभ्यासक्रमात कौशल्य विकास आणि नवोपक्रमांचा समावेश करणे यांसारख्या अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले “बदल व्यापक आणि परिणाम दीर्घकालीन व्हावेत यासाठी समाज आणि सरकारने एकत्र काम केले पाहिजे, तसेच तरुणांना शिक्षण पूर्ण करताना प्रशिक्षणाच्या संधी मिळाल्यामुळे त्यांना दिशाहीन वाटणार नाही,” असे त्यांनी नमूद केले.

शैक्षणिक गुंतवणुकीतून निर्माण होणाऱ्या लोकसंख्यात्मक क्षमतेवर प्रकाश टाकताना आणि गुजरातच्या उद्योजकीय संस्कृतीचे कौतुक करताना पंतप्रधानांनी सांगितले की राज्यातल्या तरुणांमध्ये व्यवसायिक कौशल्य नैसर्गिकरीत्या आहे आणि ते स्टार्टअप उपक्रमांद्वारे अधिक सक्रिय होत आहे. लहान शहरांमधून स्टार्टअप्सची वाढ आणि महिलांचा वाढता सहभाग याचा त्यांनी उल्लेख केला. “पूर्वी जोखमीचे मानले जाणारे क्षेत्र आता तरुणांच्या पसंतीचे क्षेत्र बनत आहेत. आगामी काळात देशाकडे मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ असेल आणि उत्पादन क्षेत्राला मोठी गती मिळेल; क्रीडा ते अवकाश तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये गेल्या दशकात झालेला बदल याचे उदाहरण आहे,” असे त्यांनी सांगितले.

महिला मनुष्यबळाचा सहभाग हा नागरी संस्कृतीच्या प्रगतीचा मूलभूत निकष असून, गुजरातने दोन दशकांपूर्वीच हे तत्व आत्मसात होते ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केली. याच अनुषंगाने राज्याच्या लिंगभाव आधारीत सर्वसमावेशक विकास प्रारूपाचा आढावा त्यांनी मांडला.  महिलांसाठी कोट्यवधी बँक खाती उघडण्यासोबतच स्वच्छता, पाणी आणि ऊर्जेची उपलब्धता अशा सुविधा उपलब्ध करून दिला असे त्यांनी सांगितले. या उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर केलेली अंमलबजावणीही त्यांनी अधोरेखित केली. यावेळी त्यांनी मुद्रा योजनेच्या माध्यमातून घडून आलेले सक्षमीकरण आणि आयुष्मान भारत अंतर्गतच्या सुरक्षा कवच आराखड्याविषयी देखील सांगितले.  समाजमनाचा विकास हा मूलभूत पातळीवर महिलांच्या सहभागावर अवलंबून असतो हे गुजरातने ओळखले आणि त्यानुसार ठोस पावले उचलली, ज्याचा लाभ आता संपूर्ण देशाला हो असल्याचे पंतप्रधानांनी  केले.

ऐतिहासिकदृष्ट्या पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रांमध्ये महिला मनुष्यबळाच्या वाढत्या सहभागाचा उल्लेखही त्यांनी केला. यापूर्वी महिलांना ज्या पदांच्या नेतृत्वाची संधी नागकारली गेली होती, आज त्याच पदांवर मुली विराजमान होत असल्याचे ते म्हणाले. यानिमित्ताने त्यांनी  लष्कर, विमान वाहतूक आणि राजकीय क्षेत्राअंतर्गत वेगाने होत असलेल्या बदलांची प्रशंसाही केली. संसदेत नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर करण्यात राजकीय अडथळे आल्याचा संदर्भही त्यांनी मांडला. त्याचवेळी लिंगभाव समानतेच्या उद्दिष्टांप्रती आपली दृढ वचनबद्धताही त्यांनी पुन्हा व्यक्त केली. आज राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये महिला कॅडेट्स प्रशिक्षण घेत आहेत, आपल्या मुली लढाऊ विमान चालक बनत आहेत त्याचवेळी महिलांच्या राजकीय सहभागासाठीही सातत्यपूर्ण प्रयत्न सुरु आहेत ही बाब त्यांनी नमूद केली. राजकीय कारणांमुळे विधेयक मंजूर होऊ शकले नसले तरी त्याबाबतीत केंद्र सरकारची वचनबद्धता कायम असल्याचेही त्यांनी सांगितले.

सामाजिक क्षेत्रांअंतर्गत लिंगभाव सर्वसमावेशकतेच्या संधींच्या विस्ताराची जबाबदारी सरकारच्या पलिकडच्या घटकांची देखील असल्याची जाणीव त्यांनी करून दिली. यासंदर्भात सामाजिक नागरी संस्थांनाचेही तितकेच समान उत्तरदायित्व असल्याचे त्यांनी सांगितले. यादृष्टीने सरदार धाम  विशेष समर्पण भावनेने करत असलेले काम म्हणजे एक आदर्श संस्थात्मक उदाहरण असल्याचे ते म्हणाले. विविध क्षेत्रांमधील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने या संस्थेने केलेल्या सर्वसमावेशक कार्याचा त्यांनी दखलपूर्ण उल्लेखही केला. सरदार धाम ही संस्था पूर्ण निष्ठेने आपली  जबाबदारी पार पाडत असून सामाजिक परिवर्तनासाठी सातत्यपूर्णता असलेल्या संस्थात्मक वचनबद्धतेची आवश्यकता असते ही बाब ही संस्था आपल्या कृतीतून सिद्ध करत आहे, आणि याचा आपल्याला आनंद वाटतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

काळाची पावले ओळखून तितक्याच वेगाने बदलांना स्वीकारणे हे गुजरातचे सांस्कृतिक वैशिष्ट्य असल्याचे ते म्हणाले. आव्हानांचे संधीमध्ये रूपांतर करण्याची राज्याची संस्थात्मक क्षमता हीच, गुजरातच्या स्पर्धात्मकतेमागची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. गुजरातमधले समकालीन उत्पादन क्षेत्रातील परिवर्तन हे ऐतिहासिक काळापासूनच्या सातत्यपूर्णतेशी जोडलेले असल्याचे ते म्हणाले. सेमीकंडक्टर, एरोस्पेस (हवाई आणि अंतराळ क्षेत्र), प्रगत अभियांत्रिकी, हरित ऊर्जा आणि वित्तीय सेवा यांसारख्या प्रगत क्षेत्रांशी संबंधित गुजरातमधील वैविध्यपूर्णतेची माहितीही त्यांनी गेली. या सर्व बाबी म्हणजे संस्थात्मक स्वरुपाच्या स्विकारार्हतेचे गुजरातचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले. घडून येत असलेल्या बदलांनांचा संधीमध्ये रुपांतरीत करणे, नवीन शक्यतांचा अवलंब करणे आणि योग्य वेळेतच भविष्यासाठी सज्ज होणे हा गुजरातच्या कार्यसंस्कृतीचा भाग राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे गुजरातने प्रत्येक उदयोन्मुख  क्षेत्रात स्वतःची नवी ओळख निर्माण केली असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

स्वदेशी सेमीकंडक्टर उत्पादन क्षमतेची माहितीही त्यांनी दिली. समकालीन उत्पादन क्षेत्रातील परिवर्तन म्हणजे पायाभूत सुविधांच्या विकासाची प्रक्रिया असल्याचे ते म्हणाले. साणंदमध्ये उत्पादित होणाऱ्या मेड इन इंडिया सेमीकंडक्टरचा आणि केन्स सेमीकंडक्टर प्रकल्पात याआधीच प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले असल्याचा दखलपूर्ण उल्लेख त्यांनी केला. धोलेरा आणि सुरत या दोन्ही ठिकाणी प्रगतीपथावर असलेल्या नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांचीही माहिती त्यांनी दिली. पुरवठा साखळीचे केंद्रीकरण घडवून आणण्याची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षाही त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली. त्याअनुषंगानेच हे जागतिक व्यवस्थेतले प्रादेशिक केंद्र असल्याचेही ते म्हणाले. जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळीत गुजरात एक महत्त्वाचे केंद्र म्हणून स्वतःचे स्थान निर्माण करत असून, या परिवर्तनाच्या प्रक्रियेत वडोदरा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. इथे तयार झालेले मेट्रो रेल्वेचे डबे आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचत असल्याचेही त्यांनी सांगितले.

विविध क्षेत्रांशी संबंधित  वडोदराच्या उत्पादन कौशल्याविषयी देखील त्यांनी सांगितले.  अभियांत्रिकी, अवजड यंत्रसामग्री, रसायने, औषधनिर्माण आणि वीज उपकरणांच्या उत्पादनांचे एक मोठे केंद्र म्हणून हे शहर उदयाला येत असल्याचे ते म्हणाले. इथल्या उद्योग व्यवसाय पूरक पायाभूत सुविधांचा दखलपूर्ण उल्लेखही त्यांनी केला. गतिशक्ती विद्यापीठाच्या माध्यमातून वाहतूक तसेच रसद पुरवठा व्यवस्थापन क्षेत्रात केली जात असलेली व्यावसायिक तज्ञतेची सज्जता आणि इथल्या एरोस्पेस प्रकल्पांमुळे वडोदरा हे जागतिक किर्तीचे विमान निर्मिती केंद्र म्हणून उदयाला येत असल्याचे ते म्हणाले.  यामुळे या प्रदेशात सर्वसमावेशक आर्थिक परिवर्तन घडून येईल असा भविष्यवेधी अंदाज त्यांनी व्यक्त केला. वडोदरा हे अनेक क्षेत्रांतील उत्पादनांचे उर्जा केंद्र बनले असून, या शहराच्या एरोस्पेस क्षेत्रातील वाढत्या क्षमतेमुळे, वडोदरा हे जागतिक पातळीवरचे नावाजलेले विमान वाहतूक केंद्र म्हणून उदयाला येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अलिकडच्या काळात जगभारात एकाच वेळी उद्भवलेल्या विविध संकटांमुळे निर्माण झालेल्या जागतिक अस्थिरतेचा उल्लेखही त्यांनी केला. सध्याच्या अनिश्चिततेच्या अनुषंगाने समकालीन आव्हानांचा ऐतिहासिक संदर्भही त्यांनी मांडला. महामारी, आर्थिक अनिश्चितता या एकामागोमाग उद्भवलेल्या संकटांमुळे दबाव निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम आशियातील संघर्ष हे या दशकातील सर्वात मोठे संकट आहे, आणि त्या सामनाही जसा महामारीच्या काळात सामूहिक एकजुटीने केला तसाच करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यादृष्टीने सरकार व्यापक सामाजिक जबाबदारीच्या चौकटीतून या आव्हानांचा सामना करत असल्याचे के म्हणाले. कोरोना महामारीच्या संकटापासून ते जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि पश्चिम आशियातील संघर्षापर्यंत जगाला अभूतपूर्व अस्थिरतेचा सामना करवा लागत आहे, ज्याचा परिणाम प्रत्येक देशावर होतो आहे, मात्र ज्याप्रमाणे आपण एकत्रितपणे कोरोनाच्या संकटावर मात केली, त्याचप्रमाणे सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आपण या संकटावरही नक्कीच मात करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या सगळ्या परिस्थितीमुळे व्यवस्थेवर ताण येत असतानाच्या काळात सामुहिक सहभागाला हे एक अत्यावश्यक साधन बनले असल्याचे त्यांनी सांगितले, त्याचवेळी राष्ट्रीय लवचिकतेसाठी सामूहिक वचनबद्धता दाखवण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. या संकटाच्या वेळी नागरिकांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्यायला हवे असे ते म्हणाले. यादृष्टाने राष्ट्रीय संसाधनांवरील ताण कसा कमी केला पाहिजे, याची मांडणीही त्यांनी केला. कच्च्या तेलाच्या आयातीवरील भारताच्या अवलंबित्वाबद्दल त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीमुळे ऊर्जा सुरक्षा हे आजचे सर्वात मोठे आव्हान बनले आहे असे ते म्हणाले. प्रादेशिक संघर्षांमुळे जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या अस्थिरतेचा उल्लेखही त्यांनी केला. भारताच्या आयातीचा मोठा हिस्सा हा कच्च्या तेलाचा असून, हे कच्चे तेल सध्याच्या युद्धग्रस्त भागांतून येते, परिणामी सर्वत्र कच्च्या तेलाची टंचाई आणि दरवाढ असे दुहेरी संकट निर्माण झाले आहे, आणि त्यावर मात करण्यासाठी आज देशाला सार्वजनिक सहभागाच्या सामर्थ्याची गरज आहे ही बाब त्यांनी ठळकपणे अधोरेखित केली.

लहान-लहान वैयक्तिक संकल्पांच्या माध्यमातून सामूहिक कृतीचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्यासंदर्भात सविस्तर आढावा घेत, त्यांनी, कार-पुलिंग उपक्रमांसह सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याची आग्रही भूमिका मांडली. कामाच्या ठिकाणी ऑनलाईन बैठकांना प्राधान्य देणे आणि ‘वर्क-फ्रॉम-होम’च्या सुविधेद्वारे डिजिटल पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन करत, त्यांनी तंत्रज्ञानावर आधारित उपायांना, कार्यक्षमता वाढवणारे प्रमुख माध्यम म्हणून अधोरेखित केले.

“जिथे कुठे शक्य असेल तिथे मेट्रो, इलेक्ट्रिक बसेस आणि सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करून पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा; तसेच अनावश्यक इंधन वापर लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी सरकारी आणि खाजगी दोन्ही कार्यालयांनी व्हर्च्युअल बैठकांना आणि ‘वर्क-फ्रॉम-होम’च्या व्यवस्थेला प्राधान्य दिले पाहिजे,” असे आवाहन मोदी यांनी केले.

विदेशी चलनाची बचत करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. आरोग्याला होणाऱ्या फायद्यांचा हवाला देत पंतप्रधानांनी, खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचे तसेच संकटकाळात सोन्याची खरेदी पुढे ढकलण्याचे आवाहन केले. आंतरराष्ट्रीय सुट्ट्यांचे वाढते आकर्षण आणि ‘डेस्टिनेशन वेडिंग’च्या वाढत्या फॅशनमुळे देशाबाहेर जाणाऱ्या परकीय चलनाचा ओघ वाढत असल्याचे सांगून त्यांनी, विविध क्षेत्रांवर होणाऱ्या याच्या परिणामांची माहिती दिली.

“आपला देश खाद्यतेल आणि सोन्याच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च करतो, तर ‘डेस्टिनेशन वेडिंग्ज’मुळे त्या गंगाजळीचा वापर होतो जी देशाची संकटांशी लढण्याची क्षमता बळकट करू शकते; म्हणूनच जागतिक अनिश्चिततेच्या या काळात संयम बाळगणे अत्यंत आवश्यक आहे,” असे आवाहन मोदी यांनी केले.

परदेशी पर्यटनाऐवजी देशांतर्गत पर्यायांना प्राधान्य देण्याचे आवाहन करत, ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चा एक धोरणात्मक पर्यटन पर्याय म्हणून वापर करण्याचे त्यांनी सूचविले. भारतावर केंद्रित पर्यटन पद्धतींचा पुरस्कार करत, ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ एक अत्याधुनिक विवाह स्थळ होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. आर्थिक गतीमानतेला चालना देण्यासोबतच येथील उत्कृष्ट सुविधा आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करत, त्यांनी पर्यटन विकास आणि परकीय चलन वाचवण्याची गरज यांची सांगड घातली.

“आपण आपल्या सुट्ट्या भारतातच घालवणे आणि लग्नासाठी भारतीय ठिकाणांची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे, ज्यामध्ये एकट्या गुजरातमध्येच उत्कृष्ट ठिकाणे उपलब्ध आहेत; तसेच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे अप्रतिम सुविधा आहेत ज्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी अगदी योग्य आहेत आणि यामुळे आपल्या देशाचे परकीय चलन देशातच राहण्यास मदत होईल,” असे आवाहन मोदी यांनी केले.

‘व्होकल फॉर लोकल’ (स्थानिक उत्पादनांना प्राधान्य) या संकल्पनेच्या माध्यमातून विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये स्थानिकीकरणाचा आग्रह पंतप्रधानांनी धरला. स्वदेशी खते व नैसर्गिक शेतीच्या प्रसाराद्वारे कृषी क्षेत्राचा दृष्टिकोन स्पष्ट करत, डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासोबतच सौर पंपांचा वापर वाढवण्यावर त्यांनी भर दिला. यासोबतच त्यांनी पर्यावरणीय शाश्वतता आणि परकीय चलन बचतीची उद्दिष्टे यांचीही सांगड घातली.

“परदेशी वस्तूंच्या ऐवजी स्थानिक उत्पादनांचा स्वीकार करा आणि आपल्या गावातील, शहरातील तसेच देशातील उद्योजकांना सक्षम करा; विशेषतः शेतीमध्ये, परकीय चलनाची होणारी घसरण आणि पर्यावरणावरील ताण दोन्ही कमी करण्यासाठी स्वदेशी खतांना व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन द्या, सोबतच सौर पंपांचा वापर वाढवा,” असे आवाहन मोदी यांनी केले.

140 कोटी नागरिकांच्या संघटित संकल्पाला एक परिवर्तनाचे माध्यम म्हणून त्यांनी अधोरेखित केले. संकट काळातून मार्ग काढण्यासाठी सामूहिक क्षमतेवर त्यांनी विश्वास करत, देशपातळीवर एकजूट दाखवण्याच्या गरजेचा पुनरुच्चार केला. यासाठी समाजाच्या सर्व स्तरांतून व्यापक सहकार्याचे त्यांनी आवाहन केले.

“हे प्रयत्न जरी लहान वाटत असले, तरी जेव्हा 140 कोटी जनता सामूहिकपणे संकल्प करते, तेव्हा हे लहान प्रयत्नच देशाची सर्वात मोठी ताकद बनतात. या संकटाचा आपल्या प्रगतीवर किंवा विकासावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी आपण पुन्हा एकदा एकत्र आले पाहिजे; आणि मला पूर्ण विश्वास आहे की, आपण सर्वजण मिळून हे संकल्प पूर्ण करू आणि आपल्या प्रिय देशाला अधिक मजबूत करू,” असे मोदी म्हणाले.

स्वतःला प्रदान करण्यात आलेल्या ‘सरदार गौरव रत्न’ पुरस्काराबद्दल तीव्र कृतज्ञता व्यक्त करत, पंतप्रधानांनी सरदार पटेल यांच्या नावाशी जोडलेल्या या पुरस्कारासोबत येणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या जबाबदारीची जाणीव ठेवत असल्याचे सांगितले. तसेच गगाजीभाईंनी आपल्याला या कार्याशी अतिशय चतुराईने बांधून ठेवले आहे, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी आपल्या खास शैलीत केली. सरदार साहेबांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करणे आणि त्यांनी सुरू केलेले कार्य पुढे चालू ठेवणे हेच आता आपल्या जीवनाचे ध्येय बनले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जनतेकडून मिळालेले आशीर्वाद, अंगी बाणवलेले संस्कार आणि गुजरातच्या मातीतून घेतलेले धडे त्यांची ही अविचल बांधिलकी सदैव कायम राखतील, अशी ग्वाही मोदी यांनी उपस्थितांना दिली.

जागतिक स्तरावर मिळणारे सन्मान जरी आनंददायी असले, तरी आपल्या हक्काच्या लोकांकडून मिळणाऱ्या ओळखीचा आनंद काही वेगळाच असतो, या जनरल करिअप्पा यांच्या वाक्याचा त्यांनी दाखला दिला. भारताच्या वाढत्या ताकदीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळत असला, तरी हक्काच्या लोकांकडून मिळणारे आशीर्वाद देशसेवेची क्षमता अनेक पटींनी वाढवतात, असे त्यांनी नमूद केले.

संस्थेने केलेल्या या परिवर्तनकारी कार्याचा गौरव करत आणि ‘सरदार धाम’च्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करत,पंतप्रधानांनी शैक्षणिक सुविधेचा विस्तार करून राष्ट्रउभारणीत संस्थेने बजावलेल्या भूमिकेची दखल घेतली. आजच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन हे युवकांच्या सक्षमीकरणासाठीच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असल्याचे सांगून त्यांनी, आपल्या भाषणाचा समारोप केला. “मी आजच्या प्रकल्पांबद्दल मनापासून अभिनंदन करतो, जे शिक्षण आणि संधीच्या माध्यमातून देशाचे भविष्य घडवण्यासाठीच्या समाजाच्या सामूहिक बांधिलकीचे प्रतिनिधित्व करतात,” असे उद्गार मोदी यांनी काढले.

नेहा कुलकर्णी/निखिलेश चित्रे/तुषार पवार/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai